Sunday, October 26, 2025

इवलेसे रोप

 इवलेसे रोप

--
वैभव बळीराम चाळके
--
अल्पाक्षरत्व अर्थात कमीत कमी शब्दांत अधिकाधिक अर्थ सांगणे, परिणाम साधणे, आनंद देणे... हे कवितेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. कविता इतर साहित्य प्रकाराहून भिन्न ठरते त्यात तिचा हा एक महत्त्वाचा गुण असतो. साहित्यात त्यालाच व्यवच्छेदक लक्षण म्हणतात.
कविता अल्पाक्षरी असते आणि तरी ती खूप काही सांगते अन् सुचवते. कारण कवितेत प्रतिमा, प्रतीके, अलंकार, सूचकता अशा गुणांचा अंतर्भाव असतो. शिवाय तो एकजीव असून उत्स्फूर्त आविष्कारातून जन्मास आलेला असतो. मराठी साहित्यापुरते बोलायचे म्हटले तरी आपल्याला अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. मराठीच्या हजारभर वर्षांच्या काव्यलेखनाच्या उपलब्ध इतिहासात पद्य रचना, दीर्घ कविता आणि स्फूट कविता विपुल प्रमाणात लिहिली गेली आहे.
संतकाव्यातील कितीतरी रचना अजरामर होऊन राहिल्या आहेत. अनेक कवितांमधील विशेषतः अभंगांतील केवळ एकेक ओळ सुभाषिताचे रूप घेऊन शेकडो वर्षे समाजमनात गुंजन करीत आली आहे. अशा शेकडो काव्यपंक्ती आपल्याला पुन्हा पुन्हा उद्धृत केलेल्या आढळतात.
संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पुढील ओळी आपण हजारो वेळा एकमेकांना सांगितलेल्या आहेत-
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके।
मेळवीन।।
या पंक्ती अजरामर होऊन राहिल्या आहेत. मराठी अमृताहून गोड आहे, हे ज्ञानेश्वरांनी इतक्या समर्थपणे मांडले आहे, की मराठीविषयी बोलताना या पंक्तींना दुसरा पर्याय नाही.
मोगरा फुलला मोगरा फुलला।
फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला।।
‘मोगरा फुलला’ ही त्यांनी निर्माण केलेली प्रतिमा तर मराठीतील एक ‘न भूतो न भविष्यती’ अशी आहे. दृश्य, स्पर्श, गंध, नाद अशा विविध संवेदनांना सुख देणारी आणि नित्यनूतन अर्थ धारण करणारी ही प्रतिमा ही मराठी साहित्याला मिळालेली आगळी देणगीच आहे, असे म्हणावे लागेल.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगांतील कितीतरी पंक्ती सुभाषित झाल्या आहेत. सुभाषित म्हणजे इवलासा अक्षरबंध... जो अर्थआभाळ कवेत घेतो.
जे का रंजले गांजले।
त्यांसि म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा।
देव तेथेचि जाणावा।।
यात साधूसंतांची ओळख कशी नेमकी सांगितली आहे. आता हे माहिती झाले म्हणजे भोंदू कोण हे सहज लक्षात येऊ शकते.
सुख जवापाडे।
दुःख पर्वता एवढे।।
हे कठोर वास्तव इवल्याशा ओळीत आणि परिचित उपमेतून मांडल्याने सर्वांना पटले, रुचले, सांगावे-सांगत राहावे वाटले.
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास।
कठीण वज्रास भेदू ऐसे।।
असे म्हणून त्यांनी माणसाने कसे असावे, हे सांगितले आहे.
लहानपण देगा देवा।
मुंगी साखरेचा रवा।।
मध्ये विनयशीलता, अहंहीनता अंगी असली की लाभ होतो, हे सोप्या उदाहरणातून पटवून दिले गेले आहे.
नाही निर्मळ जीवन।
काय करील साबण।।
हा थेट सवालच आहे.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे।
उदास विचारे वेच करी।।
हे वचन अकाली उद्‍भवणारे खर्च करताना केवढा आधार ठरते.
साखरेच्या गोण्या बैलाचिये पाठी।
तयासी शेवटी कडबा रे।।
हे कटू वास्तवही रोजच्या जगण्यात येणाऱ्या असह्य उपेक्षेच्या दिवसांत सांत्वन करते नाही का?
आणि हे सारे मांडणारे संत तुकाराम तरीही,
आनंदाचे डोही आनंदतरंग।
आनंदचि अंग आनंदाचे।।
असे म्हणून जड जीवनाला चैत्यन्याशी जोडून देतात. म्हणूनच म्हणतो, कविता हे इवलेसे रोप आहे. ते अर्थआभाळाला गवसणी घालत जाते.
(सकाळच्या दीपपर्व दिवाळी अंकात 2025 प्रसिद्ध)

उंदीरमामा की जय!



