Monday, November 18, 2019

काही लेख

तुमचा मुलगा खेळतो काय? (17.11.2019)

आता चाळीशीत असलेल्या पिढीला बालपणाच्या ज्या आठवणी आठवतात, त्यातली एक आठवण सगळ्यांनाच आठवत असते. मैदानावर क्रिकेट, कबड्डी, खो-खो, लगोरी, लंगडी, हुतुतू असा कोणता तरी खेळ रंगात आला आहे आणि आपली आई आपल्याला ओरडून-ओरडून घरी बोलावते आहे. आपल्या मनात अजूनही खेळत राहण्याची इच्छा आहे आणि आई मात्र अरे पुरे झाले, तासनतास नुसते खेळत राहणार आहेस का, असे म्हणते आहे. आता मात्र घराघरात गेलात तर अरे पुरे झाले, किती तास खेळणार आहेस, हेच वाक्य आईच्या तोंडून पुन्हा-पुन्हा उच्चारले जात असल्याचे ऐकायला येईल. फरक एवढाच आहे की, आता हे वाक्य आई घरातच उच्चारते. घरातच मोबाईलवर तासन्-तास बसून खेळणार्‍या मुलाला उद्देशून. परवा एक आई मुलाला दम देऊन घराबाहेर खेळायला पाठवताना पाहिली आणि एकदम एक विलक्षण गोष्ट लक्षात आली. मैदानावरून घरात न येणारी आमची पिढी आता इतिहासजमा झाली आहे आणि स्मार्टफोनच्या नादामुळे मैदानावरच न जाणारी एक नवी पिढी जन्माला आली आहे. वयाची तिशी पार करेपर्यंत मागच्या पिढीची पोटे खपाटीला गेलेली असत आणि आज सात-आठ-नऊ वर्षांच्या मुलांच्या पोटाला घड्या पडलेल्या दिसतात. त्या या बदललेल्या जीवनशैलीमुळे होय.
व्यायामाचे महत्त्व, शारीरिक हालचालीचे महत्त्व मागच्या पिढीला समजावून सांगावे लागले नाही. नव्या पिढीतील मुलांना मात्र, ‘अरे! किमान हला की रे’, असे सांगण्याची वेळ आली आहे. विशेषतः शहरांमध्ये जी गुबगुबीत बाळे आणि मुले दिसत आहेत. आरोग्यासाठी हे हितकर नाही. लहान मुलांनी व्यायाम करण्याची अपेक्षा नाही. त्यांचे शरीर लवचिक व्हावे आणि शरीरावर मेद साचू नये यासाठी त्यांनी खेळणे अपेक्षित आहे. मैदानी खेळांमधून आपसूकच जितका व्यायाम होतो, तेवढा मुलांसाठी आवश्यक असतो. त्यामुळे मुले काटक आणि बळकट बनतात. मैदानावरील खेळ माणसाच्या शरीराला जसे ताजेपणा देतात तसेच माणसाचे मनसुद्धा ताजेतवाने करतात. मैदानी खेळामुळे मनोधैर्य वाढीस लागते,  चिकाटी निर्माण होते, खेळाडू वृत्ती निर्माण होते आणि हे गुण मग पुढील आयुष्यात उपयोगी पडतात. सांघिक खेळामुळे सहकार्याची वृत्ती, संघभावना आणि नेतृत्वगुण यांना वाव मिळतो. त्यांचा विकास होतो. पुढील आयुष्यात त्याचा मोठा उपयोग होत असतो.
फार पूर्वीपासून मानव खेळ खेळत आलेला आहे. शिकार, कुस्ती, कवड्या, सोंगट्या, फासे, धावणे, थाळीफेक, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती, मुष्टियुद्ध असे नाना प्रकारचे खेळ जगाच्या पाठीवर माणूस वर्षानुवर्षे खेळत आलेला आहे. अलीकडच्या काळात एकूण जगाचे सपाटीकरण झाले आहे. त्यात आपण आपल्या कितीतरी गोष्टी हरवून बसलो आहोत. आज जगभरात स्मार्टफोनमुळे मोबाईल गेमचे प्रमाण इतके वाढले आहे की, मोबाईल गेमने जवळपास सगळ्या देशातले देशी खेळ संपवायला आणले आहेत की काय, असे वाटावे अशी स्थिती आहे.
