Tuesday, October 24, 2023
Monday, October 23, 2023
आकाशवाणी
(आशीष शेडगेच्या आग्रहाखातर आकाशवणीसाठी लिहिलेले लेख. हे लेख चिंतन सदरात 25 ते 28 मे 2023 या दिवशी प्रासारित झाले.
1.
मोबाईसाठी आचारसंहिता
पंचवीस तीस वर्षांपूर्वी आजच्यासारखी संवादाची साधने नव्हती. लँडलाईन आणि पीसीओचा जमाना होता. तेव्हा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी मुंबईतल्या कुठल्या कुठल्या गल्ल्यांत जावं लागायचं. वर्तमानपत्रात कार्यक्रमाची कुठेतरी जाहिरात दिसली की ती जपून ठेवावी आणि त्या दिवशी कार्यक्रमाला जावे असा त्या वेळेचा प्रघात होता. कधी पायपीट करत तर कधी बस-लोकलने प्रवास करत अशा शेकडो कार्यक्रमांना आम्हा दरवर्षी हजेरी लावत होतो. या कार्यक्रमांतून विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, शांता शेळके अशा कितीतरी ज्येष्ठ कवींना ऐकता आलं. अनेक लेखक, नाटककार, नट, संगीतकार आणि चित्रकारांना भेटता आलं. अर्थात त्यासाठी वेळ, पैसे आणि शारीरिक ताकद खर्च करावी लागली.
आता मात्र तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सारेच केवढे सोपे झाले आहे. आता तुम्हाला संदीप खरेची कविता ऐकायची असेल, रामदास फुटाणे यांची भाष्यकविता किंवा सलिल-कौशलचे गाणे त्यांच्या आवाजत एकायचे असले तर त्यांच्या क्रायकर्माची वाट पाहावी लागत नाही आणि आटापिटा करत कुठे कुठे पत्ता शोधत जावे लागत नाही. मोबाईल उघडलात की ही मंडळी क्षणार्धात तुमच्यासाठी सज्ज होऊन बसलेली दिसतात.
भीमराव पांचाळ यांचे गजल गायन, शांता शेळके यांची मुलाखत, वा. वा. पाटणकरांची जिंदादिली आणि वपु, पुल, मिरासदार अशी केवढी तरी मोठी माणसे आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये प्रकट होतात. आपल्याला हवे ते सांगू लागतात. या दृष्टीने आपण फारच मोठे भाग्यवान... तंत्रज्ञानानं आणि आपल्या मागच्या पिढीनं आपल्यावर आभाळएवढे उपकार करून ठेवले आहेत.
पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का?
हे सारं विनामूल्य मिळत असतानासुद्धा अलीकडच्या काळात आपण त्याचा उपयोग करून घेणेच विसरत चाललो आहोत. मोबाईल हाती आला की असं काही दर्जदार शोधावं... अनुभवावर ऐकावं.... पाहावं... हे आता आपल्या ध्यानीच येत नाही. एकाद्या प्रपातासारखे प्रचंड वेगानं नुसता टाईमपास करणारे व्हिडीयो आपल्यावर कोसळत राहतात आणि आपण त्यात पार भोवंडून जातो. त्यात आपला वेळ पाण्यासारखा खर्च होतो आणि बहुदा हाती काहीच येत नाही.
मुलांकडे पाहा... ती तासन्सास एकच गेम खेळत राहतात. मोठ्यांनाही याचे भान उरलेले नाही. परवा एकाने एका गेमच्या साडेपाच हजार लेवल पूर्ण केल्याचे सांगितले. निव्वळ टाईमपास....
आणखी एक गोष्ट सांगू... आपण शोधायला जातो एक आणि पाहत राहतो भलतंच असंही होतं ना... हो.. होतंच.. सगळ्या जगानं आता हे मान्य केलं आहे.
म्हणून म्हणतो... मोबईल आचारसंहिता आपण तयार करायला हवी आणि ती अंगीकारायला हवी... आणि हे काम अन्य कोणी करणार नाही. प्रत्येकाने आपापले नियम करावे आणि पाळावे... किती वेळ... काय आणि केव्हा पाहत राहायचे याचा निवाडा केला म्हणजे... सारे सोपे होऊन जाईल... रात्र ही टाईमपास करण्याची वेळ नव्हे हेही लक्षात येईल... जागरण टळतील...
