Thursday, August 31, 2017

शपथ स्वच्छतेची

शपथ स्वच्छतेची

बालनाटिका

(सर्व जण गात गात मंचावर येतात...)
‘निर्मल’ सोसायटीचे आम्ही रहिवासी.
 आमच्या सोसायटीत स्वच्छतेची काशी!!
(मग हळूहळू सगळे जण भिंत करून उभे राहतात.)
(एक जण ऑफिसला चाललाय. एकदम शर्ट झाडत उभा राहतो आणि वर पाहत म्हणतो-)
भापकर- ए, डोळे फुटले काय रे? कसले घाणेरडे पाणी ओतलंस? कोण आहे तो!
किशोर - (वरून आवाज येतो) सॉरी... सॉरी हं... भापकर काका!
भापकर- किश्या, सॉरी काय? माकडा, शर्ट खराब झाला माझा. आता माझी नोकरी जाईल. मग माझं घर तुझा बाप चालवेल काय रे?
(तिसरा माणूस बाजूने जात असतो. तो हा संवाद ऐकतो आहे. तो विचारतो-)
कदम- अहो, पण त्या पाण्याचा आणि नोकरी जाण्याचा काय संबंध?
भापकर- या असे... या शहाणपतराव! सांगतो कसा ते. (मग वर पाहत) ...आणि माकडा तू तिथंच थांब. तुला पाहायचंय अजून... तर तुम्हाला नोकरीचा संबंध हवा होता ना? ऐका! आता माझ्या बॉसचा जावई आणि मुलगी येणार आहेत फिलिपाईन्सवरून... त्यांना आणायला जायचंय मला... ती बघा गेटवर भाड्याची कार उभी आहे. आता कसा जाऊ? आणि आणायला गेलो नाही की गेली नोकरी...
कदम- घरी जाऊन बदला ना कपडे. दोन मिनिटे तर लागतील...
अजय - काका, जा आटपा... पटपट बदलून या कपडे आणि निघा...
भापकर- ए, काकावाल्या... तुझा भाऊ ना तो. त्या मूर्खाला कळत नाही. आणि दोन मिनिटांत कपडे बदला... अरे तीन माळे चढायला दोन मिनिटे लागतील. तोवर तो गाडीवाला थांबला पाहिजे ना...
कदम- का नाही थांबणार?
भापकर- शेअरिंग कार आहे ती... ती तीनच मिनिटे थांबते. ती संपतील आता...
कोरे - अणावकर... अणावकर... (जोराने ओरडत येतो) कुठे आहेस रे?
अणावकर - का? काय झालं काय कोकलायला?
कोरे - संडासचा पाईप तुटलाय... खाली घाण पसरलय दिसत नाही का? कसले सेक्रेटरी तुम्ही?
अणावकर- सगळ्यांची घाण काय सेक्रेटरीने काढायची काय?
कोरे- सगळ्यांची नाही हो... तुमच्यामुळे झालेली आहे. तुमच्या चिरंजीवाने  काल पाईप तोडलाय.. आज सकाळपासून वाहतोय तो...
अणावकर- बोंबलू नका... तुमची सगळी घाण काढेन... सर्वांसमोर... सांगून ठेवतोय...
कोरे- काय घाण करतो हो आम्ही... सांगा ना?
अणावकर- तुमची मिसेस गॅलरीत केस विंचरते... ते अनेकदा आमच्या ताटापर्यंत पोहचतात. तुमची कन्या खाली मातीत किल्ले बनवत बसते... सगळ्या सोसायटीत धूळ होते... आणि तुमचे पप्पा... खोकून खोकून आवाजाचे आणि हवेचे प्रदूषण करीत असतात त्याचे काय? चांगला डॉक्टर बघत नाही तुम्ही... खोकतोय बिचारा म्हातारा...
कोरे- अणावकर, ही असली अस्वच्छता तर सगळी सोसायटीच करते. गेटवर तुमच्या विंगची मुलं उभी राहतात.  त्यांची भाषा ऐका... शिसारी येते.
अरुणा काकू - शीशी... काय काय बोलतात ही मुलं. - ऐकायला लाज वाटते. मी पोथी वाचत बसते तर दर दोन पाच मिनिटाला यांचे अभद्र शब्द कानावर येतात...
कोरे- तुम्ही तोंड खुपसू नका! तुम्ही जे काय उद्योग करता ना धर्माच्या नावाखाली ते म्हणजे पाप करून पापशालन करण्यासारखे आहे. दुपारी तंबाखूची मशेरी भाजता आणि रात्री धूप घालता! फायदा काय हो त्याचा?
अरुणा काकू- तुमच्या मुलांच्या तोंडच्या शिव्या माझी नातही उच्चारायला लागली आहे. परवा मुन्नीच्या नानाची टांग टांग... असे काही म्हणत होती...
सविता काकू - आणि काय हो, सत्यनारायणाच्या पूजेला डान्स करतात आपली मुलं... ती गाणी तरी काय, मुन्नी बदनाम हुई... शिलाच्या आयचा घो... दिल बत्तमीज...? मुलांच्या भाषेची आधी स्वच्छता केली पाहिजे.
अणावकर- त्या आधी तुमच्या हिशोब तपासनीस नवर्‍याने सोसायटीच्या हिशोबात घाण करून ठेवलय ती आधी स्वच्छ करायला पाहिजे...
सविता काकू- पोराच्या वह्या बघा... त्या आधी स्वच्छ करा... काय ते  अक्षर... घाण घाण नुसती!
अध्यक्ष - शांत व्हा! शांत व्हा! अरे अशी अस्वच्छता सर्वत्रच पसरली आहे. ती आपल्या नात्यातही उतरली आहे. लक्षात ठेवा. शरीर, घर, परिसर अस्वच्छ झाला की, शारीरिक रोग होतात आणि मन व नाती अस्वच्छ झाली की, मानसिक रोग होतात. तेव्हा आज यानिमित्ताने आपण सोसायटीतील सर्व जण शपथ घेऊया... स्वच्छतेची शपथ...
सर्व जण- ‘आम्ही निर्मल सोसायटीचे सर्व सदस्य मनापासून अशी शपथ घेतो की, आम्ही आमचे मन, शरीर, सोसायटी, आमचे आचार, विचार यांची स्वच्छता अबाधित राखू! या सर्व ठिकाणी अस्वच्छता होणार नाही, याची काळजी  घेऊ!’
एक मालवणी- हे देवा म्हाराजा... आम्ही सर्व जण आज तुला गार्‍हाणा घालतो  की, आमच्या तनामनात घरा-आवारात कसलीच घाण होणार नाही याची काळजी घे रे देवा म्हाराजा...
सर्व जण- होय म्हाराजा...
दुसरा मालवणी- मनात दुष्ट विचार, पोटात घाणेरडे पदार्थ आणि आवारात कचरा टाकण्याची आमची दुर्बुद्धी दूर कर रे देवा म्हाराजा!
सर्व जण- (एकत्र गातात-)
स्वच्छ तनमन, स्वच्छ परिसर
स्वच्छ भारत करू
सर्व मिळुनी करू स्वच्छता
स्वच्छ ध्यास हा धरू ॥
 (पडदा)
वैभव बळीराम चाळके
9702 723 652