आधुनिक शिक्षणशास्त्रात खेळाचा प्रामुख्याने समावेश केलेला आहे. खेळाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळेच खेळासाठी शालेय अभ्यासक्रमात विशेष तासिका असतात. मात्र असे असले तरी आपल्याकडे खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही. त्यामुळे या तासांमध्ये उर्वरित अभ्यासक्रम भरून काढण्याकडे बहुतांश शाळांचा कल असतो. त्यात अलीकडेच शहरांमध्ये अनेक शाळांना मैदानेच नाहीत. त्यामुळे मैदानी खेळापासून मुले दुर्दैवाने दूर राहतात. अनेक सोसायट्यांनासुद्धा मैदाने नाहीत. त्यामुळे सोसायट्यांच्या आवारात मैदानी खेळ खेळणे शक्य होत नाही. अनेक ठिकाणी मैदाने आहेत, पण दुर्दैवाने ती गाड्या पार्क करण्यासाठी वापरली जातात. परिणामी आपल्या मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध होत नाहीत. विविध पातळ्यांवर खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. चांगल्या खेळाडूंना शिष्यवृत्त्याही देण्यात येतात. मात्र असे असतानाही एकूण समाजात मैदानी खेळाचे प्रमाण जितके असायला हवे तितके नाही.
आपल्याकडे क्रिकेटचे मोठे वेड आहे. मात्र हे वेड असलेले निम्म्याहून अधिक लोक कधीही क्रिकेट खेळत नाहीत. त्यांचे क्रिकेटवेड हे क्रिकेटचे सामने टीव्हीवर पाहणे आणि क्रिकेटविषयी बातम्या वाचणे इतक्यापुरतेच मर्यादित असते. दुसर्‍याचा खेळ पाहत राहण्यात फक्त मनोरंजन होऊ शकते. त्यातून शरीर आणि मनाला फार मोठा फायदा होत नसतो. क्रिकेट पाहणे हे मनोरंजनाचे साधन आहे. मात्र अलीकडे अनेकांच्या बाबतीत ते मनोरंजन राहण्यापेक्षा व्यसनच झालेले दिसते. क्रिकेटचे सामने सुरू झाले म्हणजे अनेक जण कामाला दांड्या मारून ते पाहात राहतात हे आपण अनेकदा पाहिलेले आहे. याचाच परिणाम मुलांवर होत असतो.
एकूणच मैदानी खेळांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कालसुसंगत नाही. आपल्याला खेळांची केवढी आवश्यकता आहे हे आपण जाणले नाही. आपला मुलगा खेळतो काय, हे आपण पाहत नाही. त्यांनी खेळावे म्हणून आपण काही प्रयत्न करतोय, असे दिसत नाही. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे माणसाच्या मनावर प्रचंड ताण असतो. आपल्या मुलांना या नव्या युगात जगायला शिकवायचे असेल तर त्यांना मानसिकदृष्ट्या कणखर केले पाहिजे. मैदानी खेळ हे मानसिकदृष्ट्या कणखर होण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. आजकाल आपल्या आहारातही फार मोठे बदल झाले आहेत. आपली नवी पिढी जंकफुडच्या आहारी गेलेली दिसते. एकदा तुम्ही मैदानी खेळ खेळायला लागलात, म्हणजे तुम्ही नकळतपणे आहाराविषयी दक्ष व्हायला लागता. आजही मैदानी खेळ खेळणार्‍या कोणत्याही खेळाडूकडे गेलात तर त्यांच्या आहारात जंकफूडचे प्रमाण फारच कमी असल्याचे तुमच्या सहज लक्षात येईल. पौष्टिक आहार शरीराला गरजेचा असतो ही बाब खेळाडूंच्या मनावर नकळतपणे बिंबवली जात असते. जंकफुडमुळे होणारे अनेक आजार खेळाडूंपासून चार हात लांब राहतात हे वेगळे सांगायला नको.
मैदानी खेळांच्या याच विविध फायद्यांमुळे आपला मुलगा खेळतो काय? असा प्रश्न विचारावासा वाटतोपण त्याचे उत्तर नाही, असे असेल तर आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे.