गेम खेळायला मोबाईल मिलाला नाही म्हणून मुलं आत्महत्या करू लागली आहेत. प्रोढ माणसंही मोबाईल हाताशी नसेल तर अस्वस्थ होऊ लागली आहेत. ही अस्वस्थता मानसिक आजार होऊन बसली आहे. ही टोकाची वेळ जर आपल्यावर येऊ नये वाटत असले तर आताच सावध व्हायला हवं. मोबाईल दुधारी आहे... त्याची दुसरी धार फार भयंकर आहे.. तेव्हा सावध व्हा... आपली आचारसंहिता बनवा आणि पाळा!
आपली नवी पिढा आपल्याकडे आपले अनुकरण करत असते... त्यांच्यासाठी तरी आपण ही अशी आचारसंहिता करून अंगीकारायला हवी! तुम्हाला काय वाटतं? पटतंय ना...?
2.
कथेचं गारूड
परवा जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन पाहायला गेलो होतो. चित्रकारासोबत उभ्याउभ्या गप्पा रंगल्या असताना तिथे त्यांचा दुरून आलेले मित्र मला म्हणाला, तुम्ही चांगले स्टोरी टेलर आहात...
माझ्या अंगावर मूठभर मास चढलं. आपल्याला चांगल्या पद्धतीने कथा सांगता यावी हे माझं अनेक वर्षांचं स्वप्न आहे. त्यामुळे हा अभिप्राय मला फारच मोलाचा वाटला.
खरे तर सर्वांनाच कथा आवडतात. कथा सांगण्याचं कौशल्य माणसाला माणसाशी जोडून देतं. शिवाय आपण आपल्याला गवसलेलं काही मौल्यवान दुसऱ्याला देण्याची वृत्ती या कथा सांगण्यातून वाढीस लागते.
बालपणी आजी-आजोबा गोष्टी सांगत. आजी छोट्या छोट्या अफलातून गोष्टी सांगत असे. आमचं बालपण त्या गोष्टींनी समृद्ध केलं. आयुष्यभरासाठी केवढे तरी मोलाचे संदेश त्या गोष्टींनी दिले. आजीची आठवणी त्या सगळ्या गोष्टी घेऊनच येते. आजोबांनाही गोष्टी सांगायला आवडत असत. आजोबा मोठमोठ्या गोष्टी सांगत. रंगवून... समरसून सांगत...
नामदेवाने दामाजीला गुरु केले त्याची गोष्ट असू दे किंवा मग राम सीतेच्या सुटकेसाठी श्रीलंकेला चालले त्याची गोष्ट... गोष्ट हा सोहळा असे.
आता बहुतेकांच्या घरात आजी-आजोबा राहिले नाहीत. त्यामुळे मुलांना गोष्टीच ऐकायला मिळेना झाल्या. काही व्यावसायिक कंपन्यांनी डिजिटल माध्यमातून गोष्टी आणल्या पण त्या आपल्या समाजात फारशा पोहोचल्या नाहीत. आणि पुढे कधी पोहोचल्या तरी त्याला मानवी स्पर्श नाही...
लाखो वर्षांच्या मानवाच्या इतिहासात मानवीजीवनात कितीतरी बदल झाले. पण गोष्टी सांगण्याची आणि गोष्टी ऐकण्याची त्याची भूक अज्ञाप शाबूत आहे आणि अनंत काळापर्यंत तीशााबूत राहील यात शंका नाही...
मोठ्या जनसमुदायासमोर गोष्टी सांगण्याची आपल्याकडे परंपरा आहे. पूर्वी म्हणे कथेकरी गावोगाव फिरून कथा सांगत. रामायण- महाभारतापासून ते एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या घरात घडलेल्या गोष्टीपर्यंत नानाविध गोष्टी हे कथेतरी विलक्षण पद्धतीनं खुलवून सांगत असत. आमचे आजोबा सांगत, कथेकरी गावात आला की एक एक गोष्ट आठ आठ दिवस सांगत असे. गाव त्याच्या गोष्टी ऐकण्यात रमून जाई.
मला अशा एखाद्या कथेकर्याला भेटायची इच्छा आहे.
मित्रांनो, कथा आपल्याला काय काय देते? कथा आनंद देते... कथा शहाणपण देते... कथा माणसं जोडून देते... कथा मानवी भावभावनांचे व्यवस्थापन करते. साहित्यशास्त्रात ज्याला कॅथर्सिस म्हणतात ते कॅथर्सिस करून देते.... म्हणजे आपल्या भावनांचा निचरा करून आपलं मन नितळ स्वच्छ करून देते...