Tuesday, July 4, 2017

 विस् मरण 


पृथ्वी आपल्या भ्रमणकक्षेतून सुटणार आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अंत करणारी जगबुडी होणार ही बातमी आल्यापासून आता 15 तास होऊन गेले आहेत. अवघ्या जगात काल सायंकाळी सात वाजता सुरू झालेला हलकल्लोळ शमून सर्वत्र मरणकळा पसरली आहे. स्मशानशांततेने जगावर पांघरूण ओढलंय. वातावरणात नुसताच मरणगंध पसरलाय. माणूस माणूस उरलेला नाही. विड्राअल सिमटम्सही संपून गेले आहेत.
जगबुडीच्या बातमीचा परिणाम झालेला नाही तो फक्त मानवेतर सृष्टीवर... माणूस मात्र पार कोलमडलाय. भिकारी आणि लफंगे काल रात्रीपासून सताड उघडी पडलेली दुकाने लुटून खूश झाले होते, तेही काय अजब चाललंय सारं, म्हणून धास्तावून निपचीत पडले आहेत.
मंदिरे, चर्च, मशिदीत माणसं प्रार्थना करून थकून पडली आहेत. एकेकाचा चेहरा पाहू नये, इतका भकास दिसतो आहे. बाजारपेठा माणसांशिवाय उघड्या पडल्या आहेत. रुग्णालयात डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, स्टाफ नाही. रुग्ण नुसतेच पडलेत. रस्त्यांवर वाहने नाहीत. रेल्वेे, रिक्षा, टॅक्सी स्थानके ओस पडली आहेत. विमानतळांवर विमाने उतरून पडली आहेत. शाळा, कॉलेजांच्या इमारती मढ्यासारख्या उभ्या आहेत. माणसं असून नसल्यासारखी सगळी पृथ्वी...
पस्तिशीतला शान आपल्या घराच्या हॉलमध्ये अस्वस्थ बसून फोन लावतोय. रिंग वाजते, पण फोन कोणीच उचलत नाही. तो पुन्हा-पुन्हा फोन लावतो. मग आतल्या खोलीत चक्कर टाकून येतो. पुन्हा फोन लावतो. मग टीव्ही लावतो. टीव्हीच्या पडद्यावर मुंग्या... चॅनेल बदलतो. एक-दोन-तीन... नवव्या चॅनेलवर एक वृत्तनिवेदिका दिसू लागते. “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष मेरी सुलेमान बाटलीवाला यांनी जगभरातील शास्त्रज्ञांना व्हाइट हाऊसमध्ये पाचारण केले आहे. ते काही तासांत पोहचतील. एक यान अंतराळात सोडले जाणार असून त्यातून कोणत्या वस्तू व कोणता संदेश अंतराळात पाठवायचा यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. लोक हो, जगातील सर्व प्रसारसेवा ठप्प झाल्या असून न्यूज नेटवर्क ही आमची एकमेव सेवा सध्या आपल्या सेवेत आहे. स्टीफन हॉकिंग यांनी लवकरच माणसाच्या वस्तीसाठी गृह शोधावा लागेल असे 2017 साली भाकीत केले होते. ते एवढ्या लवकर आठवावे लागेल असे कोणासही वाटले नव्हते. लोक हो, आपण सारेच जण जाणार आहोत. उद्या पाच वाजेपर्यंत किंवा आपला संपर्क असेपर्यंत आम्ही आपल्याला सेवा देऊ.”
शान अस्वस्थ... फोन फिरवतोय... रिंग वाजतेय... प्रतिसाद नाही. आतल्या खोलीतून मोठी किंकाळी ऐकू येते. तो आतल्या खोलीत जातो...
त्यांची पत्नी अ‍ॅना बाळंतवेणांनी धास्तावलेय... धपापतेय... हा डोक्यावर हात थोपटून तिला धीर देतो...
ती पुन्हा एकदा उसळी देऊन ओरडते. तो आता खाली पाहतो, तर बाळ जन्मास आले आहे. तो ते बाळ उचलतो आणि तिच्या छातीवर ठेवतो.
ती बाळाकडे पाहते. ते लालबुंद चेहर्‍याचे... इवल्याइवल्या नाक-कान, डोळ्यांचे इवले बाळ पाहून ती अपार समाधानाने हसू लागते... नवर्‍याच्या चेहर्‍यावर आनंद उमटू पाहतो... उमटत नाही... तो तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आधार देतो... जगभर माणसे मरणकळेने काळी पडली आहेत. हसते आहे ती बाळाच्या आगमनाने आणि प्रसूतिवेदनेतून सुटल्यामुळे मृत्यूच्या गडद छायेचे विस्मरण झालेली एकटी अ‍ॅना!