‘सँडवीच’पद्धतीमुळे संबंध सुधारतील (16.11.2019)

काही काही माणसांची शिकवण्याची हातोटी एकदम विलक्षण असते. झेनकथा ज्यांना माहीत असतील त्यांना झेनगुरूंची अनुभव देऊन शिकविण्याची हातोटी माहीत असेलच. एकाहून एक अफलातून झेनकथा आपल्याला अचंबित करून सोडतात. अलीकडे रोजच्या खाण्यातील सँडविच या पदार्थाच्या उदाहरणातून एक महत्त्वाची शिकवण देणारा एक किस्सा कळला. मोठा अफलातून किस्सा आहे हा. आपण आचरणात आणावा आणि आपल्या मित्रांनाही आचरणात आणायला सांगावा असा.
सँडविच हा पदार्थ आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. कोणत्याही वेळी खाता येणारा असा पदार्थ आहे. पुन्हा आरोग्यासाठी उत्तम. सहज करता येणारा. ज्यांना आपल्या स्वतःसाठी जेवण करता येत नाही, त्यांनी किमान सँडविच करणे शिकून घेतले पाहिजे. सँडविच करणे अत्यंत सोपे आणि खाण्यासाठी अतिशय उत्तम. स्लाईस ब्रेडचा तुकडा घेतला, त्यावर तुम्हाला हवे ते पदार्थ एकावर एक ठेवले. पुन्हा दुसरा एक स्लाईस ब्रेडचा तुकडा घेऊन त्यावर ठेवला. चटणी घाला व सॉस घातला की सँडविच तयार होते. सँडविच प्रत्येकाला करता यायला हवे. म्हणजे उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. अर्थात हे सँडविच करा, हे सांगण्याचा इथे हेतू नाही. मला त्या पुढे जाऊन काहीतरी वेगळेच सांगायचे आहे. अर्थात हे सारे आमच्या पदरचे नाही, पण आम्हाला भावलेले,  विचारमंथनाला प्रवृत्त करणारे आहे. इतरांनाही हे सांगायला हवे, असे सतत वाटायला लावणारे आहे.
आम्ही अनेकदा युट्युबवर अनेकांची मोटिव्हेेशनल भाषणे ऐकत असतो. असेच एकदा आम्हाला एक व्याख्यान ऐकायला मिळाले. त्यातील सँडविचचा उल्लेख आम्हाला खूपच आवडला. त्यात उत्तम बोलण्याचे मार्ग सुचविणार्‍या वक्त्याने त्यात छान मार्गदर्शन केले आहे. कोणाचीही उगाचच निंदा करू नका, चार चौघांत तर नक्कीच करू नका. गरज असल्यास त्या माणसाला एका बाजूला घेऊन त्याबद्दल त्याला माहिती द्या. तसे केल्याने तुमचा हेतू कितीही चांगला असला तरी तुमच्याबाबत त्या माणसाच्या मनात शत्रुत्व निर्माण होते असे याचे म्हणणे आहे.
जर तुम्हाला एखाद्याला त्याची चूक लक्षात आणून द्यायची असेल तर सँडविच करायला शिका. तुम्हाला एखाद्याची जी गोष्ट आवडत नाही किंवा जी गोष्ट चांगली नाही, असे वाटते, ती त्याला सांगण्यापूर्वी चांगल्या गोष्टींच्या मध्ये घालून सांगा. म्हणजे आधी त्याच्या बोलण्यातील, त्याच्या विचारातील चांगली गोष्ट सांगा, मग त्याला चुकीची गोष्ट सांगा आणि पुन्हा एकदा त्याला त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट सांगून तुमच्या बोलण्याचा समारोप करा. या प्रकारे जर तुम्ही सँडविचमध्ये घालून एखाद्याला त्याची चूक दाखवून दिलीत तर ती चूक ऐकणार्‍यालाही सुधारावीशी वाटते. सुधारण्याची शक्यता वाढते. शिवाय तुमच्यासोबत शत्रुत्व निर्माण होत नाही
ही गोष्ट अगदीच छोटी आहे, हेही आम्हाला माहीत आहे. पण छोटी असली तरी अतिशय महत्त्वाची आहे. जसे की सँडविच हे जेवण नव्हे, तो संपूर्ण आहार नव्हे, पण तरीही भुकेच्या वेळेला अन्य काही मिळत नसताना सँडविच हा एक अत्यंत उत्तम असा पदार्थ आहे. तसेच हा छोटा विचार अत्यंत कामाचा आहे. शक्य असल्यास तुम्ही तुमच्या आयुष्यात तो अवलंबून पाहा.
काही वेळेला स्पष्ट बोलावे लागते. शाळेत मुलांना रागावणे, कर्मचार्‍यांशी रागाने बोलणे हे ते काम साध्य करण्यासाठी आवश्यक तरी असते. पण अनेकदा नातेवाईक, मित्र आणि शेजारी यांच्याशी बोलताना आपण उगाचच अयोग्य भाषा वापरतो. मग माणसे तुटतात. अनेकदा आपण माणसांना उगाचच दुखावत असतो, तर अनेकदा चांगला सल्ला दिला असताना माणसं दुखावली जातात. या सँडवीच पद्धतीमुळे तुमचे मानवी संबंध सुधारतील. मित्र वाढतील. आयुष्य अधिक आनंदी आणि अधिक सुखी होईल.



