Tuesday, June 2, 2020

कोरोनाविरोधातील ‘केरळ पॅटर्न’


कोरोनाविरोधातील केरळ पॅटर्न
डॉ. अरुण गद्रे यांनी घेतलेली डॉ.अमर फेटले यांची मुलाखत

भारतातील पहिला कोरोना रुग्ण ज्या केरळ राज्यात सापडला त्या केरळ राज्याने कोरोना साथीचा जो यशस्वी मुकाबला केला तो कौतुकास्पद आहे. केरळ पॅटर्न म्हणून या गोष्टीकडे मोठ्या कौतुकाने पाहिले जात आहे. जगभरात हा पॅटर्न प्रसिद्ध झाला. हा केरळ पॅटर्न राबविणाऱ्या केरळच्या टीमपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे डॉ.अमर फेटले! महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डॉ. अरुण गद्रे यांनी या डॉ.अमर फेटले यांची विचारवेधसाठी घेतलेली मुलाखत कोरोनाशी सामना कसा करावा, याचा आदर्श समोर ठेवणारी आहे. नवाकाळच्या वाचकांसाठी केलेले हे शब्दांकन...

डॉ.अरुण गद्रे- कोवीड आजाराविरोधाचा तुमचा हा लढा नेमका केव्हापासून सुरू झाला?
डॉ.अमर फेटले - सतरा-अठरा जानेवारीला आम्हाला चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे लोक आजारी पडत आहेत ही गोष्ट कळली. केरळचा चीनशी फार निकटचा संबंध आहे. कारण केरळमधून आमचे वैद्यकीय शाखेचे अनेक विद्यार्थी तेथे शिक्षणासाठी जातात. त्यामुळे मग आम्ही ताबडतोब आरोग्य खात्यात बरोबर बैठक घेतली आणि जर तेथे साथीचा मोठा प्रसार झाला तर आपले विद्यार्थी परत येतील तेव्हा काय करायचे, याच्या विचाराला सुरुवात केली. आमची कंट्रोल रूम तेव्हाच कामाला लागली. केरळमध्ये  14 जिल्हे आहेत. आम्ही कंट्रोल रूमच्या माध्यमातून पुढच्या काही महिन्यांत जर आपल्याकडे अशी परिस्थिती आली तर काय करायचे याची पावले उचलायला सुरुवात केली. आमच्याकडे कंट्रोल रूम सिस्टीम अगोदरपासूनच अस्तित्वात होती. गेली काही वर्षे साथीच्या आजारांसाठी ही सिस्टीम केरळ राज्याने उभारलेली आहे.

डॉ.अरुण गद्रे- म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने covid-19 जागतिक महामारी जाहीर करण्यापूर्वीच आपण सावध झाला होतात?
डॉ.अमर फेटले- अगदी बरोबर जागतिक आरोग्य संघटनेने महामारी जाहीर करण्यापूर्वीच आम्ही पावले उचलायला सुरुवात केली. आम्ही आमची संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लावली. संसर्गजन्य आजारांच्या लक्षणांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. तापाच्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले. त्यानंतर आम्हाला भारत सरकारकडून सावधानतेचा इशारा मिळाला. मग आम्ही जागतिक आरोग्य संघटना आणि इतर वैद्यकीय संघटनांच्या वेबसाईटवरून अपडेट घेत राहिलो. तेथून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही देशांमध्ये पहिल्यांदा कोरोनाशी कसा लढा द्यायचा याची गाईडलाईन तयार केली. कोरोना मॅनेजमेंटची गाईडलाईन आम्ही 26 जानेवारी रोजी जाहीर केली.

