गाडगेबाबा
महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास अशी एक मोठी परंपरा महाराष्ट्रात होऊन गेली. ज्ञानेश्वरांनी रचलेल्या संतपरंपरेच्या पायावर जे विशाल देवालय उभे राहिले, ज्याचा कळस तुकोबांनी उभारला, त्या महादेवालयाच्या कळसावर फडकणारी विवेकाची पताका म्हणजे संत गाडगे महाराजांचे जीवनकार्य होय. जगाच्या इतिहासात असा महात्मा झाला नाही. पुढे व्हावयाचा नाही. 20 डिसेंबर 1956 रोजी या संत पुरुषाने जगाचा निरोप घेतला. आज त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांचे हे कृतज्ञ स्मरण... नव्या पिढीला काही शिकवणारे... काही सांगणारे... विवेकाच्या दिशेने घेऊन जाणारे!
आधुनिक काळातील संत शिरोमणी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव नावाच्या गावात झाला. झिंगराजी व सखुबाई यांच्या पोटी 13 फेब्रुवारी 1876 रोजी त्यांचा जन्म झाला. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. बाबांचे नाव डेबूजी असे ठेवण्यात आले. डेबूजी झिंगराजी जानोरकर हे त्यांचे पूर्ण नाव. झिंगराजी शेतकरी होते. शेती करून ते आपली उपजीविका करत. त्यांची परमेश्वरावर नितांत श्रद्धा होती. त्यांचे अकाली निधन झाले. वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या आईने त्यांना आपल्या माहेरी म्हणजे दापुरे या गावी आणले. गाडगेबाबांचे मामा मोठे कर्तबगार पुरुष होते. त्यांच्याकडे राहूनच डेबूजी हळूहळू मोठा होऊ लागला. सकाळी लवकर उठून प्रथम गुरांचा गोठा साफ करावा, भाकर्या खाव्यात, दुपारच्या जेवणासाठी कांदा-भाकरी सोबत घ्यावी, गुरे चरून झाल्यावर त्यांना पाणी पाजून झाडांच्या सावलीत उभे करून जेवण करावे आणि एखाद्या वृक्षाखाली ‘राम कृष्ण हरी! जय जय राम कृष्ण हरी!’ भजन गात विश्रांती घ्यावी. रात्री गावात भजन चाले, तिकडे जाऊन भजनात बसावे, असा त्यांचा बालपणीचा दिनक्रम होता. बालपणातच त्यांचे मन माणुसकीने भरून आले. आंधळे, पांगळे, लंगडे, लुळे, कुष्ठरोगी यांच्याविषयी त्यांच्या मनात कळवळा निर्माण झाला. ते त्यांच्यासाठी जे जे शक्य ते ते करू लागले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्या काळातील प्रथेनुसार डेबूजीचे लग्न करण्यात आले. पुढे सावकाराने मामांचे शेत लुबाडले. त्या धक्क्याने मामा वारले. मामाच्या माघारी सावकाराने डेबूजीस मारण्यासाठी गुंड पाठवले. पण डेबूजी अंगापिंडाने मजबूत होता. त्याने त्या गुंडांना पिटाळून लावले.
डेबूजीस एक कन्या झाली. एक पुत्ररत्न झाले.दुर्देवाने मुलगा बालपणीच मरण पावला. पुढे एका अज्ञात विभूतीच्या हाकेला ओ देत 1 फेब्रुवारी 1905 या दिवशी पहाटे तीन वाजता डेबूजी घराबाहेर पडले आणि जगाच्या संसाराला लागले. सर्वस्वाचा त्याग करून डेबूजी काटेरी मार्गाने समाजहितासाठी चालू लागले. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या, कानाला अडकवलेली बांगडी आणि एका हातात काठी, दुसर्या हातात गाडगे घेऊन गाडगेबाबा गावोगाव फिरून स्वच्छता करू लागले. सायंकाळी कीर्तन करू लागले. गाडगेबाबांचा हा वैरागी अवतार अनेकांना विचित्र वाटे. लोक त्यांना वेडा समजत. भिकारी समजत. गाडगेबाबा गावोगाव जाऊन स्वच्छता करीत. सायंकाळी तिथल्याच एखाद्या नदीकाठी, एखाद्या वृक्षाखाली, कीर्तन करीत. कीर्तन करायला त्यांना मंदिर लागत नसे.
गावस्वच्छता आणि कीर्तन या कामासोबतच त्यांनी गावागावांत विहिरी, धर्मशाळा बांधायला सुरुवात केली. कीर्तनातून विषमतेवर, जातीभेदावर आघात करत बाबा समाजाला समतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असत. त्यांची कीर्तनाची पद्धत फारच परिणामकारक होती. अधूनमधून ते विनोद करीत, प्रश्न विचारून लोकांना कीर्तनात सहभागी करून घेत. कीर्तन हे एक समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, हे त्यांनी दाखवून दिले. अंधविश्वास, परंपरागत रूढी, धर्माच्या नावावर असलेले शोषण याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. सामाजिक सुधारणा व्हावी, दारूबंदी व्हावी, सावकारशाहीचे समूळ उच्चाटन व्हावे, शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी आपली सगळी हयात खर्च केली.
