Showing posts with label वैभव चालके. Show all posts
Showing posts with label वैभव चालके. Show all posts

Monday, February 19, 2018

सुट्ट्यांची गंगा वाहती राहू दे!

सुट्ट्यांची गंगा वाहती राहू दे!
अजय आपल्या मित्रांना सांगत होता, अरे! परवा मुलाची पिगीबँक फोडली (म्हणजे पैसे साठवायचा डबा) तर त्यातून अठरा हजार रुपये निघाले. सात वर्षे त्यात आम्ही पैसे टाकत होतो. घेतानाच मोठी घेतली होती मला वाटले होते पाच-एक हजार निघतील. मोजले तर अठरा हजार आणि वर निघाले...
मला एकदम पंधरा-वीस दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवला.
सिएसटीहून बस पकडून मी दादरच्या दिशेने निघालो होतो. एक वृद्ध ग्रहस्थ बसमध्ये चढले, पण शंभराची नोट सुट्टी नसल्याने आणि वाहकापाशीसुद्धा सुट्टे पैसे नसल्याने त्यांना काय करावं कळेना. क्षणभर घुटमळून ते चालत्या बसमधून उतरले. उतरल्या उतरल्या धडपडले. कदाचित पडलेच असते. सुट्ट्या पैशांअभावी बिचार्‍यांना थेट हॉस्पिटल गाठण्याची वेळ आली असती.
बस प्रवासात ही सुट्टे पैसे मोठी भानगड असते. सीएसटी ते गिरगांव प्रवासाचे आधी सहा रुपये आणि मग आठ रुपये सुट्टे ठेवणे ही मोठीच डोकेदुखी ठरून राहिली होती माझ्यासाठी. चार दिवस सुट्टे द्यावेत तरी पाचव्या दिवशी वाहकाशी भांडण ठरलेले. मग एकदा मी ठरवून टाकले, आजपासून वाहकाशी हुज्जत घालायची नाही. तो असून देत नसला तरी शांत राहावयाचे. देवदयेने आपल्या खिशात पैसे आहेत. दहा रुपयाचे तिकीट घ्यायचे. वाद संपवायचा. मी हे असे ठरवून आता काही वर्षे निघून गेली. मला एकदाही आठऐवजी दहा रुपयाचे तिकीट काढावे लागलेले नाही. एकतर मी सुट्टे पैसे घेऊन जातो. दहाची नोट दिली तर सुट्टे पैसे मिळतात. म्हणजे मिळत आले आहेत.
सुट्टे हा खरे तर मोठाच प्रश्न आहे. एकदा मी खिशात पाचशेची नोट असताना दिवसभरात तिघांकडे सव्वाशे रुपये उधार ठेवले होते. शरम वाटू लागली होती स्वतःची ...
सांगायचा मुद्दा वेगळाच आहे. सुट्टे पैसे नसले म्हणजे अनेकदा शारीरिक, मानसिक त्रास होतो आणि आपल्या पैकी अनेक जण मुलांच्या पिगी बँकमधून आणि घरातल्या कपाटातून उगाचच सुट्टे पैसे अडकवून ठेवतात. सुट्टे पैसे चलनात राहिले पाहिजेत. ते असे अडचणीत ठेवू नका. सुट्टे पैसे आणायला रुग्णासोबतच्या माणसाला जेव्हा वणवण करावी लागते ना, तेव्हा त्याची काय अवस्था होत असेल ते आठवा आणि सुट्टे पैसे साठवून ठेवणे टाळा.
तुम्ही रस्त्यावर गाडी चालवित असताना जर अ‍ॅम्ब्युलन्स आली तर तुम्ही काय करता? अ‍ॅम्ब्युलन्सला जागा देता ना? सुट्टे पैसे अडवणे, अडवून ठेवणे हे अ‍ॅम्ब्युलन्सला जागा न देण्यासारखे आहे. तेव्हा वाट मोकळी करा. सुट्टे पैसे वाहत राहू द्या. ती गंगा मग तुमच्या गरजेला तुमच्यापाशीसुद्धा येईल, काय, आवडला ना विचार?
- वैभव बळीराम चाळके 
९७०२ ७२३ ६५२.

Monday, September 12, 2016

कवी कसा असावा?
काही काही दिवस अगदी विलक्षण असतात. परवा गुरुवारी असाच एक  विचित्र योगायोग घडून आला. ‘गुरुचरित्र’ लिहून मराठी कवितेत मानाचे स्थान मिळविणारे कवी गुरुनाथ सामंत यांनी मोजक्याच, पण दर्दी रसिकांसमोर जाहीर काव्यवाचन केले. (ते आध्यात्मिक गुरुचरित्र ते हे नव्हे!) आणि त्याच दिवशी काही तासांच्या अंतराने निसर्गकवी नलेश पाटील यांच्या निधनाची बातमी आली. एरवी जाहीर कार्यक्रमात कविता वाचन न करणारा एक कवी ऐकावयास मिळाल्याचा  आनंद अनुभवत असताना केवळ जाहीर कार्यक्रम हेच एकमेव माध्यम कवितेसाठी निवडलेला एक उमदा निसर्गकवी आपल्यातून निघून गेल्याचे दुःख
सामोरे आले.
या दोन घटनांच्या अनुषंगाने आज कवी कसा असावा? याविषयी मांडणी करावी वाटते आहे. कवी सामंतांचे जाहीर काव्यवाचन ऐकण्याची संधी मिळाली ती ‘रुची’चे संपादक सुदेश हिंगलासपूर आणि किरण येले यांच्यामुळे! त्यांनी ‘रुची’चा एकही कविता नसलेला विशेषांक काढला आहे आणि त्याचे प्रकाशन सत्यकथेची जेथे होळी करण्यात आली त्या मौजेच्या पायरीवर करण्यात आले. त्या घटनेचे साक्षीदार असलेल्या कवी गुरुनाथ सामंतांच्या हस्तेे हे प्रकाशन झाले. विशेषकांचा संपादक म्हणून किरण येले यांनी कवी कसा असावा, याचा एक वस्तुपाठच घालून
दिला आहे.
दुसरी गोष्ट गुरुनाथ सामंत यांची! नव्या कविता लिहू लागलेल्या सामंत यांनी एकदा कविता स्पर्धेत भाग घेतला. कवी रमेश तेंडुलकर परीक्षक होते. (भारतरत्न सचिन तेंडुलकर हे रमेश तेंडुलकर यांचे सुपुत्र) सामंतांच्या कवितेला तुफान टाळ्या पडल्या. सर्वांना माहीत होते पहिला क्रमांक सामंत यांचाच येणार, पण तेंडुलकरांनी सामंतांना उत्तेजनार्थ बक्षीसही दिले नाही. ते आपल्या भाषणात म्हणाले, सामंतने कविता छान म्हटली. पण त्यांच्यावर रेगे आणि मर्ढेकरांचा प्रभाव आहे. मी त्याला बक्षीस दिले नाही, कारण बक्षीस दिले तर तो असाच कविता करीत राहील. ते तसे त्याने करू नये, स्वतःची कविता शोधावी, म्हणून त्याला आज बक्षीस दिलेले नाही! सामंतांनी तेंडुलकरांचे ऐकले. पुढची काही दशके काव्यसाधना केली. प्रसिद्धीच्या मागे न जाता उत्तम लेखन केले. कवी कसा असावा, त्याचा हा एक वस्तुपाठच आहे!
आता तिसरी गोष्ट निसर्गकवी नलेश पाटील यांची! नलेश पाटील चित्रकार कवी! रंगानी वेड लावलेला अवलिया! निसर्गात रमणारा! कल्पनांनी बहरणारा!  त्यांनी गावोगाव कविता गाऊन कवितेचा गाव रसरशीत ठेवला. पण गंमत पाहा, अवघ्या महाराष्ट्राला नव्हे बृहन्महाराष्ट्राला माहीत असलेल्या या कवीचा स्वतःचा कवितासंग्रह नाही. ‘कवितांच्या गावा जावे’ या संग्रहात त्यांच्या काही कविता आहेत तेवढाच काय तो त्यांच्या संग्रहित प्रकाशित काव्यसंसार! उरलेल्या कविता कुठेकुठे नियतकालिकांत वाचायला मिळतात! सांगायचा मुद्दा म्हणजे कवी म्हणून नाव व्हायला, लोकांच्या मनात जागा मिळवायला संग्रह काढायची आवश्यकता नसते, चांगली कविता लिहिली पाहिजे. कवी कसा असावा याचा हा वस्तुपाठ! महाराष्ट्रात कविता गवता ऐसी उगवत आहे. अशा वेळी सर्व कवींनी हे तीन वस्तुपाठ सदैव
लक्षात ठेवायला हवेत!