- वैभव बळीराम चाळके

Thursday, February 16, 2017

कवितेतील फुलपाखरे

ज्ञानपीठाची उंची

परवा लोकलमध्ये प्रवासात मी विजया
राजाध्यक्ष यांनी संपादित केलेले ‘करंदीकरांचे
समग्र लघुनिबंध’ वाचत होतो. मित्राला म्हटलं
हा असा अवलिया लेखक आहे की, दर दोन
पानानंतर मी मनातल्या मनात या माणसाचे
पाय धरतो. यांच्या निवडक कवितांच्या ‘संहिता’
नावाचा संग्रह आहे, तो मी कित्येकदा वाचलाय.
पुन्हा पुन्हा वाचतो आणि पुन्हा पुन्हा या
माणसाची कमाल वाटते. या कविमहात्म्याला
प्रत्यक्ष ऐकण्याचा अनेकदा योग आला. यातच
काही जीवन सार्थक झाले! ज्ञानपीठाची उंची
केवढी? हे जाणून घ्यायचं असेल तर कवी
मंगेश पाडगावकरांनी संपादित केलेला ‘संहिता’
हा काव्यसंग्रह वाचावा.
‘संहिता’ वाचताना मी वेळोवेळी टीका अधोरेखा
करून ठेवलेल्या ओळी इतक्या आहेत की, त्या
सर्व देणे अशक्यच. पण त्यातल्या निवडाव्या
कोणत्या, हाही प्रश्न पडतो. हे घ्या काही तुकडेकाळ्या
कुलपातून कुजते धान्य/आणि
तळमळ्यात अगा? अर्भके/काळाच्या क्यूत (ती
जनता अमर आहे)...
आणि जिचा आत्मा एक/ती जनता अमर आहे
(ती जनता अमर आहे)
छातीच्या सापळ्यातील मुठीएवढ्या उंदिरावर/
कशाला वटारतेस मांजराचे डोळे, ज्यांतील
संपले रडण्याचेही सामर्थ्य? (त्रिवेणी)
कुरकुरणार्‍या पाळण्यामधून दोन डोळे
उमलू लागतात आणि मग इवल्या इवल्या
मोदकमुठीतून तुझ्या स्तनांवर। बाळसे चढते।
(झपताल)
सद्गुरू - वाचोनी। सापडेल सोय। तेव्हा जन्म
होय? धन्यधन्य (आततायी अभंग)
जगाचे पोशिंदे। भुकेने भाजती। आणखी
माजती। मधलेच (आततायी अभंग) जागृतांनो
फेका। प्राणांच्या अक्षता । ऐसा योग आता पुन्हा
नाही? (आततायी अभंग).
- शब्दवैभव

कवितेतील फुलपाखरे

भूक

कवितेचा छंद हा जगण्याचा, जगणं समजून घेण्याचा,
समजून जगण्याचा छंद आहे. काही वर्षांपूर्वी मी एक
छोटा लेख लिहिला होता ‘हल्ली विनोद वाचल्यावर रडू
येते.’ तेव्हा एक ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणाले होते, असे नको
रे करू! विनोदात असे दुःख पाहू लागलास तर जगणे
अवघड होईल. परवा व्हॉटस्अ‍ॅपवर एक विनोद आला होता.
तो वाचून मला पुन्हा रडू आले. विनोद होता-
‘ती सध्या करते काय? (मग बरीच मोकळी जागा...
आणि मग उत्तर) ती काहीही करू दे. तू फ्लॅटफॉर्म आणि
पायदानातील अंतरावर लक्ष दे!’
मला लोकलने प्रवास करणार्‍या बापुडवाण्या
चाकरमान्यावरील ही अत्यंत करुण टिप्पणी वाटली.
बिचारा कधी खाली जाईल त्याचा नेम नाही.
आज गुलजारांच्या ‘त्रिवेणी’चा शांता शेळके यांनी केलेला
अनुवाद वाचताना एका त्रिवेणीने असाच विचार मनात
आणला. त्रिवेणी अशी आहेकोण
खाणार? कुणाचा हा वाटा?
दाण्यादाण्यावर लिहिले आहे नाव
शेठ सूरचंद मूलचंद जेठा!
केवढी करुण अवस्था आहे सामान्यांची! दाण्यादाण्यावर
लिहिले आहे नाव म्हणायचे. पण प्रत्येक दाण्यावर एकाच
शेठचे नाव लिहिलेले ही सगळ्यांची शोकांतिका! त्यातही
शेठ, सूरचंद, मूलचंद, जेठा या चारही अक्षरातले वजन
गरीब कसा चिरडला जातोय ते सुचविणारे!
मला वामनदादा कर्डक यांचे गाणे आठवले. त्यांनी
विचारले होते,
सांगा आम्हाला टाटा बिर्ला बाटा
कुठं आहे हाय हो
सांगा धनाचा साठा नि आमचा
वाटा कुठं हाय हो
इथल्या पददलिताची अवस्था इतकी वाईट की धनवान
टाटाबिर्लाबाटाचा पत्ताही त्याला माहीत नाही. तो त्याला
इतराकडे विचारावा लागतोय. अर्थातच धनाचा आपला
वाटा मिळण्याची शक्यता तेवढीच कमी!
कधी तरी एक गाणे लिहिले होते
लागं पोटाला या भूक
एक एवढीच चूक
अशा चुकीसाठी घ्यावं
का रं मुठीमध्ये नाक? दादा रं दादा रं ...
एका अभंगिकेत भुकेबाबत लिहिले आहे-
भुकेल्याच्या लेखी। कोण जीवशिव
एका वडापाव। ब्रह्म त्याचे

