Monday, November 27, 2023



वंचितांचा शिक्षणदूत नीलेश निमकर


इं  ग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्राबल्य वाढते आहे. नव्या पिढीला परदेशात जाण्यासाठी घडवणे हेच जणू शिक्षणाचे उद्दिष्ट आहे की काय, असे वाटू लागले आहे. असे असताना ग्रामीण भागातील वंचितांसाठी, दुर्गम भागातील आदिवासी, वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी धडपडणाऱ्या नीलेश निमकर यांचे काम नजरेत भरते. या कामात आलेल्या अनुभवांच्या आधारे आपले शिक्षणचिंतन मांडणारे त्यांचे महत्त्वाचे पुस्तक म्हणजे ‘शिकता- शिकवता’. या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाचा डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथाचा पुरस्कार मिळाला आहे. उद्याचा भारत उभारण्यासाठी खरे काम व्हायला हवे, ते शिक्षणक्षेत्रात. म्हणूनच अशा व्यक्तींच्या कार्याची दखल घ्यायला हवी. 

नीलेश निमकर हे ‘क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट’ अर्थात ‘क्वेस्ट’ या संस्थेचे संस्थापक-संचालक आहेत. शिक्षण क्षेत्रात गेली २५ वर्षे कार्यरत असलेल्या निमकर यांना बालशिक्षणात विशेष रस आहे. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण आणि शिक्षकांचे प्रशिक्षण या क्षेत्रात त्यांचे विशेष योगदान आहे. अभ्यासक्रम विकासाच्या क्षेत्रातही त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. मोठमोठ्या शिक्षणसंस्थांमध्ये त्यांनी सल्लागार म्हणून काम केले आहे. ते मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचे. आता कामासाठी पालघर तालुक्यातील वाडा येथे स्थानिक आहेत. त्यांचे शिक्षण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये झाले; मात्र चित्रकलेच्या आवडीतून ते आदिवासी पाड्यांवर गेले आणि अनुताई वाघ यांच्या कामाचा त्यांना परिचय झाला. तेथे रमेश पानसे यांच्या ‘ग्राममंगल’मध्ये त्यांनी आपल्या या क्षेत्रातील कामगिरीची सुरुवात केली. तेथे त्यांनी अनेक अभिनव उपक्रम राबवले. त्या अनुभवांतून पुढे त्यांनी ‘क्वेस्ट’ संस्थेची २००७ मध्ये स्थापना केली आणि तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या नावीन्यपूर्ण पद्धती आणि आगळेवेगळे उपक्रम राबवायला सुरुवात केली. पूर्व प्राथमिक ते आठवीपर्यंतच्या मुलांसाठी भाषा, गणित, विज्ञान हे विषय शिकवण्याच्या पद्धतींवर त्यांनी विशेष काम केले. त्यासाठी विविध अभ्यासक्रम तयार केले. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या संस्थेने चालवलेल्या अभ्यासक्रमाला देशभरातून प्रतिसाद मिळाला होता. महाराष्ट्र सरकारच्या ‘आकार’ या बालशिक्षण अभ्यासक्रमाच्या रचनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ‘लिटरसी रिसर्च इन इंडियन लँग्वेज’ या टाटा ट्रस्ट आणि अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या उपक्रमासाठी निमकर यांच्या संस्थेने भाषा संशोधनाचा संपूर्ण भार उचलला. लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्यावर मुलांचे जे शैक्षणिक नुकसान झाले ते नेमके किती आणि कसे झाले आहे आणि ते भरून काढण्यासाठी शिक्षकांनी काय करायला हवे, या विषयावर त्यांनी शोधनिबंध सादर केला. ‘शिकता शिकवता’ या पुस्तकापूर्वी त्यांनी लहान मुलांसाठी चित्रमय पुस्तके लिहिली आहेत. आता त्यांनी ग्रामीण, आदिवासी भागात शिक्षणाचे काम करताना आलेल्या विविध अनुभवांचे संकलन ‘शिकता शिकविता’मधून वाचकांसमोर ठेवले आहेत. ग्रामीण, आदिवासी मुलांना शिकवताना ते स्वतः कसे शिकत गेले याचे वर्णनही या पुस्तकात आले आहे. त्यांच्या लोकविलक्षण कामगिरीची दखल घेत २०११ मध्ये महाराष्ट्र फाऊंडेशन या प्रतिष्ठित संस्थेने त्यांना पुरस्कार देऊन गौरविले. महाराष्ट्रात यापूर्वीही शिक्षण क्षेत्रात अनेक प्रयोग झाले आहेत. तीच परंपरा निमकर पुढे नेत आहेत. ‘क्वेस्ट’च्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील अडीच लाख मुले आणि तब्बल आठ हजार शिक्षकांना शिक्षण, प्रशिक्षण दिले गेले आहे. ‘शिकता शिकवताना’च्या निमित्ताने उपेक्षित क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव नव्या पिढीसमोर उपलब्ध झाले आहेत. त्यातून अनेकांना प्रेरणा घेता येईल.

