Thursday, December 16, 2010

आपण माणसात जमा नाही
राजन गवस यांच्या कथा

राजन गवस हे ऐंशीनंतरच्या कथाविश्वातले एक प्रमुख कथाकार आहेत. त्यांचा नावलौकिक कानावर होता. पण त्यांचा संग्रह आणून वाचायचा राहिला होता. एका ज्येष्ठ मैत्रिणीनं त्यांचा "आपण माणसात जमा नाही' हा संग्रह वाचला आणि तिने मला शिफारस केली. तिच्या शिफारशीमुळे मी नियोजित वाचन मागे ठेवून "आपण माणसात जमा नाही' वाचायला घेतला.
पहिलीच कथा वाचली आणि आनंदानं वेडा झालो. त्या कथेतली जैतुनबी मनात घर करून राहिली. कथेचं नाव आहे "पाझर'. पण कथा वाचून डोळ्याला अश्रूंचे झरे फुटले. जैतुनबीनं खेड्यात राहणाऱ्या आईची आणि उद्धव शेळके यांच्या "कौतिक'ची आठवण करून दिली. दहा-पंधरा वर्षांपूर्वी मागे ठेवलेलं गाव मनात पुन्हा जागं झालं. पुढच्या कथा वाचण्याअगोदरच मी न राहवून लेखकाचा फोन फिरवला. दोनच मिनिटे पण मनात होतं ते बोलून दाखवलं. मग पुन्हा संग्रहात घुसलो. संग्रहातील एकेक कथा वाचत जाताना लेखकाची मनातली प्रतिमा आणखी उंचावत गेली.
टीव्हीवरच्या एका बातमीमुळे गावातल्या मुलाण्याला तरणी मुले मारतात. तो मुसलमान हा त्याचा गुन्हा म्हणून. पण गावातली वडीलधारी माणसे जेव्हा त्या तरुणांना झापतात तेव्हा मात्र ते सगळे नरमतात, अशी ती बाबल आणि जैतुनबीची कथा आहे. त्या कथेत गाव म्हणजे काय? याचं नेमकं उत्तर मांडतामांडता लेखकाने विषमतेने फाटलेल्या तरी विविधतेने नटलेल्या एकसंघ राष्ट्राच्या एकात्मिकतेमागची सूत्रेच साररूपाने मांडली आहेत. त्या कथेचा हा शेवट पाहा.
"चुकत्यात, हाणा रांडंच्यांस्नी! हाडं मोडून ठेवा म्हणजे आसं काय सुचायचं न्हाई. टीवी बघत्यात टीव्ही.' फडकरी बाबूदानं आवाज टाकला. तसं गोंदा पाटलाने सगळ्यांना गप्प केलं. मग पुढं होत सगळ्यांकडं बघत म्हणाला, "गड्यांनू, तुमाला दक्कल नसंल, बाबलच्या खापर पणज्याला आपल्या गावच्या लोकांनी जाऊन, "आमच्या गावात मुलाणी न्हाई तू ये बाबा आमच्या गावात म्हणून बलावून आणलतं. आबा पाटलाच्या सब्दाखातर तो गडी तिथलं घरदार सोडून आला. बाबलचं घर हाय की न्हाई, ते घर गावानं त्येला बांधून दिलं. का, तर मुलाणी गावाला पायजे म्हणून. तवापास्नं ह्ये घर गावात ऱ्हायलंय. या बाबलचा बा आजारी पडला, गावानं पैसं घालून दवाखाना केला. न्हाई वाचला. जैतुनबी पोरं घेऊन चालली. आमी पाय धरलं तिचं, तवा हे घर ऱ्हायलंय. बाबलनंबी गावाचा मान राकलाय. त्येला आसा डोस्क्यात राक घालून पळवून लावू नगा. त्ये आपलंच लेकरू हाय, गोंदा पाटील मागं होऊन पोरांना म्हणाला, "तुमची चुकी तुमी मान्य केलीय. आता जैतुनबीच्या पायावर डोकं ठिऊन माफी मागा. तरच तुमची सुटका.'
पोरं धडपडून उठली. कोपऱ्यात बसलेल्या जैतुनबीकडं वळली, तर तिच्या गळ्यातला आवंढा एकाएकी बाहेर पडला. तिला समजावता समजावता अख्ख्या गावाच्या डोळ्यांना पाझर फुटला.
"आपण माणसात जमा नाही' ही शीर्षक कथा तर बदललेल्या परिस्थितीतील आमच्या पिढीची शोकांतिका आहे. लेखक कोकणनजीकच्या प्रदेशात राहत असल्याने असेल कोकणी चाकरमान्यांची ही शोकांतिका त्याला मांडावी वाटली असेल. कदाचित हा त्यांच्या गावाचा अनुभव असेल, पण कोकणवासीय चाकरमान्यांना तर तो दरदिवसाआड घ्यावा लागला आहे.
आपल्या भाषेत शिव्याचं स्वत:च असं एक खास स्थान आहे. त्यामुळे आपल्या साहित्यात त्या ओघानंच येतात. अलीकडे पिपली लाईव्ह सिनेमाला फक्त या शिव्यांच्या कारणाने "अॆ' प्रमाणपत्र स्वीकारावं लागलं होतं. त्याची बातमी तुम्ही वाचली असालच. राजन गवस यांनी सांगितलेल्या कथा गावातल्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आयुष्याच्या आहेत. त्यांच्या भाषेत शिव्या आहेत. नव्हे त्यांच्या अभिव्यक्तीची ताकदच त्या शिव्या आहे. त्यामुळे अनेक संवादात सहजपणे शिव्यात येतात.
पण अपरिहार्य, अर्थ अधिक नेमका करणारी शिवी येते ती दुसऱ्या कथेच्या शेवटी. शिवी घालायचीच झाली तर ती नेमकी कुठे घालावी (जीवनात आणि साहित्यातही) त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हा शेवट. नाही मी तो तुम्हाला सांगणार नाही. तो तुम्ही मुळातून वाचा. अख्खी कथा वाचल्याशिवाय त्या शिवीची जागा का महत्त्वाची हे कळणार नाही.
या सगळ्याच कथा सुंदर आहेत. "तळ'मधील कल्लव्वा विसरू म्हणालात तरी विसणार नाही. चौंडकं, रिवणावायली मुंगी, भंडारभोग हे त्यांचे इतर संग्रहही उपलब्ध आहेत. ज्यांचा गावाशी संबंध आला आहे त्यांना ते अधिक समजून घेण्यासाठी आणि त्यांना गाव माहीत नाही त्यांना ते माहीत व्हावं यासाठी तर राजन गवस यांची कथा वाचायलाच हवी. पण त्यापुढे जाऊन माणसाचं जगणं ही काय चीज आहे हे समजून घेण्यासाठी राजन गवस वाचायलाच हवेत. अनुभव जितका अधिक वैयक्तिक तितका तो अधिक वैश्विक होतो असं म्हणतात. त्याचं हे लेखन म्हणजे उत्तम उदाहरण आहे. राजन गवस यांनी गद्य कविताच लिहून काढल्या आहेत.
- वैभव चाळके

