Sunday, May 31, 2020

अजब न्याय


अजब न्याय

काय करतो आहेस?
वैजयंतीने फोनवर बोलणं या प्रश्नातच सुरू केलं.
उद्याचं पान लावतोय.. मी तिला म्हणालो.
मी तेव्हा उद्या प्रकाशित होणारे युवा पान  सेट करीत होतो.
कधी निघणार आहेस? तिने दुसरा प्रश्न विचारला.
पान झालं की... मी म्हणालो.
किती वेळ लागेल..? तिने प्रतिप्रश्न केला.
तासभर तरी जाईल... मी स्पष्टीकरण दिलं.
आज भेटशील..? तिने विचारलं
हो... म्हणालो.
मग भेटूया.. मी वाट पाहते... असं म्हणून ती फोन ठेवायला निघाली, तर मीच विचारलं,
काही अर्जंट आहे का?
तसंच समज... बोलायचंय तुझ्याशी.. ती म्हणाली.
येतो...
ठेवू... ?
मी बाय-बाय म्हणालो आणि आणि फोन कट केला.
पण 'काय प्रॉब्लेम असेल'च्या भुंग्याने मन पोखरायला सुरुवात केली. पानाचा लेआउट करण्यात मनच लागेना. ऑपरेटर सोलकरला सूचना दिल्या आणि पंधराव्या मिनिटाला मी ऑफिसबाहेर पडलो.
नेहमीच्या जागी पोहोचलो. वैजयंती अगोदरच पोचली होती. मोबाईलवर फेसबुकशी चाळे करीत माझी वाट पाहत बसली होती. नेहमी हसतमुख असणारी ही बया तोंड पाडून बसली होती. काय झालं म्हणून मी विचारलं तर काही न बोलता घडाघडा रडायलाच लागली.
बाजूला बसून उजवा हात पाठीमागून तिच्या उजव्या खांद्यावर टाकून मी तिला नेहमीप्रमाणे जवळ घेतलं आणि विचारलं,
काय झालं?
तर प्रश्नाचे उत्तर आले नाही. हुंदके ऐकायला येऊ लागले.
डाव्या हातानं प्रथम हनुवटी उचलून मग मी तिचे डोळे पुसले.
आश्वासक स्वरात पुन्हा विचारलं,
काय झालं?
मग मात्र तिने आढेवेढे न घेता रडवेल्या चेहऱ्याने सगळी गोष्ट सांगितली.
गोष्ट एकदम फालतू होती.
तिची सहकारी कोणी माया का छाया म्हणून... तिला बॉसने कामावरून काढून टाकलं. तिच्या घरी पैशाचा मोठा प्रॉब्लेम आहे. ती जाताना तिच्याजवळ रडली. त्या रडण्याचं हिला वाईट वाटलं. म्हणून आता ही हुंदके देत होती. मी म्हटलं, तुला वाईट वाटलं तर ठीक आहे. पण मेली तर नाही ना... जिवंत आहे ना... मग सोड चिंता. मिळेल दुसरा जॉब. मग जरा अस्वस्थ होत तिने आपला हॅंकी बाहेर काढून तोंड पुसलं. तिला हसवण्यासाठी हॅंकी... म्हणालो. तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. हॅंकीचा शॉर्टफॉर्म तिच्या पहिल्या भेटीत कळला.  ती जेव्हा हातरुमालाला हॅंकी म्हणाली तेव्हा मी म्हटलं होतं की, शब्द एकदम परफेक्ट आहे. हॅकरचिप एवढा मोठा शब्द म्हणण्याइतका एफएसआय तरी आहे कुठे त्यावर?
तिला तेव्हा एफएसआय हा शब्द माहीत नव्हता. तो सांगितल्यावर तिला हसू आलं होतं. आज मात्र तिला हँकी म्हटलं की तो विनोद आठवण हसू येतं.
प्रेमात असलं की छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या सुंदर दिसू लागतात.