Saturday, July 23, 2011

संतांची शिकवण

संतांची शिकवण
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असे आपण म्हणतो तेव्हा प्रामुख्याने आपल्यासमोर उभे राहतात ते भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणारे ज्ञानदेव-नामदेव-एकनाथ-तुकाराम हे संत चतुष्ट्य व त्यांच्यासोबत क्षात्रतेजाची पूजा मांडणारे संत रामदास. मराठी संत साहित्याचा अभ्यासही या पाच प्रमुख संतांच्या संदर्भातच झालेला आढळतो. जनसामान्यातही प्रामुख्याने जर कोणत्या संतांची शिकवण मोठ्या प्रमाणात मानली जात असेल तर या पाच संतांचीच होय.
या पाच संतांपैकी ज्ञानेश्वर, नामदेव आणि तुकाराम हे विठ्ठलभक्त वारकरी होते. एकनाथ महाराज हे दत्त संप्रदायी पण पुढे वारकरी संप्रदायाला बळकटी देण्याचे काम करणारे आणि एकूण समाजातली दरी मिटवत समन्वय साधू इच्छिणारे! तर संत रामदास क्षात्रधर्माची उपासना आणि प्रचार प्रसार करणारे!
या पाच संतांनी आणि त्यांच्या भोवतींच्या संत मंडळींनी आपल्याला कोणती शिकवण दिली. कोणकोणत्या बाबतीत आजही ती शिकवण आपल्याला दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरत आली आहे. यासंदर्भात संतसाहित्याचा घेतलेला हा धावता आढावा. हा लेखनप्रपंच पदरचे काही सांगण्यासाठीचा नव्हे तर संत साहित्याने दिलेले धडे कोणते याची उजळणी करण्यासाठी केलेला प्रयत्न होय.
संत ज्ञानदेवांपासून संत तुकारामांपर्यंत भागवत धर्माची कशी उभारणी केली हे संत बहिणाबाईंनी नेमक्या शब्दांत एका अभंगात सांगितले आहे.
ज्ञानदेवाने भागवत धर्माचा तर पाया रचलाच, पण त्याच वेळी प्राकृत भाषेचा, तत्त्वज्ञानाचा, भाषाविज्ञानाचा व मराठी काव्याचाही पाया रचला आहे. आज या कोणत्याही क्षेत्रात नव्या विचारांची मांडणी करावयाची असेल तर "ज्ञानेश्वरी'स वगळून चालत नाही. शिवाय योग आणि अध्यात्माचा कळस गाठण्याची कमालही ज्ञानेश्वरांनी करून दाखविली. म्हणूनच साधारण सातशे-आठशे वर्षे विचारवंत आणि अभ्यासक ज्ञानेश्वरीचा डोह पुन्हा पुन्हा उपसून पाहत आहेत, त्याचा थांग अजून लागलेला नाही. तो उपसावा तो तो नवा अर्थ लाभू लागतो.
ज्ञानदेवाने स्वभाषेचा अभिमान बाळगण्याची आणि तो वाढविण्याची शिकवण दिली. आज जगभरात हजारो भाषांपुढे जो प्रश्न आहे त्याचे चोख उत्तर ज्ञानेश्वर माऊलीने देऊन ठेवले आहे. माझी मराठी अमृताशी पैजा जिंकणारी आहे असे माऊलीने लिहून ठेवले आहे, पण आपण त्यांच्या या शिकवणुकीकडे दुर्लक्ष केेले आणि इंग्रजीच्या गुलामीचा पट्टा गळ्यात घालून श्र्वान झालो. त्याच्याच प्रामाणिकपणाने इंग्रज मालकाशी प्रामाणिक राहिलो आहोत.
ज्ञानदेवांनी चिद्‌विलास वादाची, म्हणजे चराचरात चैतन्य भरलेले आहे या नव्या तत्त्वज्ञानाची मांडणी करून "हे विश्वचि माझे घर' म्हटले आहे. स्वामी विवेकानंदांनी जगाला विश्वबंधुत्वाची शिकवण देण्यापूर्वी सहाशे वर्षे ज्ञानेश्वरांनी विश्र्वबंधुत्वाची शिकवण दिली होती.
ज्ञानेश्वरांच्या निमित्ताने मराठी भाषेस आणि मराठी मुलुखास एक ज्ञानसूर्य लाभला आहे. ज्ञानेश्वरांनी काय शिकवण दिली असे विचारून उत्तरे देत बसण्यापेक्षा त्यांनी काय शिकवले नाही? असाच प्रश्न अधिक सयुक्तिक ठरावा एवढे त्यांचे कार्य सूर्यतेजी आहे.
भावनेचा ओलावा संत नामदेव
संत नामदेव हे ज्ञानेश्र्वरांचे समकालीन होय. "नाचू कीर्तनाचे रंगी। नामदीप लावू जगी' म्हणत नामसंप्रदायाचा प्रचार, प्रसार करणारे नामदेव म्हणजे मराठीतील पहिले भावकवी होत. नामदेवांच्या अभंगात भावनेला मोठे महत्व आहे. साध्या सोप्या भाषेत, बहारदार कल्पना करीत नामदेवांनी, रसाळ भावनेत बुडवून उपदेश केला. म्हणूनच उपरोक्त पाच संतांपैकी सर्वमुखी होण्याचा मान तुकारामांबरोबर नामदेवांना मिळाला. आपल्याकडे चरित्र लेखनाची मोठी परंपरा नाही. पण महानुभाव पंथात महिपतीने आणि वारकरी पंथात नामदेवांनी चरित्रलेखनाचे महत्व जाणून चरित्रलेखन केलेले आढळते. ज्ञानदेवादी संतांची चरित्रे आपल्याला नामदेवांच्यामुळेच प्राप्त झाली. नामदेव नामाच्या प्रसारासाठी उत्तरेला पंजाबपर्यंत गेले. शिखांच्या गुरुग्रंथसाहेबमध्ये त्यांच्या पदांचा समावेश आढळतो. म्हणजे नामदेवाच्या उपदेशाचे महत्त्व थेट पंजाबपर्यंत आणि शिख धर्मापर्यंत पोहचलेले आढळले. ज्ञानदेवांनी बुध्दीचे अचाट सामर्थ्य दाखविले पण देव हा भावनेने जाणायचा असतो असे म्हटले. नामदेवांचे सारे जीवित आणि कार्य त्या उदात्त, निर्मळ भावनेशीच जोडलेले आहे. भावनेचं बळ नामदेवांनी नेमके जाणले. नामदेव देवाकडेही काय मागतात पाहा-
