Monday, June 24, 2019

बकरू


मी नववीत शिकत होतो. बाबा पोलिसातून निवृत्त होऊन गावी आला होता. गावची जत्रा जवळ आली तशी बकरू आणायची लगबग सुरू झाली. आमचे मोठे चुलते अण्णा आणि आम्ही दरवर्षी एक बकरू घ्यायचो. पण यंदा बाबा म्हणाला, मी माझं वेगळं
बकरू घेणार.
अण्णानं मग दोन पिल्लं मागवली. चार आठ दिवस खाऊपिऊ घालून जत्रेच्या आदल्या रात्री बकरू कापायचं हा पिढ्यांपिढ्यांचा रिवाज. त्या पिल्लांमागे आम्ही मुले दरवर्षी आवडीने फिरत राहायचो. जत्रा आली की, पाव्हणे रावळे घरी येत. त्यात मोठी मौज असे. जत्रेचा तो कालावधी इतका भारी असे की दरवर्षी आम्ही जत्रेची वाट
पाहत असायचो.
अण्णानं मागवलेली पिल्लं आली आणि बाबानं त्यातल्या एका पिल्लाचा ताबा घेतला. तो सकाळ-संध्याकाळ त्या पिल्लाला घेऊन शेतावर न्यायला लागला. पार अंधारून आलं तरी तो परतेना झाला. जत्रेच्या आधीची रात्र झाली. मागच्या अंगणात अण्णानं आपल बकरू कापायला घेतलं. मदतीला मधू आला होता. त्यानं अण्णाचं बकरू कापतानाच मला फर्मान सोडलं.,  रं पोरा, तुझं बी घेऊन ये’
मी बाबाला शोधत गेलो. बाबा आला. त्याने ते अण्णाचं बकरू कापताना पाहिले. अण्णा म्हणाला, जा रं! घेऊन ये मधु पुढची
बकरी हायत.
बाबा गेला. जो आमच्या पडवीत बांधलेलं बकरं घेऊन येईल असं वाटलं होतं. पण अण्णाचं बकरू तोडून साफ करून झालं तरी बाबा आलाच नाही.
अण्णाच्या सांगण्यावरून मी बाबाला हाक दिली. तो तिकडूनचं म्हणाला, नाय कापायचं माझं बकरू.. तुम्ही आवरा.
त्यांचे ते शब्द ऐकून एकच गडबड उडाली. अण्णा म्हणाला, डोकं फिरलं की काय?
आई बाहेर येऊन म्हणाली, डोकं फिरलं व्हय. उद्या पोर आणि नातेवाईक काय तुझ्या बकर्‍याच्या तोंडाकडं बघून जत्रा करतीलं व्हय!
‘अण्णा उठा. तुम्हीच घेऊन या’
आईनं अण्णाला फर्मान सोडलं.
अण्णा उठला. बकरू आणायला गेला. तसा बाबा तरातरा चालत माडीवर गेला.
आम्ही इकडे ते बकरू कापून, तोडून, साफ करून शिजायला घातलं. अवघं घर गंधानं भरून गेलं. रात्री सगळे जेवणाला बसलो तरी बाबा माडीवरून उतरला नव्हता.
आई बोलवायला गेली, बाबा नाही.
आम्ही टम्म जेवलो.
बाबा त्या रात्री जेवला की नाही माहित नाही. पण त्या दिवसापासून बाबा शाकाहारी झाला.