उंदीरमामा की जय!
--
‘प्रारंभी विनंती करू गणपती...’ असे म्हणत कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्याची आपली अनेक वर्षांची परंपरा आहे. या आद्यदैवत असलेल्या श्री गणेशाचे वाहन म्हणजे उंदीर. आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात त्याने भावनिक महत्त्व प्राप्त केले आहे. गेल्या काही वर्षांत त्याने वैज्ञानिक क्षेत्रातही मोठी प्रगती केलेली दिसते. माणसावर करायचे कोणतेही नवे प्रयोग प्रथम उंदरावर करून पाहिले जातात हे आपण शिकलेलो आहोत. उदाहरणार्थ माणसावर एखाद्या औषधाचा काय परिणाम होईल, हे तपासण्यापूर्वी उंदराच्या शरीरावर त्याचा प्रयोग केला जातो. अलीकडे काही शास्त्रज्ञांनी उंदराच्या नाकात हवेचा वेग आणि विविध वास ओळखण्याची विलक्षण क्षमता असल्याचे सिद्ध केले आहे. या संशोधनाचा उपयोग माणसाच्या जीवनाला उपकार ठरेल, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
आम्हा शेतकरी कुटुंबात जन्मलेल्यांसाठी उंदीर हा पहिल्या क्रमांकाचा शत्रू होता. त्यामुळे उंदीर दिसला की तो जिथे गेला तिथे त्याला शोधून मारावा किंवा पळवून लावावा, असे लहानपणापासूनच आम्हाला सांगितले गेलेले. उंदीर, घुशी आणि चिचुंद्री असे प्रकार पाहतच आम्ही मोठे झालो. पुढे पांढरा उंदीर असतो, असे ऐकायला आणि पाहायलाही मिळाले. जगभरात उंदराचे ५० प्रकार असल्याचे सांगतात. उंदीर सर्वभक्षी आहे. म्हणजे धान्यापासून अंडी-मांसापर्यंत बरेच काही अन्न म्हणून खात असतात. शिवाय सतत वाढणारे दात काबूत आणि शाबूत ठेवण्यासाठी मिळेल ती कडक वस्तू कुरतडत राहणे हे त्याचे जीवनकर्तव्यच आहे. प्रजननाबाबत उंदराने मोठीच आघाडी घेतलेली दिसते. उंदीर मादी वर्षातून पाच ते सहा वेळा पिल्ले देते आणि प्रत्येक वेळी डझनभर पिल्ले जन्माला घालते. त्यामुळे उंदीर अनेकांची दमछाक करतात. शेतकऱ्यांच्या घरात, शेतात धान्याची नासधूस करतात. शहरात घरातील अन्नपदार्थ, फर्निचर, वायर कुरतडून वात आणतात. त्यामुळे मासे पकडण्याच्या जगात जशा शेकडो क्लृप्त्या माणसाने शोधल्या आहेत तसेच शेकडो उपाय उंदरांना मारण्यासाठी केले जातात. सापळे लावणे, विषप्रयोग करणे, चिकट कागद ठेवणे हे असे उपाय वर्षानुवर्षे सुरू आहेत. शहरांमध्ये उंदरांची संख्या वाढली, की महापालिका ते मारण्यासाठी कर्मचारी नेमते. त्यामुळे आपल्या आर्थिक क्षेत्रातील उलाढालीलाही उंदराने हातभार लावलेला दिसतो.
आपल्या संशोधकांनी उंदरांच्या नाकात वाऱ्याचा वेग आणि वास ओळखण्याची मोठी क्षमता असल्याचे सिद्ध केल्याने ते आता वेगवेगळ्या कामास येणार आहे. उंदराची ऐकण्याची क्षमता ही विलक्षण आहे, हे आपल्याला कधीचेच माहीत आहे. म्हणून तर प्रत्येक गणेश मंदिरात मोठा पितळी उंदीर बसवलेला असतो आणि भाविक त्याच्या कानात त्यांना जे हवे ते मिळवण्यासाठी अतिशय हळुवार आवाजात विनवत असतात. आपल्याकडे अधूनमधून निसर्ग, तौक्ते अशा तऱ्हेतऱ्हेच्या नावांची मोठी वादळे येत असतात. अशा वेळी आता आपल्याला आपल्या खिडक्यांवर उंदीर बसवून ठेवता येतील आणि ते आपल्या मोबाईलला कनेक्ट केले म्हणजे वारे किती जवळ आले आहे, हे लक्षात येऊन आपण आपली दारे-खिडक्या वेळीच बंद करून सुरक्षित बसू शकू!
