Tuesday, November 8, 2022

आपले गाव : पुस्तकांचे गाव होऊ शकते!

 आपले गाव : पुस्तकांचे गाव होऊ शकते!


- वैभव बळीराम चाळके 

9702723652


महाराष्ट्र सरकारच्या वतीने साताऱ्यातील भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून नावारूपाला आणलं गेले आहे. अलीकडेच या गावाला भेट दिल्यावर माझ्या असे लक्षात आले की, आपले सगळ्यांचीमेच गाव पुस्तकांचे गाव होऊ शकते आणि पर्यटकांना वाचनाचा, पुस्तक चाळण्याचा आनंद देऊन पर्यटनाला चालना देता येऊ शकते.


कसे?


पुस्तकांचं गाव म्हणजे काय हे आधी आपण पाहू या. महाराष्ट्र सरकारने राज्यात एक गाव पुस्तकांचे गाव म्हणून नावारूपास आणण्याचा संकल्प सोडला आणि महाबळेश्वरपासून साधन दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या भिलार गावची निवड केली. या गावातल्या 35 म-40 घरांत, हॉटेल रिसॉर्ट आणि शाळांमध्ये साहित्य प्रकारानुसार वेगवेगळी पुस्तक ठेवली म्हणजे एका शाळेत कवितांची पुस्तके, एका घरात कादंबऱ्या, एका रिसॉर्टमध्ये कविता असे 35 40 साहित्य प्रकार करून एकेका ठिकाणी त्या त्या प्रकारातील पुस्तके ठेवून ते गाव पुस्तकांचे गाव बनवले. आज महाराष्ट्रभरातीलच नव्हे, तर देशभरातील पर्यटक या गावाला आवर्जून भेट देतात. त्यातून पर्यटकांना तर आनंद मिळतोच, पण पर्यटन वाढीलाही हातभार लागतो. रोजगार मिळतो.


माझ्या 'शुद्धलेखनाची कार्यशाळा' आणि 'कागदाची करामत' या दोन कार्यक्रमांच्या निमित्ताने मी महाराष्ट्रभर ठिकठिकाणी फिरत असतो. या फिरतीच्या काळात मी आवर्जून त्या गावातील ग्रंथालय आणि पुस्तकाची संबंधित केंद्रांना आणि माणसांना भेटत असतो. अशाच एका भेटीत चिपळूणच्या 'आरण्यक'ला भेट दिली. तेथील छोटेखानी ग्रंथसंग्रह आणि त्यांचे उपक्रम मला खूपच आवडले. ते घर पुस्तकांच्या गावातल्या एका घरासारखे अत्यंत उत्तम पद्धतीने पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करणारे आहे.


पुस्तकाच्या गावात जाऊन तिथे राहून पुस्तके वाचता येतात, हे खरे असले तरी पुस्तकाच्या गावात येणारे पर्यटक हे बहुदा पुस्तके पाहायला येणारे आणि तिथे पुस्तके पाहिल्यावर त्यातील आवश्यक पुस्तके नंतर विकत घेऊन वाचणारे असे आहेत. तिथे जाऊन पुस्तके चाळावीत, त्यातली आवडतील ती नंतर विकत घ्यावी, असे साधारणपणे घडते. पुस्तके वाचनात आनंद आहे, तसाच पुस्तक पाहण्यात आनंद आहे एखाद्या विषयावरची एवढी पुस्तक उपलब्ध आहेत हे पाहणे हीसुद्धा एक आनंद पर्वणीच असते.


म्हणून मला वाटते, आपले प्रत्येकाचे गाव पुस्तकाचे गाव होऊ शकते. आपल्या गावाशेजारी जर एखादे पर्यटन स्थळ असेल तर तिथे येणारे लोक आवर्जून आपल्या गावात येतील. आपल्या पुस्तकाच्या घराला भेट देतील. यातून पर्यटन आणि व्यवसायांनाही चालना मिळू शकते.


यासाठी करायचे काय?


आपण आपल्या घरात एका छान कपाटात वेगवेगळ्या विषयांवरची हशे-पाचशे पुस्तके आणून ठेवावीत. हे काम खरं तर एकटा माणूसही करू शकेल; पण एकट्याने केले तर ते काम मोठे होताना अडचण येऊ शकते. त्यासाठी आपण आपल्या गावातल्या सगळ्यांनी मिळून ग्रामपंचायतीत किंवा आपल्या गावच्या शाळेत अशा प्रकारे लायब्ररी उघडली आणि सगळ्यांना सांगत राहिलो. गावाच्या बाहेर मुख्य रस्त्यावर त्याची एक पाटी लावली. जवळच्या पर्यटन स्थळावर त्याची माहिती देणार एखादा बोर्ड लावला तर पर्यटक आपल्या गावातल्या या ग्रंथालयाला भेट द्यायला नक्की येतील. त्यात आणखी एक मोठा फायदा म्हणजे आपल्या गावातल्या लोकांना, मुलांना वेगवेगळी पुस्तके पाहता येतील. वाचता येतील. त्यातून पुस्तकांचे एक आनंदी जग आहे आणि ते माणसाला शहाणे करते, हे आपल्या मुलांपर्यंतही पोहोचू शकेल. 


या सगळ्या उपक्रमाला लाखभरापेक्षा अधिक खर्च येणार नाही. आपली ग्रामपंचायत आणि आपले गावकरी मिळून आपणास खर्च सहज करू शकतो. एक लाखात आपले गाव पुस्तकाचे नाव होऊ शकते.


प्रतिसाद पाहून अशा घरांची संख्या वाढवता येईल. कवितांचे गाव, कादंबरीचे गाव अशीही सुरुवात करता येईल.


हा असा प्रयोग करणे कितीतरी गावांना सहज शक्य इहे.


पुस्तकावर प्रेम करणारा माणूस म्हणून कोणती पुस्तके निवडावी, ती कशी ठेवावी, याबाबत काही मार्गदर्शन हवे असेल तर मी आणि माझा छोटासा मित्रपरिवार आपल्यासोबत आहोत. 


महाराष्ट्रातील किती गाव या उपक्रमासाठी पुढे येतील?


असे काही करू इच्छिणाऱ्यांनी माझ्यावरील व्हाट्सअप क्रमांकावर जरूर संपर्क करा.


...

हा लेख वाचन प्रेमींना नक्की फॉरवर्ड करा. कदाचित त्यामुळे एक गाव पुस्तकमय होईल.

...