प्राकृत मराठीमधील पहिला ग्रंथ (15.112019)

मराठी भाषेचा उगम प्राकृत मराठीमधून झाला. त्या प्राकृत मराठीमध्ये लिहिलेला पहिला ग्रंथ म्हणजे ‘गाथासप्‍तशती’ होय. महाराष्ट्रात इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 या चारशे वर्षांच्या काळात सातवाहन राजवट होऊन गेली. त्या राजांपैकी हाल सातवाहन राजाने ‘गाथासप्‍तशती’ हा ग्रंथ सिद्ध केला. राजा हाल सातवाहनाने आपल्या राज्यातील कवींना काव्यरचना करण्याचे आव्हान करून त्यांनी केलेल्या रचना संकलित केल्या. स्वत: काही रचना केल्या आणि त्यातून ‘गाथासप्‍तशती’ हा ग्रंथ सिद्ध झाला. ‘गाणे’ ह्या अर्थी असणार्‍या ‘गै’ ह्या धातूपासून ‘गाथा’ हा शब्द तयार झाला. गाथा हे वृत्त संस्कृतमधील ‘आर्या’ ह्या वृत्तासारखे आहे. गाथावृत्तामुळे ह्या ग्रंथाला ‘गाथासप्‍तशती’ हे नाव पडले. प्रत्येक गीताला गाथा असे म्हटले जाते. सप्‍तशती म्हणजे सातशे श्‍लोक. प्राकृत भाषेतील आद्यग्रंथ म्हणून या ग्रंथात उल्‍लेख केला जातो. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या या राज्याची राजधानी तेव्हा प्रतिष्ठान नावाने ओळखली जात होती. आजचे पैठण तेच त्यावेळचे
प्रतिष्ठान होय.
सातवाहन राजाने आपल्या राज्याचा विस्तार उत्तरेपर्यंत केला असल्याने त्याच्या गाथासप्‍तशतीचा उल्‍लेख उत्तर भारतातील अनेक ग्रंथांमध्ये सापडतो. संस्कृत कवी बाणभट्ट व राजशेखर यांनी त्यांच्या काव्यग्रंथात ‘गाथासप्‍तशती’चा उल्‍लेख केलेला आहे. या ग्रंथावर सुमारे 18 टीका आहेत. त्यामध्ये कुलनाथ, गंगाधर, पीतांबर, प्रेमराज, भुवनपाल, साधारण देव यांच्या टीका महत्त्वाच्या असून बहुतेक टीकाकारांनी गाथांचे अर्थ शृंगारिक दृष्टिनेच लावले आहेत. या ग्रंथाचे अनुकरण करून प्राकृतमध्ये वज्जालग्ग, गाथासाहस्त्री, संस्कृतमध्ये आर्यासप्‍तशती आणि हिंदीमध्ये बिहारी सतसई अशा रचना झाल्या आहेत.
पाश्‍चात्य जर्मन पंडित वेबर यांच्यापर्यंत ‘गाथासप्‍तशती’ची महती पोहोचली होती. भारतीयांना या गाथा-संकलकाची पहिली ओळख आल्ब्रेख्त फिड्रिख वेबर ह्या थोर जर्मन पंडिताने इ.स. 1881 मध्ये करून दिली. त्यानेच ह्या ‘गाथासप्‍तशती’ची (गाहा सत्तसई) पहिली संपादित प्रत तयार केली.
राजा हाल याने एक कोटी गाथांमधून सातशे गाथा निवडल्या असल्याचा उल्‍लेख ‘गाथासप्‍तशती’मध्ये केला आहे. तो या गाथांचा केवळ संग्राहक-संपादकच नाही तर तो काही गाथांचा कर्ताही आहे. ‘गाथासप्‍तशती’मध्ये दोन-दोन ओळींच्या सातशे गाथा संकलित केलेल्या आहेत.
