Wednesday, December 25, 2024

भारतीय कवयित्री

भारतीय कवयित्री

( सकाळ  नाममुद्रामध्ये 24 डिसेंबरला प्रकाशित झालेला लेख - वैभव चाळके)  

‘मैं जब तक आई बाहर एकांत से अपने... बदल चुका था रंग दुनिया का’ असे म्हणणाऱ्या कवयित्री गगन गिल साहित्य अकादमीच्या मानकरी ठरल्या आहेत. केवळ पाच कवितासंग्रहांनी हिंदी साहित्यात महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या, गेली साडेतीन दशके सातत्याने लिहिणाऱ्या, आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गिल यांची भारतीय कवयित्री अशी ओळख निर्माण झाली आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणे कोणत्याही साहित्यिकाने केलेल्या कामगिरीवर केलेले राष्ट्रीय पातळीवरचे शिक्कामोर्तब असते. अलीकडेच मराठीतील ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षा ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला, तेव्हाच उत्तरेकडील गगन गिल या ज्येष्ठ कवयित्रीसही ‘मैं जब तक आई बहार’ या कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने काव्यलेखन आणि गद्यलेखन करणाऱ्या गगन गिल यांचे साहित्य सर्वदूर पोहोचले आहेच; मात्र या पुरस्कारामुळे त्याचा परीघ आता आणखी विस्तारेल आणि भारतीय माणूस, त्यातही स्त्रीचा वेध घेऊ पाहणारा विचार अधिक मोठ्या समाजापर्यंत पोहोचण्यास त्याची नक्कीच मदत होणार आहे. वडिलांनी सांगितलेल्या कहाण्यांचा त्यांच्या आयुष्यावर कायमच प्रभाव पडला. वडिलांनी जर त्या कहाण्या सांगितल्या नसत्या तर मी गगन गिल झाले नसते, असे त्यांनी एकदा म्हटले आहे. आपल्या भावना नेमक्या शब्दांत पकडणे हे कवितेपुढील सर्वांत मोठे आव्हान असल्याचे त्या सांगतात.
नवी दिल्लीत राहणाऱ्या गिल यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९५९मध्ये नवी दिल्लीत झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठामधून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. गेली अनेक वर्षे त्या सातत्याने लेखन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याबरोबर अलीकडील काही वर्षे त्या इंग्रजीतील नामवंत वर्तमानपत्रात लिटरली एडिटर म्हणून कार्यरत आहेत. १९९०मध्ये लोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखन कार्यक्रमात त्या भारताच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. याशिवाय १९९२-९३मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना पत्रकारितेसाठी फेलोशिपसुद्धा मिळाली होती. त्यांच्या नावावर पाच कवितासंग्रह अहेत. देश-विदेशांतील कवितेचे रसिक आणि अभ्यासक यांनी त्यांच्या कवितांची नेहमीच प्रशंसा केली आहे. याशिवाय अमेरिका, इंग्लंड आणि जर्मन या विद्यापीठांमध्ये त्यांच्या कविता शिकवल्या गेल्या आहेत. २००२च्या जुलैमध्ये त्यांनी युनायटेड किंगडममधील मॅंचेस्टर लायब्ररीमध्ये कॉमनवेल्थमधील लेखकांसाठी लेखन कार्यशाळांची मालिकाच घेतली होती. त्यानंतर २००४ मध्ये पेनसिल्व्हेनिया आणि बर्कले विद्यापीठाने एकत्र येऊन त्यांच्या लेखनावर एक विशेष वर्कशॉप आयोजित केले होते. २००५मध्ये लंडन विद्यापीठाच्या पोएट्री ट्रान्सलेशन सेंटरमध्ये त्यांच्या कवितांचे अन्य पाच आंतरराष्ट्रीय कवींच्या कवितांसह भाषांतर झाले आहे.