- शब्दवैभव

Monday, January 30, 2017

कवितेतील फुलपाखरे

कवितेतील
 फुलपाखरे

फुलपाखरांशी खेळतच आमची पिढी मोठी झाली.
सोबतीला होती ग.ह. पाटील यांची कविता -
छान किती दिसते! फूलपाखरू
या वेलींवर! फुलांबरोबर
गोड किती हसते! फूलपाखरू
पंख चिमुकले! निळेजांभळे
हलवून झुलते! फूलपाखरू
डोळे बारीक! करिती लुकलूक
गोल मणी जणू! फूलपाखरू
मी धरू जाता! येई न हातां
दूरच ते उडते! फूलपाखरू
ही कविता आमच्या पिढीच्या सर्वांच्याच गळ्यातला
ताईत होऊन राहिली आहे. कविता म्हटले की, ज्या
दोन-चार कविता हमखास आठवतात त्यातली ही
एक कविता. तिचे कवी कोण, हे कदाचित अनेकांना
माहीत नसेल. पण कविता मात्र तोंडपाठ आहेच.
तर मराठीतील आणखी कोणकोणत्या कवितांत
‘फुलपाखरू’ आले आहे याचा विचार करू लागलो
की मला दोन शेर आठवतात. हे दोन्ही शेर मला
कविमित्र कैलास गांधी याने प्रथम ऐकवले. त्यानंतर
ते अनेकदा अनेक ठिकाणी अनेकांकडून ऐकावयास
मिळाले. त्यातला पहिला शेर आहे. गोव्याच्या
कवियित्री राधा भावे यांचादु:खालाही
चिमटीमध्ये धरता येते।
आणिक त्याचे फूलपाखरू करता येते॥
राधाजींच्या या शेराला दाद न देईल तो अरसिक!
केवढा जबरदस्त विचार मांडलाय! दु:खाचे फुलपाखरू
ही प्रतिमाही एकदम नावीन्यपूर्ण! पुन्हा फुलपाखराशी
मानवी मनाचे जे पूर्वबंध आहेत ते जागवले म्हणजे या
शेराची उंची कळू लागते!
दुसरा शेर आहे गजलकार चित्तरंजन भट यांचा!
हो, गजलसम्राट सुरेश भट्ट यांचे हे चिरंजीव. तेही
अफलातून गजल लिहितात. आजच्या लोकप्रिय
कवींच्या तोंडी त्यांचा हा शेर सदैव ऐकावयास मिळतो.
चित्तरंजन लिहितातकोणत्या
चिमटीत मी त्याला धरू
हिंडते मेंदूत जे फुलपाखरू
गजलेतील नवा विचार म्हणून या शेराकडे
पाहिले जाते. गजलच नव्हे तर एकूण कवितेत असा
नवा विचार मांडला गेला पाहिजे. नव्या प्रतिमांची,
कल्पनांची नवकवींनी कास धरली पाहिजे. भाषेचा
माथा तरच उन्नत होईल.
- शब्दवैभव