महाराष्ट्रातील त्या काळचे समाजजीवन, कृषिजीवन, ग्रामीण जीवन आणि माणसामाणसांतील भावनांचा आविष्कार या गाथांमध्ये झालेला दिसतो. हाल सातवाहनाने या ग्रंथाचे संकलन आणि संपादन केलेले असल्याने काही अभ्यासक हाल राजाला महाराष्ट्रातील पहिला संपादक म्हणूनसुद्धा गौरवितात.
‘गाथासप्‍तशती’ या काव्यात विंध्य पर्वताच्या दक्षिणेपासून ते गोदावरीच्या उत्तरेपर्यंतचा परिसर चित्रीत झालेला आहे. मराठवाडा, विदर्भ, गोदावरीचे दोन्ही तीर या परिसरातील समाजजीवन, परंपरा, भाषा, रीतिरिवाज, ग्रामीण संस्कृती आणि मराठी मातीचा गंध या गाथांमध्ये आढळतो. त्या काळच्या समृद्ध ग्रामजीवनाचे चित्रण या गाथांमधून येते. साळी, तूर, कापूस, ताग, हळद इत्यादी पिके, आंबे, जांभूळ, काकडी ही फळे झाडे, पशुपक्षी शिवाय गोदावरी, तापी, नर्मदा, मुळा या नद्यांचे उल्‍लेखही ‘गाथासप्‍तशती’मधील अनेक ग्रंथांमध्ये आढळतात.
‘गाथासप्‍तशती’मध्ये ज्या सातशे गाथा आहेत त्या दोन ओळींच्या स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण रचना आहेत. मानवी भावना, मानवी व्यवहार आणि नैसर्गिक दृश्यांचे सुंदर आणि सौंदयपूर्ण चित्रण या गाथांमध्ये केलेले आढळते. स्त्री-पुरुष यांच्यामधील विलासपूर्ण व्यवहार, प्रणय यांचाही विलोभनीय आविष्कार ग्रंथात मोकळेपणाने केलेला आढळतो. विविध व्रते आढळतात. होळीसारख्या उत्सवांचे उल्‍लेख आढळतात.
आज उपलब्ध असलेल्या ‘गाथासप्‍तशती’चे सहा पाठभेद असल्याचे सांगतात. यातल्या काही कथांमध्ये हजार गाथा आहेत, तर त्यातील 430 गाथा या सगळ्या पाठभेदांमध्ये असल्याचे एका अभ्यासकाने म्हटले आहे. काही अभ्यासकांनी असे म्हटले आहे की, हाल सातवाहनाने सुंदर सुभाषितांचा एक कोश निर्माण केला, त्यातच पुढे सातशे गाथांचा समावेश झाला आणि त्याचे नाव ‘गाथासप्‍तशती’ असे झाले.
तत्कालीन समाजात आढळणार्‍या स्त्रियांविषयी यातल्या अनेक गाथा आहेत. अनेक गाथा या शृंगाररसप्रधान आहेत. स्त्रीची साध्वी, पतिव्रता, चंचला, कुलटा अशी विविध रूपे या गाथांमधून वर्णन केलेली आहेत.
मराठीतील एक नामवंत कवी राजा बढे यांनी ‘शेफालिका’ नावाने या ग्रंथाचा मराठीत पद्यानुवाद केला आहे. याच पुस्तकात प्रा. अरविंद मंगरूळकर यांनी गद्यानुवाद केला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.