डॉ.अरुण गद्रे- जागतिक आरोग्य संघटनेने तपासण्या करण्यावर भर दिला होता. तुमच्या गाइडलाइनमध्ये त्याच्यापेक्षा वेगळे काही होते काय?
डॉ.अमर फेटले - जागतिक आरोग्य संघटनेने तपासणीचा जो मंत्र दिला तो फार नंतर आला. त्याच्या अगोदरच आम्ही आमच्या गाईडलाईन जाहीर केल्या होत्या. आम्ही सर्वप्रथम विमानतळांवर सावधानतेचा इशारा दिला. प्रत्येक एअरपोर्टवर एक एक वैद्यकीय अधिकारी नेमला. प्रत्येक विमानतळावर एक टीम सज्ज केली. तेथे आम्ही स्क्रिनिंग सुरू केले. प्रवाशांवर नीट पाळत ठेवली. रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित अशी विशेष रुग्णालयांपर्यंतची प्रवासाची सोय केली. ज्या चार जिल्ह्यांमध्ये एअरपोर्ट आहेत तेथे विलगीकरण कक्ष ताबडतोब उभारून घेतले. हे विलगीकरण कक्ष आम्ही अद्ययावत असे उभारले होते. तेथे पीपीई किट वेळीच उपलब्ध केल्या. हे सारे आम्ही ही फारच लवकर सुरु केले. सागरी वाहतूकीबाबतसुद्धा आम्ही वेळी दक्ष झालो. सगळ्या पोर्टवर यंत्रणा उभी केली.
त्याचबरोबर आम्ही आमची कंट्रोल रूम नव्याने अद्ययावत केली. वेगवेगळ्या टीम या कंट्रोल रूमसोबत काम करू लागल्या. वेगवेगळ्या विभागात कंट्रोल रूमचे काम सुरू झाले. पाळत ठेवणे, माहिती गोळा करणे, तपासण्या करणे, प्रसारमाध्यमांना वेळीच योग्य ती माहिती देणे, सोशल मीडिया योग्य प्रमाणे हाताळणे, पायाभूत सुविधा उभारणे, मनुष्यबळाची उभारणी करणे, त्यांना प्रशिक्षित करणे असे एकूण 18 विभाग कार्यरत झाले. मुख्य कंट्रोल रूमसोबत प्रत्येक जिल्ह्यात त्यांची त्यांची कंट्रोल रूम उभी करून काम सुरू केले. आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. राजन खोब्रागडे यांनी अत्यंत मेहनतीने आणि उत्साहाने हे सगळे काम हाती घेतले. आमच्या कुटुंब कल्याण खात्याच्या मंत्री केके शैलेजा टीचर यांनी या कामात स्वतःला झोकून दिले. त्या रोज आमच्या कंट्रोल रूममध्ये येऊन कामाला बसत असत. या दोघांच्या रूपाने आमचे सरकारच आमच्या सोबत कंट्रोल रूममध्ये कामासाठी हजर होते आणि प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींवर त्यांचे लक्ष होते.
आमच्यासोबत एक अकॅडमी कमिटीसुद्धा होती. ती कमिटी covid-19 आजार भविष्यात किती आणि कसा पसरेल याचा अंदाज बांधत होती. त्याचे चित्र रेखाटत होती. अशी एकापेक्षा अधिक कल्पना चित्रे या टीमने आपल्या अभ्यासातून रेखाटली आणि त्याप्रमाणे मग आम्ही तयारी करायला लागलो. त्याप्रमाणे आम्ही गाईडलाईन तयार केल्या. 
डॉ.अरुण गद्रे- हे सारे म्हणजे एखादे मिलिट्री ऑपरेशन असावे तसे आहे. आपण सुरुवातीच्या काळातील काही अनुभव आम्हाला सांगू शकाल का... मी असे ऐकले आहे की, एक वेळ तुम्ही लाख 40 हजार  माणसांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवले होते. सरकारच्या बाजूने तुम्ही पूर्ण तयारी केली होती, पण शेवटी दुसरी बाजू लोकांची होती. लोकांनी कसा प्रतिसाद दिला... तुम्ही त्यांना कशाप्रकारे सारे समजावून सांगितले ते सांगा...
डॉ.अमर फेटले- 30 जानेवारीला मी माझ्या मुलीच्या बाळंतपणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात गेलो होतो. मी तिथे असताना मला फोन आला की, एका चीनवरून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी आहे. तिथे मोठाच प्रश्‍न निर्माण झाला होता. कारण ही भारतातील पहिली केस होती. त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना समजावून सांगण्यापासून सगळ्या गोष्टी आमच्या टीमने केल्या. ज्या त्रिशूर जिल्ह्यात ही केस आढळळी तेथे डॉक्टर रीना म्हणून होत्या, त्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना समजावून सांगून त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आणि क्वारनटाईन केले. त्या मध्यरात्री चार मंत्री रुग्णालयात त्या विद्यार्थ्याला पाहण्यासाठी हजर झाले होते. त्या रात्री झालेल्या मिटींगला मी हजर नव्हतो, पण दुसऱ्या दिवशी सकाळीच मी जाऊन आमच्या टीममध्ये सामील झालो. त्या रात्री सुरू झालेल्या बैठका दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सातत्याने सुरू होत्या. संपूर्ण देशातच एक भीती निर्माण झाली होती. प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा आम्ही काय करतो याची प्रचंड उत्सुकता होती. तेव्हा सरकारने प्रसारमाध्यमांसमोर हा सर्व विषय ठेवण्यासाठी माझ्यावर जबाबदारी सोपवली. तेव्हापासून मी दोन फोन वापरत होतो आणि त्या काळात जेवढे फोन आले तेवढे सगळे फोन मी उचलले होते. एकही फोन मी नाकारलेला नाही. त्याच वेळी आम्ही चॅनेलवरून काय करतो आहोत हे सर्वांना सांगत होतो. अत्यंत पारदर्शक व्यवहारामुळे लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. केरळमध्ये दिशा हेल्पलाइन नावाची एक हेल्पलाइन गेली काही वर्षे सुरू आहे. निपाह व्हायरस आला तेव्हा आणि केरळा पूर आला तेव्हा या दिशा हेल्पलाइने महत्त्वाचे काम केले होते. या वेळीसुद्धा ही दिशा हेल्पलाइन कामाला आली. या दिशा हेल्पलाइनची क्षमता वाढविण्यात आली आणि आणि प्रत्येकाला जी हवी ती माहिती मिळवण्यासाठी हा नंबर देण्यात आला. काही मुलभूत माहिती तिथला माणूस देत होता आणि अधिकची माहिती हवी असेल तर विशेषज्ञांचा लाईन जोडून देत होता. लाखो लोकांनी या हेल्पलाईनवरून माहिती घेतली. त्यामुळे लोकांना थेट डॉक्टरांकडूनच फोनवर माहिती मिळू लागली.
डॉ.अरुण गद्रे- या कालावधीत मोठ्या प्रमाणावर लोकांचे प्रशिक्षण करावे लागले. आशा वर्कर, नर्स, डॉक्टर या सगळ्यांनाच प्रशिक्षण देण्याची गरज होती. अल्पावधीत आपण हे सारे कसे साध्य केले?
डॉ.अमर फेटले-  या काळात आम्ही एकूण लाख 50 हजार लोकांना प्रशिक्षित केले. हे सारे आम्ही  मिडिया कॉन्फरन्सिंगद्वारे केले. वेगवेगळ्या गटांसाठी वेगवेगळ्या मीडिया कॉन्फरन्स आयोजित केल्या. नर्स, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांच्यासोबत इतर विभागातील कर्मचाऱ्यांचेसुद्धा प्रशिक्षण केले. दोन-तीन आठवड्यात आम्ही इतक्या लोकांना प्रशिक्षित केले. एक यूट्यूब साईट तयार केली. त्याद्वारे माहिती देऊ लागलो.