वाऱ्याचा वेग आणि वास ओळखण्याच्या या क्षमतेमुळे शत्रू राष्ट्रांनी वाऱ्यावर विष पेरून दिले तर ते आपल्याकडे पोहोचण्यापूर्वीच सीमेवर उंदीर फौज उभी करून आपल्याला ते वेळीच ओळखता येईल का, याचाही शोध आपल्याला आता घ्यावा लागेल. तसे झाले तर वरून ड्रोन आणि खाली उंदीर सेना अशी एक वेगळीच लढाई भविष्यात दिसू शकते.
अर्थात उंदरांच्या या क्षमतांचा जर आपल्याला सुयोग्य वापर करायचा असेल, तर त्यासाठी उंदीर काही काळ मोकळे असणे गरजेचे आहे. सतत वाढणारे दात घासून कमी करण्यात त्यांचा बराचसा वेळ खर्च होतो आणि आपली प्रजनन क्षमता संपूर्ण कामी आणण्यातही ते पुष्कळ काळ व्यग्र असतात. त्यामुळे आपल्या विविध कामांसाठी मोठी संख्या असली तरी उंदीर कमी पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाप्रमाणे उद्या उंदरांचे निर्बीजीकरण करून त्यांचा काही वेळ आपल्याला वापरता येईल का, याच्यावर विचार करण्यासाठी एखादी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची समिती कदाचित नेमावी लागेल.
विज्ञान अचाट गोष्टी साध्य करते आहे. त्यामुळे या उंदराच्या नाकातील वासाच्या क्षमतेचा वापर करून आपण आपल्या स्वयंपाकघरातील पदार्थ नीट घमघमत आहेत ना, याची खात्री करून घेऊ शकू. उद्या कदाचित मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये हे काम उंदरांकडेच स्वाधीन केले जाऊ शकते. फक्त क्वचित प्रसंगी हा ‘सुगंध इन्स्पेक्टर’ पदार्थात पडून आपल्या ताटात आला तर उदार मनाने त्याची आणि रेस्टॉरंट मालकाची चूक आपण पदरात घालायला हवी.
गणपतीसमोर आरत्यानंतर गणरायाचा जयजयकार करून झाल्यावर आणि मंत्रपुष्पांजली म्हटल्यावर कोणीतरी ‘गणपती बाप्पा की जय... उंदीरमामा की जय’ असे हमखास म्हणत असतो. तेव्हा हे ‘उंदीरमामा की जय’ कोठून आले, असा एक भाबडा प्रश्न अनेकदा पडत असे. आता मात्र उंदीर असा उपयोगात यायला लागल्यावर आपल्याला उंदीरमामाचा जयजयकारसुद्धा कृतज्ञतेची भावना दाटून येऊन करता येईल.
एक ‘चांदोमामा’ आणि दुसरा ‘उंदीरमामा’ हे आपल्या पुराणापासून विज्ञानापर्यंत आपल्याला फिरवून आणत आहेत. मामा आपल्याला नेहमीच प्रिय असतो. चांदोमामाने चांद्रयानातून आपल्याला ‘कधीतरी या राहायला’ असे निमंत्रण दिलेले आहे. त्यामुळे तो आता आणखीच प्रिय झाला आहे. नव्यानव्या शोधांमुळे आता उंदीरमामाही प्रिय होऊन राहील. तेव्हा सर्व मिळून म्हणू या, उंदीरमामा की जय!

(संपादित अंश सकाळमध्ये 24-10-25 रोजी संपदाकीय पानावर प्रकाशित)