(सकाळ, २७ नोव्हेंबर २०२३)

Sunday, November 12, 2023

 


नव लाख तळपती...



 नव लाख तळपती... (12.11.23 सकाळ दीपपर्व पुरवणी पहिले पान)

(वैभव बळीराम चाळके)

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करता करता इतरांच्या जीवनात आपल्याला काही प्रकाश पाडता आला तर तो पाडावा, असा संदेश देणारा हा सण आहे. आपण त्यासाठी एखाद्या पणतीप्रमाणे का होईना, पण प्रयत्न करायला हवा. शेवटी अंधार भेदण्याचे काम महत्त्वाचे आहे. तोच दिवाळीचा संदेश आहे.


दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. ‘तमसोऽमा ज्योतिर्गमय’ म्हणजे ‘अंधाराकडून प्रकाशाकडे चला’ असा संदेश देणारा सण आहे. त्यामुळे दिव्याला आणि दिव्यांच्या प्रकाशाला या सणामध्ये फार मोठे महत्त्व आहे. संपूर्ण भारतवर्षात हा सण साजरा केला जातो. त्यामुळे दिवाळीच्या दिवसात हा अवाढव्य भूप्रदेश रात्री विविध प्रकारच्या दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेला असतो. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी एका कवितेत ‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ’ अशी कल्पना मांडली आहे. ती आणखी विस्तारून आपल्याला आपली कल्पना भव्य करावी लागेल, इतके दिवे दिवाळीच्या रात्री या भूपट्ट्यावर उजळत असतात.

दिव्या दिव्या दीपत्कार... असे म्हणत आपण लहानाचे मोठे होतो आणि मग केव्हा तरी आपल्याला ज्ञानेश्वरीतील तेजस्वी सृष्टीचा परिचय होतो. दिवे आणि प्रकाश आपल्या जीवनाला असे व्यापून राहिलेले असतात.

दिवाळीत घर आणि परिसर दिव्यांनी उजळून टाकतो. त्यासाठी आपण पणत्या वापरतो, निरांजन वापरतो, समया वापरतो, आकाश कंदील वापरतो आणि अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर हरतऱ्हेचे इलेक्ट्रिक दिवेसुद्धा वापरत असतो. आपल्याकडे दिव्यांचे किती तरी प्रकार आढळतात. आमचे एक मित्र मकरंद करंदीकर गेल्या पन्नास वर्षांपासून नानाविध दिवे जमा करण्याचा छंद जोपासत आहेत. सर्वाधिक दिवे जमवण्याचा विक्रमच त्यांच्या नावावर आहे. त्यांच्याकडील दिव्यांचा संग्रह पाहणे ही एक पर्वणीच असते. अनेक वर्षे दीप आमावस्येला ते या दिव्यांचे प्रदर्शन भरवत असतात.

माती, दगड, तांबे, पितळ, लोखंड, चांदी, सोने अशा नानाविध वस्तूंमधून दिवे साकारले जातात. आपल्या मंदिराबाहेर या दीपमाळा असतात, त्या दगडातून साकारलेल्या असतात. आपल्या रोजच्या वापरात चिमणी, कंदील असे दिवे असत. आता बल्ब, ट्यूब, एलईडी आले. विविध कामांसाठी विविध दिव्यांचा वापर आपण करत आलो आहोत. ध्यान आणि त्राटकासाठी छोटा दिवा वापरणारे आपण युद्धासाठी मशाली घेऊन बाहेर पडत होतो. तेथून इलेक्ट्रिक दिव्यांपर्यंत आणि त्यांच्याही पुढे महाप्रचंड झोतांपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. प्रकाश अर्थात अग्नी हा संपूर्ण तेजस्वी असतो. ज्ञानेश्वरीमध्ये दीपकळी धाकुटी असा उल्लेख आलेला आहे. या दीपककळीपासून म्हणजे छोट्या पणतीपासून ते थेट सूर्यापर्यंत आपल्याला प्रकाशाची नानाविध रूपे माहिती आहेत. सूर्य अंधःकार नाहीसा करतो, तेच काम इवलीशी पणतीसुद्धा करत असते. ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ’ हा श्लोक आपण अनेकदा म्हटलेला असेल; पण अनेकांच्या हे लक्षातच येत नाही, की या श्लोकात श्रीगणेशाचे तेज कोटी सूर्याइतके प्रखर आहे असे म्हटले आहे. आपल्याला त्या तितक्या तेजाची कल्पना करायची म्हटले तरी ते अशक्य... श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूपदर्शन घडवले, तेव्हा प्रथम त्याला ते पाहण्याची दृष्टी दिली असे म्हणतात. आपल्याला या इतक्या मोठ्या तेजाची कल्पना करायची तर आधी आपली कल्पनाशक्ती विस्तारून घ्यावी लागेल.

दिवाळी या प्रकाशोत्सवात इतरांच्या जीवनात आपल्याला काही प्रकाश सोडता आला तर सोडावा, असा संदेश देणारा हा सण आहे.

