मराठी संवर्धनासाठी काय करता येईल?
महाराष्ट्रात मराठी अनिवार्यतेचा कायदा आहे. त्याची कठोर अंमलबजावणी सुरू करावी. अन्य भाषिकांना आम्ही तुमच्याविरोधात नाही; मात्र महाराष्ट्रात मराठीच्या संवर्धनासाठी आपण सहकार्याची भूमिका घेतलीच पाहिजे, ही सरकारची भूमिका असल्याचे स्पष्टपणे समजून सांगावे. म्हणजे वादाचे प्रसंग उपस्थित होणार नाहीत. मराठी शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी आणि असलेल्या शाळा अधिक चांगल्या होण्यासाठी प्रयत्न करावेत. शाळांमधील दर्जाच्या सुधारण्यासाठी प्रयत्न केल्यास या शाळांकडे ओघ वाढू शकतो. महाविद्यालयात आणि विद्यापीठात मराठीच्या वर्गांची पटसंख्या वाढविण्यासाठी काय करता येईल याचा शोध घ्यावा. इतर माध्यमांमधील मराठीचे आध्यापन अधिक चांगले कसे होईल याचाही काळजीपूर्वक पाठपुरावा करावा. सर्व सार्वजनिक ठिकाणी मराठीचा वापर करून मराठी ही ताबडतोब अर्थकारणाची भाषा म्हणून अधिकाधिक कशी वाढेल यासाठी प्रयत्न सुरू करावेत. मराठीच्या संवर्धनासाठी काय काय करता येईल यासाठी या विषयातल्या विविध संस्था आणि तज्ज्ञ यांच्या स्वतंत्रपणे वारंवार बैठका घेऊन त्यातून आलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीवर बारकाईने लक्ष द्यावे. सरकारच्या विविध संस्थांमधला समन्वय वाढवून मराठीचे काम अधिक नेटाने पुढे कसे जाईल हे पाहावे. मराठी साहित्य, संस्कृती आणि भाषा यातील संशोधनावर भर देऊन हे संशोधन उपयोगात कसे आणता येईल यावर भर द्यायला हवा. शासनाचा निधी मोठ्या प्रमाणावर विविध उपक्रमांवर खर्च केला जातो; मात्र या उपक्रमांचे पुढे काय होते याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. उदाहरणार्थ विविध कोशांची निर्मिती केली आहे; पण बहुतांश मराठी माणसांना अशा प्रकारचे कोश आपल्याकडे निर्माण झाले आहेत आणि ते आपल्याला वापरता येतात याची कल्पनाच नाही तेव्हा या प्रकारच्या साधनसामग्रीच्या उपयोगाबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. आणखी 25 वर्षानंतर मराठीची महाराष्ट्रातील स्थिती काय असणार आहे याची एक स्पष्ट कल्पना संकल्पचित्र म्हणून मांडायला हवी. या उद्दिष्टाच्या पूर्णत्वासाठी कोण, केव्हा, किती आणि कसे काम करणार आहे, हे स्पष्ट करून घ्यावे. संबंधितांवर तशी जबाबदारी निश्चित करावी. महाराष्ट्रात मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यांच्या संवर्धनासाठी खास निधी उभा करून तो मोकळ्या हाताने खर्च करावा. अत्यंत काटेकोरपणे त्याचा हिशोब मांडावा. मराठी माणसाच्या मनात मराठीच्या संवर्धनाचे आस निर्माण व्हावी यासाठी कोणते प्रयत्न करता येतील याचा शोध घ्यावा. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे यासारख्या बहुभाषिक होऊ लागलेल्या शहरांचा चेहरा मराठमोळा कसा राहील आणि या शहरांमध्ये जगताना मराठी माणसाला न्यूनतेची भावना न येता अभिमानाची भावना कशी निर्माण होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत.
No comments:
Post a Comment