नामा म्हणे देवा तुमचे नलगे मज काही।
प्रेम असो दया हृदयी, आपुल्या लागतसे पायी।
नामदेवांचा मार्ग भावनेचा होता. म्हणूनच त्यांनी बाळगोपाळ्यांच्या भावना नेमक्या जाणत बोबड्या बोलांच्या रचना लिहिल्या-
कुत्ना थमाल ले धमाल आपुल्या गाई
आम्ही अपुल्या घलासि जातो भाई
ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम आणि रामदास यांच्या तुलनेत रामदेवांचा उपदेश अधिक प्रेमाने अधिक आपुलकीने केलेला वाटतो. आईने मुलाला सांगावे तसे नामदेव गोड शब्दांत बोलतात. म्हणूनच कदाचित नामदेवांचा धाक वाटत नाही. त्यांच्याबद्दल प्रेम वाटते आणि उत्तरोत्तर ते वाढत जाते.
समन्वयवादी संत एकनाथ
या कवी पंचकातील तिसरे कवी संत एकनाथ होय. संत एकनाथांचे अवघे चरित्र आणि लेखन ही समस्त समाजासाठी मोठी शिकवण आहे. एकनाथ महाराजांचे एकाच शब्दात वर्णन करायचे तर "समन्वयवादी' असे त्यांना म्हणता येईल. संत ज्ञानेश्वरांनी नाना क्षेत्रांची पायाभरणी केली तसाच संत एकनाथांनी नाना क्षेत्रांचा समन्वय साधला. समन्वय हेच अंतिम कल्याणाचे तत्त्व आहे, हा उपदेश, ही शिकवण संत एकनाथांनी दिली.
संत एकनाथ परंपरेने दत्त संप्रदायी होते. पण पुढे त्यांनी वारकरी संप्रदायाशी जोडून घेतले. संत एकनाथ स्वतः संस्कृताचे पंडित होते. पण त्यांनी आपल्या रचना प्राकृतात केल्या. भागवतासारखा अभिजात ग्रंथ निर्माण करतानाच सर्वसामान्यांच्या भाषेत भारुडे रचली. एका बाजूला भागवताच्या एकादशस्कंधावर ओवीबद्दल टीका रचून मूळ अर्थ सोपा करून दाखवला तर भारुडे रचताना भाषा सर्वसामान्यांची वापरून रूपके घडविली. म्हणजे जे अवघड ते सोपे केले आणि सोपेच समजणाऱ्यांना त्यांच्यात भाषेत रूपके घडवून अवघड समजून दिले. दलित-सवर्ण समन्वयासाठी एकाहून एक धाडसी निर्णय घेतले. एवढेच नव्हे तर गंगाजल तहानलेल्या गाढवास पाजून ज्ञानेश्वरांच्या चिद्‌विलासवादाचा रोकडा प्रयत्न आणून दिला.
संस्कृत भाषा देवे केली।
मग प्राकृत काय चोरापासोनी झाली?
असा थेट प्रश्न विचारून पंडितांना प्राकृत भाषेचे महत्त्व पटवून दिले, पण त्याच वेळी त्यांनी संस्कृत व तत्कालीन पारशी भाषेवर चुकूनही अन्याय केला नाही. एकनाथांनी भारुडांमधून असा उपदेश करून ठेवला आहे की, तो नित्यनूतन अर्थ देत राहतो. शेकडो वर्षे या भारुडांनी समाजावर गारूड केले आहे. मग ते विंचू चावला असेल किंवा नवरा नको ग बाई असेल. एकनाथांनी अध्यात्माच्या मार्गावर प्रकाशाचे दिवे ठेवलेच, पण प्रपंचाच्या मार्गावरही उपदेशाचा प्रकाश टाकलेला दिसतो. प्रपंच हाच परमार्थ करण्याचे अनोखे कार्य त्यांनी करून दाखविले आणि सर्वसामान्यांना अध्यात्माचा सोपा, सुकर मार्ग दाखविला. अशाप्रकारे नाना गोष्टींचा समन्वय-सुवर्णमध साधल्यानेच कल्याण साधू शकते, अशी एक महत्त्वपूर्ण शिकवण नाथांनी दिलेली दिसते.
जगद्‌गुरू संत तुकाराम
"ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालासे कळस' असे बहिणाबाईने म्हटले आहे. ज्ञानदेवांनी पाया रचला. त्यावर तुकोबांनी कळस चढवला, असे म्हटले जाते. महाराष्ट्राचा उल्लेखच आपण "ग्यानबा-तुकारामां'चा महाराष्ट्र असा करतो. आजही जनसमान्यांच्या मुखातून तुकाराम महाराजांच्या हजारो ओळी दरक्षणी ऐकायला मिळतात. सर्वसामान्यांत सर्वाधिक लोकप्रिय असलेला संतकवी म्हणजे तुकाराम होय. साधीसोपी भाषा, आंतरिक तळमळ, कधी मेणाहुनी मऊ तर कधी वज्राहुनी कठीण अशी विशेषणे असल्यानेच तुकारामांचे अभंग सदासर्वकाळ समाजात प्रिय होऊन राहिले आहेत. तुकारामांची कितीतरी वचने रोज व्यवहारात सुभाषितांसारखी वापरली जातात.
