Friday, June 6, 2025

मराठी

 मराठी संवर्धनासाठी काय करता येईल?

महाराष्ट्रात मराठी अनिवार्यतेचा कायदा आहे. त्याची कठोर अंमलबजावणी सुरू करावी. अन्य भाषिकांना आम्ही तुमच्याविरोधात नाही; मात्र महाराष्ट्रात मराठीच्या संवर्धनासाठी आपण सहकार्याची भूमिका घेतलीच पाहिजे, ही सरकारची भूमिका असल्याचे स्पष्टपणे समजून सांगावे. म्हणजे वादाचे प्रसंग उपस्थित होणार नाहीत. मराठी शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी आणि असलेल्या शाळा अधिक चांगल्या होण्यासाठी प्रयत्न करावेत. शाळांमधील दर्जाच्या सुधारण्यासाठी प्रयत्न केल्यास या शाळांकडे ओघ वाढू शकतो. महाविद्यालयात आणि विद्यापीठात मराठीच्या वर्गांची पटसंख्या वाढविण्यासाठी काय करता येईल याचा शोध घ्यावा. इतर माध्यमांमधील मराठीचे आध्यापन अधिक चांगले कसे होईल याचाही काळजीपूर्वक पाठपुरावा करावा. सर्व सार्वजनिक ठिकाणी मराठीचा वापर करून मराठी ही ताबडतोब अर्थकारणाची भाषा म्हणून अधिकाधिक कशी वाढेल यासाठी प्रयत्न सुरू करावेत. मराठीच्या संवर्धनासाठी काय काय करता येईल यासाठी या विषयातल्या विविध संस्था आणि तज्ज्ञ यांच्या स्वतंत्रपणे वारंवार बैठका घेऊन त्यातून आलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीवर बारकाईने लक्ष द्यावे. सरकारच्या विविध संस्थांमधला समन्वय वाढवून मराठीचे काम अधिक नेटाने पुढे कसे जाईल हे पाहावे. मराठी साहित्य, संस्कृती आणि भाषा यातील संशोधनावर भर देऊन हे संशोधन उपयोगात कसे आणता येईल यावर भर द्यायला हवा. शासनाचा निधी मोठ्या प्रमाणावर विविध उपक्रमांवर खर्च केला जातो; मात्र या उपक्रमांचे पुढे काय होते याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. उदाहरणार्थ विविध कोशांची निर्मिती केली आहे; पण बहुतांश मराठी माणसांना अशा प्रकारचे कोश आपल्याकडे निर्माण झाले आहेत आणि ते आपल्याला वापरता येतात याची कल्पनाच नाही  तेव्हा या प्रकारच्या साधनसामग्रीच्या उपयोगाबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. आणखी 25 वर्षानंतर मराठीची महाराष्ट्रातील स्थिती काय असणार आहे याची एक स्पष्ट कल्पना संकल्पचित्र म्हणून मांडायला हवी. या उद्दिष्टाच्या पूर्णत्वासाठी कोण, केव्हा, किती आणि कसे काम करणार आहे, हे स्पष्ट करून घ्यावे. संबंधितांवर तशी जबाबदारी निश्चित करावी. महाराष्ट्रात मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यांच्या संवर्धनासाठी खास निधी उभा करून तो मोकळ्या हाताने खर्च करावा. अत्यंत काटेकोरपणे त्याचा हिशोब मांडावा. मराठी माणसाच्या मनात मराठीच्या संवर्धनाचे आस निर्माण व्हावी यासाठी कोणते प्रयत्न करता येतील याचा शोध घ्यावा. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे यासारख्या बहुभाषिक होऊ लागलेल्या शहरांचा चेहरा मराठमोळा कसा राहील आणि या शहरांमध्ये जगताना मराठी माणसाला न्यूनतेची भावना न येता अभिमानाची भावना कशी निर्माण होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत.

सीनियर

 सीनियर


मैत्री हे जगातल्या सुंदर नात्यांपैकी एक नाते होय. रक्ताचे नव्हे तर मनाने जोडलेले नाते. माझा मित्र-मैत्रिणींचा गोतावळा मोठा आहे त्याबाबत मी मोठाच भाग्यवान आहे. शाळेची पायरी चढण्यापूर्वीच मला मैत्री गवसली आणि 40 वर्षांहून अधिक काळ मैत्रीने मला हजारो अनुभव दिले. कधी अतीव आनंदाचे तर कधी आसवात भिजवणारी.

गेली साधारण दहा-एक वर्षे माझा प्रिय सिनियर मला त्याच्या गावच्या शेतघरात राहायला ये असे वारंवार सांगत होता. पण मला जमत नव्हते. तसे त्याचे गाव माझ्या गावापासून अवघ्या चाळीस-पन्नास किलोमीटरवर आहे  पण मुंबई ते गाव अनेकदा प्रवास करणाऱ्या मला ते तेवढे अंतर गेली दहा वर्षे कापता आले नव्हते  यंदा मात्र दोन दिवस अधिकची रजा हाती आली आणि मी त्याच्याकडे जायचे ठरवले. आदल्या आठवड्याच्या शेवटी पुढच्या आठवड्यात येतो आहे, असे सांगायला त्याला फोन केला, तर म्हणाला, मीच मुंबईला यायला निघालोय. मुलीचा दहावीचा रिझल्ट लागला आहे. तिला 96 टक्के मार्क्स मिळालेत तो आनंदाने सांगत होता. मलाही खूप आनंद झाला. मी लागलीच त्याचे अभिनंदन केले. पोरीचे कौतुक केले. खेळ, वक्तृत्व स्पर्धा आणि धमाल मौज करणाऱ्या या पोरीने स्वतःला कसोटीच्या क्षणी सिद्ध करून दाखवले. म्हटले, माघारी केव्हा निघणार आहेस? तर म्हणाला मी मंगळवार-बुधवारी निघेन. मी म्हटले, मी मंगळवारी निघून बुधवारी तुझ्याकडे यायचा विचार करत होतो. आता आला आहेस तर सोबतच निघू.

हा सीनियर आणि मी दोघे जिवलग मित्र. 25 वर्षांहून अधिक काळ आमची मैत्री आहे, पण आम्ही नियमित भेटणारे मित्र नाही. जेव्हा भेटतो तेव्हा जीवाभावाने भेटणारे मित्र आहोत आम्ही. मी बारावीत असताना तो एसवाय बीएला होता. म्हणजे त्याच्या माझ्यात साधारण तीन वर्षांचे अंतर आहे. त्याचा सगळा ग्रुपच त्या काळात एका हस्तलिखिताच्या निमित्ताने माझा झाला.

या सगळ्या सीनियर्सनी त्या काळात मला अमाप प्रेम दिले  त्यांच्यात ज्युनिअरचा मी एकटाच होतो आणि त्यांचा जवळचा सुद्धा. त्या काळात त्यांनी मला प्रेमाने काय काय शिकवले त्याची गणतीच नाही. गंमत म्हणजे गेली 25 वर्षे ही मंडळी मला शिकवत आहेतच.

सीनियर कॉलेजमधून बाहेर पडला तेव्हा त्याने दिवाळी अंक काढला. त्याला नियोजनात मदत केली. लेखक मिळवले. पुढे तो निवडणुकीला उभा राहिला. मुंबई विद्यापीठात सिनेट मेंबर झाला. त्या काळात कार्यकर्ता ते मतदार अशा सगळ्याच भूमिका मी आनंदाने निभावल्या होत्या. पुढे भेटी कमी झाल्या तरी रुईयाच्या कट्ट्यावर अधूनमधून भेट व्हायची. तो आवर्जून कट्ट्यावर येतो आणि मी गेली दहा-बारा वर्षे रुईयात शिकवायच्या निमित्ताने आठवड्यातून एखाद्या दिवशी तिथे असतोच. त्यामुळे इतर सीनियर्सच्या तुलनेत हा मात्र मला अधिक वेळा भेटत आलाय. भेटला म्हणजे कडकडून मिठी मारतो. खाऊपिऊ घालतो. कविता ऐकव म्हणतो. एखादी छानशी ऐकून दाखवतो. ही अशी देवाणघेवाण अखंड सुरू असते.

ठरल्याप्रमाणे मंगळवारी सकाळी सीनियर गाडी घेऊन माझ्या दारात हजर झाला आणि आमची कोकण सहल सुरु झाली. कोकण हा आमचा दोघांचा अत्यंत आवडीचा विषय आहे. कविता हा दुसरा. त्यामुळे कोकणावर कविता केली तर ती याला दाखवायलाच हवी, असे मला वाटत राहते. त्यामुळे मी निघताना दहा एक वर्षे धुळखात पडलेला अद्यप प्रकाशित न झालेला माझा कवितासंग्रह बॅगेत टाकून मी निघालो होतो. या कवितांना ही कुणीतरी रसिक मिळणार होता.

अखंड बडबड करीत आम्ही कोकणातल्या गावाच्या दिशेने निघालो. म्हणजे बहुतांश वेळा मीच बोलत होतो. वाटेल भरपेट नाश्ता केला. चिपळूण खानावळीत जेवलो. गप्पा हास्यविनोदानी पोट तुडुंब भरले होते. गाव जवळ येऊ लागले. कितीतरी आठवणी दाटून आल्या. शाळेचे दिवस आठवले. शाळेतल्या मित्र-मैत्रिणी आठवल्या. माझी एक मैत्रीण वाटेवरच्याच एका गावात राहते. सीनियरला म्हटले तिच्याकडे जाऊया का रे? तर तो म्हणाला तू म्हणशील तिकडे जाऊ. मग आम्ही वाटेतल्या बालदोस्ताना भेटतभेटत आनंदाचा गुणाकार करत सीनियरच्या गावी पोहोचला.

सायंकाळी साडेचारला आम्ही गावात पोहोचलो गेटमधून आत घुसताच तो म्हणाला, ही आपली लायब्ररी. ती वास्तू पाहून मला आभाळभर आनंद झाला. आडगावात चक्क एका जंगलात एक अख्ख घर ग्रंथालय करणे ही कल्पनाच माझ्यासाठी अत्यंत सुखदायी होती. ग्रंथालयापासून पुढे जात डावीकडे वळण घेतले तर म्हणाला हा गोठा. 35 म्हशी होत्या. पुढे गेलो एक डावे वळण घेतले. डाव्या हाताला एक छोटी इमारत होती. हे मजुरांचे घर. गाडीतून उतरलो तर समोर एक अत्यंत देखणे घर... त्याला फुलांनी भरलेले अंगण... घराच्या आजूबाजूस माणसांचा, यंत्रांचा एकही आवाज नव्हता. हिरव्या कंच डोंगररांगात उतरंडीला बांधलेले शेतघर पाहून फार्म हाऊस या कल्पनेच्या संकुचितपणाचे तुकडे झाले. दहा वर्षे मी, या सिनियरचे चारेक एकर जागेत एखादे टुमदार छोटेखाणी घर असेल असे समजत होतो. पण हा राजा माणूस इथे निसर्ग राजा होऊन सव्वाशे अकरावर नांदतो हे पाहून मित्र म्हणून आनंदाने.. अभिमानाने उर भरून आला. हा समोरचा अख्खा डोंगर आपलाच आहे, असे तो म्हणाला, तेव्हा त्या डोंगराएवढाच आनंद मला झाला.

घरी सीनियरचा मामा होता. हा विलक्षण माणूस अधिकारी म्हणून मोठ्या पदिवरून सेवानिवृत्त होऊन जीवनाचा अखंड आनंद घेणारा माणूस. रात्री मामा, मी आणि सिंगर अंगणाच्या टेबलावर बसलो. घराशेजारीच एका टुमदार वास्तुत स्वयंपाक घर आहे. शेफ मॅक्सच्या हाताला चव आहे. त्यांने कोबी आणि कांद्याचे कुरकुरीत भजी आणून दिले. चहा भजीचा आस्वाद घेत असतानि मामा म्हणाले, तू छान कविता करतो म्हणत होता हा.. एखादी छानशी कविता म्हणून दाखव. सीनियरसारखा रसिक समोर असल्याने मी माझी सर्वात आवडती आई कविता सादर केली. ती कोकणातल्या मातीत राबणाऱ्या आईची प्रातिनिधी कविता असे मला वाटत आहले आहे. ती ऐकून सीनियर घायाळ झाला. मामाच्या काळजावर कवितेने आघात केल्याचे चेहऱ्यावर त्या अंधुक अंधारातही मला स्पष्ट दिसले. कवितेला या दोन रसिकांनी दिलेली दाद अपार समाधान देऊन गेली. मामा म्हणाले, पुन्हा वाच. फार आवडली. कवितेला वन्समोर... मी भरून पिवलो. ती कविता वाचून... अनुभवून थकलो होतो. म्हटले दोन मिनिटे थोडा विसावा घेऊ दे.

मग मी पुन्हा त्याच दमान ती कविता सादर केली..

'आधी आई पसरत जाते शेतभर आणि मग पाऊस...