म्हणून तर आपल्याकडे व पु काळे पु ल देशपांडे द मा मिरासदार शंकर पाटील अशी कितीतरी मंडळी कथाकार म्हणून नावारूपाला आली....
आज आपण नाटक, चित्रपट, वेब सिरीज, मालिका या सगळ्यांमध्ये जे पाहतो ते सारे कथात्मक असते. कथा कादंबऱ्यांचा वाचक हजारोच्या संख्येने अखंड वाचत आला आहे तो कथेच्या या विलक्षण गुणांमुळे होय...
आणि म्हणूनच आपण आपल्या तरुणांना प्रौढांना आणि कथा सांगायला हव्या...
एखादा निवृत्ती घेतोय असे मला म्हणाला की मी त्याला आवर्जून आता आठवड्यातून एक दिवस शाळेत जाऊन मुलांना गोष्टी सांग असे सांगतो.
शाळेला त्याचं महत्त्व कळणार नाही किंवा शाळेला वेळ नसेल... तर एखाद्या पारावर.. एखाद्या कट्ट्यावर किंवा तुमच्या घरात.... सोसायटीचा ऑफिसमध्ये मुलं जमूमवून त्यांना गोष्टी सांगा... यात तुमचं आणि त्यांचंही सौख्य सामावलेला आहे, हे लवकरच लक्षात येईल.
3.
नवी विकृती
आजचे जग हे सोशल मीडियाचं जग आहे. शहरापासून खेड्यापर्यंत सगळीकडे इंटरनेट पोहोचल्यावर आता देशभर कोट्यवधी लोक तासनतास सोशल मीडियावर असलेले दिसतात. सोशल मीडिया ही मोठी उपयुक्त गोष्ट आहे हे आता सगळ्या जगानं मान्य केलं आहे. दस्तूरखुद्द पंतप्रधान सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी जोडलेले राहतात, यावरून या माध्यमाची ताकद सहज लक्षात यावी. तुमच्या-आमच्या आयुष्यातही या सोशल मीडियाने मोठीच गंमत आणली आहे. आपल्या जगण्याचा दर्जा सुधारण्यात हा सोशल मीडिया महत्त्वाची पायरी ठरला आहे. अर्थात हे दुधारी शस्त्र आहे हे अनेकदा सांगून झालं आहे. ते जसं चालवावं, तसं चालतं. आज तुम्ही बसल्या जागी जगभरातील तुम्हाला हव्या त्या व्यक्तींची जोडले जाऊ शकता. त्यांच्याशी संवाद करू शकता. त्यांच्याकडून मदत मिळवू शकता आणि त्यांना मदत करू शकता. सगळं जग आता तुमच्यासाठी तुमच्या मोबाईल इतकं जवळ आलं आहे. म्हणूनच तर रत्नागिरीच्या एखाद्या खेड्यात राहणारा रसिक पुण्यात राहणाऱ्या लेखकाशी क्षणात जोडला जातो. नागपूरच्या चित्रकाराचे चित्र सोलापूरच्या चित्ररसिकाला घरबसल्या पाहता येतं. अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅली पोटापाण्यासाठी गेलेला एखादा इंजिनीयर दिल्ली बंगलोरच्या एखाद्या कलावंताची अखंड जोडलेला राहतो. विविध कलांची देवाणघेवाण अत्यंत सुलभ झाली आहे. मात्र हे सारं होत असताना आपल्याला काही गोष्टींचे भान मात्र आलेले दिसत नाही.
सोशल मीडियाच्या उदयापूर्वी सर्वसामान्य माणूस त्याच्या आयुष्यभर एका वेळी जास्तीत जास्त अडीचशे माणसांची जोडलेला असायचा. म्हणजे त्याच्या लग्नात, त्याच्या दुःखप्रसंगी धावून येणारे लोक हे साधारणपणे अडीचशेच्या आसपास असायचे. सोशल मीडियानं हा संपर्क अफाट वाढवला. उभ्या आयुष्यात दुसऱ्याला कधी चहाही न पाजलेला माणूस शेजाऱ्याच्या दमडीच्या कामालाही न येणारा माणूस या सोशल मीडियामुळे पाच जार माणसांशी जोडला गेला. कोणाच्या बाबतीत ही संख्या लक्ष-दशलक्षांच्या आसपास आहे आणि त्यामुळेच माणसाला माणसांची किंमत राहिली नाही. सोशल मीडियाच्या अकाउंटवरील कमेंट सेक्शनमध्ये गेलात तर माणसं एखाद्याला सहज अपशब्द वापरतात. मला वाटत राहतं, हा माणूस जर त्या माणसाच्या समोर आला तर या भाषेत बोलेल का?