तुकोबा सर्वाधिक प्रिय होण्याचे कारण तो सर्वसामान्यांसारखा प्रापंचिक दुःखात भरडून निघाला. त्याला संतत्व प्राप्त झाले ते सांसरिक व्यापाच्या जंजाळात "रात्रंदिवस आम्हा युद्धाचे प्रसंग' आले ते पार केल्यावरच! म्हणूनच तुकारामाच्या अभंगात एकाच वेळी सांसारिक आणि पारमार्थिक मार्गावर चालणाऱ्यांना वाट दाखविणारी वचने आढळतात. तुकाराम महाराज "सुख जवापाडे। दुःख पर्वताएवढे' असे जीवनाचे सार सांगतात. पण म्हणून ते रडत बसत नाहीत. तर सुखाचा पुरेपूर आनंद घेतात. अपार दुःख असले तरी आनंद निर्भेळपणे अनुभवता येतो, हे मोठेच सत्य तुकारामांनी मांडून ठेवले आहे. त्यांनीच आपल्या अभंगात-
आनंदाच्या डोही । आनंद तरंग ।।
आनंदची अंग। आनंदाचे ।।
असे म्हणून ठेवले आहे. तुकारामांनी साधारण साडेचार हजार अभंग लिहिले. त्या अभंगसागरात सुभाषितांची एकाहून एक सरस मोती आढळतात.
समर्थ रामदास
जेव्हा महाराष्ट्र आणि अवघा देश परकीय आक्रमणांनी रसातळाला गेला होता. तेव्हा मनामनांत राष्ट्रतेज जागृत करण्याचे काम करणारे समर्थ रामदास हे या कविपंचकातील पाचवे कवी होय. समर्थ रामदासांनी दुबळ्या झालेल्या मनांसमोर धनुर्धर रामाचा आदर्श उभा केला. गावोगाव मारुतीरायाची स्थापना करून तरुणांना राष्ट्रहितार्थ शरीर कमविण्याची प्रेरणा दिली.
"दासबोधा'ची रचना करून त्यांनी अध्यात्माबरोबरच राजकारण, समाजकारण, बुद्धिवाद, प्रयत्नवाद यासारख्या भौतिक व राष्ट्रहितपोषक विषयांवर आपली मते मांडली. आज एकविसाव्या शतकातही व्यवस्थापनासारख्या विषयावरची रामदासांची मते आणि त्यांची शिकवणी मार्गदर्शक ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. मनाच्या श्लोकातील एकेक ओळ ही जणू अनुभवसिद्ध सुभाषितेच आहेत. रामदासांच्या एकूण वाङ्‌मयात जागोजाग अशी सुभाषिते, वचने आढळतात. "यत्न तो देव जाणावा', "मरे एक त्याचा । दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे' अशी कितीतरी वचने सांगता येतील. "दासबोध' हा समर्थ संप्रदायात ग्रंथराज मानला जातो. आजही लाखो लोक या दासबोधातील बोधामृताचे अखंड प्राशन करून परमार्थ आणि प्रपंच या दोन्ही क्षेत्रांत प्रगती साधताना दिसतात. आध्यात्मिक प्रगतीबरोबरच, भौतिक हित आणि राष्ट्रहित यासाठी रामदासांनी केलेला उपदेश, त्यांनी केलेले कार्य हे अत्यंत मोलाचे आहे. रामदासांचे तेच मोठे वैशिष्ट्य आहे. त्यांची करुणाष्टके, त्यांचे मनाचे श्लोक, त्यांचा ग्रंथराज दासबोध आणि इतर काव्ये ही शेकडो वर्षे जनसामान्यांपासून राजकर्त्यांपर्यंत साऱ्यांनाच हितोपदेश करीत आली आहेत.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे किंवा आम्हा मराठीजनांना संताचा वारसा लाभला आहे असे आपण म्हणतो, तेव्हा या संतांच्या विचारांनी समृद्ध झालेल्या सांस्कृतिक वातावरणाविषयी, त्यांच्या शिकवणीविषयीच आपण बोलत असतो. जगाच्या पाठीवर एकाच प्रदेशात इतके मोठे आणि इतके अधिक संत एकाच भूमीत जन्मास आल्याचे दुसरे उदाहरण नाही.
आपल्याकडे पुष्कळ संतसाहित्य उपलब्ध आहे. ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. पण आजही बहुतांश लोकांमध्ये संतांची शिकवण पोहोचलेली आहे किंवा पोहचते आहे ती मौखिक परंपरेतूनच होय. गावोगाव होणारी भजने, भारुडे आणि अलीकडे आलेला रेकॉर्ड किंवा तत्सम साधनांतून प्रसारित होणारी संतरचना हीच संत शिकवण जनमानसात पोहचवणारी प्रमुख साधने आहेत.
म्हणूनच संतविचार आणि संतांचा शिकवण ही अभ्यासातून मिळविलेली नव्हे तर ती संस्कारातून थेट रक्तात मिसळलेली आहे. हेच आपले भाग्य आणि हीच आपली संस्कृती होय.
मनाचे श्लोक, हरिपाठ, तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी आणि दासबोध हे ग्रंथ इथल्या घराघरांत आढळतात. ते ऐकत आणि वाचतच आपण लहानाचे मोठे होतो. एकनाथांच्या गौळणी आणि भारुडे, नामदेवांचे अभंग यांच्यात तल्लीन होत आपण रात्री जागवलेल्या असतात हे खरेच, पण त्यापुढे जाऊन या महान संतांचे इतर साहित्यही आपण आवर्जून वाचायला हवे. नव्या युगाला सामोरे जाताना ते आपल्याला नक्कीच साह्यभूत ठरेल. संतमंडळींनी नेहमीच नव्याचा विचार केला. नव्या माणसासाठी नवी शिकवण दिली. त्यांचे विचार इथून पुढेही सदैव मार्गदर्शक ठरतील, यात शंकेला जागा नाही.
-वैभव बळीराम चाळके
9702723652.