राजन गवास कथा

Saturday, November 13, 2010

अन्वय

अन्वय
एखादा शब्द ऐकला की चटकन समजत नाही. अन्वय शब्दाचं तसंच आहे. निदान मला तरी त्याचा तसाच अनुभव आला. कॉलेजात असतानाच मला वाटते मला त्याचा अर्थ सर्वप्रथम समजला. तोवर तो नुसता कानावर जात होता. अन्वय म्हणजे परस्पर संबंध. दोघांतील नातं. नव्या मराठीत "कनेक्शन'! तर प्रथम जेव्हा हा अर्थ कळला, तेव्हा मला एकदम उभयान्वयी अव्यय या व्याकरणातील शब्दांची आठवण झाली. कारण तिथेच अन्वय हा शब्द कानावर पडलेला पण अर्थातच तो सुटा नव्हे तर उभयांच्या मधून डोकावत पाहिल्यासारखा. दोन शब्दांना, वाक्यांना जोडणारे अव्यय ते उभयान्वयी अन्वय हे शाळेतच शिकलो होतो. पण अन्वयचा अर्थ लागताच उभयान्वयीची संधी सोडवता आली. उभय आणि अन्वय बरोबर उभयान्वयी हे लक्षात आले.
अन्वय लावणे ही आपण सतत करीत असलेली गोष्ट आहे. एखादी घटना घडली की आपण तिचा इतर गोष्टींशी अन्वय लावत असतो. एखादा विचार पटवून देण्यासाठी आपण एखाद्या घटनेशी, उदाहरणाशी त्याचा अन्वय लावून दाखवतो. म्हणजे ती गोष्ट अधिक नेमकी कळते.
एकदा एका चर्चेच्या कार्यक्रमात सुशांत देवळकर नावाचा आमचा एक मित्र "संत नामदेवांचे वेगळेपण' या विषयावर बोलत असताना, आनंद गाडगीळ हा दुसरा मित्र म्हणाला, पण नामदेव पंजाबपर्यंत गेले तेव्हा त्यांना भाषेची अडचण आली नसेल? आनंदचा प्रश्न छान होता. तो आम्हा अनेकांना पटला. पण प्रमोद बापट नावाचे आमचे एक ज्येष्ठ मित्र म्हणाले, मी एक गोष्ट सांगतो ऐक. एक गुराखी मुलगा दूर रानात आपली गुरं चरायला नेत असे. एकदा त्याची गाय व्यायली. छोट्या वासराला एवढ्या दूर चालत नेणे शक्य नाही. म्हणून त्या गुराखी मुलाने त्याला खांद्यावर टाकून घरी आणले. दुसऱ्या दिवशी तसेच खांद्यावरून चारायला नेले आणि खांद्यावरून परत आणले. त्या गोष्टीची त्या वासराला जणू सवयच झाली. म्हणता म्हणता ते वासरू मोठे झाले. पण खांद्यावरून जाणे येणे सुरूच. एवढा मोठा बैल आपण खांद्यावरून वाहतोय हे त्या गुराख्याच्या लक्षात आले नाही. कारण रोज तो फक्त काही ग्रॅमच वाढत होता ना! नामदेवांनी पंजाबपर्यंत पायी प्रवास केला तेव्हा भाषीक बदल इतक्या कमी वेगाने झाला असेल ही त्यांना तो कळलाच नसावा.
गोष्ट ऐकल्यावर आनंद म्हणाला, व्वा! व्वा! आम्ही तर एकदम एक्स्प्रेसने पंजाबात पोहोचलो आणि आता यांची भाषा कशी कळणार याचा विचार करत राहिलो.
आम्हा इतरांच्यात आणि प्रमोद बापट यांच्या जो फरक त्या वेळी होता तो अन्वयाचाच होता. हा अन्वय ज्याला साधला त्याला कसं सगळं सहजसोपं होऊन जातं.
आपण एखाद्या घटनेचा काय अन्वय लावतो यावर अनेकदा आपले सुख आणि दु:ख अवलंबून असते.
असं म्हणतात की एकदा गंगापात्रातून एक ब्राह्मण न्हाऊन देवळाकडे चालला होता. तेवढ्यात एक कावळा त्याच्या अंगावर शिटून गेला. ब्राह्मणाला प्रचंड राग आला. त्याने त्या कावळ्याला शाप दिला. तो पुन्हा जाऊन गंगेत स्नान करून आला. पण त्याला आपण शुध्द आणि स्वच्छ झालो आहोत असे वाटेनाच.
एक मोठा ऑफिसर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला चालला होता. तो मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गाडीतून उतरत असताना त्याच्या शर्टावर कबुतराने घाण केले. पांढऱ्याशुभ्र कपड्यांवर कबुतराची विष्टा चटकन लक्ष वेधून घेत होती. पण ऑफिसर मुख्यमंत्री दालनात तसाच गेला. नमस्कार चमत्कार झाल्यावर तो म्हणाला, तुमच्या दारात कबुराने हा प्रसाद दिला, पण म्हटलं, एक बरं आहे की गायी-म्हशी आकाशात उडत नाहीत.
या दोन्ही गोष्टींवरून आपण एकच घटना वेगवेगळे परिणाम कसे साधते ते पाहू शकतो, असे होते कारण लावला गेलेला अन्वय. जो जसा अन्वय लावेल तसा त्याचा परिणाम होतो.
परवा हिंदी भजनांचा संग्रह वाचत बसलो होतो. त्यात एका भजनात देव कोठे आहे हे सांगताना फुलांच्या उमलण्यात, बालकांच्या हास्यात अशी वर्णने केली होती. त्यात एक वर्णन होतं-ज्ञानवान के आत्मरमण में! ते मला खूप आवडलं. आपली अध्यात्माची परंपरा ही आधी आत्मरमण आणि मग निरुपण अशी आहे. निरुपण कोले नाही केले तरी चालते. पण ईश्वरचिंतन, आत्मरमण हे अपरिहार्यपणे होणारी गोष्ट आहे. मला वाटते हे आत्मरमण म्हणजे दुसरे, तिसरे काही नसून तो अन्वय शोध आहे. जीवन आणि पारलौकिक जीवन, देव आणि आपण, शरीर आणि आत्मा, आत्मा आणि परमात्मा या सगळ्यांचा परस्पर अन्वय लावत राहणे, त्यातून एकूण जीवनाचा अन्वय लावणे म्हणजेच आत्मरमण होय. ही आत्मरमणता म्हणजे जणू ईश्वरभेटच होय. या अर्थाने पाहिले की अन्वय लावणे हेच आपले जीवनसाध्य होऊन बसते. अलकेमिस्टच्या भाषेत सांगायचं तर शुभशकुनांची ओळख-शुभशकुनांचा अन्वय!
-वैभव बळीराम चाळके

Wednesday, October 6, 2010

नवे लेख

भारूडसम्राज्ञी चंदाताई तिवाडी


नाट्यकर्मी वसंत सोमण यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार या वर्षी भारूडसम्राज्ञी चंदाताई तिवाडी यांना मुंबईत प्रदान करण्यात आला. या पुरस्काराच्या दिवशीच चंदाताई कार्यक्रम सादर करणार होत्या. यापूर्वी आषाढी वारीच्या वेळी दूरचित्रावाणीवर त्यांच्या कार्यक्रमाची झलक पाहिली होती. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाविषयी उत्सुकता होती. त्यामुळे वेळेपूर्वीच मी पु.ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये हजर झालो होतो.
अनेक ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. थोड्या वेळातच विठ्ठल उमपांचे आगमन झाले. लोकांनी माना उंचावल्या. तेवढ्यात चंदाताईचे आगमन झाले. लोकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजविल्या. थोड्याच वेळात सत्काराचा आणि पारितोषिकाचा कार्यक्रम सुरू झाला. विठ्ठल उमपांच्या हस्ते चंदाताईंचा सत्कार झाला. त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या मनोगतात शाहीर विठ्ठल उमप म्हणाले, "चंदाताईंना पुरस्कार देणे हा माझाच सन्मान आहे असे मला वाटते. लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी जसे शाळा, कॉलेज आणि इतर समाजकार्यासाठी काम केले तसेच चंदाताईंनीही आपल्या परीने काम केले आहे. आम्ही कलावंतांनी चंदाताईंचे हे काम पाहून काही तरी केले पाहिजे.' त्यानंतर त्यांनी चंदाताईंवर लिहिलेले, "जियो चंदाताई मैया तुम सबसे हो बढकर' हे गाणे आपल्या खड्या आवाजात म्हटले. मग म्हणाले, चंदाताई दरवषीं वारी करतात. त्यांना विठ्ठल भेटला की नाही माहीत नाही, पण हा काळा विठ्ठल त्यांना आज भेटला आहे. या विठ्ठलाच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळाला आहे!'
चंदाताई मारवाडी समाजाच्या आहेत. पण बालपण पंढरपुरात गेल्यामुळे मराठीपणाचे संस्कार त्यांच्यावर झाले. सभोवतालच्या वातावरणातील नेमके संस्कार उचलून त्यांनी आपली भाषा आणि वाणी समृद्ध केली. त्यांना जेव्हा "तुम्ही उच्चशिक्षित नाही तरी तुम्हाला हे सारे कसे जमले?' असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा त्या म्हणतात, "मी जगाचे पुस्तक वाचले. वारीचे पुस्तक वाचले!'
त्यांची निरीक्षणशक्ती अफाट आहे. त्या संतरचनांना आजच्या काळातल्या संदर्भाशी जोडून दाखवितात तेव्हा बुद्धिमान म्हणविणारेही अवाक् होताना दिसतात. चमत्कारांचा उदो उदो न करता वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्नशील असतात. सामाजिक बांधीलकी कशी जोपासावी ते अनेकांनी त्यांच्याकडून शिकायला हवे.
चंदाताई कार्यक्रमाला उभ्या राहिल्या. मागे चार साथीदार... पुढे उभा माईक... त्यासमोर प्रसन्न चेहऱ्याच्या आत्मविश्वासाने उभ्या राहिलेल्या चंदाताई... नऊवारी... काळे केस... नीट विंचरून बांधलेले... कपाळावर कुंकू... हातात बांगड्या... खेळ सुरू झाला. आधी गण... श्रीगणेशाचे स्तवन... गातागाता त्या श्लोकातील अर्थ नेमका व्यक्त करणाऱ्या नृत्याच्या मोजक्या पण प्रभावी स्टेप... हालचाली आणि उच्चारात कमालीची सफाई... पहिल्या मिनिटाला चंदाताईंनी सभागृह जिंकले.
मग सुरू झाला मुख्य विषय... भारूड... पहिलेच भारूड त्यांनी घेतले ते "सावधान... सावधान... हो सावधान!' मग ते भारूड म्हणता म्हणता चंदाताईंनी सावधान राहून जीवन कसे जगावे, त्याचा सदुपयोग कसा करावा हे सांगता सांगता बालपणापासून वार्धक्यांपर्यंतच्या काळाचे वर्णन केले आणि मग दानाचे महत्त्व विशद केले. देहदान, नेत्रदान, त्वचादान आदींबाबत सांगता सांगता दानासाठी शरीररक्षण कसे महत्त्वाचे आहे ते सांगितले.
भारूडाच्या सादरीकरणाने तर प्रेक्षक खूश झाले होतेच, पण आता त्याच्या अमोलवाणीने आणि बुद्धिचातुर्यानेही मंत्रमुग्ध झाले. मला एकदम काही वर्षांपूर्वी पाहिलेले तिजनबाईंचे पांडवांनी गायन आठवले. त्या तिजनबाई जशा महाभारताचे दर्शन घडवितात तशाच चंदाताई तो तो प्रसंग साक्षात उभ्या करतात. मध्येच गोल फेरी मारतात आणि पूर्णविरामासाठी किंवा उद्गारासाठी उडी मारून त्या त्या शब्दाचे महत्त्व ठसवतात. त्यांच्या सगळ्याच हालचाली मंत्रमुग्ध करणाऱ्या.
मग एकेक भारूड परमार्थ आणि लौकिक अशा दोन्ही अंगांनी उलगडून दाखवतात. नवल मोठे जाणा, तिथे एक ढालगज निर्माण झाली, बये तुला बुरगुंडा होईल ग अशा एकाहून एक सरस भारूडे त्या तन्मयतेने सादर करतात. वेडीचे रूप घेऊन सादर केलेले "झाले रे वेडी देवा झाले रे वेडी' हे भारूड तर त्या सगळ्यावर कळसच चढवते.
"बुरगुंडा होईल'मध्ये कमरेवर बाळ आणि डोक्यावर बोचके आणि हातात काठी असा घेतलेला वेशही लक्षात राहतो. एका बाजूला दर्शनीय तर दुसऱ्या बाजूने तेवढाच श्रवणीय असा हा कार्यक्रम... डोळ्यांचे पारणे फेडून गेला.
-वैभव बळीराम चाळके