आम्ही उठलो. नेहमीच्याच चहावाल्याकडे गेलो. मी चहा पीत नाही. ती नेहमीप्रमाणे फूल  चहा प्यायली.  चहावाल्याशेजारी पानपट्टी आहे त्याच्याकडून चॉकलेट घेतली. एक फोडून तोंडात टाकलं. खिश्यातून फोन काढला आणि ऑपरेटर सावपेकरला फोन केला.
झालं का रे पान? मी विचारलं तर तो म्हणाला, हो.
ठेवतो मग. गुड नाईट. मी म्हणालो आणि फोन कट केला.
सालपेकर आमच्या डिपारमेंटमधला सर्वात सीनियर माणूस. तितकाच सिन्सियर. म्हणूनच तर मी सालपेकरवर पान सोडून बाहेर पडू शकतो.
वैजयंतीला तिच्या गाडीला सोडून मी माझ्या घरची वाट धरली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी अंथरुणात असतानाच फोन वाजला. उपसंपादक मानेचा फोन होता. मी झटकन फोन उचलून कानाला लावला आणि हॅलो म्हणालो. तो हॅलो न म्हणता म्हणाला, साल्या, वाट लावलीस ना... काल काय झोपला होतास काय पान लावताना? क्षणात माझी झोप उडाली. उठून बसत मी काळजीच्या स्वरात विचारलं, काय झालं?
झालेलं काही नाही. तू केलं आहेस ते सांगायला फोन केला.
अरे काय झालं ते नीट सांग ना... मी करवादलो.
काय लफडा करून ठेवला आहेस पानावर? त्याने प्रश्न घातला.
काय झाले ते सरळ सांग ना भडव्या... मी त्याला शिवी घातली.
वाघ्रप्रकल्पाच्या लेखात वाघवाघिणीच्या मैथुनाचा फोटो का टाकला आहेस?
काय? मी आश्चर्याने उद्गारलो. तो काहीच बोलला नाही.
सालपेकरने वाट लावली माझी यार... मी म्हणालो.
तो त्यावरही काही बोलला नाही. मग मीच म्हणालो, खरं सांगतो आहेस ना?
सरांनी दाखवलं मला... आल्याआल्या ते म्हणाले... तोच वाघ तुझ्यावर चढवतो.
म्हणाले, मालकाचा सकाळी सहाला फोन आला होता त्यांना...
मी त्यावर काहीच बोललो नाही. मग तोच म्हणाला, पण पुन्हा पाच मिनिटांनी सर मला म्हणाले, कळवा त्याला आणि टेन्शन घेऊ नको म्हणावं. आल्यावर बघू.
खर?
खरं!
होय... पण  लक्षात ठेव चूक गंभीर आहे.
निघतो मी ताबडतोब, मी म्हणालो
बाय म्हणत त्याने फोन ठेवला.
मानेचा फोन ठेवला आणि मी वाघ मागे लागल्यासारखा तयारीला लागलो.
मी ऑफिसात पोहोचलो तेव्हा माने कामासाठी बाहेर गेला होता. सरळ सरांच्या केबिनमध्ये शिरलो. सॉरी म्हणालो आणि सगळं खरं खरं सांगितलं, मैत्रिणीला भेटायला गेलो. उठल्यावर सरांनी तिचं नाव विचारलं. मी तेही आडपडदा न ठेवता सांगून टाकलं. थोडे वैतागले, पण मग म्हणाले, आता तू विषय सोड उद्याच्या कामाला लाग.
थँक्यू सर, म्हणून मी निघालो तर मागून सरांचा आवाज आलास, आणि हो त्या सालपेकरला शिव्या घालू नकोस.
नाही सर, मी म्हणालो.
मी सरांच्या केबिनमधून बाहेर पडलो आणि डीटीपी विभागात गेलो. सालपेकर तोंड पाडून माझ्याजवळ आला. म्हणाला, माफ करा सर, माझ्या लक्षातच आलं नाही. काल खूप काम होतं. चारच्या बातम्या बदलायचे होत्या. घाईत लक्षातच आलं नाही. मी पानावर घेतला तेव्हा तो फोटो छोटा होता. त्यामुळे असं काही असेल हे लक्षातच आलं नाही. मी घरी गेल्यावर उशिरा त्या आर्टिकलच्या बाजूची बातमी काढण्याचा आदेश आला, म्हणून नावकरने जागा भरायला फोटो वाढवला आणि मग एकदम की गोष्ट लक्षात यायला लागली.