कायझेन नावाची जपानी जादू रोज करा एक मिनिट व्यायाम


कायझेन ही एक एक जपानी कार्यशैली आहे. मोठमोठ्या उद्योगांनी ही कार्यशैली वापरून आपले उद्योग यशस्वी केले आहेत. त्याचप्रमाणे एकेका माणसानेसुद्धा कायझेनचा वापर करून आपल्या आयुष्यात अमुलाग्र बदल केलेला आहे.हजारो-लाखो माणसांनी कायझेनच्या वाटेने आपल्या स्वतःमध्ये अमुलाग्र बदल करून आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवलेल्या आहेत. ही कायझेनची वाट नेमकी काय आहे आणि या कायझेनच्या वाटेने कसे चालायचे, याचा आपण अगदी थोडक्यात परिचय करून घेऊ या.
निरंतर सुधारणा
कायझेन ही एक कार्यशैली आहे. अनेक जण कायझेन हे तत्त्वज्ञान आहे असे सांगतात. ते जपानी तत्त्वज्ञान असल्याचे अनेक जण सांगत असतात, पण एवढे मोठे शब्द वापरण्याची आवश्यकता नाही. कायझेन म्हणजे निरंतर सुधारणा करीत राहणे आणि त्यासाठी अगदीच छोटीशी सुरुवात करणे होय. एखाद्या कंपनीने कायझेनचा स्वीकार केला म्हणजे ती कंपनी कंपनीच्या सीईओपासून शेवटच्या कर्मचार्‍यापर्यंत प्रत्येकाला छोट्या छोट्या सुधारणांसाठी मानसिकदृष्ट्या तयार करते आणि सगळ्यांच्या सूचनांमधून योग्य त्या सूचनांचा स्वीकार करीत हळूहळू अधिकाधिक सुधारणा करीत जाते. टोयाटो या कंपनीचे याबाबतीत उदाहरण दिले जाते. कायझेनचा वापर करून नित्य छोट्या-छोट्या सुधारणा करीत टोयाटो कंपनीने आपली व्यवस्था आमुलाग्र बदलली आणि अफाट यश मिळवले. जगभरातील मोटिवेशनल आणि विविध कंपन्या उभ्या करणारे सल्लागार या टोयाटो कंपनीचे उदाहरण देत असतात. सामूहिक प्रयत्नांनी रोज छोटी छोटी गोष्ट करीत गेल्यास मोठी गोष्ट कधी साध्य होते ते कळतच नाही, असा याचा अर्थ आहे.
कायझेनची पाच तत्त्वे
कायझेनची पाच मुख्य तत्त्वे सांगितली जातात. त्यातले पहिले तत्त्व आहे. सांघिक काम. जेव्हा तुम्ही सगळ्यांनी मिळून सुधारणा करायचे ठरविता तेव्हाच तुम्ही खर्या अर्थाने सुधारणेकडे जात असता. आपली कंपनी, आपला संघ, आपली सोसायटी, आपले राज्य, आपले राष्ट्र सुधारण्यासाठी अशी सांघिक वृत्ती अत्यंत गरजेची असते. ती निर्माण केली पाहिजे, असे कायझेन सांगते. दुसरे तत्त्व आहे स्वयंशिस्त. स्वयंशिस्तीशिवाय कोणताही बदल शक्य नाही, असे कायझेनम्हणते. कायझेनचे तिसरे तत्त्व उन्नत मनोबल अर्थात तुमचा आत्मविश्वास हे होय. रोज थोडी गोष्ट पण निरंतर करत राहिल्याने आत्मविश्वास वाढीस लागतो आणि मग बदल हमखास होतो असे कायझेन मानते. आपल्या एकूण कार्यक्षेत्रात अशीच प्रगती झाली पाहिजे. त्यात सुधारणा झाली पाहिजे, असेही कायझेनचे तत्त्व आहे. सुधारणेसाठी नवनवीन पर्याय सुचवले जावेत, असेही कायझेन मानते. या पाच तत्त्वांच्या जोरावर कायझेन एखाद्या गोष्टीत, एखाद्या कंपनीत, एखाद्या माणसाला रोज थोडा थोडा करून अंतिमता मोठा बदल करू शकते.
कायझेनमध्ये स्वच्छता, सुव्यवस्था, साधनशुचिता, प्रमाणबद्धता आणि शिस्त या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखादी गोष्ट चुकीची घडते आहे, असे लक्षात येताच ती लक्षात आलेल्या माणसाने ताबडतोब थांबून सुधारायला हवी, असे कायझेन सांगते.
वन मिनीट प्रिन्सिपल
कायझेनचा वापर कसा करायचा, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आपण विविध कामांसाठी कायझेनचा वापर करू शकतो. एक उदाहरण म्हणून आपण व्यायाम करण्याची सवय लावण्यासाठी कायझेन कसा वापरता येईल ते पाहू. दरवर्षी हिवाळा आला की, सुट्टी मिळाली की किंवा पाऊस सुरू झाला की, सकाळी फिरायला जाण्याचा, सकाळी रोज व्यायाम करण्याचा, जिममध्ये जाण्याचा संकल्प आपण करीत असतो. बहुदा हा संकल्प तडीस जात नाही. कायझेनअसे म्हणते की, आपल्या मनावर अशा कोणत्याही संकल्पाचा मोठा ताण येतो आणि अशाप्रकारे कोणताही ताण आला की मनाची स्वाभाविक प्रतिक्रिया अशी असते की, तो ताण दूर करावा. मग विविध कारणे पुढे करीत आपण ते करणे टाळतो आणि ताण दूर करतो. कायझेन नेमके हेच सांगते की, असा ताण येऊ नये, अशा पद्धतीने कामाला लागा.