डॉ.अरुण गद्रे- क्वारनटाईन व्हायला लोकांनी विरोध केला का? तुम्ही त्यावेळी ही परिस्थिती कशी हाताळली?
डॉ.अमर फेटले- अनेकदा लोकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. लोक बाईकवरून बाहेर निघत होते. मग आम्ही लोकल लोकांच्या मदतीने लक्ष ठेवणाऱ्या टीम तयार केल्या. सुरुवातीचे रुग्ण म्हणजे चीनमधून आलेले वैद्यकीय विद्यार्थी होते. त्यातले काही जण हिंसकसुद्धा झाले होते. त्यानंतर इतर देशातून येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. आम्ही मग एअरपोर्टवर लोकांना सविस्तर माहिती देऊन सेंटरमध्ये आणू लागलो.
मग आम्ही रूट मॅप तयार करायला सुरुवात केली. म्हणजे पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेल्या माणसांची त्याच्याकडून माहिती घेऊन केलेली तारीख, वेळ, माणूस यादी. तो कुठे भेटला, कधी भेटला या सगळ्याची नोंद. ते रूट मग आम्ही माध्यमांमध्ये सर्वांसाठी प्रसिद्ध केले. त्यामुळे लोकांमध्ये जी प्रचंड भीती निर्माण झाली होती ती काही प्रमाणात कमी झाली. रुग्ण कोठे कोठे गेला हे नेमके लोकांना कळले. त्यातून मग त्याच्या संपर्कात आलेले लोक ते स्वतः काळजी घेऊ लागले. लाखो लोक भीतीखाली वापरण्यापेक्षा हजार लोक भीतीखाली आले. हेल्पलाइनला लाखांऐवजी हजार लोकांचे फोन येऊ लागले. उगाचचा त्रास वाचला.