केविलवाण्या स्वरात तो बोलू लागलेला पाहून मी त्याच्या दंडावर थोपटत म्हटलं, सोड... झालं ते झालं. आता मिटलं. मीच तुझ्यावर सोपवून जायला नको होतं.
दिवसभर कामात ती गोष्ट पुन्हा आठवली नाही, पण संध्याकाळी सर स्वतःहून आमच्या विभागात आले. म्हणाले, मालकाकडून मेल आला होता आणि त्यात स्पष्ट लिहिलं होतं ज्याने हा फोटो पानावर लावला त्याला आजपासून कामावर कमी करा. कोणाला कमी केलं ते आज रात्री ऑफिस सोडण्यापूर्वी मला कळवा. कळवायला हवं.
पुढे मला म्हणाले, खरे तर तुलाच कामावरून काढून टाकायला हवा. पण मला वाटतं आपण सालपेकरला कमी करू. मी निराशेतही उसळून विचारलं, का?
कारण सालपेकरला मी उद्या दुसऱ्या ठिकाणी नोकरीला शकतो. पगार तेवढाच मिळू शकेल त्याला. पण तुला काढून टाकलं तर तुझ्यासाठी जॉब नाही माझ्याकडे. मी त्यावर गप्प राहिलो. काय बोलणार...
सालपेकर आणि मला केबिनमध्ये बोलावलं. त्याला व्यवस्थित सांगितलं. आमच्यासमोरच फोन करून  सालपेकरला कामावर घेण्याची विनंती केली. इथल्याएवढा पगार द्यावा म्हणून प्रयत्नशील होते. पण समोरच्या माणसाने सहकारी नाराज होतील, महिन्याभरानंतर वाढवतो, असं सांगितलं. माझ्यावर विश्वास ठेव मी आणखी चांगला जॉब शोधून देईन तुला, सर सालपेकरला म्हणाले.
तो थँक्यू म्हणाला. मी दोघांप्रति कृतज्ञ होतो. पण थँक्यू म्हणून मोकळा होऊ इच्छित नव्हतो.
सकाळी लवकर उठलो होतो. दिवसभर काम करून थकलो होतो. म्हणून चहा प्यायला खाली उतरलो.
हे सर्व तिला सांगाव म्हणून फोन केला तर ती वेडी स्वतः रडत होती. मला नेहमीप्रमाणे माझं गाणं बाजूला ठेवून तिचं ऐकावं लागलं. काय झालं, हा प्रश्न पाच-सहा वेळा विचारल्यावर म्हणाली, मायाला परत घेणार होते कामावर. सकाळी मी सरांना तिच्या परिस्थितीबद्दल सांगितलं. सर तयार झाले. उद्या बोलु म्हणाले. मी उत्साहाने मायाला कळवलंही. आणि आता पाच मिनिटांपूर्वी सरांनी मला निरोप पाठवला, मायाला घेऊ शकणार नाही आपण. म्हणून मी रागातच त्यांना भेटायला गेले तर म्हणाले, वरून आदेश आलाय मला, कोणीतरी सालपेकर नावाचा इसम तिच्या जागेवर जॉईन होतोय उद्यापासून...
मी सारं समजलो. पण तिला काहीच बोललो नाही. चहा प्यायलो आणि ऑफिसला परतलो.
मनात अपराधाची भावना भरून राहिली.
वैजंयतीच्या फोनमुळे मी सालपेपरवर काम सोपवलं होतं. त्याची अप्रत्यक्षरीत्या तिला सजा भोगावी लागली. एक वेगळाच न्याय घडला होता. पण तरीही माझं मन मला खात होतं.
-
वैभव बळीराम चाळके
फेब्रुवारी 2013