Tuesday, May 17, 2011

मुंग्या

मुंग्या

सखाराम अण्णाच्या घरावर सूर्य चढला की त्याची किरणं थेट खिडकीतून अजय झोपतो त्या खाटेवर येत. त्या चटक्याने अजय उठे आणि डोळे चोळत आंघोळीला निघे. आजही त्याच चटक्याने त्याला जागा आली. तो उठला आणि आंघोळीला निघाला.
शाळेला अभ्यासाची सुट्टी होती. दहावीची परीक्षा संपली म्हणजे नववीची सुरू होणार होती. अजय झेपेल तेवढा अभ्यास करी आणि कंटाळा आला म्हणजे गावात चक्कर मारून येई.
भाजावळीचे दिवस होते. गावाच्या आसपास सर्वत्र लोक भाजावळीच्या कामात दंग होते. दिवसभर एकेक तरवा भाजवळीसाठी तयार केला जाई आणि मग पहाटे पाचला उठून लोक तरव्यावर माती लावायला जात. यंदा नववीचा अभ्यास असल्याने अजयचे आईवडील त्याला घेऊन जात नव्हते. पण गेल्या वर्षापर्यंत तो आवर्जून जाई. सकाळी साधारण साडेसहा -सातपर्यंत माती खणून बारीक करून तरव्यावर पसरली जाई आणि तरव्याला पेट दिला जाई. म्हणता म्हणता आग भडके-धुराचे हत्ती आभाळाच्या दिशेने पळू लागत.
अजय उठला. घरामागच्या मोरीत जाऊन त्याने आंघोळ केली आणि भाजीभाकरी खाऊन तो अभ्यासाला बसला. वारं सुटल होतं आणि शेतं आगीनं पेटली होती. त्यामुळे गावावर आगीच्या झळा दौडत जात होत्या. घरात फारच गरम होतं म्हणून अजयने अभ्यासाचं गाईड घेतलं, घराला कडी मारली आणि तो आमटोऱ्याच्या सावलीत येऊन बसला. आमटोरा हे आंब्याचं झाड. त्याची फळं फार आंबट होती. ती कोणी तोंडातही घेत नसे, पण त्याची सावली मात्र एकदम गडद पडत असे. अजय परीक्षेच्या काळात इथेच अभ्यास करीत बसे.
आजही तो येऊन तिथल्या नेहमीच्या पाथरीवर बसला. अधूनमधून येणारे उष्ण वारे वगळता इथं थंड वातावरण होतं. म्हणूनच तो सुखावला होता. पण एका क्षणी तो धडपडत उठला. त्याचा हात प्रतिक्षिप्त क्रियेने कुल्ल्याकडे गेला होता. तोंडाने बोंबलत आणि कुल्यावर हात घासत तो वेडावाकडा नाचू लागला. वेदनेनं हैराण होत तो पुढची दोनचार मिनिटे तसाच कळवळत राहिला. त्याला लाला मुंगीने दंश केला होता. एकसारखा यग मारत होता. जरा वेदना शांत झाल्यावर त्याने ती मुंगी शोधून काढली आणि तिथल्याच एका दगडाने तिचा चेंदामेंदा केला. तिच्या अस्तित्वाची फक्त एक रेघ पाथरीवर राहिली.
अजयचे अभ्यासातून लक्ष उडाले. त्याला लहानपणीची आठवण आली- पाचवीत असताना एकदा हरे अभ्यासाला आलो तेव्हा अशाच एका मुंगीने मांडीवर चावा घेतला होता आणि वेदनेने कळवळत घरी जाताना आपण ढोपर फोडून घेतलं होतं. त्याला त्या मुंग्यांचा राग आला.
"आपण कळायला लागल्यापासून पाहतोय या आमटोऱ्याच्या मागच्या चिवारीच्या बाजूला या लालमुंग्यांची वारुळं आहेत. वारुळं नव्हे, साम्राज्याच आहे त्यांचं. त्या एरवी कुणाला त्रास देत नाहीत तरी एखाद्याला चावल्या म्हणजे तो असा एकदम फुगडी घालू लागतो.
"आपण यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे-' अजय मनाशीच बोलत होता.
दुसऱ्या दिवशी आईबाबा सकाळी भाजावळीसाठी बाहेर पडून गेले. उन्हं खाटेवर आली तसा अजय उठला. तोंडही न धुता तो काडीेपेटी खिशात टाकून घराला कडी मारून घराबाहेर पडला. गोठ्याच्या शेजारी गवताच्या वरंडी रचून ठेवल्या होत्या. त्यातली एक वरंड त्याने डोक्यावर घेतली.आमटोऱ्याच्या पाथरीवर त्याने वरंड उतरवून ठेवली. पुन्हा घरी जाऊन खोपीतली भाराभर लाकडे बांधून घेऊन आला.
आता त्याने त्या लालमुंग्यांच्या वारुळांभोवती गवताची एकेक पेंडी रचून गवताची तटबंदी उभारली. त्या पेंड्यांनी पेट घेताच वाऱ्यावर त्या उडून जाऊ नयेत म्हणून त्याने त्यावर लाकडे रचली. एकदम कडेकोट बंदोबस्त केला गेला. त्याला इतिहासातला पाठ आठवला, पुरंदर किल्ल्याला मुघल फौजेने वेढा घातला... आता एकही मुंगी जिवंत राहणे शक्य नाही! तो मनातल्या मनात म्हणाला. मग काडेपेटी काढून त्याने शिल्लक राहिलेल्या पेंड्यांमधली एक पेंडी पेटवली आणि त्या पेंडीने वारुळांभोवती रचलेल्या गवताच्या तटबंधीला आग लावली. सारीकडून गवत भरभरून पेटले. आतल्या मुंग्यांची कोण धावपळ झाली. असंख्य मुंग्या वारुळांतून बाहेर आल्या. प्रचंड वेगाने त्या सैरावैरा पळू लागल्या आणि शेकड्याच्या संख्येने जळून करपून मरू लागल्या. अजयला आता चेव चढला. त्याने उरलेल्या पेंड्या त्या वारुळांवर टाकल्या. आता त्याला त्यांचं सैरावरा पळणं पाहण्याची गरज उरली नाही. त्याला आता फक्त वारुळं, मुंग्या, गवत आणि लाकडाची राख उरलेली पाहायची होती.
हजारो मुंग्या मृत्युमुखी पडल्या. मघापासून गवताचा वास येत होता. आता त्या वासापेक्षा करपलेल्या मुंग्यांचा वास अधिक गडद झाला.
अजयच्या कुल्यावरच्या वेदना कमी कमी होत शांत झाल्या.
दुपारी आईवडील घरी परतले तेव्हा त्यांना हा सारा प्रकार समजला. वडील काही बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर ताण तेवढा दिसू लागला. पण आई करवादली, "काय केलंस हे गुलामा? देवाच्या मुंग्या होत्या त्या! सात पिढ्यांपासून आहेत तिथं. कुणाची हिंमत आली नाही त्यांना हात लावायची? आणि तू आज त्यांची राख रांगोळी केलीस! देव कोपला म्हंजी रं! काय ही अवदसा सुचली तुला?' आणि मग आवाजाची पट्टी बदलत आई हात जोडून म्हणाली, "संभाळ रं देवा माझ्या लेकरला. हातून चूक झाली आसल! लहान लेकरू हाय त्याला माफ कर!
आपण काही चूक केली आहे असं त्याला आतापर्यंत वाटत नव्हतं. पण आई रागवल्यावर आणि विशेषतः तिने देवाला साकडं घातल्यावर अजय घाबरला. आपण काही तरी अक्षम्य पाप केलं आहे आणि त्याची फळं आता आपल्याला भोगावी लागणार आहेत असं त्याला वाटू लागलं. आई देवापुढं पदर पसरत होती. अजयच्या नावानं शिव्या हासडत होती. मग अजयही मनातल्या मनात देवाला सॉरी म्हणाला. आई खूप खूप वैतागली आणि मग त्याला जवळ घेऊन रडरड रडली.
नेहमीप्रमाणे रात्री नऊला सगळे जण झोपी गेले. अजय एकटाच अभ्यास करत जागत होता. पण आज त्याचं मनच लागेना. त्याला तो दुपारचा प्रसंग पुन्हापुन्हा आठवत होता. मनात अनामिक भीती सळसळत होती. शेवटी साडेनऊला तो आपल्या खाटेवर झोपायला गेला.
आणि रात्री अकराच्या सुमारास...
"आई ग! हट... हट...' असा आवाज करीत तो उठला त्याच्या आवाजाबरोबर आई आणि बाबाही उठले. अंधारातच दोघे खाटेजवळ आले. अजय उठला होता, पण त्याचे डोळे मिटलेलेच होते. तो हातपाय झाडत होता. आणि अंगावरच्या मुंग्या झाडत होता. त्याच्या सर्वांगाला हजारो मुंग्या दंश करीत होत्या. वडिलांनी त्याचा हात धरला तर त्याने त्यांना भिरकावून दिले. आई "अजू, बाळा अजू' करीत त्याला समजवू पाहत होती. पण अजू शुध्दीवर नव्हताच मुळी! तो त्या हजार मुंग्यांच्या दंशांनी हैराण झाला होता. कधी तोंडावरून हात फिरवत होता. कधी पाठीवर तर कधी पायांवर! त्याने त्याच वेगाने शर्ट काढून फेकला. बरमोडा उतरवला. तरी हजारो मुंग्या त्याच्या अंगावर होत्याच्या तो त्यांना शिव्या पालत अगतिक होत धडपडत होता. फार केविलपणा झाला होता तो. आई त्याच्या जवळ गेली. पण त्याने तिला हिसकावून लावले. काय करावे ते कळेना तिला. इतक्यात तिच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. आणि विजेच्या वेगाने पुढे होत तिने होती नव्हती ताकद एकवटून त्याच्या कानफटात लागावली!
एकदम झालेल्या त्या आघाताने तो खडबडून जागा झाला आणि धडपडत आईकडे केविलवाण्या नजरेने पाहत राहिला. अंगावर एकही मुंगी नाही हे पाहून तो सुखावला . पण भीतीने अंग थरथरत होते.
क्षणभर विसावलेली आई पुन्हा विसकटली..
"मुडदा बसविला रं सात पिड्यांचा परपंरेचा! अजाण लेकरू त्याला दोनदा चावताना लाज नाय वाटली. मला न्या तुम्हाला रक्ताचीच भूक लागली असेल तर. माझ्या पोराला पुन्हा शिवायच नाय! जाळून टाकीन... समदं घरदार... गाव जाळून टाकीन सगळं...'
- वैभव बळीराम चाळके