आई रुजून येते हिरवीगार आणि सळाळत राहते वाऱ्यावर..'

आणि मग अशाच कवितांमधील तरल, तलम आणि धारदार प्रतिमांनी रसिकांना घायाळ करत संमेलन रंगले. रात्री मस्त जेवलो. छानपैकी झोपी गेलो. दिवसभराच्या झोपही लवकर लागली.

सकाळी उठलो. ब्रश करून चहा घेतला. त्याने टायगरला आवाज दिला. छू म्हणून त्याला सीमेवर धाडल्यावर, तो तिथे जाऊन भुंकून आला. हातात काठी घेऊन सीनिअर पुढे, त्याच्या पुढे टायगर आणि शेवटी मी. आम्ही तिघे जण काजूबागेतून चालत नदीच्या दिशेने निघालो.

सीनिअर म्हणाला, “इथून मागे जाऊ या की, फिरून जाऊ या?”

मी म्हटले, ‘‘कसेही.’’

आम्ही फिरून जायचे ठरवले. थोड्याशा चढावर चढताना मला धाप लागली. ती त्याला नेमकी दिसली. सावकाश ये म्हणाला. मग मी माझ्या वेगाने चालू लागलो. काजूबागेच्या एका बाजूला आमराई होती. पायवाटेच्या दुसऱ्या बाजूला पणसाची व आंब्याची झाडे लावलेली होती. त्यांना कुंपण घातलेले होते. उजवीकडे काजूबागेत बिया पडलेल्या होत्या. काही बोंडंही होती.

तो म्हणाला, “पाऊस पडला ना, तर या बियांचे मोठे नुकसान होईल. पुढच्या दहा दिवसांत जमेल तेवढे पिकून घ्यायला हवे.”

आम्ही त्या पायवाटेने आधी गोठ्यापर्यंत गेलो आणि उजवे वळण घेऊन पुन्हा डावीकडे वळत घरी पोहोचलो. अंगणात आल्यावर तो म्हणाला, “आपण या समोरच्या डोंगराला फेरी मारून आलो, कळलं ना तुला?”

मी त्या हिरव्यागार डोंगराकडे क्षणभर बघत राहिलो. खरे वाटलेच नाही.

मग आंघोळ करून नाश्ता केला. थोडा वेळ मामांशी गप्पा मारल्या. मामा आपल्या कामाला निघाले, तसे आम्हीही निघालो. रत्नागिरी जायचे, बंदर पाहायचे, आणि जमले तर मासे घेऊन यायचे – असा साधारण प्लॅन होता. लवकर आलो, तर लांजात जाऊन खानावळीत जेवून परतायचे असा विचार सीनियरने बोलून दाखवला होता.

आधी आम्ही खाली येऊन ग्रंथालय पाहिले. पाच-सहा हजार पुस्तके... अत्यंत विचारपूर्वक निवडलेली...  रसिक आणि बुद्धिमान, जाणत्या माणसाने निवडलेली ही पुस्तके पाहताना हरखून गेलो. एकेक पुस्तक खूपच किमती होते.

अनेक कवितासंग्रह, काही कवींचे समग्र साहित्य, निवडक महत्त्वाच्या कादंबऱ्या, महत्त्वाचे निबंधसंग्रह, कितीतरी चरित्रे, अनुवाद – असे काय काय होते त्यात.

एका कप्प्यात इंग्रजी पत्रकारितेवरची पुस्तके ठेवलेली होती. सीनियर म्हणाला, “ही लेकीसाठी घेतली आहेत.”

त्यामुळे मी त्यावर बारकाईने लक्ष टाकले. “मीडिया इथिक्स” पुस्तक दिसले. वाटले — या माणसाने मुलीला काय शिकवायचे, ते अगदी ठरवून ठेवले आहे.

पण मग काल येताना तो काय म्हणाला होता ते आठवले. तो म्हणाला होता, “लेकीला पत्रकार बनवायचे आहे. तेव्हा तिला जरा काही मार्गदर्शन कर.”

मी म्हटले, “एक दिवस फक्त दोन तास वेळ काढ. तिला घेऊनच ये. अर्ध्या तासात ‘बातमी म्हणजे काय’ ते सांगतो. आमचे २५–२५ वर्षं बातमीदारी करणारेसुद्धा बातमी नीट लिहू शकत नाहीत.

दुसरा अर्धा तास — ‘लेख म्हणजे काय’ हे तिला समजावून सांगतो. मग अर्धा तास ‘पत्रकारिता म्हणजे काय’ हे आणि पुढचा अर्धा तास ‘नवी पत्रकारिता म्हणजे काय’ हे नीट समजावून देतो.

हे एकदा समजले की मग तिला वाटेल तो अभ्यास करता येईल.”

“मीडिया इथिक्स” हे पुस्तक तिला नेमके समजले पाहिजे. आणि हे सगळं कधी, कसे आणि किती बाजूला ठेवायचे, हेही तिला अचूक समजायला हवे. मग आपण त्यावर काम करू शकतो.

त्या पुस्तकातून निघावेसे वाटत नव्हते. पण पल्ला लांबचा होता, म्हणून निघालो.

साधारण दहा-बारा किलोमीटर गाडी चालली असेल. मला थोडा थकवा जाणवत होता.

मी सामान्यतः अखंड बडबड करत असतो, पण आता माझी बडबड थोडी कमी झाली होती.

सीनियर म्हणाला, “ थकल्यासारखा दिसतोस. आपण घरी जाऊ या का?”

मी म्हटलं, “हो, थोडे तसे वाटतेय, पण जाऊ या.”

मग आम्ही ठरवले – रत्नागिरीच्या घरी जाऊ, तिथे थोडा वेळ थांबू, आणि मग पुढे निघू.

घरी गेलो. थोडा वेळ झोपलो. पण झोप आली नाही, त्यामुळे फार फ्रेश वाटले नाही.

मग कुठेही न जाण्याचा निर्णय घेतला. तिथल्याच एका खानावळीत मस्त जेवलो आणि मग घरची वाट धरली.

वाटेत मामांचा फोन आला. म्हणाले, “माझे काम पुढे ढकलले गेले आहे, त्यामुळे मी आता थांबत नाही. थेट मुंबईला निघतो.”

मी म्हटले, “मामांना रस्त्यात भेटता आले, तर भेटू या.” 

फोन केला, आणि मग रस्त्यात आम्ही भेटलो. दोन मिनिटे बोललो आणि पुन्हा आपापल्या मार्गाने निघून गेलो.

घरी जाऊन थोडा आराम केला. चहा प्यायलो आणि संध्याकाळी खानावळीत जेवायचे ठरवले. सीनियरच्या मित्राने सुरू केलेल्या, आणि त्यानेच चालवलेल्या खानावळीत गेलो.

अत्यंत ताजी, चविष्ट सुरमई खाल्ली.

जगातली सर्वात सुंदर अशी सोलकढी प्यायलो. ती इतकी अप्रतिम होती की पुन्हा एक वाटी मागून घेतली. आणि तीही मनसोक्त प्यायलो.

रात्री घरी परतल्यावर पुन्हा मैफल रंगली.

कितीतरी कविता आम्ही एकमेकांना ऐकवल्या. आमचे मराठीचे प्राध्यापक विजय तपास यांच्या कविता सीनियरने ऐकवल्या. निदा फाजली, पुनीत मातकर — अशा किती जणांच्या कविता ऐकत, ऐकवत राहिलो.

सगळे जुने दिवस पुन्हा जिवंत झाले. सगळी माणसे भोवताली पुन्हा नांदू लागली.

दारू पिणाऱ्यांना जशी हळूहळू नशा चढत जाते, तशीच आम्हाला आठवणींची नशा चढली.

त्या जिवंत झालेल्या स्मृतींच्या नशेत आम्ही बोलू लागलो — वर्तमान नात्यांप्रतीची कृतज्ञता दाटून आल्या असतानाच कुणीतरी गतनात्यांच्या सप्तरंगांची उधळण करावी, तसा एक विलक्षण आनंद अनुभवत आम्ही चिंब भिजत होतो.

किती किती माणसं आठवली...

किती क्षण पुन्हा जिवंत झाले...

माझ्या संग्रहात ही एवढी ऊर्जा आजही जिवंत आहे, याचा मलाच नव्याने अनुभव आला.

तो म्हणाला, आता हा संग्रह प्रकाशित व्हायलाच हवा. चांगला प्रकाशक भेटेलच – या कविता चांगल्या आहेत. पण नाहीच भेटला, तर मी आहे!

पण मी...  गेली २५ वर्षं माझ्या संग्रहाला सांगत आलोय – "तू नको रे बाजारात उभा राहू. तेथे रसिकांपेक्षा जास्त विक्रेते असतात!" 

म्हणूनच त्याला आतमध्ये, दडपून ठेवला.

क्षणभर वाटले – जर समान धर्मा मिळणार असतील, तर हा संग्रह प्रकाशित करायलाच हवा.

पण बाजाराचे नियम फार विचित्र असतात.

रात्री झोपलो. सकाळी उठलो.

सकाळी सीनियरने पुन्हा चहाच्या टेबलावर आपल्या वहीतील कविता ऐकवल्या.

या त्याच्या स्वतःच्या कविता होत्या.

किती उत्तम प्रतिमा होत्या त्यात!

एका जाणकाराने "मला नाही कविता लिहिता येत" म्हणावे आणि अस्सल ऐवज लिहावा – तसा अनुभव येत होता.

आणखी एक गोष्ट जाणवली – दोन दिवस आम्ही एकत्र असताना, त्याने आपल्या कवितांची ओळख होऊ दिली नाही.

असा विलक्षण संयम!

त्याच्यानंतर त्याने ‘मृत्यूभान’ ही लेखमाला वाचून दाखवली. त्यातले काही तुकडे ऐकताना असे वाटत होते – हा कुणी विलक्षण कलावंत आहे... जीवनाकडे समरसून पाहणारा.

गोड, स्पष्ट आवाज, नाट्य पकडणारी शैलीआणि भाव नेमके पकडण्याची समज… सगळे होते त्याच्या वाचनात...

म्हटले – अरे, हे ऑडिओ स्वरूपात यायला हवे!

आणि हा लेख मौजेत छापायला हवा!

चहा-नाश्ता करून आम्ही आमच्या गावाच्या दिशेने निघालो.

गेटबाहेर पडलो, तर पावसाची चाहूल लागली. थोडे पुढे आलो तर पावसाचे शिंतोडे पडू लागले.

त्याचा जीव कासावीस झाला – लाखोंची बी पावसात भिजण्याची भीती होती.

कालपासून तो एक एक माणूस शोधत होता – पण सापडत नव्हता.

त्याने स्वामींना प्रार्थना केली. मीही मनोमन हात जोडले.

घरी आलो, तेव्हा त्याने माझ्या बाबांना मिठी मारली.

आईच्या पाया पडला. आईला जवळ घेतले.

माझी आई मला प्रिय आहेच... जगातल्या कोणत्याही लेकराला त्याची आई प्रिय असते, तशीच.

पण… हा सीनियर दोन क्षणात तिचा झाला!

या पोराला ईश्वरी वरदान आहे.

एकाच वेळी याला लक्ष्मी, सरस्वती आणि प्रेमदेवता प्रसन्न आहेत.

ही तुझी समृद्धी वृद्धिंगत होत राहो, मित्रा!