कोणत्याही दिवशी व्यायाम करण्याचा संकल्प करा आणि त्या दिवशी किमान एक मिनिट व्यायाम करा. त्यानंतर ठरलेल्या विशिष्ट वेळेला घड्याळाचा आलार्म लावून घ्या. आलार्म होताच व्यायाम करायला सुरुवात करा. आता तुम्हाला दिवसातील 14 40 मिनिटांनी पैकी फक्त एक मिनिटं व्यायाम करायचा असल्याने मानसिक ताण येणार नाही. फक्त एक गोष्ट कटाक्षाने पाळली पाहिजे, आलार्म झाला की व्यायाम सुरू. त्यात खंड पडता कामा नये. सातत्याने तुम्ही असे करीत राहिलात की तुमच्या मनाला त्याची सवय होऊन जाते. तुम्हाला माहीतच असेल की कोणतीही सवय सहजासहजी सुटत नाही. त्यामुळे सतत काही दिवस निरंतर एक मिनिटाचा व्यायाम करा. असे एकवीस दिवस केल्यावर तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढीस लागेल. मग या एक मिनिटाची तीन किंवा पाच मिनिटे करा. आता तुम्हाला सवय झालेली असेल. त्यामुळे तीन किंवा पाच मिनिटे व्यायाम करणे अवघड वाटणार नाही. त्याचा मनावर ताण येणार नाही. असे करत हळूहळू हा वेळ वाढवत न्या. तीन मिनिटे किंवा पाच मिनिटे या वेळेवर काही दिवस कायम राहा. मग अपेक्षित असलेला एक तास, दीड तास वेळेपर्यंत व्यायाम वाढवत न्या. असे केल्याने त्याची सवयच लागेल आणि कोणतीही सवय एकदा लागली की ती सुटत नाही, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेच.
सातत्य टिकविणे सोपे झाले
जपानमध्ये या कायझेनचा शोध लागल्यावर माणसाच्या आयुष्याला जबरदस्त कलाटणी देणारे एक तत्त्वच हाती आले. या कायझेनचा अर्थ आहे, शहाणपणाने केलेला बदल, येथील काई म्हणजे बदल आणि झेन म्हणजे शहाणपण. झेनकथांबद्दल आपण ऐकले असाल. त्या सगळ्या शहाणपणाच्या कथा आहेत. त्यातलेच हे झेन होय. मकाई इमाई यांनी वन मिनिट प्रिन्सिपलचा शोध लावला. मग जपान या तंत्राच्या सहाय्याने यशाचे शिखर गाठणारा देश ठरला. कोणत्याही गोष्टीत यश मिळवायचे असेल तर सातत्य महत्त्वाचे असते आणि हे सातत्य तर टिकवणे अवघड असते. वन मिनिट प्रिन्सिपलमुळे सातत्य टिकविणे सोपे झाले. एक मिनिट काम करायचे म्हटल्यावर माणूस ते सातत्याने करू लागला. त्याला त्याचा त्रास होईनासा झाला आणि हळूहळू त्याला त्याची सवय लागली. त्याचा आत्मविश्वास वाढला आणि म्हणताम्हणता मग वेळ वाढवत नेला, तरी त्याची सवय मोडली नाही. असे म्हणतात प्रत्येक दिवशी निश्चित वेळी, फक्त एक मिनिट, एखादी गोष्ट तुम्ही करीत राहिलात की तिची तुम्हाला सवय होते. वन मिनिट प्रिन्सिपल नेमके हेच सांगते. या वन मिनिट प्रिन्सिपलचा वापर करून तुम्ही रोज एका पुस्तकाचे एकच पान वाचायला सुरुवात केली, तर लवकरच पुस्तक वाचून होईल. शिवाय वाचनाची सवय लागेल. रोज एकच सूर्यनमस्कार घालायला ठरवलात तर सूर्यनमस्कार घालायची सवय लागेल. रोज एक योगासन करायचे ठरविले तर लवकरच योगासनांमध्ये तुम्ही प्रवीण व्हाल. रोज एक मिनिट ध्यानधारणा करायची ठरवलात तर लवकरच ध्यानधारणेची तुम्हाला सवय लागेल. रोज एक स्पेलिंग पाठ केला तर वर्षाला 365 स्पेलिंग पाठ होतीलच, पण तुम्हाला अधिक स्पेलिंग पाठ करावी वाटतील. त्याची तुम्हाला सवय लागेल. रोज एकच पॅरेग्राफ सुंदर हस्ताक्षरात लिहिलात, तर तुमचं हस्ताक्षर संदरह होईल. ह्या एका मिनिटाच्या सवयीचा केवढा मोठा परिणाम होऊ शकतो, याची तुम्ही कल्पना करू शकाल. झेन असं सांगतो की एकवीस दिवस जर तुम्ही सातत्य टिकू शकतात, तर तुम्ही आयुष्यभर ते टिकवू शकता. तेव्हा तुम्हाला अभिप्रेत असलेलं काम एक मिनिटासाठी करायची सुरुवात तुम्ही कधीपासून करत आहात?
कायझेनच्या वाटेने जात आपण स्वतःमध्ये, आपल्या मुलांमध्ये, आपल्या शाळा-कॉलेज, संस्था, कंपन्या, सोसायट्या, उद्योग, गाव, राज्य यांच्यात ही सहज बदल करू शकतो.