एक दिन लौटेगी लडकी (१९८९), अंधेरे में बुद्ध (१९९६), यह आकांक्षा समय नहीं (१९९८), थपक थपक दिल थपक थपक (२००३) हे त्यांचे अन्य काव्यसंग्रहही वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत. याशिवाय त्यांनी गद्यलेखनही केले आहे. रामकुमार, दिल्ली में उनिंदे, आवक हे त्यांचे लेखसंग्रह प्रकाशित आहेत. त्यांनी विविध लेखक-कवींचे साहित्य भाषांतरितही केले आहे. बेगन्यू हरबर्ट, हरभजन सिंग, सीताकांत महापात्रा आणि श्रीकांत वर्मा आदी लेखकांच्या साहित्यकृती भाषांतरित करण्याचे मोलाचे कामही त्यांनी केले आहे.
भारतीय लेखकांच्या प्रतिनिधी मंडळामधून त्यांनी चीन, फ्रान्स, इंग्लंड, मॉरिशस, जर्मनी, मेक्सिको, ऑस्ट्रिया, इटली, तुर्की, बुलगेरिया, कम्बोडिया, इंडोनेशिया या देशांमध्ये जाऊन आपल्या रचना सादर केल्या आहेत. त्यांच्या लेखन कामगिरीसाठी त्यांना आजवर विविध नामवंत संस्थांचे पुरस्कार लाभले आहेत. १९८४मध्ये भारत भूषण अग्रवाल पुरस्कार, १९८९मध्ये संस्कृती सन्मान, २०००मध्ये केदार सन्मान, २००८मध्ये हिंदी अकादमी साहित्यकार सन्मान, २०१०मध्ये द्विजदेव सन्मान आदींनी त्यांना गौरविण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक निर्मल वर्मा यांच्याशी असलेल्या त्यांच्या नात्याविषयी नेहमीच बोलले-लिहिले गेले आहे. तो अनेकांच्या उत्सुकतेचा एक भाग आहे. साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यावरही अनेकांना त्या अनोख्या मैत्रीची आठवण झाली आणि गिलही त्यावर अगदी मोकळेपणाने बोलल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय कवितेचा विशेषतः भारतीय कवयित्रींचा जेव्हा जेव्हा विचार होईल तेव्हा तेव्हा गगन गिल हे त्यातील एक महत्त्वाचे नाव असेल. आगामी काव्यसंग्रह ही ओळख अधिक ठळक करतील, यात शंका नाही! 

Sunday, November 10, 2024

कवितेतील प्रकाशोत्सव - वैभव चाळके

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. दिवाळीत सर्वत्र दिवे लावून आपण आनंद साजरा करीत असतो. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हे जणू दिवाळीचे सूत्रच आहे. यानिमित्ताने मनाला भुरळ घालणारा हा मराठी कवितांमधील प्रकाशोत्सव... ‘देवा तुझे किती, सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, देव देतो’ या कवितेने आमच्या बालमनात कवितेचा पहिला सुंदर प्रकाश पडला. त्यानंतर ‘सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर... आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार...’ असे म्हणायचो, तेव्हा घरासमोरील डोंगरावरून आलेला सूर्याचा लख्ख प्रकाश संपूर्ण जगावर फाकलेला असायचा. पुढे कधीतरी ‘दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार’ वगैरे ऐकायला मिळाले. ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ’ हे बालपणापासून म्हणतोच आहे; पण त्यातला सूर्यकोटिसमप्रभ शब्द कळायला फार दिवस जावे लागले आणि त्याचा अर्थ अजून कळतोच आहे. पुढे केव्हा तरी कवी अनिल यांच्या कवितेतील ‘सारेच दीप कसे मंदावले आता, ज्योती विझू विझू झाल्या, की झड घालून प्राण द्यावा पतंगाने, असे कुठेच तेज नाही!’ वाचायला मिळाली. कुसुमाग्रजांनी ‘स्वप्नांची समाप्ती’ या कवितेत ‘काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत’ असे लिहिले आहे. यातला अलीकडचा चांदण्याचा प्रकाश शुभ्र कोवळा आणि पलीकडचा सूर्याचा प्रकाश तप्त कोवळा आहे. मंगेश पाडगावकरांनी ‘काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली’ असे जे लिहून ठेवले आहे. त्या वेलींवरचा प्रकाश हा कोवळा प्रकाश... कोवळा शुभ्र प्रकाश आहे. कुसुमाग्रजांनी ‘प्रकाश प्रभू’ कवितेत म्हटले आहे - ‘घट तेजाचे भवती ओतित, असंख्य रविराजाचे प्रेषित, महाद्वार पूर्वेचे खोलुन, क्षितिजावर येती’...