 - वैभव बळीराम चाळके

मे 2025

Tuesday, March 25, 2025

सामान्यांचा असामान्य सोबती विनोदकुमार शुक्ल

 सामान्यांचा असामान्य सोबती

...
‘हताशा से एक व्यक्ति बैठ गया था
व्यक्ति को मैं नहीं जानता था
हताशा को जानता था
इसलिए मैं उस व्यक्ति के पास गया
मैंने हाथ बढ़ाया
मेरा हाथ पकड़कर वह खड़ा हुआ
मुझे वह नहीं जानता था
मेरे हाथ बढ़ाने को जानता था
हम दोनों साथ चले
दोनों एक दूसरे को नहीं जानते थे
साथ चलने को जानते थे।’
विनोदकुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होताच देशभरातील त्यांच्या रसिकांनी त्यांचे अभिनंदन करताना, त्यांची ही कविता आपल्या समाजमाध्यमांवर उद्‌धृत केली आहे. समाजातील शेवटच्या माणसाप्रति तुमच्या मनात किती कणव आहे यावरूनच कलावंताचे महानपण ठरत असते, असे म्हणतात. ज्ञानेश्वरांची रेड्यामुखी वेद वदवण्याची प्रतीकात्मक कथा, श्री. म. माटे यांचा ‘बन्सीधर! आता तू कुठे रे जाशील?’ हा प्रश्‍न ते भालचंद्र नेमाडे यांच्या पांडुरंग सांगवीकरपर्यंत आपली साहित्याची सगळी परंपरा आपल्याला हेच सांगत आली आहे. हिंदीतही तशी मोठी परंपरा दिसते. त्यातील आजचे आघाडीचे नाव म्हणजे विनोदकुमार शुक्ल हे होय. विनोदकुमार शुक्ल यांची लेखनशैली अत्यंत साधी, गहन आशय व्यक्त करणारी आहे. त्यांच्या साहित्याची ताकद त्याच्या साधेपणात आणि सूक्ष्म निरीक्षणशक्तीत आहे. त्यांनी ग्रामीण जीवन, मानवी भावनांचा संघर्ष आणि स्वप्नांची मोहकता यांचे सुंदर दर्शन घडवले आहे. हिंदी साहित्यात त्यांनी आपली स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. त्यांचे साहित्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
विनोदकुमार शुक्ल यांचा जन्म १ जानेवारी १९३७ रोजी छत्तीसगडमधील राजनंदगाव येथे झाला. त्यांचे बालपण आणि शालेय शिक्षणही तिथेच झाले. लहानपणीच त्यांना साहित्याची गोडी लागली. त्यांनी नागपूर विद्यापीठातून उच्चशिक्षण घेतले. त्यानंतर ते अध्यापन क्षेत्रात कार्यरत झाले. अत्यंत मितभाषी असलेले शुक्ल साध्या जीवनशैलीचे पालन करणारे लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सर्वच लेखनात साधेपणा असला तरी तो वरवरचा नाही. त्यामध्ये सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि गूढ आशय आहे. आपल्या लेखनाची सुरुवात त्यांनी काव्यलेखनाने केली. कवितांमधून साध्या, रोजच्या जीवनातील गोष्टींवर आपल्या असामान्य प्रतिभेचा प्रकाश टाकलेला पाहायला मिळतो. त्यांच्या कवितेतील भाषा सहज आणि प्रवाही आहे. सहज कळणारी आहे. शांत, साधी आणि तल्लख निरीक्षणशक्ती ही त्यांची वेगळी ओळख आहे. लगभग जयहिंद (१९७१), वह आदमी चला गया नया गरम कोट पहिनकर विचार की तरह (१९८१), सब कुछ होना बचा रहेगा (१९९२), अतिरिक्त नहीं (२०००), कविता से लंबी कविता (२००१), आकाश धरती को खटखटाता है (२००६), पचास कविताएँ (२०११), कभी के बाद अभी (२०१२), कवि ने कहा (२०१२), प्रतिनिधि कविताएँ (२०१३) हे त्यांचे कवितासंग्रह रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत.
विनोदकुमार शुक्ल यांच्या कादंबऱ्या हिंदी साहित्यात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यांच्या कादंबऱ्या साध्या ग्रामीण जीवनाशी निगडित असल्या तरी त्यामध्ये मानवी मनोव्यापारांचे नितांत सुंदर दर्शन घडते. नौकर की कमीज़ (१९७९), खिलेगा तो देखेंगे (१९९६), दीवार में एक खिड़की रहती थी (१९९७), हरी घास की छप्पर वाली झोपड़ी और बौना पहाड़ (२०११), यासि रासा त (२०१७) आणि एक चुप्पी जगह (२०१८) या त्यांच्या कादंबऱ्या वाचकप्रिय झाल्या आहेत. ‘नौकर की कमीज’ ही त्यांची पहिली आणि सर्वाधिक लोकप्रिय कादंबरी. त्यात एका गरीब आणि साध्या नोकराच्या जीवनाचे दर्शन घडते. त्याची स्वप्ने, संघर्ष आणि त्याला मिळणारी वागणूक यांचे अत्यंत प्रभावी शब्दांत चित्रण केले आहे. यावर एक चित्रपटही आला होता. ‘खिलेगा तो देखेंगे’ या कादंबरीत एका ग्रामीण भागात शिकवणाऱ्या शिक्षकाच्या जीवनचित्रणाच्या निमित्ताने त्यांनी एकूण मानवी जीवनाचे विविध पैलू उलगडले आहेत. ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ ही कादंबरी मानवी जीवनातील तात्पुरतेपणा आणि शाश्वतता यावर भाष्य करणारी आहे. विशेषतः जग भौतिकतेच्या मागे धावायला लागल्याच्या पार्श्वभूमीवर या कादंबरीतील चिंतन महत्त्वाचे ठरते. विनोदकुमार शुक्ल यांनी लघुकथेच्या प्रांतातही यशस्वी मुशाफिरी केली आहे. त्यांच्या लघुकथांमध्येही लेखनशैलीची विशेष झलक दिसते. त्यांच्या कथांत पात्रांपेक्षा परिस्थिती आणि मानसिक प्रवृत्ती यांना जास्त महत्त्व असते. पेड़ पर कमरा (१९८८), महाविद्यालय (१९९६), एक कहानी (२०२१) आणि घोड़ा और अन्य कहानियाँ (२०२१) हे कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. ‘नींद की दूरी और अन्य कहानियाँ’, ‘महाविद्यालय’ हे त्यांचे कथासंग्रह विशेष गाजले.
त्यांची भाषा सरळ-सोपी आहे. कोणताही विलक्षण गुंतागुंतीचा अर्थ त्यांनी सोप्या भाषेत कुणालाही सहज कळेल अशा शब्दांत मांडला आहे. त्यांनी आपल्या साहित्यात सामान्य माणसांचे जीवन चित्रित केले. मानवी भावनांचे सूक्ष्म दर्शन घडवले. निसर्ग आणि मानवी जीवन यांचा त्याच्या साहित्यात सुंदर मिलाफ आढळतो. त्यांच्या साहित्यकृतींना अनेक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना मानाचा व्यास सम्मान मिळाला. २०२३ मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. अशा या सामान्यांच्या असामान्य सोबत्याला ज्ञानपीठ मिळाल्याने इथल्या लाखो जणांना जगण्याची आणि हजारो कलावंतांना नवसर्जनासाठी नवी उमेद मिळेल.
(हा लेख सकाळ दैनिकात 24-3-2025 रोजी संपादकीय पानावर व्यक्तिनामा सदरात प्रकाशित झाला.)

Wednesday, December 25, 2024

भारतीय कवयित्री

भारतीय कवयित्री

( सकाळ  नाममुद्रामध्ये 24 डिसेंबरला प्रकाशित झालेला लेख - वैभव चाळके)  

‘मैं जब तक आई बाहर एकांत से अपने... बदल चुका था रंग दुनिया का’ असे म्हणणाऱ्या कवयित्री गगन गिल साहित्य अकादमीच्या मानकरी ठरल्या आहेत. केवळ पाच कवितासंग्रहांनी हिंदी साहित्यात महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या, गेली साडेतीन दशके सातत्याने लिहिणाऱ्या, आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गिल यांची भारतीय कवयित्री अशी ओळख निर्माण झाली आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणे कोणत्याही साहित्यिकाने केलेल्या कामगिरीवर केलेले राष्ट्रीय पातळीवरचे शिक्कामोर्तब असते. अलीकडेच मराठीतील ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षा ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला, तेव्हाच उत्तरेकडील गगन गिल या ज्येष्ठ कवयित्रीसही ‘मैं जब तक आई बहार’ या कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने काव्यलेखन आणि गद्यलेखन करणाऱ्या गगन गिल यांचे साहित्य सर्वदूर पोहोचले आहेच; मात्र या पुरस्कारामुळे त्याचा परीघ आता आणखी विस्तारेल आणि भारतीय माणूस, त्यातही स्त्रीचा वेध घेऊ पाहणारा विचार अधिक मोठ्या समाजापर्यंत पोहोचण्यास त्याची नक्कीच मदत होणार आहे. वडिलांनी सांगितलेल्या कहाण्यांचा त्यांच्या आयुष्यावर कायमच प्रभाव पडला. वडिलांनी जर त्या कहाण्या सांगितल्या नसत्या तर मी गगन गिल झाले नसते, असे त्यांनी एकदा म्हटले आहे. आपल्या भावना नेमक्या शब्दांत पकडणे हे कवितेपुढील सर्वांत मोठे आव्हान असल्याचे त्या सांगतात.
नवी दिल्लीत राहणाऱ्या गिल यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९५९मध्ये नवी दिल्लीत झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठामधून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. गेली अनेक वर्षे त्या सातत्याने लेखन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याबरोबर अलीकडील काही वर्षे त्या इंग्रजीतील नामवंत वर्तमानपत्रात लिटरली एडिटर म्हणून कार्यरत आहेत. १९९०मध्ये लोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखन कार्यक्रमात त्या भारताच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. याशिवाय १९९२-९३मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना पत्रकारितेसाठी फेलोशिपसुद्धा मिळाली होती. त्यांच्या नावावर पाच कवितासंग्रह अहेत. देश-विदेशांतील कवितेचे रसिक आणि अभ्यासक यांनी त्यांच्या कवितांची नेहमीच प्रशंसा केली आहे. याशिवाय अमेरिका, इंग्लंड आणि जर्मन या विद्यापीठांमध्ये त्यांच्या कविता शिकवल्या गेल्या आहेत. २००२च्या जुलैमध्ये त्यांनी युनायटेड किंगडममधील मॅंचेस्टर लायब्ररीमध्ये कॉमनवेल्थमधील लेखकांसाठी लेखन कार्यशाळांची मालिकाच घेतली होती. त्यानंतर २००४ मध्ये पेनसिल्व्हेनिया आणि बर्कले विद्यापीठाने एकत्र येऊन त्यांच्या लेखनावर एक विशेष वर्कशॉप आयोजित केले होते. २००५मध्ये लंडन विद्यापीठाच्या पोएट्री ट्रान्सलेशन सेंटरमध्ये त्यांच्या कवितांचे अन्य पाच आंतरराष्ट्रीय कवींच्या कवितांसह भाषांतर झाले आहे.

एक दिन लौटेगी लडकी (१९८९), अंधेरे में बुद्ध (१९९६), यह आकांक्षा समय नहीं (१९९८), थपक थपक दिल थपक थपक (२००३) हे त्यांचे अन्य काव्यसंग्रहही वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत. याशिवाय त्यांनी गद्यलेखनही केले आहे. रामकुमार, दिल्ली में उनिंदे, आवक हे त्यांचे लेखसंग्रह प्रकाशित आहेत. त्यांनी विविध लेखक-कवींचे साहित्य भाषांतरितही केले आहे. बेगन्यू हरबर्ट, हरभजन सिंग, सीताकांत महापात्रा आणि श्रीकांत वर्मा आदी लेखकांच्या साहित्यकृती भाषांतरित करण्याचे मोलाचे कामही त्यांनी केले आहे.
भारतीय लेखकांच्या प्रतिनिधी मंडळामधून त्यांनी चीन, फ्रान्स, इंग्लंड, मॉरिशस, जर्मनी, मेक्सिको, ऑस्ट्रिया, इटली, तुर्की, बुलगेरिया, कम्बोडिया, इंडोनेशिया या देशांमध्ये जाऊन आपल्या रचना सादर केल्या आहेत. त्यांच्या लेखन कामगिरीसाठी त्यांना आजवर विविध नामवंत संस्थांचे पुरस्कार लाभले आहेत. १९८४मध्ये भारत भूषण अग्रवाल पुरस्कार, १९८९मध्ये संस्कृती सन्मान, २०००मध्ये केदार सन्मान, २००८मध्ये हिंदी अकादमी साहित्यकार सन्मान, २०१०मध्ये द्विजदेव सन्मान आदींनी त्यांना गौरविण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक निर्मल वर्मा यांच्याशी असलेल्या त्यांच्या नात्याविषयी नेहमीच बोलले-लिहिले गेले आहे. तो अनेकांच्या उत्सुकतेचा एक भाग आहे. साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यावरही अनेकांना त्या अनोख्या मैत्रीची आठवण झाली आणि गिलही त्यावर अगदी मोकळेपणाने बोलल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय कवितेचा विशेषतः भारतीय कवयित्रींचा जेव्हा जेव्हा विचार होईल तेव्हा तेव्हा गगन गिल हे त्यातील एक महत्त्वाचे नाव असेल. आगामी काव्यसंग्रह ही ओळख अधिक ठळक करतील, यात शंका नाही! 