हसायला विसरू नका! (12.11.2019)


‘हसतो तो माणूस’ अशी एक माणसाची व्याख्या आहे. माणूस आनंद झाला म्हणजे हसतो. तो विनोद वाचून हसतो. नाटक-सिनेमा पाहून हसतो. टीव्हीवर कार्यक्रम पाहून हसतो आणि एकमेकांशी बोलताना गंमत करून हसतो. कोणी ओळखीचा दिसला तरी हसतो, कोणी ओळखीचा नसेल तर ओळख काढायला म्हणून हसतो. हसण्यात आनंद आहे. सुख आहे. मन ताजेतवाने करण्याची शक्ती आहे. आजारांपासून बचाव करण्याची शक्तीही या हसण्याच्या आनंदात आहे.
माणसाने विज्ञान-तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली, पण आनंदाने जगायचे कसे, याचे उत्तर मात्र विज्ञानतंत्रज्ञानाला देता आलेले नाही. विज्ञानाने सुखसाधने तयार केली, पण सुख निर्माण कसे करायचे हे मात्र विज्ञानाला कळलेले नाही. माणसाने सुख शोधल पाहिजे. त्यासाठी आला क्षण जगून घेऊन हसले पाहिजे. वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्टमध्येे 156 देशांची क्रमवारी लावली आहे. कोणता देश किती आनंदी आहे यावर ही क्रमवारी ठरते. या क्रमवारीत यंदा भारत 7 अंक मागे गेला असून यंदा 140 व्या क्रमांकावर आहे.
अनेक गोष्टीमध्ये पहिल्या पाचदहामध्ये असणारा देश आनंदाच्या क्रमवारीत पहिल्या शंभरातसुद्धा असू नये, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. स्थळकालपरिस्थिती यास कारणीभूत  आहे हे खरेच. पण महान प्राचीन परंपरा लाभलेल्या आपल्या देशात आनंदाने कसे जगावे हेच आता आपल्या माणसांना सांगायची वेळ आली आहे, हे दुर्दैव होय. देशांचा हा आनंदाचा क्रम त्या देशातील नागरिक किती आनंद घेऊ शकतात, यावर अवलंबून असतो. अंतिमता माणसाचे जगणे किती आनंदी आहे हेच महत्त्वाचे, नाही का?
काही काही माणसे सदैव दुर्मुखलेली असतात. ती तशी का असतात कळत नाही. दुःख आणि संकटे तर प्रत्येकाच्याच जीवनात असतात. ती जीवनाची अपरिहार्यता आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे, सुख जवापाडे दुःख पर्वताएवढे. तेव्हा जीवनात सुखापेक्षा दुःख अधिक असणार हे तर आहेच. पण म्हणून सदासर्वदा चेहरा पाडून बसून
कसे चालेल?
यासंदर्भात काही वर्षांपूर्वी वाचलेली एक गोष्ट आठवते. एक भिकारी एका साधूकडे भीक मागत असतो. साधू म्हणतो, प्रथम तू मला काहीतरी दे. मग मी तुला काहीतरी देईन. त्यावर आश्चर्यचकित झालेला भिकारी म्हणतो, साधुमहाराज, माझी थट्टा करता काय? माझ्याकडे आहे काय तुम्हाला द्यायला? त्यावर तो तेजस्वी साधू उत्तर देतो, ईश्वराने तुला हसण्याचे सामर्थ्य दिले आहे आणि ते आजही तुझ्यापाशी आहे.
खरे तर भीक मागणार्‍या माणसाकडून गोड हसण्याची अपेक्षा करता येणार नाही किंवा चेहरा पाडल्याशिवाय भीक मिळणार नाही हेही खरे, पण त्या सवयीने भिकारी आपल्याला हसता येते हेच विसरून जातो. हे फक्त भिकार्‍याचेच होते असे नाही. चांगल्या चांगल्या घरातली कमावती माणसेही असे वागू लागतात. माणसाने दुसर्‍यासाठी हसले पाहिजे आणि स्वतःसाठीही हसले पाहिजे.  हसणे ही फक्त माणसाला लाभलेली देणगी आहे. तेच माणसाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. पण आपण तेच विसरून चाललो आहोत. ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’ असे संतांनी लिहून ठेवले आहे. हास्य हे मन प्रसन्न करण्याचे सर्वोत्तम टॉनिक आहे. अनोळखी माणसालाही तुम्ही एक स्मितहास्य करून दाखवलं तर तो त्या क्षणापुरता का होईना तुमचा होऊन राहतो. मग आपली माणसं अधिक जवळ येतील यात शंका आहे का?
हास्याचे नाना प्रकार आहेत. त्यातलं निर्मळ हास्य हेच सर्वोत्तम हास्य होय. विकट हास्य, कुत्सित  हास्य अशा काही हास्यापासून मात्र आपण स्वतःला सदैव दूर ठेवले पाहिजे. लक्षात ठेवा माणसाने हसले पाहिजे. नाहीतर माणसाचं हसू होतं. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे किंवा आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे किंवा हसते हसते जीना सिखो अशी वचने ऐकणार्‍या आपल्या समाजाला हसायचे कसे हे सांगायला लागू नये. आपल्या आध्यात्मिक परंपरा आणि त्यातला पुनर्जन्म विचार  हा माणसाच्या सुखासाठी जन्माला आलेला आहे, नाही का? म्हणून आम्हा म्हणतो, माणसा,
हसायला विसरू नको!

1 comment:

  1. Casinos with the BEST CASINOS - JTG Hub
    Find the BEST CASINOS 계룡 출장안마 at 화성 출장마사지 JTG Hub. We list and provide top-rated 안동 출장안마 casinos and slot machines with the highest 아산 출장마사지 payouts. 하남 출장마사지

    ReplyDelete