कथा... सांगू या... ऐकू या...



गोष्ट ऐकायला आपल्या सगळ्यांनाच आवडते. आपलं बालपण आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकण्यातच गेलं. या गोष्टींमधून आपल्या बालमनावर संस्कार झाले. रात्री झोपण्यापूर्वी आजीच्या कुशीत जावे... आजी गोष्ट सांगणार, म्हणून तिला आग्रह करावा आणि मग आजीने रोज नवी गोष्ट सांगावी असे ते दिवस होते. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात आजी-आजोबा नाहीत. त्यामुळे मुलांच्या जगण्यातली गोष्ट हरवली.
आटपाट नगर होतं... किंवा एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या... किंवा कोणे एके काळी असं घडलं... असं म्हणून सुरू होणारी गोष्ट... त्यात आमची पिढी रमली आणि रमतगमत मोठी झाली. आज मात्र गोष्ट आपल्या आयुष्यातून हद्दपार झाली की काय, असं वाटावं अशी स्थिती आहे
यू-ट्युबसारख्या माध्यमातून खरेतर आता आपल्याला हव्या तेव्हा आणि हव्या तेवढ्या गोष्टी ऐकायला आणि ऐकवायला मिळू शकतात. पण ‘गोष्ट’ ही महत्त्वाची गोष्ट आहे हेच कदाचित आपण अलीकडच्या काळात विसरून गेलो आहोत.
मुलांसाठी काम करीत असताना मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत आली आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान एखादी गोष्ट सांगू लागलो की, मुलं आणखी सांगा म्हणतात. मला ते शक्य नसतं, पण वाईट वाटत राहतं की, ही मुलं गोष्टीची उपाशी आहेत. म्हणूनच गेली काही वर्षे ‘आम्हालाही मुलांसाठी काही करायचं आहे’, असे म्हणणार्‍या प्रत्येकाला मी सांगतो, जवळच्या शाळेत जा आणि मुलांना गोष्टी सांगा.
गोष्ट ऐकायला फक्त मुलांनाच आवडते असे नाही, मोठ्या माणसांनाही गोष्टी आवडतात. म्हणूनच तर कथा-कादंबर्‍यांचा वाचकवर्ग मोठा आहे. कथाकथनाचे कार्यक्रमही अनेकदा होत असतात. आपल्याकडे त्याची मोठी परंपरा आहे. अलीकडच्या काळात त्याचे प्रमाण कमी झाले हे खरं, पण आपला कथाकथनाचा इतिहास मात्र चांगलाच मोठा आहे
काही महिन्यांपूर्वी साठ्ये महाविद्यालयात ‘कथा-कट्टा’ एक नावाचा कार्यक्रम ऐकायला मिळाला. कथाकट्टा हा एक असा उपक्रम आहे, जो भाषा वाचवू पाहतो आहे. या लोकांना आपल्या सगळ्या प्रादेशिक भाषा जिवंत राहाव्यात असे वाटते आणि भाषांचं रक्षण करण्याचा एक मार्ग म्हणून त्यांनी कथाकथनाला सुरुवात केली आहे. जागोजागी जाऊन हे लोक लोकांना गोष्टी सांगतात. त्यातलाच एक कथाकथनाचा कार्यक्रम मला ऐकायला मिळाला. सदाहत हसन मंटो या उर्दूतील महान कथाकाराच्या काही कथा त्यांनी या कार्यक्रमात सादर केल्या. कार्यक्रमाच्या पूर्वी मधुरा अभ्यंकर म्हणाली, ‘भाषा जतन करण्याचा हा एक मार्ग आहे म्हणून आम्ही हा उपक्रम चालवतो आहोत. जमिल हे लेखक याचे प्रमुख आहेत आणि त्यांच्याबरोबर इतर कार्यकर्ते कथाकथन करतात.’