गाडगेबाबा कीर्तनातून मोठी प्रभावी मांडणी करीत. भुकेल्यांना जेवण द्या... तहानलेल्यांना पाणी द्या... बेकारांना काम द्या... उघड्यानागड्यांना वस्त्रे द्या... बेघर असलेल्यांना घरे द्या... रोग्यांना औषधोपचार द्या... गरीब मुलामुलींना शिक्षण द्या... पशुपक्षी, मूक प्राण्यांना अभय द्या... हाच खरा धर्म आहे... हीच खरी ईश्वरसेवा आहे... असे ते आपल्या कीर्तनातून सांगत असत. देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका... व्यसनांच्या आहारी जाऊ नका... चोरी करू नका... सावकाराकडून कर्ज काढू नका... जातिभेद, अस्पृश्यता पाळू नका... असे ते पोटतिडकीने सांगत. संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत, पण
स्वतःबद्दल मात्र ते म्हणत, मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही.
सामाजिक प्रबोधनासोबतच गाडगेबाबांनी नाशिक, देहू, आळंदी, पंढरपूर अशा धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली. नद्यांना घाट बांधले. गोरगरिब -अपंग यांच्यासाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली. आज इतक्या वर्षानंतरसुद्धा हजारो गरजवंतांसाठी गाडगेबाबा आधार ठरलेले आहेत. हातात गाडगे घेतलेला हा माणूस आजही हजारो लोकांचा आधार आहे. सांस्कृतिक, विवेकवादी आणि प्रबोधनाचा विचार करणार्या कितीतरी पिढ्यांचा गाडगे महाराज हा मोठा सशक्त असा मानसिक आधार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गाडगेबाबा यांची 1941 च्या जुलै महिन्यात भेट घेतली तेव्हाचा प्रसंग अनेकदा सांगितला जातो. गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती, ही माहिती कळताच कायदेमंत्री असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गाडगेबाबांना भेटायचे ठरवले. गाडगेबाबा तेव्हा त्यांना म्हणाले, डॉक्टर, तुम्ही कशाला आले? तुमचे एक मिनिट महत्त्वाचे. तुमचा किती मोठा अधिकार आहे. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले, बाबा माझा अधिकार दोन दिवसांचा. खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार फार मोठा आहे. या दोन महामानवांमधील सख्य हे असे होते.
आज पुण्यतिथीनिमित्त गाडगेमहाराज यांना आपण कृतज्ञ प्रणाम करू या.
महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास अशी एक मोठी परंपरा महाराष्ट्रात होऊन गेली. ज्ञानेश्वरांनी रचलेल्या संतपरंपरेच्या पायावर जे विशाल देवालय उभे राहिले, ज्याचा कळस तुकोबांनी उभारला, त्या महादेवालयाच्या कळसावर फडकणारी विवेकाची पताका म्हणजे संत गाडगे महाराजांचे जीवनकार्य होय. जगाच्या इतिहासात असा महात्मा झाला नाही. पुढे व्हावयाचा नाही. 20 डिसेंबर 1956 रोजी या संत पुरुषाने जगाचा निरोप घेतला. आज त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांचे हे कृतज्ञ स्मरण... नव्या पिढीला काही शिकवणारे... काही सांगणारे... विवेकाच्या दिशेने घेऊन जाणारे!
आधुनिक काळातील संत शिरोमणी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव नावाच्या गावात झाला. झिंगराजी व सखुबाई यांच्या पोटी 13 फेब्रुवारी 1876 रोजी त्यांचा जन्म झाला. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. बाबांचे नाव डेबूजी असे ठेवण्यात आले. डेबूजी झिंगराजी जानोरकर हे त्यांचे पूर्ण नाव. झिंगराजी शेतकरी होते. शेती करून ते आपली उपजीविका करत. त्यांची परमेश्वरावर नितांत श्रद्धा होती. त्यांचे अकाली निधन झाले. वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या आईने त्यांना आपल्या माहेरी म्हणजे दापुरे या गावी आणले. गाडगेबाबांचे मामा मोठे कर्तबगार पुरुष होते. त्यांच्याकडे राहूनच डेबूजी हळूहळू मोठा होऊ लागला. सकाळी लवकर उठून प्रथम गुरांचा गोठा साफ करावा, भाकर्या खाव्यात, दुपारच्या जेवणासाठी कांदा-भाकरी सोबत घ्यावी, गुरे चरून झाल्यावर त्यांना पाणी पाजून झाडांच्या सावलीत उभे करून जेवण करावे आणि एखाद्या वृक्षाखाली ‘राम कृष्ण हरी! जय जय राम कृष्ण हरी!’ भजन गात विश्रांती घ्यावी. रात्री गावात भजन चाले, तिकडे जाऊन भजनात बसावे, असा त्यांचा बालपणीचा दिनक्रम होता. बालपणातच त्यांचे मन माणुसकीने भरून आले. आंधळे, पांगळे, लंगडे, लुळे, कुष्ठरोगी यांच्याविषयी त्यांच्या मनात कळवळा निर्माण झाला. ते त्यांच्यासाठी जे जे शक्य ते ते करू लागले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्या काळातील प्रथेनुसार डेबूजीचे लग्न करण्यात आले. पुढे सावकाराने मामांचे शेत लुबाडले. त्या धक्क्याने मामा वारले. मामाच्या माघारी सावकाराने डेबूजीस मारण्यासाठी गुंड पाठवले. पण डेबूजी अंगापिंडाने मजबूत होता. त्याने त्या गुंडांना पिटाळून लावले.