Tuesday, November 7, 2023

मनस्वी लेखक


 

मनस्वी लेखक

मनस्वी लेखक

आपल्या साहित्यनिर्मितीने केरळसह जगभरात मानसन्मान मिळविलेले मल्याळम भाषेतील ज्येष्ठ कथाकार ९२ वर्षीय टी. पद्मनाभन यांनी आजवर साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कारांना गवसणी घातली आहेच; पण त्यासोबत अनेक महत्त्वाचे पुरस्कार नाकारण्याचे धैर्यसुद्धा वेळोवेळी दाखवले आहे. लेखक हा मनस्वी असतो. त्याला आपला स्वायत्त अवकाश टिकवायचा असतो. याबाबतीत दक्ष असलेले पद्मनाभन् हेही त्यापैकीच. पण त्यामुळे सुरुवातीला ‘पुरस्कार नाकारणारा लेखक’ अशी त्यांची प्रतिमा झाली होती. अलीकडेच त्यांना केरळ सरकारच्या वतीने दिला जाणारा ‘केरळ ज्योती अवॉर्ड’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले.  

 आजच्या जगात एकीकडे जग तंत्रज्ञानामुळे अगदी जवळ आले आहे, असे म्हटले जाते. परंतु माणसाला मात्र एक प्रकारचे एकाकीपण भेडसावते आहे. टी. पद्मनाभन यांच्या कथांमधून हा अंतर्विरोध कलात्मक रीतीने व्यक्त होतो. कायद्याचे शिक्षण घेऊन त्यांनी वकिली सुरू केली होती; पण त्यांचा मूळ पिंड लेखकाचा होता. तो त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. लिहिण्याची हौस त्यांना आधीपासूनच होती. पुढे त्यांच्या लेखनकलेला आणखी बहर आला. त्यांचे बालपण दारिद्र्यात गेले. कन्नूर या केरळातील एका छोट्या गावात पुथियिदथ कृष्णन नायर आणि देवकी (अम्मुकुट्टी) या दाम्पत्याच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. ते काही महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि आईवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. मद्रास लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. थालास्सेरी आणि कन्नूर या न्यायालयांमध्ये त्यांनी वकिली केली. याच काळात ते लेखक म्हणून घडत गेले. एफएसीटीचे अध्यक्ष एमकेके नायर या मोठ्या माणसाने पद्मनाभन यांना बोलावून घेतले. तेथे जाऊन त्यांनी विविध पदांवर काम केले. पुढे ते या कंपनीचे उपसरव्यवस्थापक झाले. १९८९मध्ये ते तेथून निवृत्त झाले. त्यांच्या पत्नी कल्लनमर्थोडी भार्गवी यांचा २०१४ मध्ये मृत्यू झाला आणि पद्मनाभन एकटे उरले. १९४८ मध्ये त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली. आजवर त्यांनी शेकडो लघुकथा लिहिल्या आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या जीवनातील विविध अनुभवांवर ‘माझ्या गोष्टी- माझे जीवन’ नावाचे एक चरित्रात्मक पुस्तकसुद्धा लिहिले आहे. त्यांच्या कितीतरी कथा विविध भाषांमध्ये भाषांतरित झाल्या आहेत. केवळ देशी भाषा नव्हे; तर रशियन, फ्रेंच, इंग्लिश आदी भाषांमध्येसुद्धा त्यांच्या कथा भाषांतरित झाल्या आहेत आणि तिथल्या रसिकांच्या पसंतीला उतरल्या आहेत. अत्यंत सरळ भाषेत लिहिलेल्या कथा हे त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचे जाणकार सांगतात. प्रकाशम परथुन्ना ओरु पेनकुट्टी (तेजस्वी मुलगी, १९५५), ओरु कथाक्रिथु कुरिशिल (एका कथाकाराला सुळावर चढवले जात आहे, १९५६), माखन सिंघिन्ते मरनम (माखन सिंहचा मृत्यू, १९५८), काला भैरवन, गौरी (१९९३) आणि मरया (२०१७) या त्यांच्या प्रमुख साहित्यकृती आहेत. यातील ‘गौरी’ या त्यांच्या कथेवर १९८२ मध्ये दूरदर्शनने संगीतमय सादरीकरण केले होते. याच कथेवर पुढे त्याच वर्षी ‘कवियूर शिवप्रसाद’ नावाचा चित्रपटसुद्धा आला होता. माणसाचा एकटेपणा आणि हतबलता हे त्यांच्या अनेक कथांचे सूत्र असल्याचे समीक्षक सांगतात. पद्मनाभन यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात अनेक पुरस्कार नाकारले. १९९६ मध्ये त्यांनी केंद्राचा साहित्य अकादमी पुरस्कारही नाकारला होता. अर्थात काही पुरस्कार त्यांनी स्वीकारलेसुद्धा. पण शेवटी अस्सल कलावंत हा पुरस्कारांच्या पलीकडचा असतो.

- वैभव चाळके सकाळ -नाममुद्रा -6.11.23