Tuesday, March 22, 2011

सामाजिक समतेचे प्रतीक

सामाजिक समतेचे प्रतीक
सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं साखरपा हे माझं गाव. तिथे खंडवाडी नावाच्या छोट्या खेड्यात माझं बालपण गेलं. आज मुंबईत जगताना सगळ्या सण उत्सवांच्या वेळी ते जुने दिवस, त्या लोकरीती, त्या वेळेचे ते खेळ आठवतात. होळी अर्थात शिमगा आला की ते पंधरा दिवस गाव मनात पुन्हा जिवंत होतो. शाळा सुटल्यावर पळत पळत घरी यावं. पटापट दोनचार घास पोटात ढकलून कंबरेला आकडी बांधावी. त्यात कोयती सरकावून रानात शेवरीचा शोध घ्यायला निघावं. एखादी शेवर सापडली की तिला तोडून-किसून बांधावी आणि सजवून होळीच्या मळीत आणून उभी करावी. रात्री जेवून तिथेच आट्यापाट्या खेळाव्यात. मग होळी पेटवून दिंडे, आमट्या वाजवाव्यात. असा सगळा सुखाचा महासागरच त्या दहा दिवसांत झुलत असायचा.
होळी झाली की शिमग्याचा सण अर्थात वडे मटणाचा बेत असे. आणि मग दुपारपासून कोल्याचा नाच सुरू होई. वाडीतले सगळे जण देवळात जमत. मग एका तरुणाला साडी नेसवून गोमू बनवलं जाई. दुसऱ्याला मेकअप लावून कृष्ण बनवत. त्याला अनेकदा गोम्याही म्हणत. या गोमू आणि गोम्याला मध्यभागी ठेवून त्याच्या दोन्ही बाजूंनी मग इतर लोक दोन सरळ रेषांत वल्हे घेऊन उभे राहत आणि विशिष्ट पदन्यास करीत गाणी म्हणत नाचत. मधीच एखादी चाल मारली जाई. वल्हेधारी उभ्या रेषेत तर गोमू-गोम्या आडव्या रेषेत विशिष्ट लयीत झुलत राहत. एकजण डोलकी वाजवत असे. एक जण पुढे म्हणे. बाकीचे त्याच्या मागून म्हणत-
रायगड किल्ल्याला सोन्याच्या पाच पायऱ्या
तोरण बंाधिले भवानी देवीला
या गाण्यापासून
शेलारमामा म्हातारा ऐंशीया
वर्षांचा त्याने लढाय केली उदय भानूशी..
पर्यंतचा ऐतिहासिक आठवणी जागवणारी म्हटली जात.
आंबेवाडी फणसवाडी अलका हीच काय गो सासूरवाडी पासून गंगाजमना दोघी बहिणी ग पाणी जायजुय व्हाय। माशानं मारला दणका ग पाणी पाटाला जाय पर्यंतची रोजच्या जगण्याशी निगडित असलेली गाणी त्यात असत. त्याशिवाय सोंबा या देवा तू माझा सारथी देवाची आरती ओवाळू ये ओवाळू ये अशी आरती असे. त्यात देवानाच सारथी करून देवाच्या देवाला ओवाळलं जाई.
आमचं घर थोडं उंचावर आहे. म्हणून आमच्या घरी आल्यावर लोक हमखास वाळकेश्वरही हवा डोंगरी । बंगला बांधिला हवेवरी । त्या बंगल्याला दोन चार खिडक्या । हवा खेळे अति छान हो। हे गाणव म्हणत आणि त्यातील वाळकेश्वरी शब्दाच्या जागी चाळकेश्वरी असा शब्द वापरत तेव्हा छानच वाटत असे.
घरोघरी हा नाच फिरत राही. सर्वत्र गोमू गोम्या, ढोलकीवाला आणि नाचणाऱ्यांना ओवाळून दक्षिणाही दिली जात असे. रात्री उशिरापर्यंत हा नाच सुरू राही.
दुसऱ्या दिवशीपासून आमचा नाच बाहेर गावी जात असे आणि बाहेरचे नाच आमच्याकडे येत. त्यात जोयशीवाडीचा नाच खास असे. ते लोक जाकडी-नमनातील ड्रेस घालून नाचायला येत. त्यामुळे एक वेगळेच ग्लॅमर निर्माण होई. कधी गुरववाडीवरचा लिंगायत-गुरवाचा नाच येई. अधूनमधून सोंगे येत. आमचे खेळ, नाच यातले गुरू आणि हरहुन्नरी आप्पा सुर्वे कसलं तरी फर्मास सोंग काढीत. एकनाथांच्या कूट रचना म्हणत ते नाचत असत.
आम्ही मुलंही वह्यांच्या पुढ्यांचे मुखवटे बनवून रंगवून त्याला कोंबडीच्या पिसांचे तुरे खोवून सोंग काढायचो. किंवा मोठ्यांसारखा छोट्यांचा नाच काढत दारोदार फिरून धमाल करायचो. लोक मोठ्यांना पाच किंवा दहा रुपये दक्षिणा देत. आम्हाला चार आणे, वीस पैसे, आठाणे मिळत. आम्ही फक्त दहाबारा घरेच फिरायचो. पाच सहा रुपये जमायचे, ते वाटून घेतल्यावर श्रीमंत झाल्यासारखं वाटायचं. गाण्यावाजवण्याचा आनंद मिळायचा तो वेगळाच!
कोल्याच्या नाचाचे एक फार मोठे वैशिष्ट्य मला अलीकडे जाणवले. या नाचाने वर्षानुवर्षे सामाजिक समतेची गुढी उभी ठेवली आहे. आमचं गाव किनाऱ्यापासून जवळजवळ 50 किमी दूर आहे. कोळी समाजाचा आणि आमचा जवळचा संबंध नाही, तरी कोळी समाजाचा हा नाच आमच्याकडे मोठ्या प्रेमाने केला जातो. तो कोळ्यांचा आहे असं आम्हाला वाटतच नाही. एरवी स्वतःला शहाण्णव कुळी म्हणणारे मराठे, ब्राह्मणांसारखे शुध्द शाकाहारी असलेले लिंगायत- गुरव आणि जाकडी, नमननाट्यात वाखाणलेले गेलेले कुणबी हे सगळेच कोळी नसून कोळ्यांचा हा नाच आपला मानतात. दर शिमग्याला त्याची मजा घेतात आणि इतरांना देतात. प्रत्यक्ष कोळी समाजात हा नाच होतो की नाही कुणास ठाऊक!
शिमगा म्हटलं की, होळी, फाग, आट्यापाट्या, पालखी, खुणा या सगळ्याबरोबरच कोल्याच्या नाचाला मोठे महत्त्व आहे. विशेषतः त्याच्या या सामाजिक समतेच्या संदेशामुळे... सामाजिक अभिसरणाच्या त्याच्या गुणामुळे!!
- वैभव बळीराम चाळके