नवी पहाट घेऊन येणारी
भोळी, सुंदर, निर्भय श्रध्दा!



मराठी कवितेच्या क्षेत्रात जी मोजकी स्त्रीनामे आहेत. त्यात शांता शेळके हे एक अग्रभागी असणारे नाव आहे. शांता शेळके म्हटलं की त्यांची नितांत सुंदर गीतं आठवतात, पण सर्वप्रथम आठवतं ते त्याचं "असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे!' हे गाणं. आज शांताबाई आपल्यात नाहीत, पण त्यांची गाणी, त्यांच्या कविता आपल्यात आहेत. साहित्यिक केवढाही मोठा असला तरी जोवर, तो आपल्या अनुभूतीशी जोडला जात नाही तोवर तो आपला आवडता होत नाही. शांताबाईंच्या महानतेबद्दल कधीच शंका नव्हती. पण त्यांच्या माझ्यात आपलेपणाचा बंध निर्माण झाला तो अलीकडेच.
त्याचं असं झालं. एका रद्दीवाल्याकडे मला शांता शेळके यांचा "वर्षा' काव्यसंग्रह मिळाला. तो मी चाळला असता त्यातल्या एका कवितेने माझं लक्ष वेधलं.
गेली अनेक वर्षे मनात श्रध्दा आणि अंधश्रध्दा याचं द्वंद्व सुरू होतं. मी अनेकदा म्हणे, विसाव्या शतकाच्या आरंभी भ्रमनिरास झालेल्या बुध्दिवाद्यांसारखे आज आम्ही जगतो आहोत. बुध्दीची मर्यादा कळते आणि श्रध्देची तुळस उपटून फेकून दिलेली. आता श्वास कोंडतो-वाटतं-काय करायचं अशावेळी? कोण दाखवणार वाट? मग कधीतरी दूर एक दीप जळत असल्याची जाणीव झाली. ही आपली दिशा, हा आपला मार्ग! मनास थोडा विसावा लाभला. पण एक गोष्ट सतत खटकत राहिली. आपल्या अनुभवाशी साम्य असलेला अनुभव मराठी साहित्यांच्या एवढ्या वर्षांच्या इतिहासात कुणालाच आला नाही का? आणि आला तर तो आपल्यापर्यंत का पोहोचला नाही? आणि एक दिवस शांताबाईंची कविता समोर आली -
श्रध्दा जी जी पूजास्थाने मजलागी दाविते
बुध्दी त्यातील दोष नेमके शोधुनिया काढिते
श्रध्दा पाहे परमेश्वराचा घ्यावयास आसरा
बुध्दी शंकित होऊनी बोले "आहे का तो खरा!'
प्रीतीमध्ये विलीन व्हाया श्रध्दा हो आतूर
त्या प्रेयांतील व्यंगे लाविति बुध्दीला हुरहुर
श्रध्दा निर्भयपणे धावते ध्येयामागे यदा
बुध्दि तेधवा बसे न्याहळित अंतिम त्या आपदा
बुध्दि आपुले पायबंद नच शकेल घालू जिला
भोळी, सुंदर, निर्भय श्रध्दा मिळेल का ती मला?
शांताबाईंनी आपल्याला काय म्हणायचं ते स्पष्ट केलं. माझा शोध हाच होता. अकलेचं ओझं थोडं अधिक झालं की, "भोळी सुंदर निर्भय'श्रध्दा जवळपासही फिरकत नाही. अकलेच्या बेड्यांत आपण फसून जातो. अडचण आली म्हणजे आई ईश्वरापुढे हात जोडते आणि निर्धास्त होते. आम्हीही हात जोडतो पण शंकित मनानं. आमची ब्ल्यूट्यूथ ऑन होत नाही. त्यामुळे ना कोणताच डाटा सेंड होतो ना रिसिव्ह होतो. बुध्दीचा "इरर' त्याच्यात आणि आमच्यात "कनेक्टीव्हिटी'च प्रस्थापित करू देत नाही.
पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांकडे आम्ही आदराने पाहतो.पण स्वत: वारकरी होणं जमत नाही. "देव आहे हा विश्वास म्हणजे देव' मूर्तिपूजक कवितेत शांताबाई त्या मूर्तिपूजकाचं मनोगत लिहितात. तो म्हणतो-
वाटतो, वाटो तुम्हा निर्जीवही पाषाण हा
माझिया दृष्टीस ही देवीच भासे मंगला!
ईश्वराच्या चरणी नतमस्तक सारेच होतात. पण मनात श्रध्दा असली तर देव... नाहीतर पाषाण काळा! आमची धडपड त्या पाषणात देव दिसण्याची. मनात श्रध्दा निर्माण होण्याची! पण ही श्रध्दा फक्त भोळी आणि सुंदर नको ती निर्भय हवी. शांताबाईंनी श्रध्देचं शिल्प नेमकं कोरून काढलं आहे. म्हणूनच मला हवी ती ही हीच श्रध्दा असे आपण "युरेका युरेका' म्हणावे तसे म्हणू लागतो.
अंधाराच्या खोल गुहेत एक दीप दिसू लागला आहे. म्हणूनच "माझ्याच वाटेने चल' न म्हणणाऱ्या वडिलांप्रतीची कृतज्ञता आता दाटून येते. त्यांनी स्वत:चा स्वतंत्र मार्ग चोखाळू दिला. लावणीची ढोलकी वाजवता वाजवता अभंगाचा टाळ वाजवासा वाटू लागला.
"फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे' अशा प्रेमकविता लिहितात म्हणून प्रिय होऊन राहिलेल्या मंगेश पाडगावकरांचा हात धरून कबिरापर्यंत जाता आले. त्यांनीच एका ठिकाणी म्हटले आहे-
श्रध्दाच पांगळ्याच्या पायात त्राण आहे
श्रध्दाच आंधळ्याच्या डोळ्यात प्राण आहे
ज्याच्या उरी न श्रध्दा त्याला पहाट नाही
हृदयात देव आहे कोणी अनाथ नाही!
या श्रध्देची पहाट होऊ लागते तेव्हा थोडी हुरहुर, थोडी भीती असायचीच! पण लवकरच ती भीती संपायला हवी. भोळी, सुंदर आणि निर्भय श्रध्दा निर्माण व्हायला हवी तर खरी पहाट येईल.
ये, पहाटे ये तुझे स्वागत असो! धन्यवाद शांताबाई!!!
-वैभव बळीराम चाळके