Sunday, November 10, 2024

कवितेतील प्रकाशोत्सव - वैभव चाळके

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. दिवाळीत सर्वत्र दिवे लावून आपण आनंद साजरा करीत असतो. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हे जणू दिवाळीचे सूत्रच आहे. यानिमित्ताने मनाला भुरळ घालणारा हा मराठी कवितांमधील प्रकाशोत्सव... ‘देवा तुझे किती, सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, देव देतो’ या कवितेने आमच्या बालमनात कवितेचा पहिला सुंदर प्रकाश पडला. त्यानंतर ‘सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर... आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार...’ असे म्हणायचो, तेव्हा घरासमोरील डोंगरावरून आलेला सूर्याचा लख्ख प्रकाश संपूर्ण जगावर फाकलेला असायचा. पुढे कधीतरी ‘दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार’ वगैरे ऐकायला मिळाले. ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ’ हे बालपणापासून म्हणतोच आहे; पण त्यातला सूर्यकोटिसमप्रभ शब्द कळायला फार दिवस जावे लागले आणि त्याचा अर्थ अजून कळतोच आहे. पुढे केव्हा तरी कवी अनिल यांच्या कवितेतील ‘सारेच दीप कसे मंदावले आता, ज्योती विझू विझू झाल्या, की झड घालून प्राण द्यावा पतंगाने, असे कुठेच तेज नाही!’ वाचायला मिळाली. कुसुमाग्रजांनी ‘स्वप्नांची समाप्ती’ या कवितेत ‘काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत’ असे लिहिले आहे. यातला अलीकडचा चांदण्याचा प्रकाश शुभ्र कोवळा आणि पलीकडचा सूर्याचा प्रकाश तप्त कोवळा आहे. मंगेश पाडगावकरांनी ‘काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली’ असे जे लिहून ठेवले आहे. त्या वेलींवरचा प्रकाश हा कोवळा प्रकाश... कोवळा शुभ्र प्रकाश आहे. कुसुमाग्रजांनी ‘प्रकाश प्रभू’ कवितेत म्हटले आहे - ‘घट तेजाचे भवती ओतित, असंख्य रविराजाचे प्रेषित, महाद्वार पूर्वेचे खोलुन, क्षितिजावर येती’...

विलक्षण प्रतिभेचे धनी असलेले त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांनी मराठी साहित्यात एकाहून एक सुंदर काव्यलेणी कोरून ठेवली आहेत. बालकवींच्या ‘अरुण’ कवितेमध्ये त्यांनी प्रकाशाची जी रूपे टिपली आहेत, त्यांना अन्य तोड नाही. ‘पूर्व समुद्रीं छटा पसरली रम्य सुवर्णाची, कुणीं उधळिली मूठ नभीं ही लाल गुलालाची?’ अशा सुरुवातीची ही कविता प्रकाशाची कितीतरी रूपे मांडते. या कवितेत बालकवी म्हणतात, क्षितिजाची कड उज्ज्वल दीप्तीने सारवली आहे. सृष्टीसतीने गळ्यात रंगीत मेघांचे अनुपम असे लेणे घातले आहे. हे दागिने सोन्याचे आहेत... रक्तवर्णाचे आहेत... पिवळे आहेत आणि मिश्रित रंगाचे आहेत. कुणाच्या तरी उदरातून सोन्याची गंगा वाहते आहे. कोणीतरी विशुद्ध कर्पूररस आपल्या अंगास लावला आहे. अरुण म्हणजे सूर्य जणू आपल्या नभपटलावर चित्र रंगवतो आहे, असेही ते पुढे म्हणतात. त्यापुढे जाऊन त्यांनी एक अत्यंत बहारदार अशी कल्पना केली आहे... दिवस-यामिनी म्हणजे दिवस आणि रात्र या सूर्योदयाच्या समयी परस्परांचे चुंबन घेत असल्याने त्यांच्या अनुरागाच्या म्हणजे प्रेमाच्या या लाल-गुलाबी छटा गगनात खुलल्या आहेत. सूर्योदय झाला, की रात्रीचे चांदणे दूर होते आणि लाल छटा पसरू लागते. बालकवी म्हणतात, जणू आपल्या मोत्यांची माळ कोणीतरी चोरून नेली आहे म्हणून नभश्री (म्हणजे आकाश) रुसली आहे आणि तिच्या गालावर ही लाल छटा आली आहे... पुढे या लखलखीत सूर्यप्रकाशाला बालकवींनी ‘सोन्याची द्वारका’ अशीही उपमा दिली आहे. दिव्याचे झोत अरुण वसुधेच्या हृदयात ओततो आहे, अशी कल्पनाही या कवितेच्या अंतिम खंडात बालकवींनी केलेली दिसते.
आपल्या ‘संध्यारजनी’ या कवितेत बालकवींनी रात्रीच्या प्रकाशाची वर्णने केली आहेत...
‘उदयगिरीवर नवतेजाची शांत पताका ही!
की गंगेच्या शुभ्र जलाचा झोत वरी येई? ’
‘शुक्रोदय’ कवितेत रात्रीच्या प्रकाश आकाशाकडे पाहू बालकवींनी ‘तेजाची फुटली पेठ... दिव्यत्वाची लयलूट’ असे म्हटले आहे, तर ‘अनंत’ कवितेत... ‘अनंत तारा, नक्षत्रे ही अनंत या गगनात... अनंत दीप्ती, अनंत वसुधा, हे शशीसूर्य अनंत’ असे म्हटले आहे. इथे चित्ताला शांती देणारा विश्वाच्या अफाटतेचे दर्शन घडवणारा विलक्षण ज्ञानप्रकाश आहे.
बालकवींच्या या ‘अरुण’ कवितेने प्रभावित होऊन राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज यांनी या नावाच्या दोन कविता लिहिल्या आहेत. सूर्योदयाबाबत ते पहिल्या कवितेत म्हणतात... ‘की रजनीच्या उदरी दिसतो गर्भचि दिवसाचा’, तर दुसऱ्या कवितेत मात्र याच रंगांना अगदी वेगळ्या उपमा
दिल्या आहेत.
आपल्या भूपाळ्यांमध्येसुद्धा सूर्योदयाची अत्यंत विलोभनीय दृश्ये आहेत. ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या एका भूपाळीत म्हटले आहे, ‘तुझ्या कांतिसम सूर्यपताका पूर्वदिशी फडकती अरुण उगवला प्रभात झाली ऊठ महागणपती.’ दिवाळीच्या गाण्यात तर ‘लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’च आहे. हा प्रकाशोत्सव पुन्हा धुंडाळताना... ‘सप्तरंगांत न्हाऊन आली... आली माझ्या घरी ही दिवाळी!’ अशी रंगीत अवस्था होऊन जाते.

Monday, August 5, 2024

सार्वजनिक उत्सव हा अर्थव्यवस्थेचा कणा!

 सार्वजनिक उत्सव हा अर्थव्यवस्थेचा कणा!

(वैभव चाळके)
...
गेले काही दिवस समाज माध्यमांवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा वा नाही, याबाबत चर्चा रंगली आहे. या उत्सवाच्या वेळी होणारे ध्वनिप्रदूषण, उत्सवांसाठी मंडप घालतात त्याची होणारी अडचण आणि या उत्सवांच्या काही मंडपांतच कार्यकर्त्यांकडून केले जाणारे जुगार, नशापाणी अशी कारणे विरोध करणाऱ्यांकडून चर्चिली जात आहेत. या अनुषंगाने ज्येष्ठ अभ्यासक ‘कालनिर्णय’चे जयराज साळगावकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सर्वच सार्वजनिक उत्सव सुरू राहायला हवेत, अशी भूमिका मांडली. सार्वजनिक उत्सव हे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, असे ते म्हणाले.
...
आपल्या समाजात श्री गणेशाची आराधना शेकडो वर्षे होत आली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अठरा ओव्यांमध्ये ओंकारस्वरूप गणेशाचे वर्णन केले आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने करण्याचा प्रघात आहे. स्वातंत्र्य चळवळीत जेव्हा ब्रिटिशांनी जमावबंदी आदेश लागू केला होता, तेव्हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. तेव्हापासून गेली तब्बल सव्वाशे वर्षे महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. प्रथम स्वातंत्र्य चळवळीसाठी सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने पुढे सामाजिक अभिसरणाचे, कलागुणांच्या वाढीचे, छोट्या-मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन कोट्यवधी हातांना काम देण्याचे उद्दिष्ट साध्य केलेले दिसते. गेल्या काही वर्षांत या गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले आहे. या उत्सवाला भव्यपण आले आहे. श्री गणरायांच्या आगमन सोहळ्यापासून विसर्जन सोहळ्यापर्यंत कितीतरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात, मोठ्या गर्दीत पार पडताना दिसतात. या बदलत्या स्वरूपातील काही बाबींवर दरवर्षी काही प्रमाणात आक्षेप घेतले जातात. अर्थातच आक्षेप घेणाऱ्यांपेक्षा या उत्सवात सहभाग घेणाऱ्यांचे प्रमाण नेहमीच अधिक राहिलेले आहे आणि उत्तरोत्तर वाढते आहे. अलीकडच्या काळात मराठी माणसाच्या या सणात इतर भाषक आणि इतर धर्मीयसुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी होत असताना दिसतात.

जयराज साळगावकर याबाबत म्हणाले, मोठमोठे उत्सव ही समाजाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आपल्या देशात गणेशोत्सव, दुर्गापूजा, नवरात्रोत्सव, दहीहंडी, दिवाळी असे मोठमोठे सण दरवर्षी साजरे केले जातात. ते साजरे करताना समाजात मोठा उत्साह पाहायला मिळतो. केवळ आपल्या देशातच असे सण होतात असे नाही, अमेरिकेत, युरोपातसुद्धा मोठमोठे सण साजरे केले जातात. जगभरातील सर्वच देशांमध्ये सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. कारण माणूस हा उत्सवप्रेमी आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली समाजरचना उत्सवातून उभी राहिलेली दिसते. आपल्या अर्थशास्त्राचा हे मोठे उत्सव म्हणजे कणाच आहे. उत्सवांमुळे होणारी मोठी आर्थिक उलाढाल पाहता अर्थशास्त्राला सणांचे मॉडेल स्वीकारणे सोपे गेले आणि मग त्यातूनच अर्थव्यवस्था उत्सवांवर चालत असलेली पाहायला मिळते. अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला मोठ्या उत्सवांमध्ये हा अर्थशास्त्राचा भाग अत्यंत महत्त्वाचा वाटतो. आदिम काळापासून माणूस उत्सव साजरे करीत आलेला आहे. समाज जेव्हा शेतीवर अवलंबून होता तेव्हा शेतीत धनधान्य पिकले म्हणजे माणूस उत्सव साजरा करीत असे. त्याच्या नव्या गरजा, त्याच्या नव्या आशाआकांक्षा पूर्ण करण्याचा तोच कालावधी असे. नव्या वस्तू खरेदी करण्याची संधी माणसाला याच काळात मिळत असे. त्यामुळे या काळातच सगळे उत्सव साजरे केले जात असल्याचे पाहायला मिळते. आपल्या सगळ्या मोठ्या सणांकडे पाहिलेत म्हणजे तुम्हाला माणूस आपल्या नवनव्या गरजा या सणांच्या काळातच पूर्ण करीत असल्याचे दिसते. बाजारात नव्या गाड्या, नव्या फॅशनचे कपडे, नवे तंत्रज्ञान या सणांच्या पार्श्वभूमीवरच दाखल होत असते. कारण सणांच्या निमित्ताने माणूस अधिक पैसे खर्च करायला तयार होत असतो. नवनव्या गोष्टी खरेदी करण्यास तयार असतो. त्यामुळे आपल्याकडील सर्व उत्पादनस्रोत हे कोणत्या ना कोणत्या सणाशी जोडून असलेले आणि आपले अनेक उद्योग-व्यवसाय सणांच्या संदर्भात आखणी करून चालवले जात असलेले दिसतात. त्यामुळे मोठ्या भव्य स्वरूपात साजरे होणारे आपले सार्वजनिक उत्सव छोट्या-मोठ्या कारणासाठी बंद करणे योग्य नव्हे! ती अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवणारी, समाज रचनाच कोलमडून टाकणारी गोष्ट ठरेल. शेकडो उद्योग-व्यवसायातील लाखो करोडो लोकांना बेरोजगार करणारे ठरेल. केवळ आपला सार्वजनिक गणेशोत्सव उदाहरण म्हणून घेतला, तरी मूर्तीपासून देवपूजेच्या साहित्यापर्यंत आणि नैवेद्यापासून मनोरंजनाच्या क्षेत्रापर्यंत कितीतरी व्यवसायांना या काळात यानिमित्ताने चालना मिळालेली दिसते. मूर्तिकलेचा उद्योग वर्षभर सुरू असतो. कितीतरी कारागीर वेगवेगळ्या कलावस्तूंवर गणेशोत्सवासाठी वर्षभर मेहनत घेत असतात. आपल्याकडे चित्रपटांसाठी सेट उभारणारे जे लोक आहेत, त्यांच्यात कोकणातील आणि बंगालमधील कलावंतांचा सहभाग अधिक आहे. कारण या दोन प्रांतात अनुक्रमे सार्वजनिक गणेशोत्सव आणि सार्वजनिक दुर्गा उत्सव यांची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्या परंपरेत हे कलावंत घडलेले आहेत. सार्वजनिक उत्सवांनी कितीतरी कला जगवल्या आहेत. वाढवल्या आहेत आणि आजच्या समाज रचनेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. चित्रपटाचा विषय निघाला म्हणून सांगतो, आपल्या चित्रपटांनी आपल्या सणांना देशात सर्वदूर मान्यता दिली आहे. आपल्या समाजावर हिंदी चित्रपटांचा मोठा प्रभाव आहे. चित्रपटांमधून आपल्या सणांची कितीतरी गाणी सर्वत्र पोहोचली. लोकप्रिय झाली आणि त्यातून सण सार्वत्रिक झाले, असे दिसते.
...
जगभरात उत्सव
आपले अनेक उत्सव हे धर्माशी जोडलेले आहेत. जगभरात अशीच स्थिती दिसते. युरोप-अमेरिकेत अनेक चर्च मोठे उत्सव साजरे करतात. अन्य धर्मीयसुद्धा आपापले उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करताना दिसतात. याचे कारण समाजाला मोठ्या उत्सवांची गरज आहे आणि एकूण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे मोठ्या सणांची शक्ती निर्विवाद आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन अलीकडे ऑनलाइन पद्धतीने सामग्री विकणाऱ्या अमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्या मोठमोठे शॉपिंग फेस्टिवल आयोजित करीत असतात. त्यांचा आकार पाहिला म्हणजे फेस्टिवल अर्थात उत्सवांचे अर्थकारणातील महत्त्व सहज लक्षात येईल.
...
समाजधुरिणांनी आवाहन करावे!
उत्सवांमध्ये होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत साळगावकर म्हणाले, विविध सार्वजनिक उत्सवात ध्वनिप्रदूषण होते हे खरे आहे. त्यावर उपाययोजना करता येऊ शकतात. करायला हव्यात. सरकारने डीजेवर याआधीच बंदी आणली आहे. गणेशोत्सवातील कार्यकर्त्यांमध्ये जनजागृती करून आपण ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणू शकतो. ती मोठी अवघड गोष्ट नाही.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात जुगार खेळणे, नशाबाजी करणे या मुद्द्यांबाबत ते म्हणाले, सध्या अशा प्रकारे कोणी गैरवर्तन करत असेल, असे वाटत नाही. १९८०च्या दशकात हे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत होते. ती गोष्ट लक्षात आल्यावर आमचे बाबा-ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी विविध व्यासपीठांच्या माध्यमातून जनजागृती केली. गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. त्यानंतर या वाईट गोष्टींना उत्तम प्रकारे पायबंद बसला. आजही कोठे जर अनुचित गोष्टी घडत असतील, तर समाजातील धुरिणांनी पुढे येऊन आवाहन करायला हवे. अशा प्रकारच्या आवाहनाला कार्यकर्ते आणि तरुण चांगला प्रतिसाद देतात, हे यापूर्वीच लक्षात आले आहे.
रस्त्यावर मंडप घालून रस्ता अडवला जातो, असा एक आक्षेप घेतला जातो. याबाबत ते म्हणाले, नागरिकांना उत्सव हवा असतो. त्यामुळे नागरिक एकत्र येऊन उत्सव करतात. काही ठिकाणी जागेअभावी रस्त्यावर मंडप घातला जातो, हे खरे आहे; मात्र रस्त्याच्या एका बाजूला मंडप घालून दुसऱ्या बाजूने वाहनांसाठी जागा सोडली जाते. त्यातून सामंजस्याने लोक आपली वाहने बाहेर काढत असतात, असे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. बहुतांश ठिकाण लोक वाद न घालता समजुतीने मार्ग काढत असतात. अनेक जण तर स्वतःच या उत्सवात सहभागी झालेले असतात. सार्वजनिक उत्सवांमध्ये सहभाग घेणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे.
...
सामाजिक अभिसरणाचे व्यासपीठ
सार्वजनिक उत्सवाबाबतच्या चर्चेदरम्यान त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दासुद्धा अधोरेखित केला. ते म्हणाले, सार्वजनिक सण-उत्सव हे सामाजिक अभिसरणाचे एक अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ आहे. दिवाळी, रंगपंचमी, होळी अशा सणांमध्ये धर्म-जात विसरून लोक एकत्र येत असतात, याचा विचार केला जात नाही. या अर्थाने समाज म्हणून एकत्र राहण्यासाठी सण-उत्सव अत्यंत महत्त्वाचे आहेत.
...
मुंबई पोलिसांची कार्यक्षमता मोठी!
मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे यानिमित्ताने साळगावकर यांनी आवर्जून कौतुक केले. ते म्हणाले, मुंबईतील सार्वजनिक उत्सवांदरम्यान मुंबई पोलिसांची कामगिरी नेहमीच वाखाणण्यासारखी राहिली आहे. मुंबई पोलिसांच्या या कार्यक्षमतेचे कौतुक करायला हवे. मोठे उत्सव समाजाला विविध अंगांनी उपयोगी पडत असतात, हे आपण पाहिलेच; पण ते उत्सव सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडण्यासाठी पोलिस जे नियोजन करतात, जी मेहनत घेतात, ती अत्यंत महत्त्वाची आहे.