तिने चुंबिलेली लिलीची फुले
लिलीची फुले
तिने एकदा
चुंबिता, डोळां
पाणी मी पाहिले...!
लिलीची फुले
आता कधीहि
पाहता, डोळां
पाणी हे साकळे...!
ही पु.शि.रेगे यांची कविता आहे. अवघ्या आठ ओळींची. अवघ्या अठरा शब्दांची. पण तिच्यात मावणारा अवकाश फार मोठा आहे. म्हणूनच कदाचित ती कविता प्रथम वाचली तेव्हापासून मनात घर करून राहिली आहे.
ही कविता आहे डोळ्यांतल्या पाण्याची-अर्थात अश्रूंची-आसवांची! अश्रूंचे आपल्या जीवनातील स्थान फार मोठे आहे. डोळे डबडबले आहेत हे विधान डोळे ठार कोरडे झाले आहेत या विधानापेक्षा अधिक सुंदर आहे, नाही का? म्हणूनच तर साने गुरुजींनी आपल्या कवितेत "फक्त माझे अश्रू नको नेऊ देवा हाचि ठेव ठेवा जन्मभरी!' अशी प्रार्थना केली आहे. आणि चारोळीचा जनक चंद्रशेखर गोखले यांनी पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, डोळे कुणाचे भरणार नसतील तर मरणही व्यर्थ आहे असं म्हटलं आहे.
वरील कविता आसवांशीच निगेेेडित आहे. माणसाला माणसापासून तोडणाऱ्या आणि माणसाला माणसाशी जोडणाऱ्या आसवांची कविता आहे ही.
कुणी तरी एक ती... लिलीची फुले हाती घेऊन उभी असते. कवी तिला पाहतो. पुढच्याच क्षणी ती हातातली लिलीच फुले चुंबून घेते. ती लिलीची फुले चुंबत असताना तिच्या डोळ्यांत पाणी उभे राहते. का? ते कवीला माहीत नाही. पण त्या लिलीच्या फुलांशी तिचं कुणीतरी माणूस जोडलेलं असणार. लिलीची फुले कधी तरी तिच्या प्रिय माणसाने तिला दिली असतील आणि आता तो नाही म्हणून तिच्या डोळ्यांत ही लिलीची फुले पाहून आसवं आली असतील. त्याच्या स्मृतीने उचंबळून येऊन तिने ही फुले चुंबली असतील किंवा असेच काही तरी...काही तरी खास आठवण त्या लिलीच्या फुलांशी जोडलेली आहे. म्हणून ती फुलं हाती घेतल्यावर चुंबावी वाटली आणि चुंबल्यावर डोळ्यांत पाणी आलं. कवीचा आणि तिचा काहीही पूर्वसंबंध नाही. तो ते एक दृश्य पाहतो एवढाच त्याचा तिच्याशी संबंध! पण तो कवी आहे. सुहृद आहे.( गंगाधर पाटलांनी पु.शि. रेगे यांच्या निवडक कविताचं सकलन केलं आहे, त्याचं नाव "सुहृदगाथा'असंच ठेवलं आहे.) त्यामुळे तिचे डोळे भरलेले पाहून तो तिच्या भावनांशी सहकंप पावतो. तिला तशी आसवांनी डबडबलेली पाहून त्याचंही मन भरून येतं.
पुढच्या चार ओळींत कवी सांगतो की, त्या घटनेचा परिणाम इतका खोल होता की आता कधीही, कुठेही लिलीची फुले दिसली की ती घटना आठवते आणि डोळ्यांत पाणी साकळू लागते. कवी एखाद्या प्रसन्न सकाळी बागेत जातो. अचानक सुंदर उमललेली लिली दिसते. त्याचा स्मृती जागृत होतात. पटकन डोळे भरून येतात. किंवा तो एखाद्या समारंभात जातो लिलीच फुले दिसतात, डोळ्यांत एकाएकी आसवं भरून येतात. त्याच्या संवेदनशील मनानं आणि आसवांनी त्या मुलीच्या आसवांशी आणि तिच्या अज्ञात कहाणीशी मोठे गोड भावबंध निर्माण केले आहेत. स्नेहसंबंधाचे एक हिरवे झाडच त्यांच्या आत रुजून आले आहे.
प्रथम वाचनात ही कविता पटकन कळत नाही. सोपी आहे तरी अवघड वाटते. कारण ती थेट काही न बोलता बरेच काही सुचवते. त्यात या कवितेची रचना थोडी आडवळणाची आहे. त्या आठ ओळींतील पहिल्या साधारण साडेतीन ओळीनंतर स्वल्पविराम येतो, तिथे थांबलात, "डोळां' शब्दातील "ळा' वर असलेला अनुस्वार म्हणजे डोळ्यांत हे समजून घेतलात( "कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबां गेलां' मध्ये "बा'वर अनुस्वार आहे, तो आदरार्थी अनेक वचनांवरचा आहे आणि तो "बाबांनो' असे सुचवतो.) आणि दुसऱ्या कडव्यातील "पाहता'नंतरचा स्वल्पविराम आणि पुन्हा "डोळां' वरील अनुस्वार समजून घेतलात तर कविता एकदम सोपी होत जाईल.
पु.शि. रेगे यांची कविता कळायला थोडे श्रम पडतात. पण कष्टाने कमावलेली भाकरी जो आनंद देते त्याला उपमा नाही. तुम्ही चांगल्या,े दर्जेदार कवितांच्या शोधात असाल आणि थोडे कष्ट करायची तयारी असेल तर पु.शि.रेगेंच्या कविता जरूर वाचा. तसे नसेल तर ही लिलीची फुले काही कमी महत्त्वाची नाहीत. गेली साधारण दहा-बारा वर्षे ती माझ्या ओंजळीत अगदी ताजीतवानी राहिली आहेत. त्यातली काही तुमच्या हाती देतो आहे. ती जपून ठेवा. कुणी रसिक भेटला तर त्यातली काही त्यासही द्या!!
-वैभव बळीराम चाळके