डेबूजीस एक कन्या झाली. एक पुत्ररत्न झाले.दुर्देवाने मुलगा बालपणीच मरण पावला. पुढे एका अज्ञात विभूतीच्या हाकेला ओ देत 1 फेब्रुवारी 1905 या दिवशी पहाटे तीन वाजता डेबूजी घराबाहेर पडले आणि जगाच्या संसाराला लागले. सर्वस्वाचा त्याग करून डेबूजी काटेरी मार्गाने समाजहितासाठी चालू लागले. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या, कानाला अडकवलेली बांगडी आणि एका हातात काठी, दुसर्या हातात गाडगे घेऊन गाडगेबाबा गावोगाव फिरून स्वच्छता करू लागले. सायंकाळी कीर्तन करू लागले. गाडगेबाबांचा हा वैरागी अवतार अनेकांना विचित्र वाटे. लोक त्यांना वेडा समजत. भिकारी समजत. गाडगेबाबा गावोगाव जाऊन स्वच्छता करीत. सायंकाळी तिथल्याच एखाद्या नदीकाठी, एखाद्या वृक्षाखाली, कीर्तन करीत. कीर्तन करायला त्यांना मंदिर लागत नसे.
गावस्वच्छता आणि कीर्तन या कामासोबतच त्यांनी गावागावांत विहिरी, धर्मशाळा बांधायला सुरुवात केली. कीर्तनातून विषमतेवर, जातीभेदावर आघात करत बाबा समाजाला समतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असत. त्यांची कीर्तनाची पद्धत फारच परिणामकारक होती. अधूनमधून ते विनोद करीत, प्रश्न विचारून लोकांना कीर्तनात सहभागी करून घेत. कीर्तन हे एक समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, हे त्यांनी दाखवून दिले. अंधविश्वास, परंपरागत रूढी, धर्माच्या नावावर असलेले शोषण याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. सामाजिक सुधारणा व्हावी, दारूबंदी व्हावी, सावकारशाहीचे समूळ उच्चाटन व्हावे, शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी आपली सगळी हयात खर्च केली.
गाडगेबाबा कीर्तनातून मोठी प्रभावी मांडणी करीत. भुकेल्यांना जेवण द्या... तहानलेल्यांना पाणी द्या... बेकारांना काम द्या... उघड्यानागड्यांना वस्त्रे द्या... बेघर असलेल्यांना घरे द्या... रोग्यांना औषधोपचार द्या... गरीब मुलामुलींना शिक्षण द्या... पशुपक्षी, मूक प्राण्यांना अभय द्या... हाच खरा धर्म आहे... हीच खरी ईश्वरसेवा आहे... असे ते आपल्या कीर्तनातून सांगत असत. देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका... व्यसनांच्या आहारी जाऊ नका... चोरी करू नका... सावकाराकडून कर्ज काढू नका... जातिभेद, अस्पृश्यता पाळू नका... असे ते पोटतिडकीने सांगत. संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत, पण
स्वतःबद्दल मात्र ते म्हणत, मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही.
सामाजिक प्रबोधनासोबतच गाडगेबाबांनी नाशिक, देहू, आळंदी, पंढरपूर अशा धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली. नद्यांना घाट बांधले. गोरगरिब -अपंग यांच्यासाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली. आज इतक्या वर्षानंतरसुद्धा हजारो गरजवंतांसाठी गाडगेबाबा आधार ठरलेले आहेत. हातात गाडगे घेतलेला हा माणूस आजही हजारो लोकांचा आधार आहे. सांस्कृतिक, विवेकवादी आणि प्रबोधनाचा विचार करणार्या कितीतरी पिढ्यांचा गाडगे महाराज हा मोठा सशक्त असा मानसिक आधार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गाडगेबाबा यांची 1941 च्या जुलै महिन्यात भेट घेतली तेव्हाचा प्रसंग अनेकदा सांगितला जातो. गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती, ही माहिती कळताच कायदेमंत्री असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गाडगेबाबांना भेटायचे ठरवले. गाडगेबाबा तेव्हा त्यांना म्हणाले, डॉक्टर, तुम्ही कशाला आले? तुमचे एक मिनिट महत्त्वाचे. तुमचा किती मोठा अधिकार आहे. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले, बाबा माझा अधिकार दोन दिवसांचा. खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार फार मोठा आहे. या दोन महामानवांमधील सख्य हे असे होते.
आज पुण्यतिथीनिमित्त गाडगेमहाराज यांना आपण कृतज्ञ प्रणाम करू या.