विलक्षण प्रतिभेचे धनी असलेले त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांनी मराठी साहित्यात एकाहून एक सुंदर काव्यलेणी कोरून ठेवली आहेत. बालकवींच्या ‘अरुण’ कवितेमध्ये त्यांनी प्रकाशाची जी रूपे टिपली आहेत, त्यांना अन्य तोड नाही. ‘पूर्व समुद्रीं छटा पसरली रम्य सुवर्णाची, कुणीं उधळिली मूठ नभीं ही लाल गुलालाची?’ अशा सुरुवातीची ही कविता प्रकाशाची कितीतरी रूपे मांडते. या कवितेत बालकवी म्हणतात, क्षितिजाची कड उज्ज्वल दीप्तीने सारवली आहे. सृष्टीसतीने गळ्यात रंगीत मेघांचे अनुपम असे लेणे घातले आहे. हे दागिने सोन्याचे आहेत... रक्तवर्णाचे आहेत... पिवळे आहेत आणि मिश्रित रंगाचे आहेत. कुणाच्या तरी उदरातून सोन्याची गंगा वाहते आहे. कोणीतरी विशुद्ध कर्पूररस आपल्या अंगास लावला आहे. अरुण म्हणजे सूर्य जणू आपल्या नभपटलावर चित्र रंगवतो आहे, असेही ते पुढे म्हणतात. त्यापुढे जाऊन त्यांनी एक अत्यंत बहारदार अशी कल्पना केली आहे... दिवस-यामिनी म्हणजे दिवस आणि रात्र या सूर्योदयाच्या समयी परस्परांचे चुंबन घेत असल्याने त्यांच्या अनुरागाच्या म्हणजे प्रेमाच्या या लाल-गुलाबी छटा गगनात खुलल्या आहेत. सूर्योदय झाला, की रात्रीचे चांदणे दूर होते आणि लाल छटा पसरू लागते. बालकवी म्हणतात, जणू आपल्या मोत्यांची माळ कोणीतरी चोरून नेली आहे म्हणून नभश्री (म्हणजे आकाश) रुसली आहे आणि तिच्या गालावर ही लाल छटा आली आहे... पुढे या लखलखीत सूर्यप्रकाशाला बालकवींनी ‘सोन्याची द्वारका’ अशीही उपमा दिली आहे. दिव्याचे झोत अरुण वसुधेच्या हृदयात ओततो आहे, अशी कल्पनाही या कवितेच्या अंतिम खंडात बालकवींनी केलेली दिसते.
आपल्या ‘संध्यारजनी’ या कवितेत बालकवींनी रात्रीच्या प्रकाशाची वर्णने केली आहेत...
‘उदयगिरीवर नवतेजाची शांत पताका ही!
की गंगेच्या शुभ्र जलाचा झोत वरी येई? ’
‘शुक्रोदय’ कवितेत रात्रीच्या प्रकाश आकाशाकडे पाहू बालकवींनी ‘तेजाची फुटली पेठ... दिव्यत्वाची लयलूट’ असे म्हटले आहे, तर ‘अनंत’ कवितेत... ‘अनंत तारा, नक्षत्रे ही अनंत या गगनात... अनंत दीप्ती, अनंत वसुधा, हे शशीसूर्य अनंत’ असे म्हटले आहे. इथे चित्ताला शांती देणारा विश्वाच्या अफाटतेचे दर्शन घडवणारा विलक्षण ज्ञानप्रकाश आहे.
बालकवींच्या या ‘अरुण’ कवितेने प्रभावित होऊन राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज यांनी या नावाच्या दोन कविता लिहिल्या आहेत. सूर्योदयाबाबत ते पहिल्या कवितेत म्हणतात... ‘की रजनीच्या उदरी दिसतो गर्भचि दिवसाचा’, तर दुसऱ्या कवितेत मात्र याच रंगांना अगदी वेगळ्या उपमा
दिल्या आहेत.
आपल्या भूपाळ्यांमध्येसुद्धा सूर्योदयाची अत्यंत विलोभनीय दृश्ये आहेत. ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या एका भूपाळीत म्हटले आहे, ‘तुझ्या कांतिसम सूर्यपताका पूर्वदिशी फडकती अरुण उगवला प्रभात झाली ऊठ महागणपती.’ दिवाळीच्या गाण्यात तर ‘लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’च आहे. हा प्रकाशोत्सव पुन्हा धुंडाळताना... ‘सप्तरंगांत न्हाऊन आली... आली माझ्या घरी ही दिवाळी!’ अशी रंगीत अवस्था होऊन जाते.