Saturday, January 1, 2011

जागतिकीकरणात हरवलेला चेहरा शोधायला हवा!!

संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन
नव्या आसूडाची निर्मिती हेच संमेलनाचे प्रयोजन!
जागतिकीकरणात हरवलेला चेहरा शोधायला हवा!!
स्वातंत्र्यवीर सावरकरनगरी, ठाणे, ता.25- ज्या ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावात बसून महात्मा ज्योतिबा फुले यांनी "शेतकऱ्यांचा आसूड' लिहिला आणि इंग्रज सरकारला महापूर, महामारी, महायुद्धात फक्त शेतकरीच का मरतो? असा प्रश्न विचारला त्या ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या या संमेलनाने नव्या आसूडाची निर्मिती करावी, तेच या संमेलनाचे प्रयोजन आहे, असे प्रतिपादन 84व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी आज येथे केले. कोठे महात्मा फुल्यांच्या प्रश्नाचे उत्तर 140 वर्षांत आपण मिळवू शकलो नाही ते शोधण्याचे काम साहित्याने केले पाहिजे. जागतिकीकरणाच्या रेट्यात माणसाचा चेहरा हरवतो आहे, तो चेहरा शोधून देण्याचे काम साहित्यिकांनी करायला हवे असेही ते आपल्या भाषणात म्हणाले.
आज सकाळी या संमेलनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात उद्‌घाटन झाले. मावळत्या अध्यक्षांच्या छोटेखानी भाषणानंतर संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी माणसाचे जगणे आणि साहित्य याचा नेमका आलेख काढत साहित्य आणि माणसाचे जगणे यात अंतर पडत चालले असल्याचे विधान केले. हे अंतर संपवणे गरजेचे आहे आणि त्यासाठी काळाची चाहूल ओळखणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
जागतिकीकरणामुळे जीवनाला प्रचंड वेग आला आहे. आयुष्याचं नाव स्पर्धा झालं आहे. त्यात वस्तूंपुढे माणूस छोटा झाले आहे. पण हे सारं दुर्देवाने आपल्या साहित्यात प्रतिबिंबीत होत नाही. जागतिकीकरणाचे आकलन करून घेण्यास आपल्याला उशीर झाला आहे. या नव्या जगासाठी नव्या तत्त्वज्ञानाची पायाभरणी करण्याची आज आवश्यकता आहे. सौंदर्य आणि जीवन यातील जीवन महत्त्वाचे, मी जीवनालाच प्राधान्य देतो. आदिवासी लोक भिंतींवर सुंदर चित्रे काढतात, पण ते चित्रासाठी भिंत बांधीत नाहीत हे लक्षात घ्यायला पाहिजे.
उत्तम कांबळे भाषणाला उभे राहिले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या तेव्हा ते म्हणाले, तुमचा आवाज ऐकला. माझ्या जन्मभूमीतला आवाज ऐकला आणि आनंद झाला. संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न बरीच वर्षे लोंबकळत राहिला तो आपण आता सोडवून टाकला पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या परंपरेला अभिवादन करून उत्तम कांबळे यांनी आज भाषणाला सुरुवात केली. उत्तरोत्तर भाषण अधिक रंगत गेले.
पृथ्वी शेष फण्यावर उभी आहे असे सांगितले जात होते. मग ती राबणाऱ्याच्या तळहातावर असल्याचे सांगितले जाऊ लागले. आता ती संगणकाच्या पडद्यावर आली आहे, याचे भान आपण ठेवायला हवे. राजकारणाचा मी द्वेष करीत नाही आणि त्याच्याशी अतिरेकी गळेबाजीही करीत नाही. राजकारणाचा द्वेष केल्यानेच आपल्याकडे राजकीय महाकादंबरी निर्माण झाली नाही. महानाट्य निर्माण झाले नाही. आपण मी म्हणतो तेच प्रमाण, ही कृती सोडून दिली पाहिजे. मराठीच्या विविध बोली परिघावर ताटकळत न्याय मागत आहेत. आज आजूबाजूला वैचारीक लढे दिसत नाहीत. मी लढ्यांना साद घालतो आहे. वैचारीक दुष्काळ आपल्याला परवडणार नाही. जी भाषा जीवनाची होत नाही, तिच्यासाठी चर्चा कराव्या लागतात. भाषा व संस्कृती शासन निर्माण करीत नाही. तर त्यांना गतीशील करण्याचे काम शासनाचे आहे. अशी ठाम विधाने करीत साहित्याचाही आपण गांभीर्याने विचार करायला हवा असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
ठाण्यात या निमित्ताने साहित्यांची मांदियाळी जमली आहे. दुपारनंतरही विविध परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी पहिला दिवस साजरा झाला. या संमेलनात विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे, आमदार एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर आणि महापौर अशोक वैती आदी राजकीय नेते सामील झाले होते.