ही किमान सभ्यतेची मर्यादा आपण सोशल मीडियावर फार विसरून गेलो आहोत आणि त्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जे सोशल मीडियावर आपण वागू लागलो आहोत ते आता प्रत्यक्ष आयुष्यातही उतरायला सुरुवात झाली आहे. म्हणूनच मग वेगवेगळ्या मंडळींच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ क्लिपमध्ये अत्यंत गृणास्पद वक्तव्ये एकयला मिळतात. अलीकडे प्रत्यक्ष कार्यक्रमातसुद्धा माणसं तशीच वागू लागली आहेत की काय असेही प्रसंग समोर यायला लागले आहेत. हे अत्यंत भयानक आहे. ही समाजात रुजू पाहणारी नवी विकृती आहे. या नव्या विकृतीचा अटकाव कसा करावा हा मोठा प्रश्न आहे. आपण समाजातल्या विविध प्रश्नांवर जनजागृतीच्या मोहिमा राबवत असतो, तशी एखादी मोहीमच आता याबाबत राबवावी लागेल. तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग इतका अफाट आहे की त्या प्रगतीसोबत जुळवून घेण्यासाठी माणसाला वेळच मिळेनासा झाला आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या वापराची नीती निर्माण होईपर्यंत तंत्रज्ञान कुस बदलतं आणि माणूस भांबावून जातो. हे सारंच आपल्याला नवं आहे. या सगळ्यावर एक अस्सल शहाणपण उत्तम उपाय ठरू शकेल. त्यावर आता आपण विचार करायला हवा. हे नवतंत्रज्ञानाच्या वेगावर स्वार होण्याचं शहाणपण आपण नव्यानं विचारपूर्वक अनेकांचे विचार लक्षात घेऊन निर्माण करायला हवं. ते आपल्या नव्या पिढीत रुजवायला हवं. तरच ही नवी विकृती आपल्याला मुळासकट उपटून टाकता येईल.
4.
समाजशीलता जपू या
माणूस समाजशील प्राणी आहे, हे आपण शिकत आलेलो आहोत. तसा अनुभवही आपण घेतलेला आहे. असं असताना पुन्हा ‘समाजशीलता जपू या’ असं आवाहन करण्याची वेळ काय येते?
अलीकडेच एका प्रसंगानं हे आवाहन करण्यास प्रवृत्त केलं. तब्येतीने कुरबूर सुरू होती, म्हणून फॅमिली डॉक्टरांकडे गेलो होतो. औषधं घेऊन त्यांच्या केबिनमधून बाहेर आलो तर रक्तबंबाळ झालेला एक माणूस त्याच्या पत्नीसोबत आत शिरला. दवाखान्यात एकदम गडबड झाली. कुणी पाणी दिलं. कोणी बसायला जागा दिली. डॉक्टरांना वर्दी देण्यात आली. माणूस थरथरत होता. तरुण होता. असेल तीस-पस्तीस वर्षांचा. तो इतका घाबरला होता की मला एक क्षण वाटलं याच्या खांद्यावर थोपटून त्याला आधार द्यावा. मी त्याचा खांदा पकडला आणि कुठे लागले याची चौकशी केली. चेहऱ्यावर आणि शरीराच्या संपूर्ण पुढच्या भागावर जखमा झाल्या होत्या आणि त्यातून रक्त येत होतं. तो शुद्धीवर होता. साधारण दोन-तीन मिनिटांपूर्वी मुख्य रस्त्यावर स्कूटीवरून नवरा-बायको दोघं तोंडावर पडले होते.
डॉक्टरांनी सिटीस्कॅन करावे लागेल सांगितले. म्हणून मी त्यांना विचारले, घरून कोणाला बोलवायचे का? फोन करू का? दोघेही एकदम म्हणाले, घरी फक्त वृद्ध वडील असतात. म्हटले, एखादा शेजारी येऊ शकेल का? त्यावरही नाही म्हणाले. नातेवाईक किंवा मित्र? तसाही जवळपास कोणी नाही.