मी ऐकला तो कार्यक्रम उर्दूतील कथांचा होता. हिंदुस्तानी बोली म्हणतात त्या बोलीतील  सदाहत हसन मंटो  यांनी लिहिलेल्या कथा त्यांनी वाचल्या. पण त्यांनी असं भाषेचं बंधन घालून घेतलेलं नाही. सगळ्यातच प्रादेशिक भाषांमधून कथाकथन व्हावं आणि त्यातून आपली भाषा जोपासली जावी यासाठीचा त्यांचा हा उपक्रम असल्याचे ते सांगतात.
खरे तर आपणही आपल्या भाषेसाठी आणि आपल्या लोकांसाठी असे कथाकथनाचे छोटे-मोठे प्रयोग करू शकतो. आपल्याकडे कथालेखनाची मोठी परंपरा आहे. आजही अनेक सशक्त कथाकार कथा लिहीत आहेत. त्यातल्या कथा घेऊन त्यांचे अभिवाचन केले तर लोकांना ते नक्कीच आवडेल. आपल्या महाविद्यालयांनी, विविध सांस्कृतिक संस्थांनी... एवढेच काय आपल्या सोसायट्यांनीही असा एखादा वाचकांचा गट करून कथा सांगायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. सांगणारे आले की ऐकणार येतीलच. मग त्या कथेच्या निमित्ताने आपली भाषा, आपली संस्कृती, आपलं जगणं टिकून राहील. प्रवाही होईल. संवर्धित होईल. आपल्या भाषा आणि जगणे इंग्रजीखाली चिरडून जाऊ नये यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यातली ही एक अत्यंत चांगली, लोकांना हमखास आवडणारी आणि भाषा टिकवून ठेवायला अधिक सोयीस्कर ठरणारी गोष्ट आहे. म्हणून आपण सगळ्यांनी कथा सांगू या. ऐकू या. त्यामुळे आपली संस्कृतीच केवळ टिकणार नाही तर तिच्या कथा पुन्हा पुन्हा सांगितल्या जातील. तिच्यात कथा पुन्हा पुन्हा घडत राहतील. आपल्यासाठी आणि आपल्या येणार्‍या पिढीसाठी ते फारच मोलाचे असेल.

Monday, June 3, 2019

दिवेकर, दीक्षित... आता देशमुख....... वजन घटवण्याची नवी सोपी पद्धती


(वैभव बळीराम चाळके, दै. नवाकाळ, 2 जून 19)
आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी वजन घटवण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे खात राहण्याचा सल्ला दिला होता. हिंदी चित्रपटसृष्टीपासून सुरू झालेला वजन घटवण्याचा हा नवा फंडा चांगलाच गाजला. त्यानंतर दिवसातून फक्त दोन वेळ जेवा असे सांगत जगन्नाथ दीक्षित यांनी नवा प्लॅन लोकांसमोर ठेवला. त्यालाही चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता डॉ. तनवीर देशमुख यांनी आणखी एक नवा प्लान आणला आहे. तो समाजात लोकप्रिय होऊ लागला आहे. राहुरी येथे प्रॅक्टिस करणारे डॉ. तनवीर देशमुख यांचा हा नवा डाइट प्लान नेमका कसा आहे, हे आम्ही त्यांच्याकडूनच विस्ताराने जाणून घेतले.