Monday, August 5, 2024

सार्वजनिक उत्सव हा अर्थव्यवस्थेचा कणा!

 सार्वजनिक उत्सव हा अर्थव्यवस्थेचा कणा!

(वैभव चाळके)
...
गेले काही दिवस समाज माध्यमांवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा वा नाही, याबाबत चर्चा रंगली आहे. या उत्सवाच्या वेळी होणारे ध्वनिप्रदूषण, उत्सवांसाठी मंडप घालतात त्याची होणारी अडचण आणि या उत्सवांच्या काही मंडपांतच कार्यकर्त्यांकडून केले जाणारे जुगार, नशापाणी अशी कारणे विरोध करणाऱ्यांकडून चर्चिली जात आहेत. या अनुषंगाने ज्येष्ठ अभ्यासक ‘कालनिर्णय’चे जयराज साळगावकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सर्वच सार्वजनिक उत्सव सुरू राहायला हवेत, अशी भूमिका मांडली. सार्वजनिक उत्सव हे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, असे ते म्हणाले.
...
आपल्या समाजात श्री गणेशाची आराधना शेकडो वर्षे होत आली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अठरा ओव्यांमध्ये ओंकारस्वरूप गणेशाचे वर्णन केले आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने करण्याचा प्रघात आहे. स्वातंत्र्य चळवळीत जेव्हा ब्रिटिशांनी जमावबंदी आदेश लागू केला होता, तेव्हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. तेव्हापासून गेली तब्बल सव्वाशे वर्षे महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. प्रथम स्वातंत्र्य चळवळीसाठी सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने पुढे सामाजिक अभिसरणाचे, कलागुणांच्या वाढीचे, छोट्या-मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन कोट्यवधी हातांना काम देण्याचे उद्दिष्ट साध्य केलेले दिसते. गेल्या काही वर्षांत या गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले आहे. या उत्सवाला भव्यपण आले आहे. श्री गणरायांच्या आगमन सोहळ्यापासून विसर्जन सोहळ्यापर्यंत कितीतरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात, मोठ्या गर्दीत पार पडताना दिसतात. या बदलत्या स्वरूपातील काही बाबींवर दरवर्षी काही प्रमाणात आक्षेप घेतले जातात. अर्थातच आक्षेप घेणाऱ्यांपेक्षा या उत्सवात सहभाग घेणाऱ्यांचे प्रमाण नेहमीच अधिक राहिलेले आहे आणि उत्तरोत्तर वाढते आहे. अलीकडच्या काळात मराठी माणसाच्या या सणात इतर भाषक आणि इतर धर्मीयसुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी होत असताना दिसतात.