परक्या शहरात राहताना एकही शेजारी, एकही नातेवाईक आणि एकही मित्र जोडून न ठेवणारी ही माणसे आपल्याला कुणाची गरजच लागणार नाही या मस्तीत जगत असतात. मराठीतले ज्येष्ठ कथाकार सुधीर सुखटणकर यांची ‘डिंक’ नावाची कथा आहे. त्यात दोघांनी कमवू.. दोघांनी मजा करू, मूलबाळाची जबाबदारी कशाला? अशी मानसिकता असलेल्या शहरातील नवतरुणांबद्दल लिहिले आहे. ही नव्या विचारांची तरुण मंडळी अडचणीत आली म्हणजे त्यांना आधाराला कोणीही असत नाही. जुन्या पिढीला मागास ठरवणारे हे लोक जुन्यापिढीकडून त्यांच्या काही चांगल्या गोष्टी घेण्याचेही टाळतात आणि मग कठीण प्रसंगात त्यांना रडायला दोन डोळे कमी पडतात.
म्हणून म्हणतो, आपण प्रत्येकानं समाजशीलता जपायला हवी. आपल्या घरची माणसं, शेजारची माणसं, आपले नातेवाईक, आपलं मित्रमंडळ, आपले कामातले सहकारी यांच्यासोबत चांगले संबंध ठेवणं हे आयुष्य सुंदर करण्यासाठी गरजेचं आहेत, शिवाय अडचणीच्या वेळी हीच माणसं धावत येत असतात. आपण सगळ्यांसोबत सदैव चांगले वागू शकत नाही. माणसाला शत्रू असणार... शत्रुत्व हा शापच आहे... त्याला घाबरू नये. कधीतरी वैर पत्करून काही गोष्टी कराव्या लागतात. त्या जरूर कराव्यात... पण म्हणून प्रत्येकाशी शत्रुत्व घेण्याची गरज नाही. निदान जेवढे शत्रू वाढतील... तेवढे मित्र वाढवण्याची तरी आपण जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायला हवी. आपल्या चांगल्या दिवसांत वाईट दिवस असलेल्या मंडळींना आपण मदतीचा हात देऊ केला तर आपल्या वाईट दिवसांत ते हात आपल्या मदतीला येण्याची शक्यता असते. समाजशीलता जपायची ती यासाठी... आणि जर आपण आपल्यापुरते समाजशील झालो... तर सगळा समाजच सुंदर होऊन जातो, हे वेगळं सांगायला नकोच... तेव्हा मित्रांनो, आजपासून समाजशील जगण्याचा आरंभ करू या... ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत,’ हे आपण शाळेतच म्हणून ठेवलं आहे.
Wednesday, October 18, 2023
नवरूप देवी
माउली तू या जगाची
साऱ्या जगा संभाळिशी
दशभुजा तू लक्ष्मीमाते
भाविकाच्या पाठीशी
तू वरदा तू शारदा
तू सुखदायिनी माता
तू अवघ्या जगताची
अव्वल गं अभियंता...
ये शारदे वरदान दे
आरोग्य दे गं सर्वदा
तूच वैद्य आमुची
निवार सर्व आपदा...
तू सेवकाची सेविका
आधार तू या भाविका
वादळाच्या मध्यरात्री
विश्वास तू गं नाविका...
नृत्यांगणा तू आगळी
उपमा नसे तव नर्तना
दाविशी तू माऊली
नित्यनूतन विभ्रमा...
राबशी शेतात तू
अन्नपूर्णा माउली
तूच अंबे सुखावणारी
शांत शीतल सावली...
गृहलक्ष्मी तू सर्वदा
तू घराचा खांब ग
लेकरे आम्ही तुझी
तू पार्वती तो सांब गं...
तू विघ्नविनाशिनी सर्वदा
तू आदिमाता शारदा
तूच निर्मिशी भवानी
या जगाचा कायदा
नाना रूपे माते तुझी
तू जीवा आधार गं
आज तुझिया हातामधी
सर्व हे अधिकार गं...