Friday, May 15, 2020

माझे छंद माझे जीवन


माझे छंद माझे जीवन

अगदी लहानपणी मला टाकाऊ वस्तू जमवून ठेवून त्यांच्यापासून काही बनवण्याचा छंद होता. आईकडे बघून मी शालेय वयातच चपला शिवणे, छत्री दुरुस्त करणे इथपासून ते थेट कोंबडी कापून साफ करण्यापर्यंत अनेक गोष्टी शिकलो होतो. आजोबांकडून निरगुडीच्या काड्यापासून शेणाची पाटी आणि अंबाडीच्या सालीपासून दोर बनवायला मी शिकत असे. त्या सगळ्या गोष्टी करताना उपयोगी येणारे सामान आणि हत्यारे माझ्या एका झोलीत ठेवलेली असत. माळ्यावर चढायच्या शिडीखाली एका खुंटीला माझी झोळी टांगलेली असे. तिच्यात माझी खेळणी असत तशाच अशा कित्येक चित्रविचित्र गोष्टीसुद्धा असायच्या. घोंगडी सुखवायच्या पिरशात छत्रीची लोखंडी काडी गरम करून हातोडी आणि पकड यांच्या साह्याने घोंगडीला लावायचा म्हणजे पिन तयार करीत असे. त्याला मोठी कलात्मक गाठ घालण्यासाठी केवढा मोठा खटाटोप करायचो. अनेकदा हाताला चटका बसत असे. पण त्याचे कधी वाईट वाटले नाही. लोखंडी गाडी चालवायचो. त्या गाडीला तार लागे तीसुद्धा मी ठोकून ठोकून बनवत असे. आमच्या घरात बादलीच्या लोखंडापासून बनवलेली एक गाडी होतीच. पण आणखी एक गाडी होती. पण तिची दोन टोके एकमेकापासून दूर होती. त्यामुळे ती गाडी चालवता येत नसे. म्हणून मी कितीतरी दिवस... आठवण होईल तेव्हा तेव्हा... वेळ मिळेल तेव्हा तेव्हा... ती गाडी ठोकत असे. कोवळ्या हातांची फार वाट लागेपर्यंत.  पण त्यातून कदाचित सतत एकसारख्या गोष्टीचा ध्यास घेऊन संयमाने प्रयत्न करण्याचा गुण अंगी बाणवला. तेव्हा मला शास्त्रज्ञ व्हायची इच्छा होती आणि असे नाना उद्योग करताना मी त्याच भूमिकेत असे. कसल्या कसल्या झाडांपासून खेळणी बनवणे हा आमचा मोठा छंद होता. पावसाळ्यातील एक विशिष्ट झाड उगवत असे. त्यापासून आम्ही नांगर जोखड बनवायचो  आणि नांगर नांगर खेळायचो. झाडांच्या फांद्या व दोरा यांनी बनवलेले नांगर जोखड तर मला आजच बनवले असल्यासारखे आठवतात. उन्हाळी दिवसात जमीन खोदून कालवे काढण्याचा छंद होता. तसा त्या काळी बेचकी बनवण्याचा म्हणजे खेळण्यातली बांबूपासून बनवायची बंदूक बनविण्याचा छंद होता. आता आठवले म्हणजे आश्चर्य वाटावे इतक्या गोष्टी आम्ही मुले त्याकाळी करीत असू.

पुढे शाळेत चित्रकलेचा छंद लागला. कागदावर चित्रे काढलीच. पण वर्षातून एक-दोनदा घराच्या भिंती आई सारवीत असे. त्या दिवसाच्या आदल्या दिवशी भिंतीवर कोळसा आणि खडू यांची चित्रे काढण्याची हौस भागविता असे. गणपतीत आई घराच्या भिंती खालून तीन फुटापर्यंत सेल बॅटरीतील दारू घालून त्याने सारवत असे. मग त्यावर चुन्याने आदिवासींची वारली चित्रकला आहे ना त्या शैलीतील चित्रे काढत असे.  पुढे मीही ती कला थोडी अवगत केली होती. 

बांबूची बासरी बनवणे हाही असाच एक चांगला छंद होता. पोकळ बांबू आणून त्यात करवंदीच्या झाडाचे खोड बसायचो. करवंदाचे झाड तोडताना किती काटे लागले त्याचा पत्ता नाही आणि आमच्या बासरीतून सुरेल स्वरांना कधी पत्ता गवसला नाही. 
करवंदीच्या पानावर करवंदीच्या काट्याने नाव लिहून त्यावर आम्ही धुळ अंथरायचो. मग पान झाडले म्हणजे एवढी सुंदर अक्षरे दिसतात! करवंदीच्या पानाची पिपाणीसुद्धा आम्ही वाटेल तेव्हा बनवत असायचो आणि वाजवायचो. 

होळीच्या दिवसात दहा दिवस रानातून शेवरीची झाडे तोडून आणून होळी उभारायचो. 
बाराव्या दिवसापासून शेवरीच्या लाकडापासून शिमग्याच्या नाचासाठी वल्हवे आणि क्रिकेट खेळायला बॅट तयार करण्याचा उद्योग करायचो. बांबूच्या काठीवर कोणती कोणती डिझायर करत राहणे हा एक छंद होता. तांबेटी  या गवतापासून लोक टोप्या बनवत ते मात्र मला अनेकदा प्रयत्न करूनही जमले नाही. 