(3 आॅगस्ट 2024 रोजी सकाळच्या अवतरण पुरवणीत प्रकाशित)  

Thursday, December 28, 2023

तरुणांसाठी तुकाराम...................... आकाशवाणीसाठी लिहिलेले लेख

 तरुणांसाठी तुकाराम


संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायासह सारे जण जगद्गुरू असे संबोधत आले आहेत. गुरू म्हणजे आपल्या आकलनापलीकडच्या गोष्टी सुलभ करून आपल्या जीवनाला नवा मार्ग देणारा मार्गदर्शक होय. त्याच्या म्हणण्यावर आपण निःसंशय विसंबून राहू शकतो. तुकोबांची शेकडो वचने लाखो जणांना कसं जगावं, कसं वागावं, कसं राहावं, हे सांगत आली आहेत. अगदी सुरुवातीच्या काळापासून पाठ्यपुस्तकातून आपल्याला तुकोबांच्या अभंगांचा परिचय होतो. मात्र त्यानंतरचा उमेदीचा काळ आपण तुकोबांना आध्यात्मिक संत म्हणून काहीसे बाजूला ठेवतो. मग वय उताराला लागलं की, पुन्हा एकदा तुकोबांच्या गाथेकडे वळतो. हा सार्वत्रिक अनुभव आहे. पण तारुण्याच्या काळात आपल्याला पडणाऱ्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे तुकोबाच्या गाथेत आढळतात, असं म्हटलं तर ते अनेकांना खरं वाटणार नाही. पण त्याचा अनुभव घेतला तर हे विधान निःसंशय सत्य आहे, हे लक्षात येईल. आजच्या तरुणांना मार्गदर्शक ठरतील, असे अभंग गाथेत सापडतात का, असा शोध घेऊन एखादे पुस्तकच लिहिता येईल.
तुकारामांच्या एका अभंगात ते म्हणतात,
शेत आले सुगी... सांभाळावे चारी कोन... पीक आले परी... केले पाहिजे जतन...
शेत सुगी आली की चारी बाजूनं सांभाळावं लागतं. आलेलं पीक जतन करून जोपासून ते वेळीच घरात आणावं लागतं. तसं केलं नाही तर शेतकऱ्याच्या साऱ्याच मेहनतीवर पाणी फिरतं, असे सांगणाऱ्या या ओळी आहेत. त्यांचा काव्यर्थ, जे जे पीक हाती आलं आहे, ते ते सांभाळून त्याचा उपभोग घेतला पाहिजे, असं सांगतो. तारुण्यात अंगात शक्ती येते. या शक्तीचा उपयोग भल्यासाठी, चांगल्यासाठी करायला हवा; अन्यथा हे शक्तिरूपी पीक म्हणजे तारुण्यातली ताकद भलत्याच कामाला लागण्याची शक्यता असते. म्हणून तरुणांनी या काळात संयमानं, हुशारीनं, चतुराईनं वागून आपल्या जीवनाचे भलं कसं होईल, हे पाहायला हवं, असा संदेश या ओळी देत असतात. तो समजून घेण्याची कुवत कदाचित तरुणांमध्ये नसेल तर ते समजून सांगण्याची जबाबदारी ज्येष्ठ पिढीनं घ्यायला हवी. सुगीच्या पिकावर जशी जनावरं आणि पक्षी येतात आणि नुकसान करतात, तशी मोहरूपी जनावरं तारुण्य नासवायला टपून बसलेली असतात.
तुकारामांचे आणखी एक सुंदर वचन आहे,
करविली तैसी... केली कटकट... वाकडे की नीट... देव जाणे...
तुकाराम महाराज म्हणतात, मी मला जसं जमलं तसं देवाचं भजन केलं आहे, ते योग्य की अयोग्य ते देव जाणतो. ते मला माहीत नाही. मी मात्र हे मनापासून केलं आहे. तरुणांनी आपल्या हाती घेतलेलं काम आपल्या परीनं चोख करायला हवं. अनुभव आणि ज्ञानाच्या मर्यादा असल्यामुळे कदाचित ते काम सुयोग्य आणि ज्याला आपण शतप्रतिशत योग्य म्हणतो, तसं होईलच असं नाही; पण तसं एखादं काम होत नाही म्हणून ते न करताच सोडून देणे, हे तारुण्याला शोभणारं नाही. तारुण्यात आपल्या परीनं जीव ओतून तऱ्हेतऱ्हेची कामं करत राहिले पाहिजे. त्यातूनच नवं काही करण्याची ऊर्मी पुन्हा पुन्हा निर्माण होत राहते. त्यातून कधीतरी नवं काहीतरी साध्य होऊ शकतं. गीतेत भगवंत म्हणतात, हाती घेतलेल्या कर्मात दोष आहे म्हणून ते त्यागू नये. सर्वच कामात प्रारंभी दोष असतात. तुकाराम हेच सांगतात.
त्यागाचं, कष्टाचं महत्त्वही तुकाराम अचूक सांगतात...
एका बिजा केला नास... मग भोगिले कणीस...
अलीकडे मुले पास्टफूड आणि अवेळीच्या खाण्यामुळे आपल्या आरोग्यशीच खेळत असतात. अशांना तुकारामांचे पुढील वचन वारंवार ऐकवलं पाहिजे...
काही नित्यनेमाविण... अन्न खाय तोचि श्वान
अशी कितीतरी वचनं आहेत. शोधा म्हणजे सापडतील.

...
तिसऱ्या असत्यापासून सावधान!

असत्याचेही प्रकार असतात. काही धडधडी असत्ये असतात. वाचणाऱ्याला-ऐकणाऱ्याला ती असत्ये आहेत हे वाचताक्षणी, ऐकताक्षणी लक्षात येतं. दुसरा प्रकार आहे अर्धसत्याचा. म्हणजे इथे ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका घेतलेली असते. जे सत्य आहे तेवढं सांगायचं आणि त्यामागे मोठं धडधडीत असत्य लपवायचं, असा हा प्रकार आहे.
धडधडीत असत्य आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. ‘अभ्यास झाला’,  ‘मी पहिल्यापासून मेहनती’,  ‘आपल्याला नाही बाबा खोटं बोलता येत’ अशी  धडधडीत असत्ये आपण अनेकदा जन्माला घातलेली आहेत, हे काय सांगायला हवं.
दुसरं असतं अर्धअसत्य. ते सत्य म्हणून खपवलं जातं. पुढे जाऊन असं म्हणता येईल की, ते खपवण्यासाठीच जन्माला घातलं जातं. महाभारतातील एक युद्धप्रसंग सुप्रसिद्ध आहे. पांडव आणि कौरव यांचं युद्ध टिपेला पोहोचलेलं असतं. कौरव विजयी होतात की काय अशी स्थिती निर्माण झालेली असते. अश्वत्थामा निकरानं लढत असतो. आता तो लवकरच पांडवांवर विजय मिळवणार अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना नेहमी सत्य बोलणाऱ्या धर्मराजालाच खोटं बोलायला सांगितलं जातं. तो खोटं बोलणार नाही. असं सांगतो, तेव्हा हा दुसरा मार्ग वापरायचं ठरतं. धर्मराज मोठ्यानं आवाज देतो, ‘अश्वत्थामा मेला....!’ पुढे तो ‘नरो वा कुंजरो वा’ असं म्हणतो. म्हणजे माणूस अश्वत्थामा मेला किंवा अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला ते माहीत नाही. हे अर्धअसत्य होय. हे वरकरणी सत्य असतं; पण आपल्या पोटात फार मोठं असत्य लपवत असतं.
तिसरे असत्य म्हणजे आकडेवरीनं सत्याचा भास निर्माण करणारं असत्य... कलियुगात या तिसऱ्या असत्याला चांगले दिवस आले आहेत.
या तिसऱ्या असत्यापासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे.
ह असत्या आपल्या वाटेत अनेकदा येत असतं.
तऱ्हेतऱ्हेच्या आॅफर घऊन येणारे लोक हे तिसरं असत्य बाळगून असतात. ते त्यांचं हत्यारच असतं. या हत्यारानं ते रोज कुणा ना कुणाला जखमी करत असतात. अनेकांना कायमचं अधू- अपंग करून टाकतात.
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असं एक काव्यात्म वाक्य आहे. त्या चालीवर प्रत्यक्षाहून तक्ता संुदर अशी या असत्याची गत असते.
शेअर मार्केमध्ये गुमतवणूक करा सांगणारे.... पैसे दुप्पट-तिप्पट करू सांगणाऱ्या कंपन्या... आपला माल तुमच्या गळी उतरवताना तुम्हाला सोयीचे तक्ते दाखवणारे अनेक जण या तिसऱ्या असत्याचा अधार घेत असतात.
म्हणून कोणीही तक्त दाखवू लागले की सावध झालं पाहिजे. फिल्टर लावून काढलेल्या छायाचित्रापेक्षा प्रत्यक्ष व्यक्ती वेगळी असते, तसाच हा प्रकार असतो. म्हणून कोणीही तक्ता दाखवला की त्या विषयावरचे अनेक तक्ते पाहून खात्री करा... सहज मिळालेल्या तक्त्यावर विसंबून पावलं उचलाल, तर घात ठरलेलाच आहे, हे लक्षात घ्या.   
अगदीच ढोबळ उदाहरण द्यायचं तर शेअर बाजाराचा निर्देशांक सतत वाढतच असतो. त्याचे कोट्यवधी तक्ते दाखवता येतील, पण या सततच्या वाढीत तो अधूनमधून झुकून शहण्यांना नमस्कार करतो आणि कधीकधी शहण्यांसह साऱ्यांनाच सोबत घेऊन धारातीर्थी पडतो, हे कटू सत्य हे तक्ते दाखवत नसतात. म्हणून मग आपला गैरसमज होतो.