- सुवर्णसुत 18/10/2023
Monday, October 2, 2023
संस्कृतचा नवनाट्यकर्मी प्रसाद भिडे
प्रसाद भिडे यांची दोनच शब्दांत ओळख करून द्यायची, तर ती ‘संस्कृतचा नवनाट्यकर्मी’ अशी करून देता येईल. त्यांच्या संस्कृत नाट्यशास्त्रातील कामगिरीची दखल घेत केंद्राच्या संस्कृत विद्यापीठाच्या भोपाळ येथील ‘नाट्यशास्त्र अनुसंधान केंद्रा’त अलीकडेच त्यांची ‘असोसिएट प्रोफेसर’ म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला नवा अवकाश मिळाला आहे. प्रसाद मूळचे देवगडचे. डोंबिवलीत त्यांचे बालपण गेले. वडील ‘नाट्यसंपदा’ संस्थेत होते. तो वारसा आणि शाळा-महाविद्यालयातून मिळालेले प्रोत्साहन यामुळे संस्कृतकडील त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण प्रवास सुरू झाला. १९९९ हे केंद्र सरकारने ‘संस्कृत वर्ष’ जाहीर केले होते. रुईया महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या
डॉ. मंजूषा गोखले यांनी ‘अखिल भारतीय कीर्तन महाविद्यालया’च्या संयुक्त विद्यमाने शिवाजी मंदिर नाट्यगृहात दोन संस्कृत नाटके सादर केली. त्यात प्रसाद यांना काम करण्याची संधी मिळाली. पुढे ‘युथ फेस्टिवल’मध्ये त्यांनी संस्कृत नाटक सादर करायला सुरुवात केली. त्यांनी ‘भगवदज्जुकीयम्’ हे संस्कृत प्रहसन सादर केले. या नाट्यप्रयोगाला द्वितीय पारितोषिक मिळाले. २००५ मध्ये त्यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले ‘को न याति’ हे नव्या समस्यांना नव्या पद्धतीने सामोरे जाणारे संस्कृत नाटक चांगलेच दाद मिळवून गेले. प्रभाकर भातखंडे हे प्रसाद यांचे गुरू. त्यांनी २४ नवी संस्कृत नाटके केली. गुरूचे बोट धरून प्रसाद यांनी तीन एकांकिका, तीन लघुनाटके लिहून त्याचे प्रयोग केले. नववर्षाच्या स्वागतयात्रेत चौकाचौकांत संस्कृत पथनाट्ये केली. त्यांनी लिहिलेल्या ‘देवशूनी’ या नाटकाला २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट लेखनाचा शासनाचा पुरस्कार मिळाला. याच काळात ते प्रायोगिक रंगभूमीवरही कार्यरत होते. ‘एका गुराख्याचे महाकाव्य’ हे महाकवी कालिदासाच्या जीवनावरील नाटक त्यांनी २०१३ मध्ये सादर केले. हौशी नाटक स्पर्धेत त्याला प्रथम क्रमांक मिळाला. प्रसाद यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचाही पुरस्कार मिळाला. २०१६ मध्ये या नाटकाचा अमेरिकेतही प्रयोग झाला. भारतातील तीन कलावंत आणि अमेरिकेतील सात कलावंत घेऊन ऑनलाईन तालीम करून हे नाटक सादर केले गेले.
प्रसाद यांनी आयआयटी मुंबईतून भाषाशास्त्रात पीएचडी मिळवली. नाटकांचे लेखन, दिग्दर्शन, संशोधन आणि प्रत्यक्ष अध्यापन अशी त्यांची आजवरची कारकीर्द आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी सात शोधनिबंध सादर केले आहेत. रुईया, सोमय्या महाविद्यालयांत ते प्राध्यापक होते. आता केंद्रीय संस्कृत विद्यापीठात कार्यरत झाले आहेत. भविष्यातील योजनांबद्दल प्रसाद यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. संस्कृत भाषा देशात सर्वदूर पसरलेली आहे. ज्या ज्या प्रांतात संस्कृत नाटके सादर होतात, तिथे तिथे तिथला तिथला रंग घेऊन ती सादर होतात, हे लक्षात घेऊन पुढील काळात विविध प्रांतांतील नाटक आणि लोककलांच्या माध्यमातून अभिजात संस्कृत नाटके सादर करावी, असा त्यांचा मानस आहे. यक्षगान, रामलीला या पद्धतीतून संस्कृत नाटकांचे सादरीकरण करणे, हे त्यांचे ध्येय आहे. त्यासोबतच वर्षातून एक तरी नव्या विषयावरील नवे नाटक लिहून नव्या पद्धतीने सादर करणे आणि आजच्या पिढीला संस्कृतशी जोडून घेणे हे आपले ध्येय असल्याचे ते सांगतात. अध्यापनासोबत संशोधन करताकरता साहित्यातील ‘टीका परंपरा’ पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला.
(2.10.23 रोजी दैनिक सकाळमध्ये संपादकीय पानावर प्रकाशित)