लपाछपी, चोर-पोलिस, लंगडी, विटीदांडू, लगोरी, कबड्डी, गोट्याआबादुबी, क्रिकेट खेळ खेळायचो. गणपतीगौरीत बाल्याडान्स करायचो. गावात भारुड करत त्यातही अनेकदा काम केले. उन्हाळी सुट्टीत गोठ्यात नमन नाट्याचा खेळ उभा करायचो. त्यासाठी पुठ्ठ्याची बाशिंगे बनवायचो. साडीच्या धारेचा  चाबूक बनवायचो. टॉवेल अंगरखा म्हणून वापरायचो. साडीच्या धारीचा कापडी बोल आम्ही आबादुबी आणि लगोरी खेळण्यासाठी वापरायचो. त्यासाठी अशा धाऱ्या मिळवून त्यांची बोल बनवायचो  खेळ म्हणजे हे असले. असले भलतेसलते.
पण त्यामुळेच आमच्या बालपणाला कंटाळा नावाचा राक्षस कधी शिवला नाही. आज जेव्हा माझा मुलगा टीव्ही... लॅपटॉप... आणि मोबाईलवर खेळून झाल्यावर, पप्पा काय करू सांग ना? कंटाळा आलाय! म्हणतो तेव्हा मला माझ्या समृद्ध बालपणाचे केवढे कौतुक वाटते.  तेव्हा पायात चप्पल नसायची आणि कपडे फाटलेले असायचे, पण अवघा परिसर आपल्याला अंगाखांद्यावर घेऊन खेळवायचा. कवी अरुण म्हात्रे यांचा एक शेर मला तिथे आठवतो आहे...
फाटका होतात खिसा अन् नोटही नव्हती खरी
पण नभीच्या चांदण्यावर मालकी वाटायची... 

आठवी-नववीच्या वयात मला कवितेचा छंद लागला. मग पाठ्यपुस्तकातल्या कविता माझ्या भसाड्या आवाजात मी मोठमोठ्याने गात असे. तोंडाला जरासा... बोंबलाचा दोर... किती छान लागे... सुकटा सार... हा मी चक्क स्वानुभवावर लिहिलेला अभंग गात असताना आजीने, फालतू अभंग लिहू नको अशी तंबी दिल्याचे आठवते. त्याच वयात मी मला आवडणार्‍या मुलीच्या नावाने माझा कवितासंग्रह बनवला होता. तो आजही माझ्या संग्रही आहे. आमच्या एस एस सी केंद्रात मी पहिला आलो आणि मला पुढील शिक्षणासाठी मुंबईत जाण्याची परवानगी मिळावी. मुंबईत येणे हे माझ्यासाठी विश्वरूप दर्शन होते.

मुंबईला आल्यावर रुईयासारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळाला. माझ्या जीवनाला अपेक्षित दिशा आणि वेग प्राप्त झाला. तेथे मी सर्वप्रथम काय केलं असेल तर वाचनाची भूक भागवायला सुरुवात केली. आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर यांचे साहित्य प्रथम वाचनात आले. त्याचा पहिला परिणाम म्हणजे भाषेवर संस्कार झाला. मला आठवते मुलांना अत्रे यांचे किस्से सांगणे याचा तेव्हा मला छंद होता. माझे सीनियर मित्र तर मला अनेकदा केवळ विनोदा आणि कविता सांगण्यासाठी लेक्चर बंक करून घेऊन जात असत. पुढे कवितेला खतपाणी मिळत गेलं.  कविता ऐकवून मुलींच्या डोळ्यात हमखास पाणी काढण्याचा मला तेव्हा मोठा छंद  लागला होता. परवा पंधरा-सोळा वर्षानंतर एक मैत्रीण भेटली तिने त्या तशा कवितेची आठवण करून दिली. महाविद्यालयाच्या पाच वर्षात काय काय गोष्टी केल्या... तर कविता केल्या. त्यांची संग्रह बनवले. हस्तलिखितासाठी काम केले. कविता आणि निबंध लेखनात बक्षिसे मिळवली. स्वतः एक पाणी अनियतकालिक काढले. पार्टटाईम नोकरी केली. कॉलेज करता करता कॅलिग्राफी शिकू लागलो. ग्रीटिंग बनवली. त्यासाठी छान छान संदेश लिहिले. कोणाकोणाला वाढदिवसाला भेट दिले. कोणाकोणाच्या वाढदिवसासाठी दुसऱ्याला असे संदेश लिहून दिले. मिळेल तेव्हा आणि पैसे असतील तर नाटके पाहिली. काव्यमैफली ऐकायला 