...
शुद्ध हवेसाठी...

हवेचा स्तर दरवर्षी खालवतो आहे. दिवाळीपूर्वी मुंबईच्या हवेतील प्रदूषणानं उच्चांकी पातळी गाठली होती. त्यामुळे अनेकांना श्वसनाच्या विकारानं ग्रासलं. खडबडून जागा झालेल्या प्रशासनानं मग नानाविध उपाययोजना हाती घेतल्या. त्याचा परिणाम म्हणून हवेचा स्तर सुधारला. मात्र उच्च न्यायालयानं दिवाळीत फटाक्यांवर कालमर्यादा आणली असताना नागरिकांनी जोरदार फटाकेबाजी करत पुन्हा हवेचं वाटोळं केलं.
अलीकडच्या काळात नानाविध कारणांनी आपलं वातावरण बिघडतं आहे. शहरांमध्ये हिरवळीचा अभाव, मोठ्या प्रमाणात होत असलेली बांधकामं, कारखान्यांतून होणारं प्रदूषण यामुळे जगणं असह्य झालं आहे. खराब हवेत कसं जगावं, हा एक नवाच प्रश्न दिवसेंदिवस उग्र होऊ लागला आहे.
पुराण काळापासून मध्ययुगीन संतपरंपरेपर्यंत आपल्याकडील जाणत्या लोकांनी निसर्गाशी साहचर्य ठेवत जगण्याचा सल्ला आपल्याला दिला आहे; पण या पारंपरिक शहाणपणाकडे दुर्लक्ष करून आणि विकासाच्या अतिरेकी कल्पनांना बळी पडून आपण प्रथम निसर्गाचं नुकसान केलं आणि त्याचा परिणाम म्हणून आपलंच आरोग्य धोक्यात घातलं आहे. आदर्श जीवनाची भारतीय कल्पना ही पाश्चात्यांच्या कल्पनेहून निराळी आहे, हेच विसरून गेल्यामुळे आपल्यासमोर आता पाश्चात्यासारखेच प्रश्न उभे राहू लागले आहेत. मोठी विद्वत परंपरा लाभलेल्या आपल्या देशाचं हे मोठंच दुर्दैव होय.

वेद-पुराणांपासून आपल्याकडे निसर्गपूजा मांडलेली दिसते. कृषी संस्कृतीत निसर्ग सहजीवन ही अपरिहार्य अशी गोष्ट होती. आजही गाव-खेड्यांतल्या कोणत्याही शेतकऱ्यासोबत एक दिवस घालवला तरी माणूस निसर्गाशी केवढा जोडलेला आहे आणि निसर्गाकडून घेता घेता तो त्याला देण्याची भूमिका कशी सहज वटवत आला आहे, हे लक्षात येईल. आपल्या पाठ्यपुस्तकांतून आपल्यावर हा संस्कार झालेला आहेच. पाठ्यपुस्तकातल्या तुम्हाला आठवणाऱ्या कोणत्याही कविता आणि कोणतेही गद्यवेचे आठवू लागलात, तर तुम्हाला त्यातील निम्म्याहून अधिक हे निसर्ग आणि मानव याच्या साहचर्याचे दर्शन घडवणारे असल्याचं लक्षात येईल. असं असताना आपण निसर्गद्वेष्टे कसे झालो, हा खरे तर संशोधनाचाच विषय आहे. कदाचित खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या रेट्यात अर्थकारणानं आपल्या जगण्याचा ताबा घेतल्यामुळे हे सारं झालं असावं, असं म्हणायला वाव आहे. अर्थात यावर जाणत्याने अधिक प्रकाश टाकायला हवा. एक गोष्ट मात्र खरी आहे, या नव्या बदलांना शरण जाताना आपलंही काही चुकलं आहे. आपण सजगता दाखवली असती किंवा सजगता दाखवणाऱ्या चार दोन एकाकी शिलेदारांना पाठिंबा दिला असता तर आज कदाचित श्वास कोंडण्याची वेळ आपल्यावर आली नसती.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ म्हणणारे आपण ‘जो जे वांछील तो ते लाहो’ असा जीवनमंत्र घेऊन जगणारे आपण इथवर कसे येऊन ठेपलो याचं आपण चिंतन करायला हवं... आणि नव्या पिढीसाठी हवेत थोडा ऑक्सिजन शिल्लक राहील म्हणून आता तरी आपापल्या परीनं धडपड करायला हवी. अन्यथा कोविड काळात ऑक्सिजन विकत घेऊन जगण्याची वेळ आली आणि तो न मिळाल्यानं काहींना जीव गमावा लागला तशी वेळ उद्या कदाचित आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात येऊ शकते. तसं व्हायला नको असेल तर आतच आपण सावध झालं पाहिजे.

हवा प्रदूषणास कारणीभूत ठरणारे मोठमोठे घटक कदाचित आपल्या हाती नसतील. अनेक गोष्टी आपल्या आपल्या कुवतीच्या पलीकडच्या असतील...  तरीही काही गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. एक छोटं पाऊल नक्कीच पुढे टाकू शकतो... फटाक्यांचा मोह तर आपण नक्कीच सोडून शकू... शिवाय सव्वाशे-दीडशे कोटी लोकसंख्येपैकी शंभर कोटी लोकांनी दोन झाडं लावायची ठरवली तरीही दोनशे कोटी झाडं भारतभूमीवर तरारून उभी राहू शकतात. सावध व्हा! श्वास गुदमरण्यापूर्वी सावध व्हा! इतरांना सावध करा... स्वच्छ हवा हा आपला हक्क आहे!


प्रश्न संपलेत! का?
व्याख्यानानिमित्त मी विविध महाविद्यालयांत आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये जात असतो. दीड-दोन तासांचं दीर्घ व्याख्यान संपल्यानंतर मी हमखास 'कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा' असं विचारत असतो. व्याख्यानातून सुटून गेलेला एखादा मुद्दा अधिक स्पष्ट करावा, एखाद्याच्या मनात शंका असेल तर तिचं निरसन करावं आणि त्याचसोबत आपल्याला आव्हान देणारा एखादा प्रश्नही श्रोतृवर्गामधून मिळवावा आणि आपल्या अभ्यासाला नवी दिशा मिळावी, हा त्यामागचा मुख्य हेतू असतो. पण अनेकदा असा अनुभव येतो की, प्रश्नोत्तरासाठी राखून ठेवलेल्या दहा मिनिटांपैकी पहिली दोन-तीन मिनिटं उलटली की सर्वांचे प्रश्न संपलेले असतात. मग प्रश्न विचारण्यासाठी श्रोत्यांना उद्युक्त करावं लागतं. पुन्हा पुन्हा आवाहन करावं लागतं.
हे असं का होतं याचा विचार केला, तर दोन-तीन कारणं प्रामुख्यानं आढळतात.
एक म्हणजे आपल्याला शाळा-कॉलेजांपासून प्रश्न न विचारण्यासाठीच घडवलं जातं. वर्गात एखाद्या विद्यार्थी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत असेल, तर त्याला शांत केलं जातं. खूप प्रश्न विचारल्यास दरडावलं जातं, हे आपलं पाहत आलेलो आहोत. त्यामुळे शक्यतो प्रश्न विचारू नयेत, अशी आपली वृत्ती आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे प्रश्न विचारायचे असतील तर विचार करावा लागतो. आपल्याकडे अनेक लोक ऐकून सोडून द्या, अशा वृत्तीचे असतात. डोक्याला त्रास करून घेऊ नये  असं त्यांचे मत असतं. या लोकांना आपण सोडून दिलं तरी, काही लोक मात्र प्रश्न निर्माण झाले तरी विचारत नाहीत, ते मनात दडवून टाकतात, ते विचारण्याची हिंमत त्यांच्यात नसते, बोलत असताना आपलं काही चुकलं तर काय करावं, आपला अपमान होईल का, अशा शंका त्यांच्या मनात येत असतात. या गटासाठी अनेकदा वक्त्याचा जीव तुटत असतो.
कोणत्याही क्षेत्रात काम करणारा वक्ता हा त्या क्षेत्रातला काही एक अभ्यास केलेला मनुष्य असतो. तो एखाद्या विषयावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकतो. म्हणजे तो विशिष्ट विषय तुम्हाला नेमका कळवा यासाठी प्रयत्न करीत असतो. एखाद्या गोष्टीवर नेमका प्रकाश पाडला गेला नसेल तर प्रश्नोत्तराच्या निमित्तानं तो पुन्हा त्या विषयावर अधिक विवेचन करू शकतो आणि अंधकारात राहिलेला एखादा कोपरा पुन्हा उजळू शकतो. आपल्या मनात जेव्हा एखादा प्रश्न उभा राहतो, तेव्हा हा एक कोपरा अंधारातच राहिला आहे, अशी ती जाणीव होत असते. तोही उजळून द्या, अशी आपण त्या वाक्याला विनंती करायची असते. वक्त्यापाशी जर त्या कोपऱ्यातल्या लाईटचे बटन असेल तर तो क्षणार्धात तो कोपरा उजळून देतो. कधीतरी असं होऊ शकतं की आपल्या मनातल्या कोपऱ्यात साचलेला अंधार वक्त्याला दूर करता आला नाही. पण असं क्वचित होतं. पण समजा असं झालंच तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांवर असा एक अंधारा कोपरा आपल्या व्याख्यानानंतर शिल्लक आहे त्याची जाणीव होऊन वक्ता त्या दृष्टीने विचार करू लागतो.... अभ्यास करू लागतो आणि भविष्यात त्याच्यासमोर येणाऱ्या अशा प्रश्नाच्या वेळी तो त्या शंकेचेसुद्धा निरसन करू शकतो. प्रश्न विचारल्यामुळे अशा प्रकारे तुमचा फायदा होत असतो, तुमच्या ज्ञानात भर पडता पडताच वक्त्याच्या ज्ञानातसुद्धा भर पडत असते. म्हणून कोणताही चांगला वक्ता श्रोत्यांकडून चांगल्या प्रश्नांची अपेक्षा करीत असतो. तेव्हा यापुढे कोणतीही व्याख्यानंतर तुम्हाला पडलेला प्रश्न विचारायला कचरू नका. क्वचित प्रसंगी तुम्हाला प्रश्नांची सुयोग्य मांडणी करता येणार नाही. ती सरावानंच करता येते आणि प्रश्न विचारण्याचा सराव म्हणजेच प्रश्न विचारणे आहे, हे लक्षात घेतलंत म्हणजे तुम्हाला मला काय म्हणायचं आहे हे सगळं लक्षात येईल. आजपासून पुढे जेव्हा केव्हा मी किंवा माझ्यासारख्या कोणताही वक्त्यानं तुम्हाला तर प्रश्न विचाराची संधी दिली, तर आपल्या मनातले प्रश्न दडपून टाकू नका. ते मोकळ्या मनाने उपस्थित करा.

(आकाशवाणीवर १३,१४,१५,१६ जानेवारी २०२३ ला प्रकाशित झालेले लेख)

मराठी शायरी ः भाऊसाहेब पाटणकर

 मराठी शायरी ः भाऊसाहेब पाटणकर

वैभव चाळके


उर्दूत लोकप्रिय असलेली शायरी मराठीत लिहीत असताना भाऊसाहेबांनी तिचा आत्माच कसा मराठी राहील याची काळजी घेतली. याशिवाय शायरीचे तंत्र त्यांनी नेमके साध्य केले आहे. रचनेतील रसिकाला धक्का देण्याचे तंत्र त्यांनी इतके चोख अवगत केले की, तेच त्यांच्या यशाचे गमक ठरले. २८ डिसेंबर हा भाऊसाहेबांचा जन्मदिवस. त्यानिमित्त...