40 दिवसात तब्बल 18 किलो
इतके वजन कमी केले

डॉक्टर सांगतात, माझे स्वतःचे वजन तब्बल एकशे दोन किलो होते. ते कमी करण्यासाठी मी अनेक गोष्टी केल्या. ज्यांनी ज्यांनी जे जे सांगितले ते ते करून पाहिले. पण वजन कमी झाले नाही. फार तर एखाद किलो वजन कमी होत होते. त्यासाठीसुद्धा दोन-दोन महिने तो विशिष्ट डायट पाळावा लागत होता. मग मी स्वतः वजन का वाढते, याचा अभ्यास करायला सुरुवात केली. वजन वाढण्याची कारणे शोधली. मग 40 दिवसात तब्बल 18 किलो इतके वजन कमी केले.

कमी खाल्ले तरी शरीरात
जास्त कॅलरीज जातात

सर्वसाधारण भारतीय माणसाला चोवीस तासांसाठी साधारणपणे दोन हजार कॅलरीज लागतात.  आपण मात्र आपल्या आहारात 4000 ते 5000 कॅलरीज घेत असतो. वजन कमी करू इच्छिणारे लोक कमी खातात, पण त्यांचे खाणे अधिक कॅलरीज युक्त असते. त्यामुळेच कमी खाल्ले तरी शरीरात जास्त कॅलरीज जात असतात. आपण कमी खातो, पण काय खातो त्याकडे पाहत नाही. म्हणून मी सांगतो की, उपाशी राहण्याची गरज नाही. शरीरात कॅलरीज कमी जातील, असे पाहा. तसे केल्याने वजन सहज कमी होते. वजन कमी करायचे म्हणजे शरीरात जाणार्‍या कॅलरीज कमी करायच्या, एवढे सूत्र लक्षात ठेवा. कमी कॅलरीज असलेला आहार पोटभर घ्या. आता हे कॅलरीजचे गणित कसे ते प्रथम समजून घेतले पाहिजे. सर्व प्रकारच्या भाज्या या कमी कॅलरीज असणार्‍या असतात. म्हणजे शंभर ग्रॅम हिरवी भाजी घेतली तर त्यात 20 कॅलरीज असतात. त्याउलट ते साखर, तळलेले पदार्थ घेतले तर 100 ग्रॅम मध्ये तब्बल 900 कॅलरीज असतात. म्हणजे तुम्ही वजन कमी करण्यासाठी इतर आहार कमी केला, पण त्याच दिवशी चार गुलाबजाम खाल्लात तर उपयोग होणार नाही. कारण गुलाबजाममध्ये शंभर ग्रॅममध्ये तब्बल 900 कॅलरीज असतात. म्हणून तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर सर्वप्रथम साखरेचा त्याग करा. चहा पूर्ण सोडून द्या.
नाश्त्यामध्ये फळे खा
नाश्त्यामध्ये फळे खा. सर्व प्रकारची फळे चालतील. बीट, सफरचंद, डाळिंब, केळे अशी सर्व प्रकारची फळे चालतील. ही सगळी फळे मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात साखर टाकू नका. वाटलेली ती फळे सर्व चौथ्यासहित खा. तुम्हाला हवे असेल तर या मिश्रणात अर्धा ग्लास दूध टाका. म्हणजे ते थोडे पातळ होऊ शकेल. पोटभर हा आहार घ्या. म्हणजे भुकेचा प्रश्न मिटेल आणि कॅलरीज कमी जातील.
दुपारच्या जेवणात भाज्या
दुपारच्या जेवणाचासुद्धा आपण नीट विचार केला पाहिजे. आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट फार मोठ्या प्रमाणात असतात. ते शरीराला फारशी ऊर्जा देत नाहीत. शिवाय ते पचनाची गती मंद करीत असतात. म्हणून आपण आपल्या आहारातून कार्बोहायड्रेट कमी केले पाहिजेत. पोळी किंवा चपाती यातून कार्बोहायड्रेट शरीरात जात असतात. म्हणून दुपारच्या आहारात चपाती बंद करा. बाजरी, ज्वारी यांची भाकरी हीसुद्धा कार्बोहाइड्रेटसंपन्न असते. म्हणून बाजरी किंवा ज्वारी यापैकी एका धान्यापासून बनवलेली अर्धी भाकरी दुपारी घ्या. अर्ध्या भाकरीने पोट कसे भरेल, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. त्याचा विचार आपण केलेला आहे. या अर्ध्या भाकरीसोबत खाण्यासाठी पुरेशी हिरवी पालेभाजी करून घ्या. त्यासोबत कोबी, पालक, काकडी, गाजर, फळे यांचे सलाड करून घ्या. तुमची अर्धी भाकरी खाऊन झाली की मग पोट भरेपर्यंत ही शिजवलेली हिरवी पालेभाजी आणि सलाद खा. उपाशी राहू नका. भरपेट खा.