कवितेतील फुलपाखरे जागी झालेली बाई

कवितेतील
 फुलपाखरे

जागी झालेली बाई

बाईच्या जगण्याचं रडगाणं तर कित्येकांनी गायलंच
आहे. पण तिच्या दुःखाच्या अथांग काळ्याशार
पाण्यातून मान वर करून तिच्या आत ही अथांगता
फोडून टाकण्याची ताकद असल्याची जाणीव देणारी
कवयित्री नीरजा यांची कविता मराठी काव्यरसिकाला
नेहमीच आपली वाटत आली आहे.
नीरजा यांचा ‘मी माझ्या थारोळ्यात’ हा दीर्घकवितांचा
संग्रह आता माझ्यासमोर आहे. मी काहीही न बोलता
या एवढ्याच प्रस्तावनेसह त्यातले मी अंडरलाइन करून
ठेवलेले काव्यतुकडे एका मागोमाग एक तुमच्यासमोर
ठेवतो आहे. अस्वस्थ नाही झालात, डोळे खाडकन् नाही
उघडले, बाईला काय हवं ते नाही कळलं तर अजून
तुम्हाला खूप चालायचं नीरजापर्यंत पोहचायला याची
खूणगाठ मनाशी बांधून स्वतःला माफ करा. नीरजा
लिहितात - ‘मला व्हायचं आहे आता/भयमुक्त/सोडवून
घ्यायचं आहे स्वतःला/तुझ्यातून/पुन्हा एकदा व्हायचं
आहे/आदिम अथांग/पुसायचा आहे/माझ्या कपाळावरचा
इतिहास/तू लिहिलेला/खुडायच्या आहेत मुळ्या/
रूढिपरंपरांच्या/खोडायची आहेत अक्षरं/माझ्यासाठी
तू तयार केलेल्या/नियमावलीतील/भिडायचं आहे
थेट/माझ्यातल्या शक्यतांना’
‘आज माझ्या श्वासात/मी साठवते आहे/स्वातंत्र्याचा
करकरीत गंध/धुडकावते आहे/वर्षानुवर्षांची तुझी
एकछत्री राजवट’
‘बाईनं द्यायला हवा नकार/ह्या व्यवस्थेला/असं वाटतंय/
तुझ्या काही मित्रांना/हातात हात घेऊन माझा/ते काढू
पहाताहेत मला/माझ्याच आयुष्याच्या चिखलातून/
पण माझ्यासाठी/आणि माझ्या इतर मैत्रिणींसाठी/पुरेसे
नाहीत/हे दोन-चार हात/हजारो हातांनी/यायला हवंस तू
माझ्याकडे’
‘गंगेसारखी पवित्र हवी बाई/आणि मर्यादेत रहाणारीही;/
दुथडी भरून वहायला लागली/किनारे ओलांडत
अस्ताव्यस्त/तर/तू वसवलेली गावं उद्ध्वस्त करून
जाईल/हे तुझ्या मनात वसलेलं भय किती आदिम आहे/’
‘मला परतायचं आहे/पुन्हा एकदा/त्या आदिम अंधार्‍या
गुहेत/जिथं होते मी विमुक्त/आणि तुझ्याही मनात नव्हतं
रुजलं विष/लिंगसत्तेचं.’
‘ती बाई कशी काय झोपू शकते/गाढ/ह्या कानठळ्या
बसवणार्‍या/ग्लोबलायझेशनच्या आवाजात?/माझ्या
मनात चाललेल्या/स्फोटांच्या अखंड मालिकांचा आवाज/
ऐकू येत नाही का तिला?/की जाणूनबुजून घेते आहे ती
सोंग/निवांत असण्याचं?’
- शब्दवैभव

कवितेतील फुलपाखरे- जीवनाची क्षणभंगुरता

कवितेतील
 फुलपाखरे

जीवनाची क्षणभंगुरता

तुम्हाला ती गोष्ट माहीत असेलच! एका राजाकडे
एक साधू भिक्षा मागण्यासाठी येतो. राजा गडबडीत
असल्यामुळे तो साधू महाराजांना म्हणतो, महाराज
आज आम्ही कामात आहोत. उद्या या आणि
आपल्याला जे हवे आहे ते घेऊन जा. महाराजांच्या
या विधानावर साधूला हसू फुटते. साधू का हसला?
हा प्रश्न राजाला बेचैन करतो. राजा साधूच्या
मागे जाऊन त्यांना विचारतो, साधू महाराज, मी
तुम्हाला उद्या याच वेळी या हवे ते देतो, असे म्हटले
असतानाही आपण हसलात का?
साधू महाराज नम्रपणे म्हणाले, राजे महाराज,
जेथे जीवनाचे पुढच्या क्षणी काय होणार याचा
भरवसा देता येत नाही, तेथे तुम्ही उद्याची गोष्ट
केलात म्हणून हसू आले.
राजकवी भा.रा. तांबे यांनी ‘जन पळभर
म्हणतिल हाय हाय’ असे सांगून ठेवले आहे.
जीवनाच्या नश्वरतेबद्दल बोलताना त्यांनी थेट
रामकृष्णांचाच दाखला दिला आहे-
 रामकृष्णही आले गेले
त्याविण जग का ओसचि पडले।
राम आणि कृष्णाच्या जाण्याने जगावर काही
परिणाम झाला नाही तर आपण त्यांच्यासमोर
कोण क्षुद्र!
आमच्या गावातील एक भजनी बुवा भजन
म्हणत असे- ‘नाही कुणाचा कुणी तुझा नव्हे रे
कुणी, अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे
म्हणुनी...’
लोकसंस्कृतीच्या अभ्यासक तारा भवाळकर
यांनी एका लेखात पारंपरिक ओवी दिली आहेशेजारीणबाई,
नको म्हणूस माझं माझं
 नदीच्या ग पलीकडे जागा साडेतीन गज
आपल्या बहिणाबाई चौधरींनी सांगितलंय-
आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर
अरे जगनं मरनं एका सासाचं अंतर
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ‘मातीवर चढणे
एक नवा थर अंती’ असे म्हटले आहे. जीवनाची
क्षणभंगुरता हा कवींचा नेहमीच औत्सुक्याचाचिंतनाचा
विषय होऊन राहिलेला आहे.
- शब्दवैभव