मुंबईच्या गल्लीबोळात भटकलो. पायपीट केली. कवितांचा कार्यक्रम केला. तो कॉलेजात सादर केला. साठाये महाविद्यालयात जाऊन सादर केला. विद्यापीठ गेलो असता तिथे मराठीचा चळवळीत सक्रिय भाग घेतला. आझाद मैदानावर उपोषण, चौकसभा केल्या. त्या चळवळीसाठी गाणी लिहून ती आझाद मैदानावर सादर केली. याच काळात मराठी शुद्धलेखन शिकलो. कवितेच्या छंदशास्त्राचा अभ्यास केला. गझलेची बाराखडी आत्मसात केली. सामाजिक संस्थेत काम करताना समाजातील उपेक्षित घटकांसाठी आणि घटकांसोबत काम केले. त्यासाठी मुलुंडच्या कोठीवर आणि भांडुपच्या सोलापूर परिसरात जाऊन जनजागृतीचे काम केले. त्यासाठी गाणी लिहून ती सादर केली.

मग पत्रकारितेत आलो. लोकसत्ता, तरुण भारत, आकाशवाणी करीत दैनिक नवाकाळ मध्ये पोहोचलो. तेथे हे काम करीत असताना नानाविध छंद जोपासत आहेच.
अल्बमसाठी साईबाबांवर, पावसावर गाणी लिहिली. त्याचे दोन अल्बम आले. सह्याद्री वरील एका मालिकेसाठी शीर्षक गीत लिहिलेले. रेडिओ सुरभीसाठी जिंगल लिहिली. दोन-तीन सिनेमांसाठी गाणी लिहिली. त्यातला तृषार्त नावाचा सिनेमा रिलीज झाला. दूरदर्शन, ईटीव्ही मराठी या वाहिन्यांवरून कविता सादर केल्या. आकाशवाणीसाठी कवितांचा कार्यक्रम केला. चिंतन सदरात काही लेख वाचले. कागदाची करामत नावाचा मुलांसाठीचा कार्यक्रम तयार करून त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग केले. मुंबई-पुणे-चिपळूण- कोल्हापूर अशा विविध ठिकाणच्या हजारो मुलांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचविला. 

शुद्धलेखनाच्या दिशेनेही कार्यशाळा घेऊन हजारो मराठी लोकांना शुद्धलेखनाचे कानमंत्र दिले. रुईया महाविद्यालयाच्या पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पत्रकारितेतील विविध विषय शिकविले. गणपतीची बाजारपेठ दादर आणि लालबागला विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे दाखविली. फक्त रुईया महाविद्यालयाच्या नव्हे तर साठ्ये महाविद्यालयाच्या पत्रकारिता पदवीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा हा प्रत्यक्ष रस्त्यावरचा शिकण्याचा अनुभव दिला. लहान मुलांना घेऊन फोटोग्राफीचे ते शिबिर केले. सायनच्या साधना विद्यालयातील विद्यार्थ्यांना गोष्ट कशी लिहावी याचे प्रशिक्षण दिले. प्रथम या नामवंत संस्थेच्या शिक्षकांना मुलांना भाषा कशी शिकवावी याचे प्रशिक्षण दिले. 

झी24तास या आघाडीच्या वाहिनीच्या सर्व पत्रकारांना शुद्धलेखनाचे धडे दिले. शासनाच्या एका समितीवर घेतले तेव्हा पत्रकारांची भाषा कशी सुधारावी यासाठी काही सूचना केल्या. अनेक महाविद्यालयात भाषा आणि करियर या विषयावर व्याख्याने दिली. मुलांच्या कविता स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून काम केले. हाताने विविध गोष्टी बनवून त्याचे छंदोत्सव या ग्रुपसोबत विविध ठिकाणी प्रदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. सोमय्या महाविद्यालयात देशभरातील हस्त कलाकारांसाठी भरणाऱ्या कला मेळाव्यामध्ये अशा हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन केले. कवितांची पोस्टर डिझाईन करून त्याचे प्रदर्शन केले. अनेक मित्रांना विजिटिंग कार्ड डिझाईन करून दिली. वर्तमानपत्राची शेकडो पाने डिझाईन केली. कॅलिग्राफर ग्रुपच्या फेसबुक पेज वरून कॅलीग्राफर लोकांना शुद्धलेखनाचे मार्गदर्शन केले. काही हजार कविता, काही हजार लेख, काही कथा लिहिल्या. 