Tuesday, August 31, 2010

लोकल

लोकल... माझे आई!
"चॉकी आण! फ्रुटी आण! आयस्क्रीम आण!' म्हणत बाळाने टाटा केलं. त्याला हात हलवून बाय बाय करत मी पटापट जिणे उतरलो. वॉचमननं नेहमीप्रमाणे हात दाखवून सलाम केला. मी सुहास्यवदनानं त्याचा स्वीकार करत गेटबाहेर पडलो. गेटसमोर पावसाचं पाणी साचलं होतं. ते सहज ओलांडत रिक्षात जाऊन बसलो. स्टेशनपर्यंत जाणाऱ्या या शेअर रिक्षात कधी कधी रिक्षा भरेपर्यंत रखडायला होतं. पण आज माझ्याआधीच एक बाई छोट्या मुलीला घेऊन बसल्या होत्या. मी बसल्यावर ताबडतोब आणखी दोघे जण आले आणि रिक्षा सुरू झाली. मुलगी आणि आईच्या गप्पा सुरू होत्या.
"आपण कुठे चाललो?'
"मामाकडे'
"कशाला?'
"मजा करायला!'
"तू थांबणार घरी...'
"मी कशी थांबणार? मी ऑफिसला जाणार. तू दादाबरोबर मजा कर हं!'
"तू कधी येणार?'
"संध्याकाळी... तुला चॉकलेट घेऊन येईन हं!' केविलवाण्या आईचा आनंदी स्वर.
स्टेशन आलं तसे आम्ही उतरलो. स्टेशनात घुसताना पॉलीशवाला मुकाट बसलेला दिसला. हे पावसाळ्याचे दिवस त्याच्यासाठी नको वाटणारे असणार. एका बाजूला पेपरवाला बसला होता. पाऊस सुरू झाल्यापासून तो इथे रेल्वेच्या छपराच्या आधाराला आला आहे. मी त्याच्याकडून पेपर घेतला. त्याच्या स्टॉलवर 25-30 पेपर. त्याच त्याच बातम्या आपापल्या कढईत शिजवून वाढून ठेवलेल्या. आवडेल ती प्लेट उचला. स्वस्तात मस्त सौदा. दोन-अडीच रुपयांत 25, 40, 50 पानं.
पेपर घेऊन जिना चढत असतानाच गाडी आली. पायांनी एकाएकी वेग घेतला. जरा जास्तच धावलो. त्यामुळे गाडीत बसल्यावर दम लागला. बॅग मांडीवर घेऊन उसासत राहिलो. तेवढ्यातच समोरच्याने बॅगेवरचा पेपर न विचारताच खेचून घेतला. हे फुकटे वाचक! मिळेल तिथे हात मारणारे! माझं एक निरीक्षण आहे की ज्यांना आपली आवड कळली आहे ते पेपर विकत घेतात आणि आपल्या आवडीचं तेवढं वाचतात. बाकी पेपर उद्या नव्हे तर आजच रद्दी असतो त्यांच्यासाठी! पण हे फुकटे वाचक मात्र मोठे रसिक असतात. ते फुकट मिळालेला पेपर अथपासून इतिपर्यंत वाचून काढतात.
दोन मिनिटे स्वस्त बसल्यावर मी समोरच्याकडे माझा पेपर मागितला. त्याने पेपर आणि पुरवणी अलग करून विचारलं, कुठला देऊ? जणू काही तो त्याचाच पेपर होता आणि मी याचक म्हणून मागणी करतोय.
मी सभ्य संकोचाने मुख्य पेपर घेतला. वाचू लागलो. पेपर चाळून झाल्यावर मी तो बॅगेत टाकला. मला उठायचे आहे असे समजून त्याने पुरवणी देऊ केली. तीही न वाचताच मी बॅगेत ठेवून दिली आणि बॅगेतून पुस्तक काढून वाचू लागलो.
साहित्य अकादमीने प्रकाशित केलेली ही नामदेवाची गाथा वाचताना नामदेवाला भावकवी का म्हणतात, त्याचा प्रत्यय येतो आहे.
चार स्थानके गेली नाहीत तोवर गाडीत ही गर्दी झाली. मला पुस्तक मिटून ठेवावं लागलं. मग मी माणसं निरखत राहिलो. रविवारच्या मेजवाणीसाठी शनिवारी बॉयलर कोंबड्या घेऊन येणाऱ्या गाडीसारखी डब्याची अवस्था! प्रत्येकाचे न दिसणारे पंख फडफडताहेत. तिथे तर एकदाच जीव जातो. ही माणसं तर रोज थोडी थोडी कापली जातात. मला तो विचार आवडला नाही. म्हणून मग मी त्या जागी दुसरा विचार आणला- कशी असतील या सगळ्यांची घरं?
मग कल्पनेच्या राज्यात कितीतरी वेळ मी गुंग होतो. तेवढ्यात तंद्री भंगली. आणि म्हणून मग शेजारच्या माणसांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं. त्यांच्या गप्पा सुरू होत्या. एक जण म्हणाला, "पोरीला चांगलं स्थळ मिळालं तर चारएक लाख खर्च करायला तयार आहे मी. एकुलती एक मुलगी आहे. ती जाताना समाधानाने गेली की आपलं काम झालं.'
मला एकदम सकाळी चॉकी आण म्हणणारं माझं बाळ, मग रिक्षात आईला तू कधी येणार विचारणारी मुलगी आठवली.
वाटलं, अरे आपण सारे ट्रेनला लटकत दिवस काढतोय असं म्हणतो ते तितकंस खरं नाही. आपण तर आपल्या बाळांनाच लटकतो आहोत. तेच तर आधार झालेत आपले. संध्याकाळी ड्युटी संपण्याआधी मनाला घराचे वेध लागतात आणि आपण गर्दीच्या लोकललाच लटकत प्रवास सुरू करतो, ते केवळ त्यांच्याचसाठी नव्हे काय?
मुंबईत नवा असताना मला वाटे-ही लटकणारी माणसं पडत कशी नाहीत? आता लक्षात आलं. लटकणाऱ्यांच्या काळजाला लटकणारी इवली बाळं पाहून लोकल त्यांना संभाळून घेत असते. लोकलं... माझे आई तुला साष्टांग नमस्कार!
- वैभव चाळके

Friday, August 20, 2010

कबीर

कबीर म्हणे

माती सांगे कुंभाराला तुडवशील मज किती
दिवस एक येईल असा की तुलाच तुडविल माती


देव, गुरू दोन्ही सामोरे, कोणाचे धरू पाय
देव दाविला म्हणून आधी गुरुच्या चरणी जाय


सुखात ज्यांची स्मृती न येते दुःखात येते याद
कबिर म्हणे की कुणी तयाची ऐकावी रे साद


निद्रेमध्ये रात घालवी, खाण्यातच दिस जाई
सोन्यासम जिविनास तयाने कवडी मोल न येई



सप्त सागराची कर शाई, लेखणि कर वनराई
धरतीचा जरि कागद करशी हरिगुण मावत नाही


धीर धरी रे मना धिराने सर्व साधती सोयी
माळ्याने जरि जीव सोडला ऋतुविण बहर न येई


साधू गाठीशी नच ठेवी पोटी चिमटा घेई
ईश पुढे अन् ईशच मागे, तो मागे हा देई


साधू सुपासमान असावा फोले उडवुन देई
विवेकवाऱ्याच्या मदतीने निके तेवढे ठेवी



मी असता तो नव्हता आता तो आहे मी नाही
अंधाराचे फिटले जाळे, दीप पाहिला मीही



स्नान लाखदा करशी त्याने नच होते मनशुध्दी
पाण्यामध्ये असतो मासा धुतला तरि दुर्गंधी