डॉ.अरुण गद्रे- शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील लोकांचा प्रतिसाद आणि सहकार्य मध्ये कोणता फरक जाणवलातुम्ही त्या परिस्थितीशी कसा सामना केला?
डॉ.अमर फेटले- आमचे केरळ राज्य बहुतांश छोट्या छोट्या शहरांनी बनलेले आहे. येथे हे शहर आणि ग्रामीण असा मोठा फरक नाही. त्यातूनही ज्याला ग्रामीण भाग म्हणावे तेथून चांगला प्रतिसादाला मिळाला. अर्थात याचे श्रेय आमच्या स्थानिक वैद्यकीय पथकांना दिले पाहिजे. ग्रामीण भागात या वैद्यकीय पथकातील लोकांच्या नागरिकांशी थेट ओळखी होत्या. त्याचा उपयोग झाला. शहरी भागात अशा ओळखी असणे शक्य नव्हते.

डॉ.अरुण गद्रे- तुमच्याकडे मुंबईप्रमाणे झोपडपट्टीचा भाग आहे का?
डॉ.अमर फेटले- धारावीसारखी आमच्याकडे झोपडपट्टी नाही. काही भागांमध्ये झोपडपट्टी आहे. अर्थात तिथल्या लोकांना आम्ही स्थलांतरित म्हणत नाही. त्यांना पाहुणे कामगार असे म्हणतो. तेथे विविध भाषिक लोक असल्याने आम्हीही सहा भाषांमध्ये त्यांच्यासाठी काम सुरू केले. त्यांच्यासाठी सर्व प्रकारची मदत देऊ केली. त्यामुळे त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. देशभर लॉकडाऊन होण्याच्या अगोदरच दोन दिवस आम्ही केरळमध्ये कर्फ्यू लावला होता.

डॉ.अरुण गद्रे- आपण या काळात तंत्रज्ञानाचा काही नावीन्यपूर्ण वापर केलात का?
डॉ.अमर फेटले- अनेकदा असे होत होते की काही लोक माहिती देत नव्हते. काही लोक चुकीची माहिती देत होते. अशा वेळेला आम्ही काय करत होतो, त्यांनी दिलेली माहिती सायबर सेलसोबत फोन मॅपिंग करून खात्री करून घेत होतो. त्यामुळे श्रम कमी झाले आणि नेमकी माहिती समोर येऊ लागली. सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज या मॅपिंगसाठी अनेकदा वापरले.


डॉ.अरुण गद्रे- तुम्ही क्वारनटाईन यंत्रणा कशी उभी केली?
डॉ.अमर फेटले- आमचे पायाभूत सुविधांचे खाते, पीडब्ल्यूडी आणि पंचायत यांच्या मदतीने कामाला लागले. लॉकडाऊन जाहीर झाल्यावर  राज्यातील वस्तीग्रहे, मोठ्या इमारती आणि रिकामी हॉटेले यांच्याशी बोलणी करून ती ताब्यात घेतली. तेथे सेंटर्स उभारली. परदेशातून चार विमानतळांवर प्रवासी येत होते. ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत अशा लोकांना कोरोना केअर सेंटरला पाठवत होतो. ज्यांना कोणतीच लक्षणे नाहीत त्यांना होम क्वारनटाईन करत होतो. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या लोकांना आम्ही फ्री वायफाय पुरवले होते. 24 तास मानसिक आधार देणारी हेल्पलाइन उपलब्ध करून दिली होती. हजार समुपदेशकांची दिशाही हेल्पलाइन त्यासाठी काम करीत होती. होम क्वारनटाईन केलेल्या लोकांसाठीसुद्धा काही नियम घालून दिले होते आणि जनमैत्री पोलीस नावाने एक गट त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम करीत होता.
डॉ.अरुण गद्रे- या मोहिमेमध्ये आपण स्वयंसेवकांची मदत घेतली होती. हे स्वयंसेवक कसे मिळाले? ते कसे मिळवले त्यांच्याकडून कसे काम करून घेतले?
डॉ.अमर फेटले गेली काही वर्षे दर पावसाळ्यात केरळमध्ये लेप्टो, डेंग्यू यांच्या साथी येतात. म्हणून गेली काही वर्षे आम्ही जनजागृती मोहीम राबविली आहे. या मोहिमेत जन आरोग्य सेवक काम करतात. हे जन आरोग्य सेवक म्हणजे जनतेतीलच काही लोक आहेत. ते आशा वर्कर आणि आरोग्य पथकासोबत काम करीत असतात. सर्व गल्लीमोहल्ल्यांत, गावागावांत असे जन आरोग्य सेवक आहेत. हे आरोग्यसेवक म्हणजे आमचे ताबडतोब हाताशी असलेले स्वयंसेवक होते. शिवाय वेबसाइटवरून स्वयंसेवक म्हणून आम्हाला जोडून घेण्याची विनंती केली. आमच्या आवाहनाला 43 हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे तिथल्या प्रत्येक घरावर किमान लोकांचे लक्ष होते. आम्ही नागरिकांना आवाहन केले होते कोरेना रुग्ण आढळल्यास त्याच्या मदतीला जा. त्याच्या घरच्यांना आधार द्या. रुग्णाला विलगीकरण कक्षात जाण्यासाठी आवाहन करा. मागच्यांची आम्ही काळजी घेतो असे सांगा. टेलिव्हिजन आणि प्रिंट अशा दोन्ही माध्यमांनी यासाठी मोठी मदत केली. मी स्वतः त्यासाठी कितीतरी वेळ दिला. शिवाय मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री रोज सायंकाळी एक तास जनतेबरोबर संवाद साधत होते, मुख्यमंत्र्यांच्या या संवादाला सर्वाधिक टीआरपी होता. लोक इतर सर्व गोष्टी सोडून मुख्यमंत्र्यांना ऐकत होते.