कबीरांच्या दोहे यांचा अनुवाद केला. मिराबाईची काही पदे, सूरदासाची काही पदे अनुवादित केली. अनेक चांगले मित्र मिळवले. पुस्तकांचा संग्रह केला.
अवघे जीवनच छंदांनी समृद्ध करून घेतले.

- वैभव बळीराम चाळके
मे 2020
9702 723 752


Saturday, May 9, 2020

जगावेगळा चित्रकार



जगावेगळा चित्रकार
महात्मा गांधी विद्यालयाचे
आमचे डी.एस. सुतार सर

खूप वर्षानंतर शाळेबाहेरच्या रस्त्यावरून रिक्षाने जात होतो. रिक्षावाला मित्र होता. त्याला म्हटले एक- दोन मिनिटे थांब. शाळेत जाऊन येतो. त्याने गाडी थांबवली. शाळेचा गेट बंद होता. मग कंपाउंडवरून उडी मारून मी आत गेलो. डोळा भरून शाळा पाहून घेतली. मग माझे लक्ष पटकन शाळेच्या भिंतीवर काढलेल्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पोस्टवर गेले. माझी महात्मा गांधी विद्यालय साखरपा ही कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेची शाळा. इथे मी 90 ते 96  या वर्षांत शिकत होतो. शाळेच्या एका भिंतीवर कर्मवीर भाऊराव पाटलांचे पोट्रेट काढलेले आहे. त्यावर त्याची तारीख आहे आणि पोट्रेट काढणाऱ्या चित्रकार सरांची सहीसुद्धा...

1990 च्या जून महिन्यात मी इयत्ता पाचवीला प्रवेश घेतला. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर असलेली शाळा. दहा अकरा वर्षांचा मी माझ्या घरापासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या या शाळेत माझ्या शेजारपाजारच्या मुलांसोबत जाऊ लागलो.  सकाळी नऊ - सव्वा नऊ वाजता घर सोडायचे. साडेदहाला शाळेत पोहोचायचे. संध्याकाळी मात्र पावणेपाचला शाळा सुटली ती धूम ठोकत आम्ही एका तासात पावणे सहाला घरी पोहोचत असू. खरेतर शाळेत जाताना आम्हाला डोंगर उतरत जावे लागत असे आणि येताना डोंगर चढावे लागत असे. मात्र घरी जाण्याची ओढ आणि पोटातली भूक पायांना बळ देत असे. सकाळी नऊच्या आधी नाश्ता करून निघालेले आम्ही सगळे जण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काहीही खात नसायचो. ही पद्धत होती. शाळेत डबा न आणणे ही फॅशन वाटत असे. गावातली शाळेच्या जवळ असलेल्या छोट्या शहरात राहणारी श्रीमंत घरची काही मोजकी मुले विशेषता मुलीच डबा आणत. त्यामुळे शाळेत डबा घेऊन येणे हे बायकीपणाचे लक्षण मानले जात असे. वाढत्या वयात खरेतर आमचे मोठे कुपोषण झाले, पण याची आम्हाला जाणीव नव्हती. आमच्या पालकांना,  आमच्या शिक्षकांना ही जगण्याची रीतच होती, त्यात काही वावगे आहे असे कुणाला वाटत नव्हते. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता आम्ही पाच किलोमीटरचा प्रवास करून शाळेत येत होतो. महामार्गावरचा दोन-अडीच किलोमीटरचा प्रवास बिनधास्तपणे करत होतो. गाड्या आतासारख्या मोठ्या प्रमाणावर नव्हत्या? तरी गाड्या होत्यात आणि वेगात येत असत. पण सह्याद्रीच्या डोंगररांगात जन्माला आलेल्या आम्हा लेकरांना अशा जगण्याची सवय झालेली होती. त्यामुळे त्याचे काही वाटत नव्हते. ना नवल होते न कौतुक होते.