कवितेतील फुलपाखरे- सूर्य

कवितेतील
 फुलपाखरे

सूर्य

‘जे न देखे रवी ते देखे कवी’ अशी कवीची
महती गायली जाते. म्हणजे कवी हा सूर्यापेक्षा
मोठ्या दृष्टीचा माणूस आहे. त्याचा प्रत्यय
आपल्याला अनेकदा येतो. गणेशाचे वर्णन
करताना ‘सूर्यकोटी समप्रभ’ असे म्हटले आहे.
म्हणजे कोटी सूर्यांइतकी प्रभा आहे असा.
याचा अर्थ महाप्रभेच्या कोटी सूर्यांची प्रभा
एकत्र केली ती केवढा प्रकाश निर्माण होईल
याची कल्पना कवीने केली आहे. रसिक म्हणून
ती आपल्याला करता आली तरच आपण कवीने
निर्माण केलेली प्रतिमा समजून घेऊ शकू.
दुसरी एक गोष्ट ही कल्पना करताना कवीने
केलेली आहे. कवीने उपमा देताना महाप्रभावान,
महातेजस्वी, सूर्यालाच गणेशाच्या प्रभेपेक्षा
कोटीपटींनी छोटा करून दाखवला आहे.
असे अन्यत्र कोठे आढळते का? तर आढळते!
मला याची दोन उदाहरणे माहीत आहेत. एका
काव्यसंमेलनात गझलकार सदानंद डबीर यांनी
महामानव बाबा आमटे यांचा उल्लेख करून
पुढील शेर ऐकविला होताअंधार
सोबतीला घेऊन चाललो मी
लाजून सूर्य आता मागून येत आहे
अर्थातच या शेराला दाद मिळाली. आपल्या
सूर्यमालेतील सर्वात मोठ्या वस्तूला लाज
आणण्याची धमक असणारा बाबा आमटे
नावाचा माणूस आणि तशी कल्पना करणारा
कवी या दोन्ही गोष्टी दाद देण्याजोग्याच आहेत,
नाही का?
अलीकडेच हुल्लड मुरादाबादी यांचा ‘जिगर
से बीडी जला ले’ नावाचा संग्रह घेतला. त्यात
वरील शेराचा सख्खा भाऊ भेटलानामवाले
नाज मत कर देख सूरज की तरफ
ये सवेरे को उगेगा शाम को ढल जाएगा
मला मुरादाबादींना वाह म्हटल्यावाचून
राहवले नाही. कधी तरी एक अभंगिका लिहिली
होती. आता तीही आठवते आहे-
भास्कर तस्कर । करितो तस्करी ।
प्रकाशाची सारी । मालमत्ता॥
         -शब्दवैभव 