Friday, July 2, 2010

कविता-लेख

लघुत्तम, पण अप्रतिम कथा!
प्रथमच जेव्हा झेनकथा वाचनात आल्या तेव्हा केवढा तरी आनंद झाला होता. पाच-दहा ओळींची कथा एकदम विलक्षण अनुभूती देते. कधी आपण आश्चर्याने आवाक हाेतो. कधी अरे हे आपल्याला कसं कळलं नाही असं वाटतं. कधी वाटतं - कित्ती कित्ती सुंदर! कधी तर साक्षात्काराचाच अनुभव मिळतो.
आजच्या फास्टफूडच्या जमान्यात तर या झेनकथांना आणखीनच महत्त्व आहे. पाच मिनिटांत एक कथा वाचून होते. कधी एकाच मिनिटात संपते. अनुभव मात्र विलक्षण देते.
साहित्यात आधीच लघुकथेला फार प्रतिष्ठा नाही. त्यामुळे लघुत्तम कथेला ती सहज मिळणे अवघडच! पण म्हणून लघुत्तम कथांचे महत्त्व काही कमी होत नाही. ती ज्याला भावली त्याच्यासाठी ती प्रिय होऊन राहिली. वि..खांडेकरांच्या रूपककथा अशाच छोट्या आकाराच्या पण केवढा तरी आशय कवेत घेणाऱ्या आहेत.
अलीकडेच एक अनुवादित पुस्तक हाताशी लागलं. ते केवळ अप्रतिम आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे. "लघुत्तम कथाचा गुलदस्ता' या कथा मुळात हिंदीत आहेत. डॉ. योगेंद्रनाथ शुक्ल हे त्या कथांचे लेखक आहेत. डॉ.अनिल गजभिये यांनी त्या कथा मराठीत अनुवाद केल्या आहेत. मधुरा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात एकूण 112 लघुत्तम कथा आहेत.
शितावरून भाताची परीक्षा केली जाते, याच तत्त्वानुसार आपणही या कथांच्या दर्जाचा अंदाज बांधू शकाल. त्यासाठीच आज या पुस्तकातील एक उत्तम कथा देतो. या कथेचे नाव आहे "कपाट'! लेखक लिहितो-
"का हो दादा, लाडूचा भाव काय? पन्नास किलो हवेत!'
"मास्तर साहेब, पन्नास रुपये किलोप्रमाणे विकून राहिलो. पण तुमच्यासाठी पंचेचाळीस रुपये.'
"अहो दादा! स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेच्या मुलांना वाटायचे आहेत. राष्ट्रीय पर्व आहे. ठीक भाव सांगा.'
"राष्ट्रीय पर्व आहे म्हणालात म्हणून तुम्हाला पस्तीस रुपयेप्रमाणे देईन. यापेक्षा कमी शक्य नाही.'
"ठीक आहे. हे तीनशे रुपये ऍडव्हान्स घ्या. पण बिल पन्नासच्या भावाचं द्या.'
"जी! समजलं मला. बिल आणि लाडू अगदी वेळेवर तयार करून ठेवू.'
"सातशे पन्नास रुपये पुष्कळ झाले!' मास्तरसाहेब हा विचार करत आनंदाने घरी परतले.
सामाजिक ऱ्हासाचे वर्णन करणारी कोणतीही मोठी कथा जशी काळीज विदीर्ण करून जाते तशीच ही एवढीशी कथा काळजाचे तुकडे तुकडे करते. या लघुत्तम कथांचे हेच मोठे बलस्थान आहे. या कथा लिहिणारे आणि त्या मराठीतून आपल्यापर्यंत पोहोचविणारे असे जे दोन डॉक्टर आहेत, त्यांना आपण या कामासाठी धन्यवाद द्यायला हवेत!
-वैभव चाळके

सुरेश भटांचा वारस! चंद्रशेखर सानेकर
सुरेश भटांचं बोट धरून अनेक मराठी कवींनी गझलच्या क्षेत्रात मुसाफिरी केली. पण भटांचा वारस कोण? असा प्रश्न विचारला गेला तर चंद्रशेखर सानेकर हेच नाव अनेकांच्या मुखी सर्वप्रथम येईल. (सुरेश भटांचा चिरंजीव चित्तरंजन उत्तम गझला लिहितो. पण ही राजगादी नसल्यामुळे तसा दावा स्वतः चित्तरंजन करणार नाहीत आणि त्याचे रसिकही तसं म्हणणार नाहीत.) आज लिहित्या गझलकारांत अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार आहेत. त्यांच्या अनुभवाच्या आणि अभ्यासाच्या तुलनेत चंद्रशेखर थोडे मागेपुढे असतीलही. पण त्यांच्या आतला आवाज खंबीर, तीव्र आणि धारदार आहे. त्याचा आपला असा पोत आहे. "एका उन्हाची कैफियत' हा संग्रह वाचतानाच या गझलकाराची ताकद लक्षात येते. "एका शहराच्या खुंटीवर' हा दुसरा संग्रह त्यांच्या महानतेवर शिक्कामोर्तब करतो.
गझलेच्या आकृतीबंधात लिहिलेल्या सर्वच रचनांना आपण गझल म्हणतो. पण त्या सगळ्या गझलांत खरेखुरे शेर क्वचितच हाती लागतात. जेथे असे एकदोन खरे शेर हाती लागतात, तेथे गझल रसिक थांबतो. ती गझल त्याला आपली वाटते. ती तो उराशी कवटाळतो. पण असे प्रसंग फार क्वचित अनुभवायला मिळतात. चंद्रशेखर सानेकरांचं मोठेपण हे की असे खरेखुरे शेर त्यांच्या दोन्ही संग्रहांत अपेक्षेपेक्षा जास्त वेळा भेटतात. त्यांनी सूचकतेने केलेले भाष्य हे एक सूत्र घेतले तरी किती केवढे शेर हाती लागतात.
"एका शहराच्या खुंटीवर' मध्ये ते लिहितात-
गरिबी, श्रीमंती, बेकारी, स्वप्ने, अश्रू, आशा, हासू
एका शहराच्या खुंटीवर सारे काही लटकत होते
हे आपल्या मुंबईचे समग्र दर्शन आहे. पहिल्या ओळीतल्या प्रत्येक शब्दात एकेक अर्थशहर वसलं आहे आणि दुसऱ्या ओळीत हे सारंच लटकत असल्याचं सांगून नवीन नेहमीपेक्षा वेगळा विचार मांडला आहे.
दुसऱ्या एका ठिकाणी सानेकर लिहितात-
आत शिरत जे होते त्यांनी हाल उभ्यांचे फारच केले
आणि उभे जे होते ते तर बसलेल्यांना चेपत होते
वरवर पाहता हे ट्रेनमधले दृश्य वाटेल. पण त्यापलीकडे जाऊन कवीला जे सुचवायचं आहे ते महत्त्वाचं आहे. "आतले' आणि "बाहेरचे' यांच्यातला ही सनातन संघर्ष आहे.
"एका उन्हाची कैफियत'मध्ये एक शेर आहे-
बोलली नाहीस काही... एकटी झुरलीस तू
आणि मी समजून सारे बोलण्याचे टाळले
या शेरातली "ती' कोण आहे? मला "ती' कधी मुंबई वाटली. कधी "आम आदमींनी' बनलेली जनता!
"एका शहराच्या खुंटीवर' मधला पुढील शेर वाचल्यावर मी आनंदाने वेडापिसा झालो. मनोमन सानेकरांना सलाम केला. ते लिहितात-
गरिबांच्या घराघराला ती घरघर लावत आहे
या शहराच्या मध्यावर आहे जी एक हवेली!
यातला "मध्य' भौगोलिक मध्य नव्हे तर "अर्थमध्य' आहे हे लक्षात घेतलं तर किती किती जणांच्या मुस्काटात कवीनं सणसणीत चपराक लावली आहे ते सहज लक्षात येईल.
मुंबईतल्या बेघर चाकरमान्यांची व्यथाही त्यांनी अचूक पकडली आहे-
पाहिजे होती जराशी ऊब मायेच्या घराची
पण घराच्या कल्पनेने जन्मभर मी भीत होतो!
"गालावर खळी डोळ्यांत धुंदी' असं रोमॅंण्टिक लिहिणारे सानेकर गझलेत कसे "शेर' होतात त्याची ही काही उदाहरणं! असली शेकडो स्थळं सहज सापडतात त्यांच्या गझलांत. म्हणून त्यांना सुरेश भटांचा वारस म्हणायचं!
- वैभव चाळके