संध्याकाळच्या नाश्त्याच्या
वेळेला उसाचा रस प्या

संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळेला उसाचा रस प्या. अगदी चार-पाच ग्लास प्यायलात तरी चालेल. टोमॅटो हा कमी कॅलरीज असलेला पदार्थ असल्याने नाश्त्याच्या वेळी तुम्ही तुम्हाला हव्या तेवढ्या प्रमाणात टोमॅटो खाऊ शकता. शंभर ग्रॅम टोमॅटोमध्ये केवळ सात ते आठ ग्रॅम कॅलरीज असतात.

रात्री प्रोटीनयुक्त आहार घ्या

आता रात्रीच्या आहाराचा विचार करू. तुम्ही शाकाहारी असाल तरीही तुम्हाला रात्री प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे. त्यासाठी सर्व प्रकारच्या डाळी घ्या. त्या कुकरला लावा. त्यामध्ये आले, लसूण आणि गायीचे तूप आणि तुम्हाला हवा तो मसाला हव्या त्या प्रमाणात टाका. त्या डाळी चांगल्या शिजवून घ्या. तेल मात्र वापरू नका. या डाळी चांगल्या शिजल्या पाहिजेत. त्यासाठी कुकरला आठ ते दहा शिट्ट्या होऊ द्या. रात्रीच्या जेवणात पोळी किंवा भाकरी घेणे पूर्ण वर्ज्य करा. दिवसभरातील या आहारातून तुमच्या शरीराच्या सर्व पोषणमूल्यांच्या गरजा पूर्ण होतील.
चार अक्रोड आणि चार बदाम
रात्री चार अक्रोड आणि चार बदाम पाण्यात भिजायला घाला. सकाळी ते खा. न भिजवलेले अक्रोड किंवा कसे बदाम खाऊन शरीराला फायदा होत नाही. ते तसेच शरीरातून बाहेर फेकले जातात.
तेलाविषयी जागरूक व्हा
तेलाविषयी थोडे जागरूक व्हा. जेवढे तेल कमी खाल तेवढे वजन घटवण्यासाठी चांगले ठरते. आज बाजारात चांगल्या कंपनीचे चांगले तेल 110 ते 120 रुपये लिटरने उपलब्ध आहे. तुम्ही घाण्यावर जर शेंगदाणे घेऊन गेला तर तीन किलो शेंगदाण्यापासून एक लिटर तेल निघते. 80 रुपये किलो असा शेंगदाण्याचा भाव धरला तर एक लिटर शेंगदाणा तेलासाठी तीन किलो शेंगदाणे म्हणजे तब्बल 225 ते 240 रुपये इतका खर्च येतो. असे असताना बाजारात शेंगतेल 110 ते 120 रुपये किलो कसे काय, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. ते तसे मिळते, कारण त्या तेलामध्ये विविध केमिकल आणि पामतेलाचा वापर केलेला असतो. म्हणून मी सांगत असतो की, असे तेल ही अत्यंत खराब गोष्ट आहे. पिशवीतले तेल नको. रिफाइंड तेल नको. तेल वापरायचे झाले तर नैसर्गिक पद्धतीने काढलेले घाण्यावरचे तेल वापरा. गाईचे तूप सगळ्यात चांगले. तेही प्रति माणशी चार चमचे यापेक्षा जास्त नको.