उडणारा घोडा - - वैभव बळीराम चाळके


उडणारा घोडा


-वैभव बळीराम चाळके

आज रविवार. मस्त मजेचा दिवस. सार्थ उशिरा
उठला. नाश्ता करून झाल्यावर त्याने मागच्या
रविवारी मिटून ठेवलेली चित्रकलेची वही उघडली.
काळ्या रंगाचे जेलपेन घेऊन त्याने बैठक मारली.
आता पुढचा तास-दीड तास हा इथून उठणार नाही.
हे आई-बाबांनी ओळखले. लहान असल्यापासूनच
त्याला चित्रकलेची आवड आहे. यंदा तो सातवीत
आहे. अभ्यासातून वेळ मिळत नाही म्हणून तो हल्ली
फक्त रविवारी चित्रे काढतो. पूर्वी तो खूप चित्रे काढत
असे. आता मात्र दर रविवारी तो एकच चित्र काढतो.
त्यात गेले दोन तीन महिने त्याने घोड्यावरच सारे लक्ष
केंद्रित केले आहे. दर रविवारी तो एक नवा घोडा
रेखाटतो. काल्पनिक घोडा. कधी सहा पायांचा...
कधी लांब शेपटाचा... कधी पंख असलेला...
आज त्याने चार पंखांचा घोडा रेखाटायला
घेतला आहे. काळ्या जेलपेनने चित्र काढण्याची
खास शैलीच त्याने गेल्या वर्षभरात निर्माण केली
आहे. त्याच्या वयाच्या हिशोबात ही चित्रे अधिकच
सुंदर आहेत. जो पाहील तो त्याचे या चित्रासाठी
कौतुक करतो. राजवर्धनच्या वाढदिवसाला त्याने
काढून दिलेली मनीमाऊच्या पिल्लांचे चित्र केवळ
अप्रतिम होते. सर्वांनी त्याचे कौतुक केले. हा चार
पंखाचा घोडा तो इतूला देण्यासाठी रेखाटतो आहे.
घोडा त्याला अगदी लहानपणापासूनच आवडतो.
खेळण्यात घोडा, टीव्हीवर घोड्याचा कार्यक्रम,
फिरायला जायचे तर घोड्यावर बसता येईल तेथेच
अशी त्याची घोडदौड सुरू असते.
दोन तास झाले असतील तो जागचा हलला
नाही. घोडा काढून पूर्ण होताच तो पप्पाला दाखवणार
होता. पण त्याच्या एकाएकी लक्षात आले की,
आपण बराच वेळ सुसूला गेलेलोच नाही. तो पटकन
उठून धावतच टॉयलेटमध्ये घुसला. मग हातपाय
तोंड धुवून पुसून तो चित्र घेऊन पप्पाकडे गेला.
‘पाहिलात माझा घोडा....!’
‘व्वा!’
‘आवडला?’
‘अर्थातच छान आहे!’
‘पण...’
‘पण काय?’
‘एका पायाचा खूर का रे असा काढलाय! नीट
नाही आला बघ! मोडलेला पाय बांधून ठेवतात
आणि मग तो जखडून राहतो तसा दिसतोय’
‘हा, ना?’ एका पायाकडे बोट दाखवत सार्थने
विचारले.
‘हो! पण चालतंय तेवढं!’
‘सॉरी! चालणार नाही हा घोडा मी इतूसाठी
क्रिएट केलाय. अजून एक रविवार आहे. तिच्या
वाढदिवसाला मी पुढील रविवारी नवीन घोडा
काढणार’
‘पुन्हा दोन तास...’
‘हो काढणार!’ सार्थ निग्रहाने म्हणाला.
तेवढ्यात वेदू हाक मारत आला. चित्रकलेची
वही मिटून ठेवून तो खेळायला गेला. पुढच्या
रविवारी तब्बल दोन तास खर्चून त्याने घोड्याचे
चित्र पुन्हा काढले. पंखाचा हा घोडा अत्यंत देखणा
दिसत होता. आता त्याच्या पायात खोटही नव्हती.
तो घोड्याचे चित्र घेऊन इत्तूच्या वाढदिवसाला
गेला. वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला.
चित्राचेही सार्‍यांनी कौतुक केलं. इतू तर भलतीच
खूश झाली.
रात्री तो इतूकडेच थांबला होता.
रात्री मामाबरोबर इतू आणि तो आईस्क्रीम
खायला खाली उतरले, तेव्हा मामा त्याला म्हणाला,
‘माझ्याकडे एक जादूचा मंत्र आहे!’
‘जादूचा मंत्र...’ इतू आणि तो एकदम
उद्गारले
‘हो! जादूचा मंत्र! त्या मंत्राने तुम्ही चित्र जिवंत
करू शकता म्हणजे तू इतूसाठी काढलेला घोडा
जिवंत करू शकतोस!’
‘खरेच!’
‘हो’
‘मग करूया!’
‘नको इतू म्हणाली, मला ते चित्र हवे आहे. तू
दुसरा घोडा काढ आणि तो जिवंत कर’
‘माझ्या घरी आहे दुसरा काढलेला,’ तो
म्हणाला.
‘मामा मला मंत्र सांग. मी उद्या घरी गेलो की तो
घोडा जिवंत करेन’
मामाने मंत्र सांगितला. तो त्याने पाठ केला.
घरी परतताच त्याने चित्रकलेची वही काढली.
आणि तो मंत्र म्हटला. क्षणाचा विलंब न लावता
घोडा जिवंत...
तो अवाक्!
मग त्याने घोड्यावर उडी मारून मांड ठोकली.
घोडा तयार होताच त्याने लगाम खेचला. आणि
दुसरे आश्चर्य...
घोडा थेट हवेत झेपावला...
त्याला पंख होते ना! एक दोन नव्हे चार! त्याने
मग हवेत सैर केली. मुक्त सैर. कसले कसले चित्कार
काढत तो अमाप फिरून आला. त्याला विमानात
बसायची इच्छा होती. वरून जग कसं दिसत असेल
असा विचार त्याच्या मनात येई. पण आज त्याने
उंचउंच जाऊन वरून पाहिलं. जीव अगदी हरखून
गेला त्याचा.
मनसोक्त फिरल्यावर आणि चांगलाच दमल्यावर
तो परतला. बाईकच्या पार्किंगमध्ये घोडा उभा करून
तो घरी आला. धापा टाकत आईला म्हणाला,
‘आई, मज्जा आली भारी’
घरात पाऊल टाकताच त्याला टीव्हीवर आगीचे
लोळ दिसले. टीव्ही पाहणार्‍या आजीला त्याने
विचारले,
‘काय झालं ग आजी?’
‘अरे बॉम्बस्फोट झाला....’
‘कुठे?’
‘मुंबईतच’
‘पण नेमका कुठे?’
‘सीएसटी स्थानकाशेजारी....’
‘कधी’
‘आताच... ब्रेकिंग न्यूजच आहे ही...’
‘अतिरेक्यांनीच केलाय.. समुद्रमार्गे... ते पसार
झाले असल्याची माहितीही पुढे आली आहे.’
‘मी येतो हं थोड्या वेळात,’ म्हणत तो बाहेर
पडला. त्याच तिरमिरीत त्याने घोडा सोडला. उडी
मारून घोड्यावर मांड ठोकली. खबडक खबडक
करीत गेटबाहेर आला
आणि त्याने लगान खेचत
घोडा उडवला. चार पंख
पसरत घोडा क्षणात उंच झेपावला. आधी सीएसटी
गाठत त्याने अंदाज घेतला. हळूच खाली उतरून
त्याने घोडा उभा केला. पोलीस अधिकार्‍यांच्या
आसपास जाऊन चर्चेला कान दिला. कुलाबा
मच्छीमारनगरातून अतिरेकी पळाल्याची माहिती
मिळताच त्याने पुन्हा घोड्यानेही आकाशात झेप
घेतली. किनारा सोडत तो उंच झेपावला. समुद्रावर
अनेक बोटी दिसत होत्या. बारकाईने पाहताच त्याला
खूप दूरवर वेगाने जाणारी स्पीडबोट दिसली. हीच
बोट... हेच अतिरेकी... त्याने घोड्याची दिशा
बदलून लगाम खेचत वेग घेतला. त्या स्पीडबोटीमध्ये
पाच लोक होते. आपल्या माघारी कोणी नाही ना
याचा अंदाज घेत ते वेगाने चालले होते. काही
क्षणात तो त्यांच्यापासून काही शे फुटांवर पोहचला.
बोटचालक सोडून चौघांनी उडणारा घोडा आणि
त्यावरचा स्वार पाहून गोळीबार सुरू केला. क्षणाचा
विलंब न लावता घोडा उंच झेपावला. गोळीबार
होत राहिला. घोडा आता, गोळीच्या टप्प्याबाहेर
होता. गोळ्या सुसाट वेगाने येऊन गलितगात्र होऊन
समुद्रात पडत होत्या. गोळ्या वेध साधूच शकत
नाही कळल्यावर त्यांनी गोळीबार थांबवला. तसा
घोडा जवळ आला. पुन्हा गोळीबार सुरू झाला.
आता घोड्यालाच एक खेळ सापडला. तो लगेच
वर झेपावला. गोळीबार बंद झाला. पुन्हा तो खाली
आला. गोळीबार पुन्हा सुरू. घोड्याने आता
स्वतःच त्या अतिरेक्यांशी दुश्मनी घेतली होती. तो
उंच गेला अफाट वेगाने खाली येत त्याने गोळीबार
सुरू होण्यापूर्वीच त्या स्पीटबोटच्या जवळून एक
फेरी मारली. आता ते चौघे घाबरले. गोळीबार सुरू
होईपर्यंत घोडा वेधलांबीच्या बाहेर पोहचला होता.
एक अनोखा झगडा सुरू झाला. उलटसुलट दिशेने
घोड्याने खाली झेपावत दोघांना लाथांनी घायाळ
केले. पण त्या चकमकीत घोड्याला पुढच्या डाव्या
खुराच्या जरा खाली एक गोळी चाटून गेली. एक
वेदना मस्तकात गेली. घोडा आणखी चवताळला.
त्याने पुन्हा एक अफाट झेप घेत तिसर्‍याला दणक्यात
खाली पाडले. पुढची एक झेप चुकली, पण त्या
पुढच्या झेपेत बोटचालकाला घोड्याच्या खुराचा
फटका बसला. तो जागीच ठार झाला.
स्पीडबोटवर आता चार प्रेते. बोट तशीच पळत
आहे. घोडा आता बोटीच्या जवळ उडू लागला.
बोट आणि घोडा समान वेगाने धावू लागताच त्याने
बोटीतील अतिरेक्यांचा अंदाज घेतला आणि बोटीवर
उडी घेतली. ड्रायव्हर सीटवर बसत त्याने स्पीडबोटीचा
वेग कमी केला. मग बोट एकशे ऐंशी अंशात वळवून
तो किनार्‍याच्या दिशेने निघाला. घोडा बोटीवरून
उडत होता. तब्बल एक तासाच्या प्रवासानंतर बोट
किनार्‍यावर लागली. घोडा जमिनीवर उतरला.
किनार्‍यावर ही गर्दी होती. हवाईदलाने हा पराक्रम
पाहिला होता. चित्रित केला होता. हवाईदलाचे प्रमुख
किनार्‍यावर उपस्थित होते.
त्यांनी घोड्यासह त्याचे स्वागत
केले. लोक मोठ्या आनंदाने
आणि कौतुकाने पाहत होते. त्याच्या घरच्यांनाही
बोलवले होते. इतू आली होती. राजवर्धन आला
होता आणि मामाही आला होता.
हवाईदलाच्या प्रमुखांनी सार्थची पाठ थोपटली.
पाठीवर पडल्याच्या थापेमुळे त्याला एकदम
जाग आली.
‘अरे उठ,’ आजी त्याला सांगत होती.
सार्थ आता संभ्रमात... हे सारे स्वप्न होते...?
पण इतूकडे आपण गेलो होतो. आलो कधी
घरी? स्वप्न नेमके कुठून सुरू झाले?
त्याने गडबडीने उठून चित्रकलेची वही काढली.
जो घोडा त्याने जिवंत केला होता तो पाहिला. तो
तेथे होताच.
त्याची गडबड पाहून त्याच्या मागे फिरणार्‍या
आजीने विचारले,
‘काय झाले रे?’
‘स्वप्न पडलं मला...’
‘कसलं..?’
‘सांगतो नंतर’ तो म्हणाला. तेवढ्यात बाबा
आंघोळ करून आले होते. त्यांना तो म्हणाला,
‘बाबा, अहो या घोड्याचा एक पाय खराब
दिसतोय ना, त्याचे कारण कळले मला. गोळी
लागलेय त्याच्या पायाला.
आजी तूही ये, आईऽऽ ये ना ग! स्वप्नातला
पराक्रम सांगतो तुम्हाला...’