मखमली फुलं!
केशवसुतांनी मजुराला कवितेचा नायक बनवला त्याच्या खूप आधी इथल्या स्त्रियांनी आपल्या सुखदु:खाची गोष्ट शब्दात गुंफून जात्याच्या गतीवर खेळवली आहे. आपलं माहेर, आपलं सासर, आपली सासू, नणंद, दीर, नवरा, भाऊ, आई, बाप, बाळ या सगळ्यांनी मिळून बनणारं आपलं आयुष्य स्त्रियांनी जात्यापाशी बसून शब्दांत गुंफलं आहे. त्यात कठोर वास्तवदर्शन आहे आणि भावूक स्वप्नविश्वही!
आमच्या लहानपणी आई भल्या पहाटे किंवा रात्री उशिरा जात्यावर दळायला बसायची. जात्याचा एकही फेर तिने ओवीशिवाय ओढलेला नाही. आम्ही कधी तरी तिच्या मांडीवर डोकं ठेकून तिची गाणी ऐकायचो मग एखाद्या गाण्यात ती आमचंच नाव गुंफायची. गाण्यात आपलं नाव आलं की अंगावर फुलं फुलायची.
केवढं आमप सुख होतं ते! कधीतरी गाता गाता आईचा स्वर भरून यायचा. डोळे वाहू लागायचे. जात्याच्या गतीवर स्वार होऊन आई गाऊ लागली की तिला भानच राहायचं नाही. जात्याचा वेग वाढत जायचा. जात्याभोवती हिमालयाचे नग उभे राहायचे. गाता गाता आई आपलं सगळं दु: जात्यात भरडून काढायची.
गावोगावच्या बायांच्या मुखातल्या या ओव्यांना आपलं असं सौंदर्य आहेच. पण त्यांचा सर्वाधिक मोठा गुण म्हणजे त्या भावकवितेच्या अगोदरच्या भावकविता आहेत आणि आधुनिक कवितेच्या अगोदरच्या आधुनिक कविता! आपल्या दु:खाचं गाणं करावं, आपल्या सुखाचं गाणं करावं, आपल्या पतीला, आपल्या बाळाला आपल्या गाण्याचं केंद्र बनवावं हे या अडाणी समजल्या जाणाऱ्या बायांना शिकलेल्या शहाण्या लोकांच्या अगोदर कळलं होतं. अभिव्यक्तीची गरज आधी त्यांनी ओळखली होती. हेच या गाण्याचं व्यवच्छेदक लक्षण होय.
लोकगीताच्या अभ्यासिका म्हणून मोठे काम करून ठेवलेल्या सरोजिनी बाबर यांनी स्वत: आपल्या आजीच्या मुखातून प्रकटलेल्या ओव्यांचा विलक्षण अनुभव घेतला होता. त्या ओव्यांचा आपल्या मनावर केवढा सुंदर परिणाम झाला याचा अनुभव सरोजिनी बाबर यांरी आपल्या "झोळणा' काव्यसंग्रहाला लिहिलेल्या प्रस्तावनेत सांगितला आहे. मला तो खूप भावला. त्या लिहितात. "माझ्या आजीचा "गळा' फार देखणा. चार बायकांत दाखवण्याजोगा. पोटभरून गीतं ती एका बैठकीत म्हणायची न् भलं दांडगं जातंदेखील ती गीतं गात हरण पळावं तसं पळवायची. जात्याची शीग पार भरून जास्तोंवर ती दळायची. अशा वेळी मी तिच्या मांडीवर निजून तिची गीतं ऐकायची. मला त्या गीतांचा मोह पडायचा. त्यातल्या त्यात माझ्यावरून गायिल्या जाणाऱ्या गीतांच्या श्रवणानं तर मी भुलून जायची! कारण माझ्या न्याहरीच्या वेळी पंक्तीला सूर्यदेवाला आवतण जायचं न् लाल शेंदराच्या खापा दिसाव्यात त्या डामडौलानं तो पण यायचा!....माझ्या वेणीला बांधलेल्या रेशमी गोंड्याचं आणि डोईवरल्या राकडी केवड्याचं तर कोण कौतुक व्हायचं! तंगभार साखळ्या घालून आणि झिनकारी मासोळ्या घालून मी चालायला लाभले की तालेवाराची लेक आली म्हणून आवई व्हायची. पालख पाळण्यात निजलेल्या माझ्या सारखीच्या खेळांत चंद्र-सूर्याचा चांदवा यायचा आणि गौळणींच्या उतरंडी मांडताना कृष्णदेवाच्या लग्नाचा थाट निघायचा. त्यात मी करवली व्हायचे, हत्तीवरून किंवा पालखीतून मिरवायचे, रातोरात गावोगावचे कारागीर बनवून माझी बाळलेणी तयार व्हायची न् सोन्याच्या सुपलीतून माझं दळणं पाखडणं व्हायचं. चांदीच्या डेऱ्यात माझ्या हातची रवी घुमायची न् लोण्याचे गोळे खात माझी भाकरी खाऊन व्हायची. रोजच्या नानापरीच्या "खिरापती'नी माझा हादगा खेळला जायचा. न् मी साडेतीनशे मोती गुंफलेले झुबे कानांत डोलवीत वतनाचे कागद वाचायची!.... असल्या शेकडो भाव-भावनांनी तटवून ती गीतं धष्ठपुष्ठ व्हायची!
या प्रस्तावनेला बाईंनी नाव दिलं आहे- "मखमली फुलं!' खरेच त्या सगळ्या ओव्या म्हणजे मखमली फुलेच आहेत. त्यांचा अनोखा रंग, अनोखा स्पर्श आणि अनोखा गंध ज्यांनी अनुभवला ते धन्य झाले. ज्यांना तो अनुभवता आला नाही त्यांना अजूनही संधी आहे. आजही एखाद्या आडगावात गेलात तर एखादं जातं गरगरताना दिसेल आणि त्या जात्याच्या गतीवर ही मखमल उमलत असलेली दिसेल. शोधा म्हणजे सापडेल!
-वैभव चाळके
पहिला पाऊस
भजी आणि चहा
"पावसात भिजू नका!', "तळलेले पदार्थ खाऊ नका! विशेषतः भज्यांचा मोह टाळा', असे सल्ले सगळे जण देत असतात. त्या सल्ल्यांचा आरोग्याशी घनिष्ठ संबंध असला तरी रसिकतेशी काडीमात्र संबंध नसतो. म्हणूनच पहिला दांडगा पाऊस पडला की, रसिक भज्यांच्या गाड्यांवर आणि चहाच्या टपऱ्यांवरही गर्दी करतात...
"निदान पहिल्या पावसात तरी भजी खाणे माफ केले पाहिजे!' किंवा "वर्षातून फक्त एकदाच पहिल्या पावसात भजी खातो मी!' असली विधाने रस्तोरस्ती ऐकावयास मिळतात. आणि म्हणूनच आभाळ घनदाट भरून आलं की भजीवाल्यांच्या अंगावर मूठभर मांस चढतं. ते सकाळी जरा लवकरच उठून कांद्यांवर तुटून पडतात. पहिल्या पावसात काय काय करावं याची यादी फार मोठी आहे. आणि गंमत म्हणजे ती थेट सभ्यतेची सीमा ओलांडून असभ्यतेच्या वावरात वावरायला जाणारी आहे. अर्थात त्या सगळ्याची सुरुवात कांदाभजीपासून होते. पावसाची ही जादू आहे. वर्षभर ज्या गाडीवाल्याकडील भज्यांना आपण नावे ठेवतो त्याच गाडीवरचे भजी पावसात चांगले का लागतात हे उलगडणारं कोडं आहे. आपल्या भज्यांच्या गाडीकडे ढुंकून बघणारा शेठ पहिला पाऊस पडल्यावर दहा प्लेट भजीची ऑर्डर का देतो, हा भजीवाल्याला पडणारा प्रश्नही वर्षोनुवर्षे अनुत्तरीतच आहे.
मुलांच्या आहाराबाबत दक्ष असणारे पालकही आपल्या मुलाला पहिल्या पावसात भज्याचं महत्त्व सांगू लागतात. हे काही आपलं भजीप्रेम लपविल्याचं लक्षण नव्हे तर तो एक संस्कारच आहे जणू! हे खाऊ नको, ते खाऊ नको, म्हणणारी "मॉम'ही "खारे, तेवढ्याने काही होत नाही!' म्हणण्यावर येते ती केवळ संस्कृती संवर्धनाच्या उदात्त हेतूनेच होय.
कोणताही ऋतू बदलला की आमच्या पोटाची तक्रार असते. चार आठ दिवस ते हटूनच बसते. त्याला तो बदल नको असतो. मग ते त्याला जसे हवे तसे वागते. आम्हीही मग त्याचे कोडकौतुक करतो. त्याला आंजारतो-गोंजारतो. पण भजी खायची वेळ आली की नो एक्सक्यूज! आम्ही खाणारच! तुला काय करायचं ते कर! गंमत म्हणजे एरवी साध्यासाध्या पालेभाज्याही तक्रार केल्याशिवाय पचविणारे आमचे पोट दरवर्षी भजी मात्र मोठ्या प्रेमाने पचवत आले आहे. तर असे स्वर्गसुख देणारे कांदाभजी आणि त्यावर वाफाळणारा, टपरीवरचा चहा! अहाहा! कोण ते सुख! चहा भजींचा अनुभव की रतिअप्सरांचा स्वर्गसहवास, काय हवे? असं विचारलं तर जगातले समस्त रसिक चहा आणि भजी हाच पर्याय निवडतील.
(या विधानानंतर ज्यांचा ज्यांचा आश्चर्याने "' वासला असेल त्या सगळ्यांना मी मोठ्या मनाने माफ करून टाकले आहे.)
तर भज्यांवर रिचवायचा वाफाळणारा चहा ही काय चीज आहे, हे ज्याला कळलं त्याला या जगात सुख नेमकं कशात आहे ते वेगळं सांगावं लागत नाही. या अनोख्या सुखाची एकदा चव चाखली, की दरवर्षी आपण पहिल्या दांडग्या पावसाची वाट पाहू लागतो.
पहिल्या पावसाच्या अनुभूतीचं शिखर कोणतं ते ज्याचं त्यानं ठरवावं, पण त्याचा पाया मात्र भजी रिचवून त्यावर चहा स्वहा केल्यावरच मजबूत होतो हे नाकारता येणारं सत्य आहे.
नुकताच या "सत्याचा प्रयोग' करून पाहिल्यानेच लेखणीला हा अनोखा बहर आला आहे!
तेव्हा तुम्हीही या प्रयोगासाठी निघा! तेवढ्याचसाठी हा वाफाळणारा ब्रेक! पुन्हा भेटू!!
- वैभव चाळके