डॉ.अरुण गद्रे- लॉकडाऊन संपल्यानंतर या व्हायरससोबत कसे जगावे याबाबत काय सल्ला द्याल?
डॉ.अमर फेटले- असा सल्ला देण्याइतका मी मोठा विशेषज्ञ नाही. मात्र एवढे सांगू शकेन की, या वायरसला कमी लेखू नका. हा व्हायरस जाणार नाही. त्यामुळे बाहेर जाताना तो प्रत्येक सरफेसवर आहे याची जाणीव ठेवा. मास्क वापरा फार महागडे माज लावण्याची गरज नाही साधा कापडाचा मास्क वापरा. कोठेही बाहेर जाऊन आला की प्रथम आपले हात साबणाच्या पाण्याने धुवा. कामावरून आल्यावर आंघोळ करून मग इतर लोकांना भेटण्याची सवय लावा. बाहेर जाल तेव्हा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा. वयस्कर लोकांची काळजी. घ्या मुलांना स्वच्छतेचे धडे द्या. रस्त्यावर थुंकणे टाळा. केरळमध्ये रस्त्यावर थंकणाऱ्यारांची संख्या अत्यल्प आहे. डॉक्टर आणि संशोधक हेच तज्ज्ञ असतात, हे लक्षात ठेवा. कोणीही सांगितलेल्या कुठल्याही माहितीवर उगाच विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही गोष्टीने प्रभावित होऊ नका. सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करा. एक-दोघांनी जरी नियमांचे उल्लंघन केले तर काही हजार लोकांचे जीव धोक्यात टाकण्यासारखे आहे, हे लक्षात ठेवा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला समजू द्या. ऐकला नाही तर रागवा. पण कायदा हातात घेऊ नका. संबंधित विभागाला कळवून त्यांना त्यांचे काम करू द्या. वैद्यकीय विभागात काम करणाऱ्यांना आदराने वागवा. त्यांना बहिष्कृत करणे टाळा. पोलिसांचा आदर करा. आपली तब्येत चांगली ठेवा. 90 टक्के कोरोना माइल्ड म्हणजे कमी त्रासदायक असतो. तांदळाची पेज आहारात घ्या. गुळण्या करायची सवय लावा. तुळशीचा रस, हळदीचे पाणी अशा काही स्थानिक गोष्टी उपयोगात आणू शकाल. फळे आणि आणि फळभाज्या, पालेभाज्या आहारात घ्या. आवळा, पपया यांचे सेवन आवर्जून करा. पुरेशी झोप घ्या. सारखेसारखे कोरोनाचे आकडे पाहत राहू नका. अमेरिकेत किती रुग्ण आहेत याच्याशी सामान्य माणसाला फारसे काही देणेघेणे नाही, हे लक्षात घ्या. आपण काय करायचे हे महत्त्वाचे आहे. आपल्या कुटुंबाची, आपल्याशी संबंधित लोकांची आणि आपल्या परिसरातील सेवेत असलेल्या लोकांची काळजी घेणे एवढेच आपले काम आहे. एवढे केले म्हणजे सगळ्या राज्यांची, देशाची आणि जगाचीही काळजी घेतल्यासारखे आहे.

No comments:

Post a Comment