Friday, January 6, 2017


माझे नवे सदर दै. नवाकाळ मधून.....दर रविवारी.....

कवितेतील फुलपाखरे 

कवितासंग्रहांचा एक चांगला संग्रह माझ्यापाशी आहे. गेल्या २० वर्षांत जमविलेली ही माझी अमूल्य संपत्ती आहे. त्यातील कोणताही कवितासंग्रह काढला तरी त्यात मला फुलपाखरे बागडताना दिसतात. शब्दांची फुलपाखरे, अर्थांची फुलपाखरे, छंद-लईची फुलपाखरे, प्रतिमा-उपमांची फुलपाखरे... पहिल्या वाचनातच मला आवडलेल्या ओळी, शब्द यांच्यासमोर खुणा करून ठेवण्याची मला सवय आहे. पुढच्या वेळी जेव्हा संग्रह हाती येतो तेव्हा काव्यगुणांची फुलपाखरे कोठे बागडत आहेत ते मला नेमके आढळते. थोडा जरी वेळ मिळाला तरी मग मी तो या फुलपाखरांसोबत घालवतो.
अलीकडे तर या संग्रहांमधून एकसारख्या रंगांची, एकसारख्या जातीची फुलपाखरे मला मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत. एक या पुस्तकात तर दुसरे त्या पुस्तकात... कधी एखाद्या पुस्तकातल्या फुलपाखराशी नाते सांगणारे फुलपाखरू मला एखाद्या कार्यक्रमात... एखाद्या रेडिओ, टीव्हीवरील शोमध्ये... कधी वर्तमानपत्रात-मासिकांत... आढळतात. ही सजातीय फुलपाखरे मग केवढा तरी आनंद देऊन जातात. फुलपाखरांचे असे रंग निरखण्यात काळ केवढा सुंदर जातो. हा एक सुंदर असा शोधप्रवास आहे. अखंड आनंद देणारा. तो आनंद मग इतरांनाही वाटावा, असे वाटू लागते. चला तर तुम्हीही माझ्यासोबत... दर रविवारी याच जागेवर... तर्‍हेतर्‍हेची कवितेतील सजातीय फुलपाखरे पाहूया!!
                               
                                                              - शब्दवैभव