सुखदु:खांची "रंगहोळी'
अनिल धाकू कांबळी यांच्या रसदार कविता
दादरच्या सार्वजनिक वाचनालयात एकदा "रंगहोळी' नावाचा एक संग्रह योगायोगाने हातात आला. चाळून पाहवा म्हणून काही पाने उलटली. तर अवीट गोडीच्या छंदांत लिहिलेल्या हळुवार ओळींंनी मोह घातला. मी लागलीच ते पुस्तक घरी घेऊन आलो. घरच्या वाटेवरच त्यातल्या दोन ओळी हृदयात रुजून- फुलून- फळून आल्या. आज त्या घटनेला पाचसात वर्षे होऊन गेली असतील, पण कवी अनिल धाकू कांबळी आणि त्यांचा तो रंगहोळी नावाचा संग्रह आठवला की सर्वप्रथम त्याच ओळी आठवतात-
माणूस जपावा आत, खोल हृदयात, फुलासम मित्रा
घे डुबकून काव्य जळात, जळत वणव्यात जिवाची जत्रा!
कधी हाताशी चांगलं पुस्तक नसेल तर मी अशी आवडलेली पुस्तके पुन्हा पुन्हा घेऊन येतो आणि पुन्हा पुन्हा वाचत राहतो. प्रत्येक वाचनात किमान एक नवा अर्थ हाताशी लागतो. किमान एक कल्पना पूर्वबंधने तोडून विस्तारलेली पाहायला मिळते. परवा रंगहोळी पुन्हा घेऊन आलो. पुन्हा एकदा झपाटल्यागत त्यातल्या कविता वाचल्या. गुणगुणलो. काहींच्या भोवती फेर धरून नाचलो.
आज कविता मुक्तछंदाच्या नावाखाली आपलं आखीवरेखीव सौंदर्य हरवून बसली असताना या कोरीव लेण्यांची मोहिनी पडेल तर नवल! शिवाय या कवीची छंदांवरची पकड एतकी सुंदर आहे की, या कवितांना छंदांच्या कोंदणांत बसवावं लागलंच नाही. त्या कविता त्या त्या छंदातच जन्मास आल्या आहेत. रचनेची ही सहजता खरेच वाखणण्याजोगी आहे.
रंगहोळी कविता संग्रहात पूर्वरंग, रंगमध्य आणि उत्तररंग असे तीन भाग आहेत. आपण आज त्यातल्या एकाच भागापुरते बोलुया. "नाच रे' मध्ये कवी पावसाचे वर्णन करतो-
मेध फुटत
थेंब तुटत
रान भिजत
चालले
शब्द करत
रंग भरत
मोर फुलत चालले
दुसऱ्या एका कवितेत कवीने पावसाच्या रौद्र रूपाचे वर्णन केले आहे-
दिशांतून डंका अघोरी विजेचा! पिसाटापरी ही हवा वादळी
खुनी पावसाचा कडाडून हल्ला! धरेची त्वचा पूर्ण रक्ताळली
असे रौद्ररूप पाहिलेल्या कवीला पावसाचे हळुवार रूपही चांगलेच परिचयाचे आहे. या हळव्या पावसाबद्दल कवी लिहितो -
आज मृगाचा मृदंग- पाऊस
मृद्गंधाचा सुगंध- पाऊस
"घन कोसळला' ही पावसाचे रौद्ररूप दाखविणारी कविता. त्या कवितेत कवी लिहितो -
घन कोसळला, घन कोसळला
कोवळ्या दिसांचा गर्भ कुशीतून ओघळला
ही अवघी कविताच अर्थाच्या विविध अंगांना सामावून घेत घनाचे कोसळणे अधिकाधिक रौद्र-भयाण करीत जाते.
श्रावणाविषयी सर्वांनी गोडगुलाबी लिहून ठेवलं आहे, पण या कवीने श्रावणात महापूराचा अनुभव मांडला आहे. तो म्हणतो -
प्रलय माजला इकडे राणी
गाऊं नको तू श्रावणगाणी
कवीने केलेली निसर्गवर्णने तर केवळ लाजवाब आहेत. "मधुमास'मध्ये वाटेविषयी लिहिलं आहे - वाटुली गवत दाटुली छपत चालली दूरच्या गावा तर "गिरीच्या तळी'मध्ये लिहिलं आहे- लाटांच्या वलयांत मंद झुलते आभाळ बिंबातले आणि वडाचे वर्णन करताना कवी लिहितो -
ऋतुस्नात नार वाळविते उन्हात केशसंभार
तैसेच मोकळा सोडी वड पारब्यांचा भार
आणि ज्या कडव्यांनी कवीला महानतेच्या पक्तींत बसवलं आहे. त्या या ओळी वाचा -
दिनभर गवसेना गाय रानात व्याली
चिखल चिखल झाली चिंब पाणंद न्हाली
हळुहळु हळु चाले गाय हुंकार देई
तटतट तट पान्हा... दूध सांडून जाई
भरभर जळ वाढे पूर ओढ्यास आला
धडपडत गुराखी सावरी वासराला
ढळत ढळत भोळी सांज दारात आली
नकळत कवितेचे दान देऊन गेली
असे हे सुंदर कवितांचे पुस्तक सावंतवाडीच्या वैजयंती प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉ. राजेंद्र चव्हाणांनी काढलेले मुखपृष्ठ दाद द्यावे असे आहे.
-वैभव चाळके