जयराज साळगावकर याबाबत म्हणाले, मोठमोठे उत्सव ही समाजाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आपल्या देशात गणेशोत्सव, दुर्गापूजा, नवरात्रोत्सव, दहीहंडी, दिवाळी असे मोठमोठे सण दरवर्षी साजरे केले जातात. ते साजरे करताना समाजात मोठा उत्साह पाहायला मिळतो. केवळ आपल्या देशातच असे सण होतात असे नाही, अमेरिकेत, युरोपातसुद्धा मोठमोठे सण साजरे केले जातात. जगभरातील सर्वच देशांमध्ये सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. कारण माणूस हा उत्सवप्रेमी आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली समाजरचना उत्सवातून उभी राहिलेली दिसते. आपल्या अर्थशास्त्राचा हे मोठे उत्सव म्हणजे कणाच आहे. उत्सवांमुळे होणारी मोठी आर्थिक उलाढाल पाहता अर्थशास्त्राला सणांचे मॉडेल स्वीकारणे सोपे गेले आणि मग त्यातूनच अर्थव्यवस्था उत्सवांवर चालत असलेली पाहायला मिळते. अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला मोठ्या उत्सवांमध्ये हा अर्थशास्त्राचा भाग अत्यंत महत्त्वाचा वाटतो. आदिम काळापासून माणूस उत्सव साजरे करीत आलेला आहे. समाज जेव्हा शेतीवर अवलंबून होता तेव्हा शेतीत धनधान्य पिकले म्हणजे माणूस उत्सव साजरा करीत असे. त्याच्या नव्या गरजा, त्याच्या नव्या आशाआकांक्षा पूर्ण करण्याचा तोच कालावधी असे. नव्या वस्तू खरेदी करण्याची संधी माणसाला याच काळात मिळत असे. त्यामुळे या काळातच सगळे उत्सव साजरे केले जात असल्याचे पाहायला मिळते. आपल्या सगळ्या मोठ्या सणांकडे पाहिलेत म्हणजे तुम्हाला माणूस आपल्या नवनव्या गरजा या सणांच्या काळातच पूर्ण करीत असल्याचे दिसते. बाजारात नव्या गाड्या, नव्या फॅशनचे कपडे, नवे तंत्रज्ञान या सणांच्या पार्श्वभूमीवरच दाखल होत असते. कारण सणांच्या निमित्ताने माणूस अधिक पैसे खर्च करायला तयार होत असतो. नवनव्या गोष्टी खरेदी करण्यास तयार असतो. त्यामुळे आपल्याकडील सर्व उत्पादनस्रोत हे कोणत्या ना कोणत्या सणाशी जोडून असलेले आणि आपले अनेक उद्योग-व्यवसाय सणांच्या संदर्भात आखणी करून चालवले जात असलेले दिसतात. त्यामुळे मोठ्या भव्य स्वरूपात साजरे होणारे आपले सार्वजनिक उत्सव छोट्या-मोठ्या कारणासाठी बंद करणे योग्य नव्हे! ती अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवणारी, समाज रचनाच कोलमडून टाकणारी गोष्ट ठरेल. शेकडो उद्योग-व्यवसायातील लाखो करोडो लोकांना बेरोजगार करणारे ठरेल. केवळ आपला सार्वजनिक गणेशोत्सव उदाहरण म्हणून घेतला, तरी मूर्तीपासून देवपूजेच्या साहित्यापर्यंत आणि नैवेद्यापासून मनोरंजनाच्या क्षेत्रापर्यंत कितीतरी व्यवसायांना या काळात यानिमित्ताने चालना मिळालेली दिसते. मूर्तिकलेचा उद्योग वर्षभर सुरू असतो. कितीतरी कारागीर वेगवेगळ्या कलावस्तूंवर गणेशोत्सवासाठी वर्षभर मेहनत घेत असतात. आपल्याकडे चित्रपटांसाठी सेट उभारणारे जे लोक आहेत, त्यांच्यात कोकणातील आणि बंगालमधील कलावंतांचा सहभाग अधिक आहे. कारण या दोन प्रांतात अनुक्रमे सार्वजनिक गणेशोत्सव आणि सार्वजनिक दुर्गा उत्सव यांची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्या परंपरेत हे कलावंत घडलेले आहेत. सार्वजनिक उत्सवांनी कितीतरी कला जगवल्या आहेत. वाढवल्या आहेत आणि आजच्या समाज रचनेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. चित्रपटाचा विषय निघाला म्हणून सांगतो, आपल्या चित्रपटांनी आपल्या सणांना देशात सर्वदूर मान्यता दिली आहे. आपल्या समाजावर हिंदी चित्रपटांचा मोठा प्रभाव आहे. चित्रपटांमधून आपल्या सणांची कितीतरी गाणी सर्वत्र पोहोचली. लोकप्रिय झाली आणि त्यातून सण सार्वत्रिक झाले, असे दिसते.
...
जगभरात उत्सव