मराठी कवितेच्या महामार्गात काही नितांत सुंदर वळणे आहेत. रॉय किणीकरांच्या रुबाया आणि भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी ही त्यातील दोन महत्त्वाची उदाहरणे. रसिकतेचा सोपान चढत असताना भाऊसाहेबांची शायरी ‘भेटली’ म्हणजे जीव अगदी हरखून जातो. महाविद्यालयात शिकत असताना मुंबई महानगरात कुठे कुठे होणाऱ्या काव्यमैफलींना हजेरी लावण्याच्या काळात मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापटांपासून संदीप खरे यांच्यापर्यंत नानाविध कवींची सादरीकरणे ऐकायला मिळाली. अशाच एका मैफलीनंतर रात्री परतताना एक ज्येष्ठ मित्र म्हणाले, ‘‘तू भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी वाचली आहेस का? नसली वाचलीस तर नक्की वाच. तुला आवडेल.’’ तो सल्ला शिरोधार्य मानून दुसऱ्या दिवशी ग्रंथालयातून भाऊसाहेब पाटणकरांचा संग्रह आणला आणि वाचून काढला. तेव्हा चढलेली नशा आज २५ वर्षे होऊन गेली तरी उतरलेली नाही... ती कधी उतरेल, असे वाटत नाही!


भाऊसाहेब पाटणकर यांनी मराठीत लिहिलेली शायरी हे मराठी साहित्यातील एक सुंदर लेणे आहे. मराठी गजलेपेक्षा ही शायरी वेगळी आहे. सुरेश भटांनी ज्याप्रमाणे मराठी गजल लिहिली, तशी मराठी शायरी लिहिण्याचे काम भाऊसाहेब पाटणकर यांनी केले. येथे मराठी हा भाषावाचक शब्द नसून तो संस्कृतीवाचक, गुणवाचक शब्द आहे. ‘मठोमती मुंबाजींना कीर्तने करू द्या... विठू काय बेमानांना पावणारा नाही’ असे सुरेश भट म्हणतात, तेव्हा गजलेतील तो शेर केवळ मराठीत आहे, म्हणून मराठी नाही. तो मराठी संस्कृतीतून निर्माण झालेला वाक्प्रचार घेऊन येतो. म्हणून सुरेश भटांची गजल ही अस्सल मराठी गजल आहे. अगदी त्याचप्रमाणे उर्दूत लोकप्रिय असलेली शायरी मराठीत लिहीत असताना भाऊसाहेबांनी तिचा आत्माच कसा मराठी राहील याची काळजी घेतली. याशिवाय शायरीचे तंत्र त्यांनी नेमके साध्य केले आहे. रचनेतील रसिकाला धक्का देण्याचे तंत्र त्यांनी इतके चोख अवगत केले की, तेच त्यांच्या यशाचे गमक ठरले. काही हिंदी चित्रपट आणि काही गाणी जशी आपण पुन्हा पुन्हा ऐकली तरी आपल्याला त्यांचा कंटाळा येत नाही किंबहुना पुन्हा पुन्हा नवा आनंद देण्याचे काम त्या कलाकृती करतात, त्याच गुणवत्तेची ही शायरी आहे. यातली भाषा इतकी सोपी... इतकी प्रासादिक आहे की, कोणत्याही सामान्य वाचकाला या शायरीतील अर्थ सहज उलगडतो... भावतो... आणि दाद द्यायला भाग पाडतो.


इष्काच्या गोष्टी

एरवी शायरीतील प्रेमिक म्हणजे पुन्हा पुन्हा प्रेयसीच्या पायाशी बसून प्रेमाची आळवणी करणारा असतो. भाऊसाहेबांचा प्रेमिक मात्र आपला सन्मान सांभाळून प्रेम करणारा आणि तशीच वेळ आली तर त्या सन्मानासाठी प्रेम उधळून लावणारा आहे. त्यांनीच म्हटले आहे,

‘हसतील ना कुसुमे जरी ना जरी म्हणतील ये

पाऊल ना टाकू तिथे बाग ती अमुची नव्हे

भ्रमरा परी सौंदर्य वेडे, आहो जरी ऐसे अम्ही

इष्कातही नाही कुठे, भिक्षुकी केली अम्ही’

मराठी माणूस मोडून पडेल; पण वाकणार नाही, असे त्याचे जे वैशिष्ट्य सांगतात, ते इथे बेमालूमपणे सहज काव्यात उतरले आहे.

...

कल्पनेच्या  उंच भराऱ्या

कल्पनाविलास हा भाऊसाहेबांच्या काव्याचा अगदी खास गुण आहे. त्यांच्या अनेक रचनांमध्ये तोंडात बोट घालायला लावणाऱ्या कल्पनांचा खजिना आपल्याला सापडतो. जीवन व्यवहार आणि जीवन तत्त्वज्ञान हे त्यांचे चिंतनाचे विषय आहेत. ‘जीवन’ या रचनेत जीवनाच्या कठोर वास्तवाबद्दल त्यांनी म्हटले आहे...

‘सारे मला विसरोत, त्याचे वाईट ना वाटे मला

वाटते वाईट, त्यांना विसरता ये ना मला

वाचला वेदांत आणि क्षणमात्र त्यांना विसरलो,

दोस्तहो, दुसऱ्या क्षणी मी वेदांत सारा विसरलो’

साने गुरुजी यांनी त्यांच्या एका कवितेत ‘फक्त माझे अश्रू नको येऊ देवा, हाचि ठेव ठेवा जन्मभरी’ असे म्हटले आहे. भाऊसाहेबांनी म्हटले आहे...

‘काय माझ्या आसवांनी काय मज नाही दिले

ते दिले जे ईश्वराने योग्यासही नाही दिले’

आपल्या इथल्या जीवनाबद्दल ते इतके समाधानी आहेत की, त्यांना या जीवनापुढे स्वर्गही फिका वाटतो आणि मग त्यांच्यातील मिश्कील शायरसुद्धा याविषयी टिप्पणी करतो...

‘आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही

एकही ना चीज इथली घेऊन गेलो आम्ही 

तोही असो आमच्यासवे आणिला ज्याला इथे

भगवान अरे तो देह मी टाकून गेलो इथे’

...

शायरीतील विनोद


भाऊसाहेबांनी त्यांच्या शायरीतून विनोदाची अशी पखरण केली आहे की, आपण प्रसन्न होऊन जातो. रोजच्या व्यवहारातील छोट्या-छोट्या गोष्टीतून त्यांनी विनोद निर्माण केला आहेच; पण थेट मृत्यूशीही पंगा घेतलेला दिसतो.

‘चंद्रमा हासे नभी शांत शीतल चांदणे

आमच्या आहे कपाळी अमृतांजन लावणे

नसतो तसा नाराज मी

आहे परी नशिबात आपल्याच हाती लावणे’

किंवा

‘पत्रे तिला प्रणयात आम्ही खूप होती धाडली

धाडली होती अशी की नसतील कोणी धाडली

धाडली मजला तिनेही काय मी सांगू तिचे

सर्व ती माझीच होती एकही नव्हते तिचे’

किंवा

‘मृत्युची माझ्या वदंता सर्वत्र जेव्हा पसरली

घबराट इतकी नर्कलोकी केव्हाच नव्हती पसरली

प्रार्थति देवास, म्हणती सारे आम्हाला वाचवा

वाचवा अम्हास आणि पावित्र इथले वाचवा’

किंवा

‘तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खूश मी

आज पण कळले मला ती ऐसेच बघते नेहमी’

किंवा

‘भास्करा, येते दया मजला तुझी आधीमधी

पाहिली आहेस का तू, रात्र प्रणयाची कधी’

आणि मग सूर्य त्यावर शाहिराला उत्तर देतो...

‘आम्हासही या शायराची कीव येऊ लागते

याच्या म्हणे प्रणयास याला रात्र येऊ यावी लागते’

ना म्हणू की इष्क त्याला आहे जराही समजला

इष्कातही दिवसास की जो रात्र नाही समजला’

...

ईश्वराशी संवाद


संत तुकारामांनी 'सुख जवापाडे आणि दुःख पर्वताएवढे' असे सांगून ठेवले आहे. भाऊसाहेबांनी तेच शायरीत कसे सांगितले आहे पाहा...

‘भगवंत तुला जर हाय ऐसे नाव असते लाभले

आम्हासही कोटी जपाचे पुण्य असते लाभले.

पाहुनी हा जपयज्ञ तुजला संतोष असता वाटला

आम्हासही रडण्यात नुसता मोक्ष असता लाभला’

ज्ञानेश्वरांची चराचरांत ईश्वर असल्याची कल्पना मनात आणा आणि मग भाऊसाहेबांच्या या चार ओळी ऐका.

‘तुमचा आहे अंश भगवान मीही कुणी दुसरा नव्हे

लोळण्या पायी तुझ्या तुमचा कोणी कुत्रा नव्हे

हे खरे की आज माझे प्रारब्ध आहे वेगळे

ना तरी आपणास भगवंत काय होते वेगळे’

‘यदा यदाही धर्मस्य’ हे आपणा सगळ्यांना माहिती आहे. भाऊसाहेबांनी ते तिरकस पद्धतीने मांडले आहे. ते म्हणतात...

‘निर्धारण्या दृष्टास तुजला त्रास घ्यावा लागला

देह घ्यावा लागला, अवतार घ्यावा लागला’

याशिवाय जीवनाला गाडीची उपमा देऊन त्यांनी मांडलेले शेर मुळातून वाचण्यासारखे आहेत. इष्क, शृंगार किंवा प्रेम याबद्दलच्या त्यांच्या रचना तेव्हाही लोकप्रिय झाल्या आणि आजही कवितेच्या रसिकांमध्ये लोकप्रिय होऊन राहिलेल्या आहेत. भाऊसाहेबांची प्रेम करण्याची एक स्वतःची रीत आहे आणि ती कुणाही रसिकाला मोहात पाडणारी आहे.

‘दोस्तहो, हा इष्क काही ऐसा करावा लागतो

ऐसे नवे नुसताच येथे जीव द्यावा लागतो

वाटते नागीन ज्याला खेळण्यासाठी साक्षात हवी

त्याने करावा इष्क येथे छाती हवी मस्ती हवी

ना म्हणून इश्कातले या सौंदर्य त्याला समजले

झाल्यावरी बरबाद ज्याला बरबाद झालो समजले’

...

लाखमोली संपदा

जिंदादिल, दोस्तहो, मराठी मुशायरा, मराठी शायरी आणि मैफिल ही त्यांची शायरीची पुस्तके प्रकाशित झाली. देशभर नानाविध ठिकाणी त्यांनी मैफली सादर केल्या. एक निष्णात वकील, सहा वाघांना लोळविणारे नेमबाज शिकारी आणि त्याच एकाग्रतेने रसिकाच्या वर्मा आपल्या शेरोशायरीतून नेम धरणारे भाऊसाहेब पाटणकर हे मराठी काव्याला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे.

सरते शेवटी त्यांना त्यांच्याच शैलीत अभिवादन...

वाचली ही शायरी, गुणगुणलोही लाखदा

ही मराठीच्या घरातील लाखमोली संपदा

...

(काही अंश दैनिक सकाळमध्ये २८ डिसेंबर २०२३ रोजी प्रकाशित)

Monday, November 27, 2023



वंचितांचा शिक्षणदूत नीलेश निमकर


इं  ग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्राबल्य वाढते आहे. नव्या पिढीला परदेशात जाण्यासाठी घडवणे हेच जणू शिक्षणाचे उद्दिष्ट आहे की काय, असे वाटू लागले आहे. असे असताना ग्रामीण भागातील वंचितांसाठी, दुर्गम भागातील आदिवासी, वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी धडपडणाऱ्या नीलेश निमकर यांचे काम नजरेत भरते. या कामात आलेल्या अनुभवांच्या आधारे आपले शिक्षणचिंतन मांडणारे त्यांचे महत्त्वाचे पुस्तक म्हणजे ‘शिकता- शिकवता’. या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाचा डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथाचा पुरस्कार मिळाला आहे. उद्याचा भारत उभारण्यासाठी खरे काम व्हायला हवे, ते शिक्षणक्षेत्रात. म्हणूनच अशा व्यक्तींच्या कार्याची दखल घ्यायला हवी. 