हृदयाची परडी करून वेचावी अशी
द. भा. धामणस्करांची कविता

अलंकारांनी स्त्रीचे सौंदर्य खुलते, तसेच भाषिक अलंकारांनी भाषेचेही सौंदर्य खुलून येते. भाषेेचे शब्दालंकार अर्थालंकार असे दोन प्रमुख अलंकार असून त्यात उपप्रकार आहेत. आपण शाळेत असताना व्याकरणात ते सारे अलंकार शिकलेले असतो. अभ्यासापलीकडे जाऊन ज्याला त्यांचा आस्वाद घेता येतो, त्याच्या ओठावर त्या त्या अलंकारांची उदाहरणे आयुष्यभर फुलत राहतात. चेतनागुणोक्ती हा मला भावलेला अलंकार. निसर्गातल्या मानवेत्तर वस्तूवर मानवी भावभावनांचा आरोप करणे म्हणजे ती वस्तू मानवाप्रमाणे वागत असल्याची कल्पना करणे म्हणजे चेतनागुणोक्ती अलंकार होय. मला शाळेत असताना या अलंकाराची दोन उदाहरणे शिकविली होती. एक - कुटुंबवत्सल इथे फणस हा कटिखांद्यावर घेऊन ओझे! आणि दुसरी बालकवींची फुलराणी कविता! त्यातल्या ओळी होत्या-
छानी माझी सोनुकली ती।
कुणाकडे पाहत होती
कोण बरे त्या संध्येतून
हळुच पाहतो डोकावून
तो रविकर का गोजिरवाणा।
आवडला आमच्या राणींना
लाजलाजली या वचनांनी
साधी भोळी ती फुलराणी
या ओळी तेव्हापासून आजपर्यंत साधारण दिवसातून एकदा तरी मी गुणगुणत असतो. त्या ओळींनी तेव्हा जी भुरळ घातली ती अद्याप उतरलेली नाही.
चेतनागुणोक्तीची ही भली मोठी प्रस्तावना लिहायचं कारण आहे . भा. धामणस्करांचा "प्राक्तनाचे संदर्भ' हा कवितासंग्रह. काही वर्षांपूर्वी मी प्रथम हा संग्रह वाचला तेव्हाच तो माझा आवडता होऊन राहिला. मग कधीतरी मी तो विकत आणला. वाचला. पुन्हा पुन्हा वाचला. या वेळी वाचताना त्यांच्या या संग्रहातील चेतनागुणोक्ती अलंकाराने लक्ष वेधून घेतले. मला वाटते अलीकडच्या काळात चेतनागुणोक्तीचा इतका सुंदर आविष्कार इतर कुठे क्वचितच पाहावयास मिळेल.
किती सांगू एवढी उदाहरणे संग्रहात आढळतात.
वृक्षतळी पडलेली ही फुले...
त्यांनी मातीशी
पुनर्जन्मासाठी धरणे धरले आहे.
दुसऱ्या एका कवितेत धामणस्कर लिहितात- "पाने मिटून झाडे निश्चल प्रार्थनेत उभी होती.' आणखी एका कवितेत लिहितात - माळावरचे एकटे करडठे झाड रात्री उठून नवे अंकुर तुडवून टाकते... कविता म्हणून या अलंकाराने केवढे नेमके काम साधले आहे इथे ते पाहा. केवळ अप्रतिम! व्वा! म्हणायलाही भान उरू नये इतके! "जास्वंदी' नावाच्या कवितेत ते लिहितात - जास्वंदी नेहमीच रक्ताची भाषा बोलते म्हणून तगरीला मनापासून हसू येते! पुढे एके ठिकाणी ते लिहितात - "हट्टी मुलासारखी रुसलेली हिवाळ्यातील हिरवीगार शेते'. "फुलून आले झाड'मध्ये म्हटलं आहे - ओंजळीत फांद्यांच्या हलके कोसळले ब्रह्मांड...'
"गळणारी फुले' नावाच्या कवितेतल्या ओळी आहेत - वाट पाहून पाहून थकलेले फूल वाऱ्याचा हात धरून निघून जाते. धामणस्करांचा हा संग्रह आणि त्यांची एकूण कविताच रसिकाला अनोखा आनंद देते. चेतनागुणोक्ती हा एक अलंकार त्यांच्या भाषेची समृद्धी दाखविण्यासाठी नमुना म्हणून विचारात घेतला तरी ही एवढी अस्सल उदाहरणे सापडतात. त्यावरून धामणस्करांच्या एकूण कवितेचा अंदाज यायला हरकत नाही. तेव्हा लवकरात लवकर आमच्या या हिरव्यागार मैफलीत आपणही रुजून या. आम्ही आपल्या स्वागताला उभे आहोत.
जाता जाता धामणस्करांनी लिहिलेल्या कवितांतील चेतनागुणोक्ती अलंकाराच्या या "मास्टर पीसचाही अनुभव घ्या. उरल्या सुरल्या लोखंडाचेही त्याने सोने होऊन जाईल -
पाने गळून गेलेली फांदी
खिडकीच्या ग्रिल्सवर पंजा टेकते,
ग्रिल्सचे आखीव आकृती बंध
विस्कटून सहज होतात....
आता ग्रिल्सना पानेफुले आली
की फांदीलाही येतील....
- वैभव चाळके
दुष्यंतकुमार आणि सुरेश भट
साध्या माणसांचा एल्गार!
गझलचा विषय निघाला की मराठीतल्या सुरेश भटांचा जसा उल्लेख अपरिहार्यपणे येतो, हिंदीतल्या दुष्यंतकुमारांचाही येतो. गझल मुशायऱ्यात दुष्यंतकुमारांचा शेर वाचल्याशिवाय निवेदन पूर्ण होत नाही. इतकं त्यांचं काम मोठं आणि महत्त्वपूर्ण आहे.
मराठी गझल वाचनाच्या कार्यक्रमाचं निवेदन करताना कवी आणि निवेदक अरुण म्हात्रे दुष्यंतकुमारांचे काही शेर नेहमी सांगत असतात-
मैंै जिसे ओढता बिछाता हूँ
वो गजल आपको सुनाता हूँ
एक जंगल है तेरी आँखो में
मैं जहॉं राह भूल जाता हूँ
तू किसी रेल-सी गुजरती है
मैं किसी पूल-सा थरथराता हूँ
निर्जीव पुलाचं थरथरणं केवढं काव्यमय करून ठेवलंय कवीने! आपल्या नकळत आपण "व्वा!' अशी दाद देतो. मग एखाद्या कवीची प्रेमकविता सुरू होते. हा अनुभव मी दोन-तीन वेळा तरी घेतला असेन.
काही दिवसांपूर्वी दुष्यंतकुमारांचं "साये में धूप' नावाचं गझलच पुस्तक आणलं. त्यातल्या एकाहून एक सरस गझल वाचताना मजा आली. अरुण म्हात्रे ज्या गझलचे शेर ऐकवतात ती संपूर्ण गझल या संग्रहात आहे. म्हात्रे सांगतात ते वरील पहिले तीन शेर पण चौथा शेर वरील तीन शेरांहून अगदी वेगळा आहे-
हर तरफ ऐतराज होता है
मैं अगर रोशनी मैं आता हूँ।
हा शेर वाचल्यावर वाटलं- अरे, इतक्या जवळ येत होतो आपण आणि नेमके इथून मागे फिरत होतो. आज जर हा संग्रह हाती घेतला नसता तर केवढ्या श्रीमंतीला मुकलो असतो आपण!
दुष्यंतकुमारांचं भटांशी नातं आहे ते असं रंजल्या-गांजल्यांच्या मुखातील आवाज बुलंद करण्याच्या वृत्तीचं! सुरेश भटांनी लिहिलंय-
साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही!
सुरेश भटांनी स्वातंत्र्योत्तर काळातील देश पाहून लिहिलंय-
उष:काल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...
दुष्यंतकुमारांनी लिहिलं आहे-
अंधेरे में कुछ जिंदगी होम कर दी,
उजाले में अब ये हवन कर रहा हूँ।
सामान्य माणसाचं काय होतं आहे त्याचा आवाज काय म्हणतो आहे हे या शायरांनी गझलेला - पर्यायाने या जगाला सांगितलं.
अहोरात्र कष्ट करणाऱ्या आणि तरीही अभावात जगणाऱ्या माणसाचा आवाज बुलंद करणारे हे महामानव... त्यांनी आपल्या जगण्याचं नवं - खरं आकलन करून दिलं. कुणी कुणाचे कितीदा अश्रू पुसले हे महत्त्वाचं नाही. दुसऱ्याच्या डोळ्यांत अश्रू पाहून आपले डोळे पाणावले का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
हे पाणावणं... हीच माणूसपणाची सर्वश्रेष्ठ खूण आहे. आपले साने गुरुजी लिहितात-
फक्त माझे अश्रू
नको नेऊ देवा
हाचि ठेव ठेवा - जन्मभरी!
अर्थात हे सारं नाजूक काम आहे. सरींच्या लेखणीने पाण्यावर लिहिण्याचं! कुणी म्हणेल पण म्हणजे काय? ते कसं कळेल? उत्तर सोपं आहे. ज्ञानेश्वर माऊलीने हरिपाठाच्या अभंगात लिहून ठेवलं आहे-
भावबळे आकळे। एऱ्हवी ना कळे।
-वैभव चाळके