सकाळी उठल्यावर

सकाळी उठल्यावर एक चमचा जिरेपूड, आल्याच्या चार कापा, दालचिनीची पूड चिमूटभर, सात पाकळ्या लसूण (तीही दगडावर ठेचलेली), दीड ग्लास पाण्यात टाकून घ्या. हे पाणी चांगले उकळवून घ्या. साधारण निम्मे होईपर्यंत ते उकळा. आटलेले पाणी बशीत घ्या. त्यात मध व लिंबू पिळा. त्याचे सेवन करा. हा चहाचा एक पर्यायच आहे. वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या पेयांमुळे मेटाबोलिक हालचालींना वेग येतो. शरीरातील चरबी जळून जाण्यास मदत होते.
कोमट पाण्यामध्ये केलेले लिंबूपाणी तुम्हाला हवे तेव्हा पिऊ शकाल. भात मात्र पूर्ण टाळला पाहिजे. गव्हाच्या पिठाची पोळी टाळली पाहिजे. कधी खावी असे वाटलेच तर दुपारी एक पोळी घ्यावी.

आठवड्यातून एकावेळी सुट्टी

आठवड्यातून एकावेळी सुट्टी घ्या. त्यावेळी तुम्हाला हव्या त्या हॉटेलात जाऊन तुम्हाला हवे ते पदार्थ खा. महिन्यामध्ये असे चार दिवस तुम्ही सुट्टी घेऊ शकाल.  त्याप्रमाणे याच दिवसातील एका वेळी तुम्ही तुमच्या आवडत्या हॉटेलात तुमचा आवडता पदार्थ हवा तेवढा खाऊ शकाल, मात्र आठवड्यातले उरलेले साडेसहा दिवस आपला डायट प्लान व्यवस्थित पाळला पाहिजे. या डायट प्लानचे शंभर टक्के पालन केल्यास 100% रिझल्ट मिळेल. आपले वजन कमी होईल. महिन्याकाठी 14 ते 16 किलो वजन कमी करणे या डायटमुळे शक्य आहे.

मी चालत नाही
व्यायाम करीत नाही

मी 40 दिवसात 18 किलो वजन कमी केले. मी चालत नाही. व्यायाम करीत नाही. सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत ओपीडीमध्ये असतो. अनुलोम-विलोम सारखा व्यायाम प्रकारसुद्धा मी करत नाही. तरीही सध्या माझे वजन कमी करून स्थिरावले आहे. याआधी वजन कमी करण्यासाठी मी खूप धावलो आहे. चाललो आहे. व्यायाम केला आहे. पण चुकीच्या आहारामुळे माझे वजन हे सारे करूनसुद्धा घडले नव्हते. गाईचे दूध हळद टाकून पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढे घेऊ शकता. मी स्वतः आठवड्यातून एक दिवस जे हवे ते खातो. कधी लग्नवगैरे कार्यक्रमात गेलो तर तेवढा वेळ अपवाद करतो.

21 हजारांची औषधे फुकट गेली

असे केल्याने वजन नक्कीच कमी होईल. औषधांची गरज पडणार नाही. मी अनेक प्रकारे प्रयत्न केले. खर्च केला. व्यायाम केला. फायदा झाला नाही. मात्र या फ्लॅनने माझे वजन घटले. मी एका कंपनीची तब्बल 21 हजारांची औषधे खाल्ली होती. फारसा फरक पडला नव्हता. मी खूप खर्च केला. तुम्ही तसा खर्च करु नका. तुम्ही खर्चाशिवाय आपले वजन कमी करू शकाल. अर्थात त्यासाठी मनाचा ठाम निर्धार करायला हवा. तुम्हाला जर या प्लॅनवर विश्वास असेल तरच हा प्लॅन सुरु करा. एक महिन्यात फरक पाहा. एक महिन्यानंतर मला येऊन आपल्याला किती यश मिळाले याची कल्पना द्या.
डॉ. तनवीर देशमुख यांनी सांगितलेला हा नवा प्लॅन अमलात आणून आपल्याला औषधाशिवाय जर आपले वजन आटोक्यात आणता आले तर ते एक वरदानच ठरावे. डॉ. देशमुख यांनी कोणतेही अघोरी उपाय सांगितलेले नाहीत. कदाचित पुढच्या काही महिन्यात हा डायट प्लॅन आणखी लोकप्रिय होऊन जाईल.
संपर्क- 8605 606 664