Monday, September 12, 2016

ग्रंथसत्ता
थोर विचारवंत पु.ग.सहस्रबुद्धे यांच्या लेखांचे ‘माझे चिंतन’ नावाचे एक पुस्तक आहे. त्या पुस्तकात ‘ग्रंथसत्ता’ नावाचा एक अत्यंत उत्तम असा लेख आहे. काही काही ग्रंथांनी समाजमनावर आपली सत्ता कशी चालविली, याविषयी त्यात सुरेख लेखन आहे. रामायण, महाभारत, गीता, बायबल, कुराण, गुरुग्रंथसाहेब असे धर्मग्रंथ त्या त्या समाजावर वर्षानुवर्षे सत्ता करीत आलेले आहेत. जगाच्या पाठीवर रोज हजारो ग्रंथ प्रकाशित होतात आणि प्रकाशहीनही होऊन जातात. मात्र काही मोजके ग्रंथ जनमानसावर राज्य करतात. प्रत्येक पुस्तकाचा राज्य करण्याचा काळ आणि परीघ थोडा कमी जास्त असतो एवढेच.
दास कॅपिटल
आधुनिक काळात लिहिलेली कोणती पुस्तके जनमानसावर राज्य करीत आहेत किंवा कोणत्या पुस्तकांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले, असा प्रश्‍न उपस्थित केला की, सर्वप्रथम कार्ल मार्क्स यांच्या दास कॅपिटल या ग्रंथाची आठवण होते. या एका ग्रंथाने जगाचा सगळा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला. कामगाराला जगाच्या  केंद्रस्थानी आणले. त्याच्या बाह्यांमध्ये लढण्याची ताकद भरली. जगभरातील कामगार जागा होऊन संघटित झाला. कामगारांनी सत्ता उलथवून लावल्या.  सध्या जगभर भांडवलशाही फोफावली असली तरी एककाळ दास कॅपिटलने जगावर राज्य केले यात तीळमात्र शंका नाही. म्हणूनच आधुनिक काळात लिहिल्या गेलेल्या आणि जगावर राज्य करणार्‍या पुस्तकांत पहिला मान दास कॅपिटलला
दिला पाहिजे.
भारतातील ग्रंथसत्ता
भारतीय समाजमनावर वर्षानुवर्षे विविध ग्रंथांनी सत्ता गाजविली आहे. रामायण, महाभारत, गीता या ग्रंथांनी केवढा समाज अंकित केला आहे, हे सर्वांना माहीतच आहे. अलीकडच्या काळात भारतावर राज्य करणारा एकमेव ग्रंथ म्हणजे भारतीय राज्यघटना होय. अवघा देश या ग्रंथाप्रमाणे चालतो आहे. सव्वाशे करोड भारतीयांच्या जगण्यामरण्याचा संबंध या ग्रंथांशी जोडलेला आहे. याच ग्रंथाने इथल्या करोडोच्या संख्येत असलेल्या दीनदुबळ्या गोरगरिबांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे. थोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आकारास आलेला हा ग्रंथ सर्वच भारतीयांना वंदनीय असा आहे.
महाराष्ट्रातील ग्रंथसत्ता
महाराष्ट्राचा उल्लेख ज्ञानोबा, तुकारामांची भूमी असा केला जातो. अर्थातच महाराष्ट्रावर सत्ता करणार्‍या ग्रंथांच्या यादीत ज्ञानेश्‍वरांची ‘ज्ञानेश्‍वरी’ आणि ‘तुकोबांची गाथा’ यांचा क्रमांक फार वरचा आहे. आज महाराष्ट्रातील विद्यापीठांपासून पायी वारीला जाणार्‍या गोरगरीब, अडाणी वारकर्‍यांपर्यंत या ग्रंथांनी आपली सत्ता चालविलेली दिसते. ज्ञानेश्‍वरी हे एक मोठे बंड होते. मराठी भाषेला संस्कृतच्या पंगतीला बसविणारे! तुकोबांनीसुद्धा तत्कालीन समाजाला जी शिकवण दिली, ती आजही अनुकरणीय वाटते. तुकोबांची गाथा म्हणूनच मनामनात रुजलेली आढळते. मराठी माणसाच्या तोंडी हमखास आढळणारी वचने पाहिली तर त्यातील निम्म्याहून अधिक तुकारामांच्या गाथेतील असल्याचे लक्षात येईल. या एवढ्या एका कसोटीवरून सुद्धा तुकारामांच्या गाथेने मराठी मनावर केवढी सत्ता गाजविली आहे ती सहज लक्षात येईल. या झाल्या मोठ्या ग्रंथसत्ता! या साम्राज्यांच्या आत विविध ग्रंथांच्या छोट्या छोट्या सत्ता अस्तित्वात होत्या आणि आहेत.

No comments:

Post a Comment