नीलेश निमकर हे ‘क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट’ अर्थात ‘क्वेस्ट’ या संस्थेचे संस्थापक-संचालक आहेत. शिक्षण क्षेत्रात गेली २५ वर्षे कार्यरत असलेल्या निमकर यांना बालशिक्षणात विशेष रस आहे. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण आणि शिक्षकांचे प्रशिक्षण या क्षेत्रात त्यांचे विशेष योगदान आहे. अभ्यासक्रम विकासाच्या क्षेत्रातही त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. मोठमोठ्या शिक्षणसंस्थांमध्ये त्यांनी सल्लागार म्हणून काम केले आहे. ते मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचे. आता कामासाठी पालघर तालुक्यातील वाडा येथे स्थानिक आहेत. त्यांचे शिक्षण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये झाले; मात्र चित्रकलेच्या आवडीतून ते आदिवासी पाड्यांवर गेले आणि अनुताई वाघ यांच्या कामाचा त्यांना परिचय झाला. तेथे रमेश पानसे यांच्या ‘ग्राममंगल’मध्ये त्यांनी आपल्या या क्षेत्रातील कामगिरीची सुरुवात केली. तेथे त्यांनी अनेक अभिनव उपक्रम राबवले. त्या अनुभवांतून पुढे त्यांनी ‘क्वेस्ट’ संस्थेची २००७ मध्ये स्थापना केली आणि तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या नावीन्यपूर्ण पद्धती आणि आगळेवेगळे उपक्रम राबवायला सुरुवात केली. पूर्व प्राथमिक ते आठवीपर्यंतच्या मुलांसाठी भाषा, गणित, विज्ञान हे विषय शिकवण्याच्या पद्धतींवर त्यांनी विशेष काम केले. त्यासाठी विविध अभ्यासक्रम तयार केले. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या संस्थेने चालवलेल्या अभ्यासक्रमाला देशभरातून प्रतिसाद मिळाला होता. महाराष्ट्र सरकारच्या ‘आकार’ या बालशिक्षण अभ्यासक्रमाच्या रचनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ‘लिटरसी रिसर्च इन इंडियन लँग्वेज’ या टाटा ट्रस्ट आणि अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या उपक्रमासाठी निमकर यांच्या संस्थेने भाषा संशोधनाचा संपूर्ण भार उचलला. लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्यावर मुलांचे जे शैक्षणिक नुकसान झाले ते नेमके किती आणि कसे झाले आहे आणि ते भरून काढण्यासाठी शिक्षकांनी काय करायला हवे, या विषयावर त्यांनी शोधनिबंध सादर केला. ‘शिकता शिकवता’ या पुस्तकापूर्वी त्यांनी लहान मुलांसाठी चित्रमय पुस्तके लिहिली आहेत. आता त्यांनी ग्रामीण, आदिवासी भागात शिक्षणाचे काम करताना आलेल्या विविध अनुभवांचे संकलन ‘शिकता शिकविता’मधून वाचकांसमोर ठेवले आहेत. ग्रामीण, आदिवासी मुलांना शिकवताना ते स्वतः कसे शिकत गेले याचे वर्णनही या पुस्तकात आले आहे. त्यांच्या लोकविलक्षण कामगिरीची दखल घेत २०११ मध्ये महाराष्ट्र फाऊंडेशन या प्रतिष्ठित संस्थेने त्यांना पुरस्कार देऊन गौरविले. महाराष्ट्रात यापूर्वीही शिक्षण क्षेत्रात अनेक प्रयोग झाले आहेत. तीच परंपरा निमकर पुढे नेत आहेत. ‘क्वेस्ट’च्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील अडीच लाख मुले आणि तब्बल आठ हजार शिक्षकांना शिक्षण, प्रशिक्षण दिले गेले आहे. ‘शिकता शिकवताना’च्या निमित्ताने उपेक्षित क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव नव्या पिढीसमोर उपलब्ध झाले आहेत. त्यातून अनेकांना प्रेरणा घेता येईल.

(सकाळ, २७ नोव्हेंबर २०२३)

Sunday, November 12, 2023

 


नव लाख तळपती...



 नव लाख तळपती... (12.11.23 सकाळ दीपपर्व पुरवणी पहिले पान)

(वैभव बळीराम चाळके)

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करता करता इतरांच्या जीवनात आपल्याला काही प्रकाश पाडता आला तर तो पाडावा, असा संदेश देणारा हा सण आहे. आपण त्यासाठी एखाद्या पणतीप्रमाणे का होईना, पण प्रयत्न करायला हवा. शेवटी अंधार भेदण्याचे काम महत्त्वाचे आहे. तोच दिवाळीचा संदेश आहे.


दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. ‘तमसोऽमा ज्योतिर्गमय’ म्हणजे ‘अंधाराकडून प्रकाशाकडे चला’ असा संदेश देणारा सण आहे. त्यामुळे दिव्याला आणि दिव्यांच्या प्रकाशाला या सणामध्ये फार मोठे महत्त्व आहे. संपूर्ण भारतवर्षात हा सण साजरा केला जातो. त्यामुळे दिवाळीच्या दिवसात हा अवाढव्य भूप्रदेश रात्री विविध प्रकारच्या दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेला असतो. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी एका कवितेत ‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ’ अशी कल्पना मांडली आहे. ती आणखी विस्तारून आपल्याला आपली कल्पना भव्य करावी लागेल, इतके दिवे दिवाळीच्या रात्री या भूपट्ट्यावर उजळत असतात.

दिव्या दिव्या दीपत्कार... असे म्हणत आपण लहानाचे मोठे होतो आणि मग केव्हा तरी आपल्याला ज्ञानेश्वरीतील तेजस्वी सृष्टीचा परिचय होतो. दिवे आणि प्रकाश आपल्या जीवनाला असे व्यापून राहिलेले असतात.

दिवाळीत घर आणि परिसर दिव्यांनी उजळून टाकतो. त्यासाठी आपण पणत्या वापरतो, निरांजन वापरतो, समया वापरतो, आकाश कंदील वापरतो आणि अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर हरतऱ्हेचे इलेक्ट्रिक दिवेसुद्धा वापरत असतो. आपल्याकडे दिव्यांचे किती तरी प्रकार आढळतात. आमचे एक मित्र मकरंद करंदीकर गेल्या पन्नास वर्षांपासून नानाविध दिवे जमा करण्याचा छंद जोपासत आहेत. सर्वाधिक दिवे जमवण्याचा विक्रमच त्यांच्या नावावर आहे. त्यांच्याकडील दिव्यांचा संग्रह पाहणे ही एक पर्वणीच असते. अनेक वर्षे दीप आमावस्येला ते या दिव्यांचे प्रदर्शन भरवत असतात.

माती, दगड, तांबे, पितळ, लोखंड, चांदी, सोने अशा नानाविध वस्तूंमधून दिवे साकारले जातात. आपल्या मंदिराबाहेर या दीपमाळा असतात, त्या दगडातून साकारलेल्या असतात. आपल्या रोजच्या वापरात चिमणी, कंदील असे दिवे असत. आता बल्ब, ट्यूब, एलईडी आले. विविध कामांसाठी विविध दिव्यांचा वापर आपण करत आलो आहोत. ध्यान आणि त्राटकासाठी छोटा दिवा वापरणारे आपण युद्धासाठी मशाली घेऊन बाहेर पडत होतो. तेथून इलेक्ट्रिक दिव्यांपर्यंत आणि त्यांच्याही पुढे महाप्रचंड झोतांपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. प्रकाश अर्थात अग्नी हा संपूर्ण तेजस्वी असतो. ज्ञानेश्वरीमध्ये दीपकळी धाकुटी असा उल्लेख आलेला आहे. या दीपककळीपासून म्हणजे छोट्या पणतीपासून ते थेट सूर्यापर्यंत आपल्याला प्रकाशाची नानाविध रूपे माहिती आहेत. सूर्य अंधःकार नाहीसा करतो, तेच काम इवलीशी पणतीसुद्धा करत असते. ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ’ हा श्लोक आपण अनेकदा म्हटलेला असेल; पण अनेकांच्या हे लक्षातच येत नाही, की या श्लोकात श्रीगणेशाचे तेज कोटी सूर्याइतके प्रखर आहे असे म्हटले आहे. आपल्याला त्या तितक्या तेजाची कल्पना करायची म्हटले तरी ते अशक्य... श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूपदर्शन घडवले, तेव्हा प्रथम त्याला ते पाहण्याची दृष्टी दिली असे म्हणतात. आपल्याला या इतक्या मोठ्या तेजाची कल्पना करायची तर आधी आपली कल्पनाशक्ती विस्तारून घ्यावी लागेल.

दिवाळी या प्रकाशोत्सवात इतरांच्या जीवनात आपल्याला काही प्रकाश सोडता आला तर सोडावा, असा संदेश देणारा हा सण आहे.

Tuesday, November 7, 2023

मनस्वी लेखक


 

मनस्वी लेखक

मनस्वी लेखक

आपल्या साहित्यनिर्मितीने केरळसह जगभरात मानसन्मान मिळविलेले मल्याळम भाषेतील ज्येष्ठ कथाकार ९२ वर्षीय टी. पद्मनाभन यांनी आजवर साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कारांना गवसणी घातली आहेच; पण त्यासोबत अनेक महत्त्वाचे पुरस्कार नाकारण्याचे धैर्यसुद्धा वेळोवेळी दाखवले आहे. लेखक हा मनस्वी असतो. त्याला आपला स्वायत्त अवकाश टिकवायचा असतो. याबाबतीत दक्ष असलेले पद्मनाभन् हेही त्यापैकीच. पण त्यामुळे सुरुवातीला ‘पुरस्कार नाकारणारा लेखक’ अशी त्यांची प्रतिमा झाली होती. अलीकडेच त्यांना केरळ सरकारच्या वतीने दिला जाणारा ‘केरळ ज्योती अवॉर्ड’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले.  

 आजच्या जगात एकीकडे जग तंत्रज्ञानामुळे अगदी जवळ आले आहे, असे म्हटले जाते. परंतु माणसाला मात्र एक प्रकारचे एकाकीपण भेडसावते आहे. टी. पद्मनाभन यांच्या कथांमधून हा अंतर्विरोध कलात्मक रीतीने व्यक्त होतो. कायद्याचे शिक्षण घेऊन त्यांनी वकिली सुरू केली होती; पण त्यांचा मूळ पिंड लेखकाचा होता. तो त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. लिहिण्याची हौस त्यांना आधीपासूनच होती. पुढे त्यांच्या लेखनकलेला आणखी बहर आला. त्यांचे बालपण दारिद्र्यात गेले. कन्नूर या केरळातील एका छोट्या गावात पुथियिदथ कृष्णन नायर आणि देवकी (अम्मुकुट्टी) या दाम्पत्याच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. ते काही महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि आईवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. मद्रास लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. थालास्सेरी आणि कन्नूर या न्यायालयांमध्ये त्यांनी वकिली केली. याच काळात ते लेखक म्हणून घडत गेले. एफएसीटीचे अध्यक्ष एमकेके नायर या मोठ्या माणसाने पद्मनाभन यांना बोलावून घेतले. तेथे जाऊन त्यांनी विविध पदांवर काम केले. पुढे ते या कंपनीचे उपसरव्यवस्थापक झाले. १९८९मध्ये ते तेथून निवृत्त झाले. त्यांच्या पत्नी कल्लनमर्थोडी भार्गवी यांचा २०१४ मध्ये मृत्यू झाला आणि पद्मनाभन एकटे उरले. १९४८ मध्ये त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली. आजवर त्यांनी शेकडो लघुकथा लिहिल्या आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या जीवनातील विविध अनुभवांवर ‘माझ्या गोष्टी- माझे जीवन’ नावाचे एक चरित्रात्मक पुस्तकसुद्धा लिहिले आहे. त्यांच्या कितीतरी कथा विविध भाषांमध्ये भाषांतरित झाल्या आहेत. केवळ देशी भाषा नव्हे; तर रशियन, फ्रेंच, इंग्लिश आदी भाषांमध्येसुद्धा त्यांच्या कथा भाषांतरित झाल्या आहेत आणि तिथल्या रसिकांच्या पसंतीला उतरल्या आहेत. अत्यंत सरळ भाषेत लिहिलेल्या कथा हे त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचे जाणकार सांगतात. प्रकाशम परथुन्ना ओरु पेनकुट्टी (तेजस्वी मुलगी, १९५५), ओरु कथाक्रिथु कुरिशिल (एका कथाकाराला सुळावर चढवले जात आहे, १९५६), माखन सिंघिन्ते मरनम (माखन सिंहचा मृत्यू, १९५८), काला भैरवन, गौरी (१९९३) आणि मरया (२०१७) या त्यांच्या प्रमुख साहित्यकृती आहेत. यातील ‘गौरी’ या त्यांच्या कथेवर १९८२ मध्ये दूरदर्शनने संगीतमय सादरीकरण केले होते. याच कथेवर पुढे त्याच वर्षी ‘कवियूर शिवप्रसाद’ नावाचा चित्रपटसुद्धा आला होता. माणसाचा एकटेपणा आणि हतबलता हे त्यांच्या अनेक कथांचे सूत्र असल्याचे समीक्षक सांगतात. पद्मनाभन यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात अनेक पुरस्कार नाकारले. १९९६ मध्ये त्यांनी केंद्राचा साहित्य अकादमी पुरस्कारही नाकारला होता. अर्थात काही पुरस्कार त्यांनी स्वीकारलेसुद्धा. पण शेवटी अस्सल कलावंत हा पुरस्कारांच्या पलीकडचा असतो.

- वैभव चाळके सकाळ -नाममुद्रा -6.11.23