आपले अनेक उत्सव हे धर्माशी जोडलेले आहेत. जगभरात अशीच स्थिती दिसते. युरोप-अमेरिकेत अनेक चर्च मोठे उत्सव साजरे करतात. अन्य धर्मीयसुद्धा आपापले उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करताना दिसतात. याचे कारण समाजाला मोठ्या उत्सवांची गरज आहे आणि एकूण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे मोठ्या सणांची शक्ती निर्विवाद आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन अलीकडे ऑनलाइन पद्धतीने सामग्री विकणाऱ्या अमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्या मोठमोठे शॉपिंग फेस्टिवल आयोजित करीत असतात. त्यांचा आकार पाहिला म्हणजे फेस्टिवल अर्थात उत्सवांचे अर्थकारणातील महत्त्व सहज लक्षात येईल.
...
समाजधुरिणांनी आवाहन करावे!
उत्सवांमध्ये होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत साळगावकर म्हणाले, विविध सार्वजनिक उत्सवात ध्वनिप्रदूषण होते हे खरे आहे. त्यावर उपाययोजना करता येऊ शकतात. करायला हव्यात. सरकारने डीजेवर याआधीच बंदी आणली आहे. गणेशोत्सवातील कार्यकर्त्यांमध्ये जनजागृती करून आपण ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणू शकतो. ती मोठी अवघड गोष्ट नाही.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात जुगार खेळणे, नशाबाजी करणे या मुद्द्यांबाबत ते म्हणाले, सध्या अशा प्रकारे कोणी गैरवर्तन करत असेल, असे वाटत नाही. १९८०च्या दशकात हे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत होते. ती गोष्ट लक्षात आल्यावर आमचे बाबा-ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी विविध व्यासपीठांच्या माध्यमातून जनजागृती केली. गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. त्यानंतर या वाईट गोष्टींना उत्तम प्रकारे पायबंद बसला. आजही कोठे जर अनुचित गोष्टी घडत असतील, तर समाजातील धुरिणांनी पुढे येऊन आवाहन करायला हवे. अशा प्रकारच्या आवाहनाला कार्यकर्ते आणि तरुण चांगला प्रतिसाद देतात, हे यापूर्वीच लक्षात आले आहे.
रस्त्यावर मंडप घालून रस्ता अडवला जातो, असा एक आक्षेप घेतला जातो. याबाबत ते म्हणाले, नागरिकांना उत्सव हवा असतो. त्यामुळे नागरिक एकत्र येऊन उत्सव करतात. काही ठिकाणी जागेअभावी रस्त्यावर मंडप घातला जातो, हे खरे आहे; मात्र रस्त्याच्या एका बाजूला मंडप घालून दुसऱ्या बाजूने वाहनांसाठी जागा सोडली जाते. त्यातून सामंजस्याने लोक आपली वाहने बाहेर काढत असतात, असे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. बहुतांश ठिकाण लोक वाद न घालता समजुतीने मार्ग काढत असतात. अनेक जण तर स्वतःच या उत्सवात सहभागी झालेले असतात. सार्वजनिक उत्सवांमध्ये सहभाग घेणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे.
...
सामाजिक अभिसरणाचे व्यासपीठ
सार्वजनिक उत्सवाबाबतच्या चर्चेदरम्यान त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दासुद्धा अधोरेखित केला. ते म्हणाले, सार्वजनिक सण-उत्सव हे सामाजिक अभिसरणाचे एक अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ आहे. दिवाळी, रंगपंचमी, होळी अशा सणांमध्ये धर्म-जात विसरून लोक एकत्र येत असतात, याचा विचार केला जात नाही. या अर्थाने समाज म्हणून एकत्र राहण्यासाठी सण-उत्सव अत्यंत महत्त्वाचे आहेत.
...
मुंबई पोलिसांची कार्यक्षमता मोठी!
मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे यानिमित्ताने साळगावकर यांनी आवर्जून कौतुक केले. ते म्हणाले, मुंबईतील सार्वजनिक उत्सवांदरम्यान मुंबई पोलिसांची कामगिरी नेहमीच वाखाणण्यासारखी राहिली आहे. मुंबई पोलिसांच्या या कार्यक्षमतेचे कौतुक करायला हवे. मोठे उत्सव समाजाला विविध अंगांनी उपयोगी पडत असतात, हे आपण पाहिलेच; पण ते उत्सव सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडण्यासाठी पोलिस जे नियोजन करतात, जी मेहनत घेतात, ती अत्यंत महत्त्वाची आहे.

(3 आॅगस्ट 2024 रोजी सकाळच्या अवतरण पुरवणीत प्रकाशित)