मी प्राथमिक शाळेत जरा बरा विद्यार्थी होतो. या मोठ्या इंग्लिश शाळेमध्ये आल्यावर तेथेही आपणच समजदार आहोत आपल्यापुढे दोन-चार मुलेच आहेत याचीही लवकरच जाणीव झाली आणि आत्मविश्वास वाढला.
याच काळात मला चित्रकलेची आवड निर्माण झालेली होती. डी.एस. सुतार नावाचे एक पन्नाशीचे शिक्षक आम्हाला चित्रकला शिकवत असत. माणूस फारच गोड होता. सर्वांना प्रेमाने वागवणारा होता. त्यामुळे अर्थातच चित्रकलेविषयी अधिक प्रेम वाटू लागले. मला वाटते पावसाळ्याचे दिवस संपत आले तेव्हा आमच्या शाळेच्या दोन्ही बाजूकडील भिंतीवर आमच्या सुतार सरांनी नकाशे आणि चित्रे काढायला सुरुवात केली. एका भिंतीवर त्यांनी आमच्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चित्र काढायला घेतले. त्याला पोट्रेट म्हणतात हे कळायला मध्ये वीस वर्षे जावी लागली. तर कर्मवीरांचे चित्र काढताना त्यांच्या जोडीला आमचे पवार मामा नावाची शिपाई असत. सर शिडीवर चढून चित्र काढीत. पवार मामा त्यांना मदत करीत. सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी, मधल्या सुट्टीत, लघवीच्या सुट्टीत आणि दोन तासांच्या मधल्या वेळेत, मी सर चित्र कसे काढतात ते जाऊन पाहत असे. मला अजून आठवते शाळेत शेजारच्या होस्टेलच्या चुलीमधून सरांनी कोळसे आणले होते आणि त्या कोळशाने रेखाटन करून घेतले होते. मग त्याच्यावर रंगलेपन केले होते. हे काम पाहणे हा माझ्यासाठी मोठा आनंदाचा भाग होता. आपणही मोठे होऊन चित्रकार होणार अशी मनाशी मी खूणगाठ बांधली होती,पण...
हा पण नेहमीच वाईट असतो. पहिले सत्र संपण्याच्या आसपास सुतार सर यांचे आकस्मिक निधन झाले आणि त्याने चित्रकार मनावर आघात केला. चित्रकार व्हायचे स्वप्न भंगले.

पुढे सहावीत गेल्यावर मोरे नावाचे एक शिक्षक भेटले. ते आम्हाला मराठी शिकवायचे. मराठी शिकवण्याच्या पद्धतीमुळे भाषेची रुची लागली आणि चित्रकलेकडून मी भाषेकडे सरकलो. अर्थात तरीही मनात चित्रकला जिवंत होती. मी माझ्या परीने वाढवण्याचा प्रयत्न करीत होतो.

पुढे मुंबईत शिक्षणासाठी आल्यावर  पुस्तकांच्या प्रेमामुळे मुखपृष्ठ आणि मुखपृष्ठासह पुस्तकांसाठी चित्र काढणार्‍या चित्रकारानी मला चित्रकलेकडे ओढले. सुलेखनाकडे ओढले. पुढे पत्रकारितेत आल्यामुळे काही प्रदर्शनास जाण्याचा योग आला आणि म्हणताम्हणता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार, सुलेखनकार यांच्या ओळखी झाल्या. दरम्यान एकदा घर सोडून बाहेर पडावे लागले तेव्हा दोन चित्रकार बंधूंनी आधार दिला. सहा महिने त्यांच्यासोबत राहताना चित्रकलेत बुडूनच राहिलो होतो.

चित्रकलेची ही अशी वाटचाल करीत असताना त्या दिवशी शाळेबाहेर रिक्षा थांबवून मी शाळेच्या कंपाऊंडच्या आत गेलो.  सुतार सरांनी काढलेले ते पोट्रेट पाहत असताना सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

त्या पोट्रेटच्या खाली सुतार सरांनी केलेली स्वतःची डी.एस. सुतार ही सही आणि त्याच्याखालची 22- 9- 1990 ही तारीख वाचलीच! पण त्याखाली मदतनीस म्हणून वसंत पवार यांचे लिहिलेले नाव पाहून मला सुतार सरांबद्दल आणखीनच आदर वाटू लागला. सर तेव्हा जायला नको होते असे पुन्हा एकदा वाटून गेले. जगभरातल्या नामवंत चित्रकारांनी त्यांच्या चित्राखाली आपली सही आवर्जून केली आहे. ती कलावंताची नाममुद्रा असते. पण चित्राखाली आपली सही करताना आपल्याला मदत करणाऱ्या शिपायाचे नाव देण्याचे औदार्य असलेला मला माहीत असलेला हा एकमेव चित्रकार होय.
सुतार सर, तुम्ही माझ्या मनात आहात आणि मनात कायम राहाल. 

- वैभव बळीराम चाळके
   मे 2020
   संपर्क- 9702 723 652
   Kokanvaibhav.blogspot.com